Monday 18 January 2016

कवितांचा अनुवाद- सृजनाचा पैस वाढवणारं अभिव्यक्तीचं सशक्त माध्यम

कविता लिहिता लिहिता कवितेचं स्वरूप आणि सामर्थ्य उमगत जातं तसं अनुवादाचंही आहे. कवितांचा अनुवाद करताना पावलापावलाला अडचणी येतात. त्या निवारताना प्रश्न पडतात. उत्तारांचा शोध घेता घेता अनुवाद-प्रक्रियेतले बारकावे लक्षात येत राहतात. त्यातून अनुवादाचं स्वरूप उलगडत जातं... 

कवितांचा अनुवाद ही एक दीर्घ प्रक्रिया आहे... प्रथम कविता आवडायला हवी. इतकी की तिचा अनुवाद करावा असं वाटावं. ही प्रेरणा देणारी पहिली पायरी. मात्र प्रत्यक्ष अनुवाद करताना कविता आवडणं एवढी गोष्ट पुरेशी होत नाही. तिचा अनुवाद करायचा तर ती आस्वादाहून खूप अधिक आतून-बाहेरून उमगावी लागते. त्यासाठी कविता परत परत वाचणं, शक्य असेल तर मूळ कवीशी संवाद साधणं आवश्यक असतं. त्यानंतर या उमगलेल्या, आपल्या मनात उमटलेल्या कवितेचं आपल्या भाषेत शब्दांकन करणं हा महत्त्वाचा टप्पा येतो. हा अनेक स्तरांवर कसोटी पाहणारा असतो. सर्वात पहिली कसोटी अनुवादाची सुरुवात होण्याचीच असते. कारण मूळ कविता सुचण्याइतकंच अनुवादाचं सुरुवातीचं टोक हाती येणं वाट पाहायला लावणारं असतं. एकदा सुरुवात झाली की मग कवितांमधे अंतरंग-प्रवेश मिळतो. अनुवादाच्या पहिल्या खर्ड्यात कवितांची अंतरंग ओळख व्हायला सुरुवात होते. ही ओळख जसजशी दृढ होत जाईल तसतसा अनुवाद बदलत राहतो. पुन्हा पुन्हा परिष्करण करत राहाणं हे शेवटच्या क्षणापर्यंत चालू राहातं. एवढं सगळं करूनही कवितांचा अनुवाद कधी पूर्ण समाधान देत नाही. याचं कारण कवितेच्या स्वरूपाशी निगडित आहे.

ही पूर्ण अनुवाद-प्रक्रिया, त्यात येणार्‍या अडचणी, त्या त्या वेळी घेतलेले निर्णय... इ. प्रत्यक्ष उदाहरणांच्या आधारे उलगडून दाखवता येईल. अलिकडल्या पाच-सहा वर्षांत मी तीन अनुवाद हातावेगळे केले आहेत. प्रत्येक अनुवादाच्या वेळी त्या त्या कवितांच्या शैलीनुसार वेगळा अनुभव आला. उदा. हिंदीतील ज्येष्ठ कवी डॉ. दामोदर खडसे यांच्या ‘तुम लिखो कविता’ या संग्रहातील कवितांमधे प्रत्येक कवितेच्या सुरुवातीला, शेवटी आणि मधेमधेही धृवपदासारखी परत परत ‘तुम लिखो कविता’ ही ओळ आलेली आहे. कवितांच्या गाभ्यात शिरायचं तर या ओळीतील ‘तुम’ आणि ‘लिखो’ असं म्हणणारा ‘मैं’ यांच्यातलं नातं समजून घेणं महत्त्वाचं आहे हे प्रकर्षानं जाणवलं. कविता वाचताना हळूहळू हे नातं उलगडत गेलं. जाणवलं की या कविता म्हणजे एक दीर्घ स्वगत आहे. आत्मसंवाद आहे. व्यवहारी जगात व्यग्र असलेला ‘मी’ स्वस्थित ‘मी’शी संवाद करतो आहे... जगण्याचे अनुभव घेणारा ‘मी’ त्या अनुभवावर कवितेतून भाष्य करणार्‍या ‘मी’शी हितगुज करतो आहे. निरखतो आहे त्याचं शब्दांमधे उतरणं आणि प्रकटलेल्या शब्दांमधे स्वतःचं प्रतिबिंबित होणं..!... असंही जाणवलं की हा संवाद फक्त व्यक्तीरूपातील ‘मी’शी नाही तर समष्टीरूपात विस्तारलेल्या ‘मी’शीही चाललेला आहे.. या आत्मसंवादात दोन्हीतला एक ‘मी’, ‘तू’ होतो. ही पूर्ण आंतरिक प्रक्रिया... संवादापुरते दोन  झालेले ‘मी’ आपल्या भूमिका बदलत राहतात. त्यांच्यातलं निरखणारं कोण?, अनुभवणारं कोण?, लिही म्हणणारं कोण?, आणि लिहिणारं कोण?... अनुवाद करताना हे हळूहळू उमगत गेलं.

