Wednesday 29 September 2021

कवितेचा रियाज


     कविता हा आद्य साहित्य-प्रकार आहे. अंगाई गीतापासूनच तिची ओळख प्रत्येकाला झालेली असते. जात्यावरच्या ओव्या, म्हणी, वाक्‍प्रचार, उखाणे ही सर्व काव्याचीच रूपं. आजच्या कवितेची पाळंमुळं अशा लोकसाहित्यात सापडतात. कविता अल्पाक्षरी असते, ती प्रतिमांमधून बोलते. व्यक्त होऊनही अव्यक्त राहते. वैयक्तिक असूनही सार्वत्रिक होते. कवितेला दाद मिळते... कवितेच्या अशा काही ‘सोप्या’ वाटणार्‍या वशिष्ट्यांमुळे अनेकांना कावितेचे आकर्षण वाटते. कविता लिहाविशी वाटते. दाखवाविशी वाटते. सध्याच्या इंटरनेटच्या सुविधेमुळे अगदी बोटाशी असलेली अनेक प्रसार माध्यमे कवींची हौस पुरवतात. ‘लाइक्स’ प्रोत्साहन देत राहतात. पण खर्‍या कवितेपासून हा व्यवहार दुरावत राहतो. कवितेसाठी कुठे गुरुकुल असत नाही. तिची साधना ज्याची त्याला स्वतःलाच करावी लागते. ही साधना कशी करता येईल? त्यासाठी कवितेला किती तर्‍हांनी भिडता येईल ते पाहण्यापूर्वी कवितेच्या स्वरूपाविषयी थोडंसं-

कवितेच्या स्वरूपाविषयी अनेकांनी बरंच काही म्हणून ठेवलं आहे. कवितेचे वेगवेगळे आयाम अधोरेखित करणार्‍या काही व्याख्या पाहू-

१) A poetry is not the thing said but the way of saying it.- कवितेचं कवितापण ती काय सांगते यात नाही तर कसं सांगते, कशा तर्‍हेनं सांगते यात आहे. इथे ‘कथना’साठी वापरलेल्या प्रतिमा, अभिव्यक्तीसाठी निवडलेली छंद-लय... कवितेची शैली यांचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. विशिष्ठ शैलीमुळं कवितेला कवितापण येतं.

२) ‘A poem should not mean but be.’ या व्याख्यारूप झालेल्या ArsPoetica या Archibald MacLeish यांच्या कवितेतील ओळीत तर ढोबळ अर्थाला स्थानच नाही. स्तब्ध, अंतर्मुख करणार्‍या सूक्ष्म आशयाचं महत्त्व इथं अधोरेखित झालंय. कविता फक्त अनुभवायची. तिच्याविषयी बोलायचं नाही...

३) A poetry is a lava of imagination, whose irruption prevents earthquake या व्याख्येत कवितेच्या परिणामाकडे लक्ष वेधले आहे. घुसमटून टाकणार्‍या भावनांना कवितेतून व्यक्त होता आलं तर अतिरिक्त ताणातून सुटका होऊ शकते... हा अनुभव आपण घेतच असतो..!

४) ‘वाक्यं रसात्मकं काव्यं’ या अल्पाक्षरी व्याख्येत साहित्य आणि तत्त्वज्ञानाच्या भूमिकेचं सार आहे. इथे कवितेच्या आशयापेक्षा त्याच्या आस्वादप्रक्रियेकडे लक्ष वेधले आहे. रसनिष्पत्ती हा चांगल्या साहित्यकृतीचा महत्त्वाचा निकष आहे.

समीक्षेच्या एका पद्धतीनुसार कवितेचं असणं- Being हे शब्दांमधे बांधलेल्या दृश्य कवितेत नसते तर ते आस्वाद-प्रक्रियेत, आस्वादाच्या जिवंत क्षणात असते. एरव्ही शब्द पडून असतात बंद पुस्तकांमधे. उच्चारित शब्द तर बापुडे केवळ वारा असतात’..

कवितेतील प्रतिमा...

चांगल्या कवितेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ती आत्मनिष्ठ असली तरी वैयक्तिक असत नाही. त्यात अनुभवाचं सामान्यिकरण झालेलं असतं. ‘मी’ सर्वनाम बनून कवितेत आलेला असतो. एकप्रकारे तो ‘स्व’चा विस्तार असतो. हे सामान्यिकरण करण्याचे कार्य कवितेतल्या प्रतिमा करत असतात. प्रतिमांमुळे कवितेला अनेकार्थ प्राप्त होतात. ज्याची जशी कुवत तशा त्याला त्या प्रतिमा उमगतात. राधा-कृष्णाच्या प्रेमाच्या प्रतिमेत पार्थिव प्रेम ते आत्मा-परमात्मा नातं एवढा मोठा आवाका आहे.

