भारतात अनेक संत होऊन गेले. प्रत्येक
राज्यातील भाषा, ऐतिहासिक, भौगोलिक पार्श्वभूमीनुसार प्रत्येकाच्या संतपणाची जातकुळी
भिन्न असली तरी सर्वांमधे एक समान धागा आहे आणि तो म्हणजे ईश्वर-भक्ती..! कुणी
ईश्वराचं निर्गूण निराकारत्व जाणून घेऊन ज्ञानोत्तर भक्तीला प्राधान्य दिलं तर कुणी
कर्मयोगाचे पालन करत कुटुंबात राहून, सामाजिक प्रबोधन करत भक्तीमार्गाचा प्रसार
केला. राजघराण्यात जन्माला आलेल्या संत मीराबाईंनी पूर्ण समर्पण भावानं एकनिष्ठ
भक्ती केली. त्यांचं संतपण मधुरा भक्तीत विलीन झालेलं होतं.
भक्ती या समान धाग्यामुळं इतर
भाषेतले संतही सर्वत्र वंदनीय झाले. त्यांच्या संतत्वाचा सहज स्वीकार झाला.
त्यांची काव्यमय शिकवण समजून घ्यायचा प्रयत्न होत राहिला. आपल्या भजन-कीर्तनात ती
सामावली गेली. संत मीराबाईंची पदं तर विशेषच लोकप्रिय आहेत. कथा, कादंबरी, कविता.. अशा साहित्यामधून,
चित्रपटांमधूनही मीराबाईंचा परिचय जनमानसात रुजला. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर
यांनी मीराबाईंच्या साठ निवडक पदांचा अनुवाद करून त्यांच्या कवितेची ओळख मराठी
वाचकांना करून दिलेली आहे. या सगळ्या माध्यमांमधून सतत भेटत राहिल्यामुळे संत
मीराबाई मराठी मनाला कधी परक्या वाटल्या नाहीत.
संतसाहित्याला वाहिलेल्या
‘आनंदघन’ या दिवाळीअंकात या वर्षी वेगवेगळ्या अंगानं मीराबाईंचे संतत्व समजून
घेण्याचा प्रयत्न होतो आहे. ‘संत मीराबाईंची कविता आणि कवितेतल्या मीराबाई’ हा
त्यातलाच एक पैलू. खरं तर कवी आणि त्याची कविता एका पातळीवर अभिन्न असतात. कवीचे
व्यक्तित्वच त्याने लिहिलेल्या प्रत्येक कवितेत डोकावत असते. एकेक कविता म्हणजे
एकेका अँगलमधून त्यानं स्वतःच चितारलेलं स्वतःचं पोर्ट्रेट असतं. तरी त्याचं समग्र
असणं त्याच्या कवितेत सामावू शकत नाही. संत मीराबाईंसारख्या कवयित्रीच्या मनाचा
ठाव तर त्यांच्या पदांमधून पूर्णतः लागणं अशक्यच आहे. तरी त्यांची पदं आणि त्यांचं
व्यक्तित्व यांच्यातला अनुबंध तपासण्यातून आपण त्यांच्या भक्तीची जातकुळी जाणून
घेऊ शकतो का हे पाहता येऊ शकेल.
त्यासाठी त्यांची पदं समजून
घ्यायची तर त्यांचं उपलब्ध चरित्र थोडक्यात जाणून घ्यायला हवं. मीराबाईंचा
कार्यकाल अंदाजे १४९८-१५४७ असा मानला जातो. तो मोघल
साम्राज्याचा काळ होता. त्यांचा जन्म १४९८ मधे राजघराण्यात झाला आणि १५१६ मधे त्यांचं
चितोडच्या राणा संगाच्या ज्येष्ठ मुलाशी- युवराज भोजराजाशी लग्न झालं. लहानपणीच
आईचे निधन झाल्यामुळे विष्णुभक्त असलेल्या आजोबांकडे त्या वाढल्या. तिथे त्यांच्यावर
भक्तीचे संस्कार झाले. संतसाहित्य, आध्यात्मिक आणि पौराणिक साहित्याशी त्यांचा
चांगला परिचय होता... लहानपणी एका साधूकडून त्याना मिळालेली कृष्णाची मूर्ती, तोच
आपला पती मानणं, सासरी झालेला छळ... विषप्रयोग... अशी मीराबाईंविषयीची माहिती आख्यायिकांमधून
आणि काही प्रमाणात त्यांच्या पदांमधून कळते. पण प्रमाण
माहिती फारशी मिळत नाही असे त्यांच्याविषयीच्या लेखनात म्हटलेले दिसते. त्या जन्मापासून लग्नानंतरचा
काही काळपर्यंत राजस्थानात होत्या. पतीनिधनानंतर काही वर्षांनी वृंदावनात गेल्या. शेवटी
त्यांचे वास्तव्य व्दारकेत होते.. मीराबाईंच्या अशा चरित्रविषयक माहितीवरून लक्षात
येतं की ऐहिक स्तरावर वैभवसंपन्न आयुष्य लाभूनही राजकीय, सामाजिक, कौटुंबिक
स्तरांवर अस्थिरता, सर्वत्र कलहाचे वातावरण, जवळच्या व्यक्तींचे मृत्यु.. अशा
गोष्टींमुळे ऐहिक जीवनाविषयी त्यांच्या मनात वैराग्यभाव जागा झाला असेल आणि त्यांच्यावर
झालेल्या आध्यात्म-भक्तीच्या संस्कारांमुळे त्यांनी सामान्य जीवनाचा त्याग करून
भक्तीमार्ग स्विकारला असेल.