प्रत्यक्ष अनुवाद करताना, परत परत परिष्करण करताना कवितांशी पुरेसं अनुसंधान साधलं गेलं तेव्हा जाणवलं की या कवितांमधल्या ‘मी-तू’च्या नात्याचं परिमाण बदलत गेलं आहे... यातला ‘मी’, ‘तू’सह विशिष्ठतेचा परीघ ओलांडत राहतो... भोवतालाचं उत्कट भान असल्यामुळे त्याचा ‘परीघ’ विस्तारत राहतो.. ‘मी’ केवळ अलिप्त निरीक्षण करत नाहीय.. तो जगतोय असंख्यांमधला एक होऊन. तो अनुभवतोय नात्यांमधली गुंतागुंत, निसर्गाचे विभ्रम, आयुष्याला लगडलेली सर्व स्तरांवरची गर्दी... आणि यातून वाट्याला येणारी सुख-दुःखं..! ‘तू लिही कविता’ असं म्हणत हे सगळं ‘तू’ला सांगता सांगता या सांगण्याचीच कविता होऊन जाते..!! हे ‘कविता-दृश्य’ टिपणार्‍या कॅमेर्‍याच्या भूमिकेतला निवेदक कधी दुरून पाहतोय ही ‘निर्मिती प्रक्रिया’ तर कधी तिचा भाग होऊन जातोय... या कविता म्हणजे दृश्य, द्रष्टा आणि या दोघाना जोडणारी ‘पाहणं’ अनुभवण्याची प्रक्रिया या तिन्ही भूमिकांमधल्या ‘मीं’चा अद्‍भुत खेळ आहे... या खेळात इतक्या मिती सामावलेल्या आहेत की दर मितीनुसार कवितांतील शब्दांचे अर्थ बदलत.. विस्तारत राहू शकतात...

या सार्‍याचा प्रत्यय देणार्‍या कवितांची दोन उदाहरणं-

-‘... तुम लिखो कविता / और मैं देखूँ / तुम्हारी अंगुलियों में / एक बेचैन कलम / मैं देखूँ / शब्दों में नहाई पुतलियाँ / आँखों में बहुत गहरे / अर्थों की कतारें / माथे पर उठती / सागर-सी हिलोरें../ तुम लिखो कविता / और मैं देखूँ तुम्हें / कविता में बदलते हुए!’...

अनु.- तू लिही कविता / आणि मी पाहीन तुझ्या बोटांमधे / एक अस्वस्थ लेखणी / पाहीन शब्दांत न्हाऊन निघालेल्या बाहुल्या / डोळ्यांत खोलवर अर्थांच्या रांगा / कपाळावर उमटणार्‍या रेषा / सागरलाटांसारख्या / तू लिही कविता / आणि मी पाहीन तुला / कविताच होऊन जाताना...!

-‘कविता खिड़की है यात्रा की / तुम हो जाओ द्रष्टा / और मैं / यात्रा का गुजरा हुआ दृश्य... / आनेवाला दृश्य भी मैं ही होऊँ / तुम लिखो कविता..!’

अनु.- कविता खिडकी आहे प्रवासातली / तू हो द्रष्टा / आणि मी / प्रवासात मागे पडलेलं दृश्य / पुढे येणारं दृश्यही मीच असेन... / तू लिही कविता..!

कवितेचा अनुवाद करताना कवितेचं पुरेसं आकलन ही सर्वात महत्त्वाची पहिली पायरी असते. अनुवादकाची आस्वादक्षमता, आकलनक्षमता आणि कवितेकडे, एकूण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हे सर्व घटक या आकलनाचा स्तर ठरवणारे असतात. कवितासंग्रहाची प्रस्तावना, मनोगत, अर्पण-पत्रिका.. अशा गोष्टींही कवितेच्या आकलनाला सहाय्य करू शकतात... पण प्रश्न पडतो की कवितांच्या आकलनासाठी अशा गोष्टीतून मिळणार्‍या दिग्दर्शनाचा आधार किती घ्यायचा, घ्यायचा की नाही की थेट कवितांनाच भिडायचं आणि पूर्णतः स्वतःच्या आकलन-क्षमतेवर विसंबायचं?

अनुवाद-प्रक्रियेत निर्माण होणार्‍या अशा प्रश्नांमधून अनुवादाविषयीची समज घडत राहते. हा अनुवाद करताना असाही विचार मनात आला की अनुवादकाच्या ‘आकलना’नुसार अनुवादाचं शब्दांकन बदलू शकेल का? किती प्रमाणात बदलेल? कारण मूळ कवितेनं दिलेल्या शब्दांच्या ढाच्यातच अनुवादित कवितेची इमारत उभी करावी लागते. एका मर्यादेबाहेर अनुवादक स्वतःच्या शब्दांची निवड करू शकत नाही. मग शब्द साधारण तसेच फक्त त्यामागचं आकलन वेगळं वेगळं असं होईल का?

मात्र कवितेतील ‘तू’ आणि ‘मी’ ही सर्वनामं अशी आहेत की त्यासंदर्भातील आकलनानुसारच स्त्रीलिंगी/पुल्लींगी शब्दयोजना करावी लागते. शिवाय हे आकलन अनुवादित कवितेचं परिमाणच बदलून टाकू शकतं... ‘तुम लिखो कविता’ या संग्रहातील कवितांच्या अनुवादासंदर्भात हा कळीचा मुद्दा होता... 
  
 ‘लम्हा लम्हा’ या दीप्ती नवल यांच्या कवितासंग्रहाचा अनुवाद या कवितांच्या प्रेमात पडून मी वीस वर्षांपूर्वी केला होता. मात्र त्याच्या प्रकाशनाचा योग अचानक आता आला. वीस वर्षांपूर्वी केलेला अनुवाद पुन्हा ‘आज’च्या नजरेनं तपासून पाहणं गरजेचं होतं. हा अनुवाद सुधारून घेताना नव्यानं आलेले अनुभव इथे नोंदवण्यासारखे आहेत.

`Poetry is not the thing said, but the way of saying it’- आशय नाही, तो कथन करण्याची शैली म्हणजे कविता... दीप्ती नवल यांच्या कवितांचा नव्यानं अनुवाद करताना कवितेच्या या व्याख्येची प्रकर्षानं आठवण झाली. कारण या कविता आस्वादताना जाणवलं की या कवितांमधून काय सांगितलं गेलंय त्यापेक्षा ते कसं सांगितलंय ते अधिक सुंदर आहे. त्यात खरं काव्य आहे... पण या शैलीचा अनुवाद कसा करणार? कवितांच्या अनुवादात सतत असमाधान देणारा हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा अडचणींना सामोरं जाताना आपल्या सृजनशीलतेची कसोटी लागते. त्यात यश मिळेल न मिळेल पण ही प्रक्रिया अनुभवणं आनंददायी असतं असा माझा अनुभव आहे. या अनुवादातली काही उदाहरणं-