मीराबाईंना काव्य, संगीत,
नृत्य.. या कला चांगल्या अवगत होत्या. त्यांनी आपला आर्त उत्कट भक्तीभाव
काव्यरूपात शब्दबद्ध केला. इतकंच नाही तर ही पदं स्वतः गाऊन, नाचून, उघडपणे
संतांना बरोबर घेऊन त्या आपला भक्तीभाव व्यक्त करत असत. त्यांच्या समूहसाधनेचाच हा
भाग होता. त्यांची पदं अत्यंत प्रभावी आणि हृदयस्पर्शी असल्यामुळे मौखिक परंपरेतून
सर्वदूर पसरली आणि टिकली. त्यातली सुमारे ५०० पदं आजही
उपलब्ध आहेत. पण त्यात प्रक्षिप्त भाग बराच आहे. त्यामुळे
उपलब्ध पदांमधे अनेक भाषांचे मिश्रण आढळते. मूळ काव्य-रचना
१५-१६व्या शतकातली राजस्थानी, ब्रज आणि गुजराती या भाषांमधे
आहे. पण त्यात पंजाबी, खडी बोली.. इ. भाषांमधले शब्दही
आढळतात. मीराबाईंच्या काव्याचा विषय प्रामुख्यानं कृष्ण-भक्ती.. विरह, मीलन.. हा आहे. पण काही
पदांमधे वैयक्तिक आणि सामाजिक संदर्भही आढळतात. उत्कटता, भाव-सौंदर्य, शब्दमाधुर्य, नादमयता, गेयता, चित्रात्मकता आणि सर्वात
महत्त्वाचं म्हणजे आत्मप्रचीतीचं सच्चेपण... ही त्यांच्या काव्याची प्रमुख
वैशिष्ट्ये आहेत.
अशा काही निमित्ताने मीराबाईंविषयी
अधिक माहिती मिळवणं, त्यांच्या काव्याची पार्श्वभूमी आणि प्रेरणा समजून घेणं या स्तरावर
थोडा अभ्यास आणि विचार होतो. त्यातून मीराबाईंची विविध रूपं समोर येतात... भारतीय
समाजाच्या नजरेत- अव्दितीय, श्रेष्ठ संत, मध्ययुगीन भारतीय साहित्यात
स्त्री-विद्रोहाची विधायक सुरुवात करणारी क्रांतिकारी कवयित्री, स्त्रीजातीच्या
आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी निर्धारानं लढणारी सत्याग्रही... इत्यादी आणि
सासरच्या नजरेत कुलनाशिनी... तर पतीच्या नजरेतलं इतिहासाला माहीत नसलेलं
प्रश्नार्थक रूप...! मीराबाईंच्या उपलब्ध पदांमधून या सर्व रूपांतील मीराबाईचं
समग्र आकलन होणं अवघड आहे. पण त्यांच्या पदांमधून त्यांच्या भक्तीतील उत्कटतेचा
प्रवास जाणवतो. तो समजून घेताना संत तुकारामांचे अभंग आठवत राहतात. त्या आधारे
मीराबाईंच्या भक्तीचं स्वरूप जाणणं सोपं होतं...
उदाहरण म्हणून काही
प्रातिनिधिक पदं पाहता येतील-
पद १-
“म्हांरां
री गिरधर गोपाळ, दूसरा णा कूयां ।
दूसरां
णां कोयां साधां, सकळ ळोक जूयां ॥
भाया
छांड्या बंधां छांड्या, छांड्या संगा सूया ।
साधां संग
बैठ बैठ, लोक लांज खूयां ॥
भगत
देख्यां राजी ह्ययां, जगत देख्यां रूयां ।
असवां जळ
सींच सींच, प्रेम बेळ बूयां ॥
दधी मथ
घृत काढ लयां, डार दया छूयां ।
राणा विष
रो प्याळा भेज्यां, पीय मगण हूयां ॥
अब त बात
फेळ पड्या, जाण्यां सब कूयां ।
मीरां री
लगण लग्यां, होणा हो जो हूयां ॥३॥”
भावार्थ-
‘हे जग मी पाहिलंय आणि मला कळून चुकलंय की गिरधर गोपालाखेरीज आता माझं असं कोणी
नाही. मी सर्व सोयरेजनांचाच काय तर भक्तीत रमलेल्या साधूंच्या संगतीत राहताना
लोकलज्जेचाही त्याग केला आहे. याचा राग येऊन राणाजींनी मला विषाचा पेला पाठवला...