अनुवाद करताना कवितांमधे वापरल्या गेलेल्या एकाच मूळ शब्दांसाठी अनुवादात वेगवेगळे मराठी शब्द योजताना त्यांच्या कवितेला अभिप्रेत अर्थच्छटा कशा येतील याचा विचार होत राहिला... उदा. या कावितांमधे वापरलेला मैला-साहा शब्द. -  ‘मैले-मैले से डिब्बों में वक्त की धूल जमती जाती है’, ‘क्यों अपना आप मैला-सा लगता है जाने’, ‘मैले-से टीले के करीब...’ अशा वेगवेगळ्या संदर्भात आलेल्या या शब्दासाठी मराठी शब्दयोजना करताना या शब्दाभोवतीचा कवितेतला परिसर पुन्हा पुन्हा फिरून अनुभवला. आणि मग कविताशयाशी प्रामाणिक राहात  अनुवाद केला. तो असा- ‘मळकट डब्यांवर क्षणांची पुटं चढत राहतात’, ‘कोणजाणे सारखं मलिन का वाटतं आहे माझं मलाच’, ‘उदास टेकडीजवळ...’

मात्र आपली भाषिक संवेदनशीलता आणि अनुवादाचं कसब कितीही पणाला लावलं तरी कवितांचा अनुवाद कधीही पूर्ण समाधान देत नाही. कारण प्रत्येक भाषेत काही शब्द असे असतात की त्याला समांतर तितका चांगला शब्द अनुवाद करताना सापडतच नाही. अशावेळी तडजोड करावी लागते. स्वतः दीप्ती नवल यांनी स्वतःला हवी तीच अर्थच्छटा कवितेत यावी म्हणून आपल्या हिंदी कवितेत काही पंजाबी शब्द वापरण्याची शैली अनुसरली. काहीसं याचंच अनुकरण करत मीही त्यांच्या मूळ हिंदी कवितेतला मंजिल हा शब्द एक दोन कवितांच्या अनुवादात तसाच ठेवला. कवितांच्या अनुवादात काही तडजोडी अपरिहार्यपणे कराव्या लागतात. मूळ शब्दासाठी तितका चांगला शब्द आपल्या भाषेत नाही मिळाला तर एखादा लंगडा शब्द वापरण्यापेक्षा तोच शब्द वापरण्याची तडजोड मला मंजिलशब्दासाठी तरी चांगली वाटली. अर्थात अशी तडजोड हा शेवटचा पर्याय असतो...

वर म्हटल्याप्रमाणे कवितांची शैली म्हणजेच खरंतर कविता! कवितेतल्या प्रतिमा कवितेला कवितापण बहाल करत असतात. अनुवादातही हे कवितापण जपणं ही खरी कसोटीची गोष्ट असते. दीप्तीजींच्या कवितांमधे तर अनेक तरल प्रतिमा आहेत. त्या अनुवादातही आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. फारसं कृत्रिम न वाटता काही ठिकाणी थोडं जमून गेलं. उदा. एका कवितेत म्हटलंय-

‘ रात के पहलू से / गुज़रा करते हैं जब / खामोशियों के काफिले /
वादी के इस कोने में खड़े होकर / देखा है हर दफ़ा / धुंधला सा इक चेहरा, आशना ”

अनु.-
“ रात्रीच्या कडेने नीरव शांततेचे जथ्थे / सरकत असतात / तेव्हा डोंगर-घाटातल्या
या कोपर्‍यात उभं राहून / प्रत्येक वेळा पाहिलाय / एक अस्पष्ट चेहरा, जिवलग ”

            मात्र काही जागा असमाधान देतच राहिल्या. अनुवादातून मूळ कवितांपर्यंत पूर्णांशानं नाही पोचता आलं. काही ठिकाणी जसाच्या तसा अनुवाद फारच कृत्रिम वाटला आसता. त्यामुळं अशा ठिकाणी भावानुवादाचा आधार घ्यावा लागला. उदा. एका कवितेची सुरुवात आहे-

आंचल से लिपटे अजनबी हवाओं के लम्स
दूर किसी गिरजे में शाम की घंटियां सी

भावानुवाद-
दूर एका चर्चमधे सायंकालीन घंटांचा नाद
आणि हृदयात एक अनामिक हुरहुर...’

 असाही एक मुद्दा आहे की कविता एकदा लिहून झाली की ती कवीची राहात नाही. शब्द, विशेषतः कवितेतल्या प्रतिमा प्रत्येकाला वेगळा प्रत्यय देतात. अनुवाद करताना मूळ कवीला अभिप्रेत आशय यायला हवा हे खरं आहे. पण त्याच आशयाशी बांधून राहण्यात कवितेतील अनेकार्थांच्या शक्यताना मर्यादा पडतात. आणि अनेकार्थांचं सूचन हे तर कवितांचं बलस्थान आहे. त्यामुळं काही प्रमाणात अनुवादकाला अर्थनिर्णयनाचं स्वातंत्र्य असलेलं कवितांच्या दृष्टिनं योग्यही ठरतं. त्यामुळं दीप्ती नवल यांनी प्रत्यक्ष भेटून कवितांविषयी आपण चर्चा करू असं सुचवलं तरी मी ते टाळलं. एका मर्यादेनंतर मूळ कवितेतल्या शब्दांचं बोट सोडून दिलं आणि मी आत्मसात केलेल्या कवितांशी प्रामाणिक राहात अनुवाद पूर्ण केला.

कवितांचा अनुवाद करताना आणखी एक भान ठेवावं लागतं. बर्‍याचदा वाचकांसमोर फक्त अनुवाद असतो. मराठी कविता या स्वरूपातच त्याचा आस्वाद घेतला जातो. त्यामुळं मराठी कविता म्हणूनही त्या वाचनीय व्हायला हव्यात. मात्र हे पथ्य सांभाळताना मूळ कवितेला थोडा धक्का लागणं टाळता येत नाही. मूळ आशय तर फारसा उणावणार नाही आणि अनुवादही कृत्रिम वाटणार नाही अशी कसरत काही वेळा करावी लागते. उदा. एका कवितेतल्या दोन ओळी अशा आहेत-

मैंने करवट बदल कर तुम्हें छूना चाहा
मगर अल्लाह ! तुम नहीं थे

या ओळीतील मगर अल्लाह !’ हा भावोद्गार पूर्ण कवितेतला एकाकीपणा आणि तूहवा असण्याची अत्यंतिक ओढ व्यक्त करणारा आहे. पण अनुवादात अल्लाहच्या जागी ईश्वरा, परमेश्वरा, असं काही घालणं मराठी कवितेच्या स्वभावात बसणारं नाही. मग तसं काही न लिहिताच अनुवाद केला. कवितेचं एक बलस्थान म्हणजे मौन. दुसर्‍या ओळीतल्या पणनंतर रिकामी जागा सोडून मी मौनाचा आधार घेतला. ‘हे नसण्याची कृती अधोरेखित करणारं अक्षर जोडीला घेतलं आणि त्या जागेतला मूळ भावाशय जाणवून देणारं उद्‍गारचिन्ह शेवटी घातलं. तो अनुवाद असा-  

मी कुशीवर वळून तुला स्पर्शू पाहिलं
पण.... तू नव्हतासच तिथे !

‘तू लिही कविता’ आणि ‘लम्हा लम्हा’ या दोन्ही कवितांहून गोरखपूर येथील हिंदीतील ज्येष्ठ कवी डॉ. विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या कवितांचा पोत वेगळा आहे. त्यांच्या निवडक कवितांचा अनुवाद ‘तरीही काही बाकी राहील’ या नावानं मी केला आहे. या कवितांचा अनुवाद करताना काही वेगळे प्रश्न पडले. उदा. यातल्या काही कवितांच्या शीर्षकाखाली ‘संदर्भ : बांगला देश’, ‘संदर्भ : वीयतनाम’ असं काही काही लिहिलेलं आहे. शीर्षकाबरोबर त्याचा अनुवाद करणं अवघड नव्हतं. पण हे संदर्भ नीट कळायला हवेत असं वाटलं. स्वतः तिवारींनाच विचारून ते समजून घेता आले असते. पण मग असंही वाटलं की कविता अशा संदर्भांशी बांधलेली असावी का? खरंतर शीर्षक हेही दिशादर्शक पाटीसारखं कवितेच्या मुक्त आस्वादाच्या आड येत पूर्वग्रह निर्माण करत असतं. परत त्याखाली आणखी काही संदर्भ देणं म्हणजे कविताशय सीमित करण्यासारखं नाही का? डॉ. तिवारी यांच्याशी या संदर्भात चर्चा करून मुळातले असे संदर्भ अनुवादात न देण्याचा निर्णय घेतला.
 