पण त्यामुळे माझा भक्तीभाव अधिकच दृढ झाला. हे सर्वांना माहिती झालंय. आता जे
व्हायचं असेल ते होऊदे....’
चरित्रात्मक
तपशील असलेल्या या पदात लौकिक जीवनाचा पूर्ण त्याग आणि गिरधर गोपालाखेरीज आता माझं
असं कोणी नाही या निर्णयाप्रत पोचणं हा टप्पा मीराबाईंनी गाठलेला आहे असं जाणवतं.
पद २-
“हेरी
म्हां तो दरद दिवाणी, म्हारा दरद णा जाण्यां कोय ॥
घायळ री
गत घायळ जाण्या, हिवडो, अगण संजोय ।
जौहर कीमत
जोहरां जाण्यां, क्या जाण्यां जिण खोय ॥
दरद री
मारयां दर दर डोळला, बैद मिळया णा कोय ।
मीरा री
प्रभु पीर मिटांगां, जद बैद सांवरो होय ॥२१॥”
भावार्थ- ‘सर्वस्वाचा
त्याग करून मी त्याला आपलं म्हटलं पण त्याचं साधं दर्शनही होत नाहीए. त्याच्या
विरहाच्या दुःखानं मी पार वेडी झालीय. या दुःखाची प्रत कोणाला कळण्यासारखी नाही.
अशा विरहाच्या आगीत जो होरपळलाय त्यालाच ते समजू शकेल. रत्नाची किंमत रत्नपारखीच
करू शकतो. इतर दगड समजून ते फेकून देतील. या दुःखावर औषध मिळावं म्हणून वैद्याच्या
शोधात मी दारोदार भटकले पण कोणी वैद्य मिळाला नाही. आता तो प्रियतमच वैद्य बनून
येईल तेव्हाच विरहाग्नी शांत होईल.’
इथे संत
तुकारामांच्या ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस....’ या अभंगातील ईश्वरभेटीचा आकांत
आठवतो. मधुरा भक्तीतला हा अत्यंतिक उत्कट असा विरहाचा टप्पा आहे.
पद ३-
“सांवरो
म्हारी प्रीत णिभाज्योजी ॥
थे छो
म्हारो गुण रो शागर, औगुण म्हां विशराज्यो जी ।
ळोक णां
शीझ्यां मण णा पतीज्यां मुखड़ा सबद शुणाज्यो जी ॥
दासी थारी
जणम जणम री, म्हारा आंगण आज्यो जी ।
मीरां रे
प्रभु गिरधरनागर, बेडा पार ळगाज्योजी ॥३०॥”
भावार्थ- ‘हे
प्रियतम, आपलं प्रेम आता तूच निभावून ने. तू गुणांचा सागर आहेस. माझे अवगुण नजरेआड
कर आणि माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. ज्यांना मी सोडून आलेय ते माझ्या प्रेमाविषयी
शंका घेताहेत कारण तू अजून मला आपलंसं केलं नाहीएस. आता तू स्वतःच येऊन माझ्या
प्रेमाचा स्वीकार केल्याचे सांग. मी जन्मोजन्मीची तुझी दासी आहे. मला भवसागरापार
घेऊन जा.’
अशा काही
पादांमधे जाणवतं की मीराबाई आपल्या प्रेमातलं सच्चेपण तपासून बघतायत. माझं प्रेम
खरं असेल तर त्याचा स्वीकार केल्याचे येऊन सांग, आणि तूच ते निभावून ने असं
प्रियतमाला आळवतायत.
पद ४-
“पग बांध
घुंघरयां णाच्यां री ॥
ळोग
कह्यां मीरां बावरी, शाशू कह्या कुळनाशां री ।
विख रो
प्याळो राणा भेज्यां, पीवां मीरां हांशां री ॥
तण मण
वारयां हरि चरणां मां, दरसण अमरत पाश्यां री ।
मीरां रे
प्रभु गिरिधरनागर, थारी शरणं आश्यां री ॥४९॥”
भावार्थ- ‘प्रियतमाला
रिझवण्यासाठी मी पायात घुंघरू बांधून नाचते आहे. माझी ही बेभान अवस्था पाहून
लोकांना वाटतं मला वेड लागलंय. सासूला तर मी कुलनाशिनी वाटते आहे. शासन म्हणून मला
विष दिलं गेलं. पण ते प्यायल्यावर मला दर्शनामृत प्राप्त झालं.. आता मी सदैव
तुझ्या चरणांपाशीच राहीन.’