‘एक पहाड़ी यात्रा’ या कवितेचा अनुवाद करताना पुन्हा वेगळी अडचण आली. या कवितेची सुरुवात आहे- ‘पीछे छूट चुके हैं / हजारो चीड़ वन / उपर बुलाते हैं कुछ और / कुछ और देवदारू वन..’ इथे वन हा शब्द अनेकवचनी आहे. मराठीत ‘वन’चं अनेकवचन वने किंवा वनं असं आहे. या ओळींचा अनुवाद असा केला- ‘मागे पडलीत / हजारो चीडवनं / वर खुणावताहेत आणखी काही / आणखी काही / देवदारवनं..’ मराठी कविता म्हणून वाचायला हा अनुवाद छान वाटत नाही. इथे प्रश्न पडला की, ‘अनुवाद इतका सफाइदार असावा की तो अनुवाद वाटता कामा नये’ या मताशी प्रामाणिक राहावं की, ‘अनुवाद हा अनुवादच वाटला पाहिजे. सफाइदार अनुवाद म्हणजे रूपांतर’ हे मत लक्षात घ्यावं?.. अशा पेचप्रसंगी त्या त्या वेळी योग्य वाटेल तो निर्णय घेतला जातो. अनुवादकाचा कोणताही निर्णय एका वेळी कोणत्यातरी एकाच मताला न्याय देऊ शकतो आणि त्यामुळं दुसर्‍या मतानुसार तो टीकेला पात्र होतो...

अनुवादातून अनुवादक नाही मूळ कवी डोकवायला हवा. हे लक्षात घेऊन या कवितांचा अनुवाद करताना मी अनुवादातील सफाईपेक्षा मूळ कवितांच्या शैलीशी प्रामाणिक राहण्यावर अधिक भर दिला. प्रश्नचिन्हं, उद्‍गारचिन्ह, विरामचिन्ह आणि ‘पण’ ‘म्हणून’ ‘आणि’ असे आशयातील संबंध दाखवणारे शब्द यांचा कमीतकमी वापर हे या कवितांचं वैशिष्ट्य आहे. अनुवादातही हे वैशिष्ट्य राखण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. कवितांमधे दोन ओळींच्या मधल्या अनुच्चारित आशयाला अधिक महत्व आहे. तिवारी यांच्या कवितांत अशा अनुच्चारित जागा आहेत. अनुवादातही त्या तशाच अनुच्चारित राहायला हव्यात. पण काहीवेळा ते शक्य झालं नाही. उदा. ‘शब्द’ नावाची एक छोटी कविता आहे. शब्दाविषयीची अत्यंत सूक्ष्म आणि खोल समज या कवितेतून व्यक्त झालीय. ती कविता अशी-

“वस्तूंना नावं द्या / शब्द सृष्टीची किल्ली आहेत / बोलणं ओठांची कसरत नाही / लिहिणं बोटांचा खेळ नाही / शब्द ‘असण्या’चा पुरावा आहे / तो एक विराट मौन भंग करतो / एका निबिड अंधारातून सोडवतो / (त्याच्याशिवाय) / कोणतं साधन आहे आपल्याजवळ / या दिक्कालाशी झुंजण्याचं / ज्यामधे आपण फेकले गेलोय?”

शेवटच्या तीन ओळींपूर्वी कंसात घातलेला ‘त्याच्याशिवाय’ हा शब्द मूळ कवितेत नाही. पण कविता समजण्याच्या दृष्टीनं तो तिथे असणं मला आवश्यक वाटलं. बराच विचार करून तो कंसात घालण्याचा पर्याय मी निवडला.

अनुवादामधे योग्य शब्दाची निवड करणं हे एक मोठं आव्हान असतं. शब्दाला शब्द ठेवायचा तर शब्दशः अर्थ काही वेळा हास्यास्पद ठरतो. पण सूचितार्थ, भावार्थ दर्शवणारा शब्द घ्यायचा तर कवितेचा अनुवाद म्हणजे कविता समजून सांगण्यासारखं होईल. अनुवादातही आशय सुचकतेनं, मूळ अर्थच्छटेसह यायला हवा... असा शब्द मिळेपर्यंत चांगलाच धीर धरावा लागतो. उदा. ‘गति की आवाज’ या कवितेत ‘सन्नाटा नहीं था वहाँ...’ अशी सुरुवात करून मधे निसर्गाच्या विविध विभ्रमांचं वर्णन करत शेवटी म्हटलंय- ‘सन्नाटा नहीं था वहाँ / एक खामोश आवाज थी / गति की...’ यातील सन्नाटा या शब्दाला अनेक अर्थच्छटा आहेत. सन्नाटा म्हणजे भकास शांतता असा अर्थ लगेच लक्षात येतो. कविता पुन्हा पुन्हा वाचून तिचा पोत समजून घेतल्यावर भकास शांतता किंवा नीरवता हे शब्द योग्य वाटेनात. आशयाचं आंतरिकीकरण आणि विचारांचा रियाज होत राहिला. त्यानंतर केलेला अनुवाद असा- ‘निःशब्दता नव्हती तिथे / मूक ध्वनी होता / गतीचा..!’

डॉ. तिवारी यांच्या कवितांच्या अनुवादाच्या निमित्तानं अनुवाद-प्रक्रिया पुन्हा अनुभवायला मिळाली. अनुवादाच्या स्वरूपाविषयीची समजूत नव्यानं घडत राहिली. यापूर्वी केलेल्या अनुवादातून हे लक्षात आलं होतं की कवितेचा अनुवाद म्हणजे मूळ कवितेचा व्युह भेदत आत शिरायचं आणि कमावलेल्या आकलनातून रचायचा ‘आपल्या’ कवितेचा नवा व्युह. किंवा कवितेचा अनुवाद म्हणजे तारेवरची कसरत. तोल सावरण्यासाठी क्षीण आधार देणारी आणि तोल जाण्यासाठी भरपूर अवकाश असलेली!.. किंवा कवितेचा अनुवाद म्हणजे आंतरिक मशागत करून नवनिर्मितीच्या शक्यता पेरणारा रियाज!... इ.

या अनुवाद-प्रक्रियेनं अनुवादाच्या सामर्थ्याचं वेगळं दर्शन घडवलं. अनुवादाचं पुन्हा पुन्हा परिष्करण करताना भाषा, आशय आणि रचना या तिन्ही स्तरांवर कवितेशी जवळीक साधता येते. ही आंतरिक प्रक्रिया अनुवादकाची स्वतःची, स्वतंत्र असते. अशा खोल जाण्यातून उमगणारा आशय केवळ त्या कवितेपुरता मर्यादित राहात नाही. ही उमज कवितेच्या सीमा ओलांडून जाते. अनुवादित कवितेसाठी होणारी शब्दाची निवड, रचना, उच्चार-अनुच्चार या बाबतीत घेतले जाणारे निर्णय अनुवादकातल्या ‘मी’चे असतात. ‘मी’ हीच निवड का करतो? ‘मी’ हाच निर्णय का घेतो? या प्रश्नांच्या उत्तरांतून ‘मी’चा स्तर कळतो. ‘मी’ची ओळख होत जाते... कविता-लेखन असो की कवितांचा अनुवाद असो, ‘स्व’शी प्रामाणिक राहून केलेली प्रत्येक अभिव्यक्ती ही ‘स्व’ची अभिव्यक्ती असते. ती ‘स्व’ची ओळख करून देणारी असते... अशी प्रत्येक समज ही अखेरीस स्व-शोधाचं माध्यम ठरू शकते.

अनुवादाच्या या सामर्थ्याचा परिचय घडवणारी अनुवाद-प्रक्रिया अनुभवणं मला महत्त्वाचं वाटतं... अनुवादात मूळ कृती उणावते का? अनुवाद यशस्वी होण्याचे निकष काय आहेत? काय असावेत?.. हे अनुवादाच्या अभ्यासकांनी विचार करावेत असे प्रश्न आहेत. त्याचा विचार मी गरजेपुरता करते. माझ्यासाठी कवितांचा अनुवाद हे सृजनाचा पैस वाढवणारं अभिव्यक्तीचं एक सशक्त माध्यम आहे.

आसावरी काकडे 


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्मरणिकेत प्रकाशित- २०१३

No comments:

Post a Comment