या
टप्प्यावर मीराबाईंची ईश्वरभेटीची आस शिगेला पोचलीय. देहभानही उरलं नाही. ही एकप्रकारे
माणसातून उठण्याचीच अवस्था...! ही भक्तीमार्गातली फार पुढची अवस्था आहे. संत
तुकारामांनी या विषयी म्हटलंय, ‘देवाची ते खूण आली ज्याच्या घरा / त्याच्या पडे
चिरा मनुष्यपणा..!’
पद ५-
“माई म्हा
गोविण्द गुण गाणा ॥
राजा
रूठ्यां णगरी त्यागां, हरि रूठ्यां कठ जाणा ।
राणा
भेज्यां विख रो प्याळा, चरणामृत पी जाणा ॥
काळा णाग
पिटारयां भेज्यां शाळगराम पिछांणा ।
मीरां
गिरधर प्रेम बावरी, सावळ्या वर पाणा ॥६३॥”
भावार्थ- ‘राजा
पती रागावला म्हणून मी त्याचं नगर सोडून बाहेर पडले. पण ब्रह्मांडनायक असलेला माझा
प्रियतम जर माझ्यावर रुष्ट झाला तर मी कुठे जाणार? म्हणून आता गोविंद गुणगान करत त्याला
आळवत राहाणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय ठरलेलं आहे. कारण विषाचा पेला, काळा नाग
पेटीतून पाठवून माझा नाश करण्याचा प्रयत्न झाला. पण त्या सगळ्यामधे मला हरिचंच दर्शन
झालं. आता त्याला सोडून मी कुठेही जाणार नाही...!’
वाट्याला
आलेल्या जीवघेण्या संकटांमुळेच मीराबाईंना संसारत्याग करणं सोपं झालं, त्यांची
श्रद्धा अविचल झाली आणि ‘माई म्हा गोविण्द गुण गाणा’ हे जीवनाचं लक्ष निश्चित करता
आलं. मीराबाईंची ही अवस्था “हाचि नेम आतां न फिरें माघारी / बैसलें शेजारी
गोविंदाचे..!” या संत तुकारामांच्या अवस्थेची आठवण करून देणारी आहे.
मीराबाईंच्या
कवितेमधून दिसणारा त्यांच्या भक्तीच्या उत्कटतेचा हा चढता आलेख म्हणजे केवळ
त्यांच्या कवितेचा ढोबळमानाने लावलेला अन्वयार्थ आहे. आणखी खोलात शिरून, पदांमधील भावाशयाशी
एकरूप होऊन, भाषेचे अडसर दूर करून मीराबाईंची ‘कविता’ समजून घेतली तर त्यांच्या
भक्तीतल्या उत्कटतेचा प्रवास याहून वेगळा जाणवू शकेल. राजवैभवाचा आणि
भोजराजासारख्या पतीचा त्याग करून इतक्या समर्पण भावनेनं एका मूर्तीच्या, खरंतर
अमूर्ताच्या मागे लागण्यातली आंतरिक अपरिहार्यता समजून घेता येईल. तटस्थपणे दुरून
विचार करताना भक्ती, त्यातही मधुरा भक्ती ही काय चीज असेल?... त्यासाठी आयुष्यच्या
आयुष्य कुणी कसं आकांत करू शकतं?... असे प्रश्न पडू शकतात. आणि या संदर्भातल्या
रूढ समजूती आणि आपसुक होत राहाणारे संस्कार यातून मिळणारी भाबडी उत्तरं अपुरी वाटतात.
पण या असमाधानातून या सगळ्याचंच ‘पुनर्वाचन’ करता आलं तर मनात निर्माण होणार्या
प्रश्नार्थक जिज्ञासेला सत्याच्या जवळ जाणारी उत्तरं मिळू शकतील. ‘मीराबाईंची
कविता आणि कवितेतल्या मीराबाई’ या विषयीचं हे लेखन म्हणजे या दिशेनं टाकलेलं एक
पाऊल आहे..!
आसावरी
काकडे
२२ जून
२०१८
(या लेखात
उद्धृत केलेली सर्व पदे श्री ब्रजेन्द्रकुमार सिंहल यांच्या भारतीय विद्या मन्दिर
या संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘मेरे तो गिरधर गोपाल’ या संशोधनपर ग्रंथातून घेतलेली
आहेत.)