‘अभिधा’, ‘लक्षणा’, आणि ‘व्यंजना’ या शब्दांच्या तीन सामर्थ्यांपैकी व्यंजना हे सामर्थ्य कवितेला पोषक आहे. कधी कधी नेहमीचे शब्दच सूचकतेनं वापरले जातात तेव्हा ते प्रतिमा बनून जातात. रोजच्या जगण्यातल्या साध्या अनुभवांतून कवीला प्रतिमा सुचतात. कवीचे अनुभव-क्षेत्र जेवढे व्यापक तेवढ्या त्याच्या प्रतिमा व्यामिश्र बनतात. आणि त्या सामान्यांसाठी दुर्बोध ठरतात. उदा. कवी ग्रेस, आरती प्रभू, शंकर रामाणी यांच्या कविता. अबोध मनातला आशय दूरस्थ प्रतिमांमधून समोर आला की दुर्बोध होतो.

कवितेचा रियाज म्हणजे काय? तो कसा करायचा? या संदर्भातला महत्त्वाचा मुद्दा-

अनुभवाचं आंतरिकीकरण-

कविता लिहाविशी वाटण्याचा क्षण हा काहीतरी सांगण्यासाठी आसुसलेला असतो. जे सांगायचं आहे ते मनात पुरेसं रुजलेलं असणं, स्वतःला उमगलेलं असणं ही आतली पूर्वतयारी असते. पुरेसं पिकल्याशवाय फांदी फळाचं बोट सोडत नाही त्याप्रमाणे व्यक्त होण्याच्या अपरिहार्य क्षणाची वाट पाहावी. घाई करू नये. व्यक्त होण्याआधी अनुभवाच्या सर्व बाजू, गुंतागुंत असह्य होण्याइतक्या जाणवायला हव्यात. कधी कधी त्या लिहिता लिहिता जाणवायला लागतात. परिपूर्ण दृश्य कविता आधी मनात तयार असत नाही.

कवितेत Spontaneous overflow असतो, असावा. पण हा ओव्हरफ्लो अचानक नसतो. आपल्या नकळत आत बरंच काही घडलेलं असतं... थोडक्यात, व्यक्त व्हायची घाई करू नये. संत तुकारामांनी म्हटलं आहे- ‘फांकूं नका रुजू जालिया वाचून..’ गथा अभंग १२७/पृ.१८

अनुभवसमृद्धी

कविता आशयसमृद्ध होण्यासाठी आधी एक व्यक्ती म्हणून आपण समृद्ध व्हायला हवं. विविध प्रकारचं वाचन, त्यावर स्वतःचा विचार, एखाद्या आवडीच्या विषयाचा सखोल अभ्यास, ज्येष्ठांशी संवाद... अशा गोष्टी आपला दृष्टिकोन घडवायला मदत करतात. एखाद्या घटनेकडे किंवा व्यक्तीकडे पाहण्याचे किती वेगवेगळे दर्शनबिंदू असू शकतात ते अशा व्यासंगातून लक्षात येते. देवाला प्रदक्षिणा घालताना वाटेवरच्या प्रत्येक कोनातून त्याचे वेगळे दर्शन घडते. तसेच असते जगणे समजून घेणेही. वेगवेगळ्या भूमिकांमधून जगण्याविषयीची समज वाढवणं हा प्रगल्भतेकडे नेणारा मार्ग आहे.

कवितेतून नकळत इतर कलाप्रकारांना साद घातलेली असते. उदा. कवितेतले नादभारले शब्द संगीतकाराला, त्यातली चित्रदर्शी वर्णनं चित्रकाराला तर त्यातलं कथाबीज नृत्याला...! तसंच इतर कलांच्या आस्वादातूनही कवितेला प्रेरणा मिळते. हे आदान-प्रदान बर्‍याचदा सहज होते. पण ते होण्यासाठी कवीची नजर चौफेर भिरभिरली पाहिजे. समकालिन कवी कवयित्री काय, कसं लिहितायत याचं भान असतं, असावं तसंच इतर कलाक्षेत्रात काय चाललंय हेही सजगपणे समजून घ्यावं.

कवितांचा अनुवाद

कवितांचा अनुवाद करणं हा कवितेसाठीचा खरा रियाज आहे असा माझा अनुभव आहे. गायक जसा स्वरसाधनेसाठी शब्दांचा आधार घेऊन स्वर आळवतो तसेच काहीसे अनुवादाच्या प्रक्रियेत होते. इथे दुसर्‍या कवीच्या दुसर्‍या भाषेतील शब्दांमधून व्यक्त होऊ पाहणारा भावाशय तुमच्या समोर असतो. शब्दांचा एक चक्रव्युह रचलेला असतो त्या कवीनं. त्यातील प्रत्येक शब्द भाल्यासारखा त्याच्या आशयाच्या समोर उभा असतो. अनुवादकाला सर्व क्षमतेनिशी त्या व्युहात शिरून त्या शब्दांना जिंकून घेऊन त्यामागे दडलेल्या आशयापुढे आपला शब्द उभा करायचा असतो...! या प्रक्रियेत भाषेशी, शब्दांशी आतून बाहेरून जवळीक साधली जाते. शब्दांच्या सामर्थ्याचं भान अनुवाद करताना जेवढं येतं तितकं नुसतं वाचताना, लिहितानाही येत नाही.

अनुवादात शेवटच्या क्षणापर्यंत पुन्हा पुन्हा परिष्करण करावं लागतं. ते करताना एकाच वेळी दोन भाषांतील शब्दांशी निकटचं नातं तयार होतं. नवे शब्द, नव्या प्रतिमा, नवी कथनशैली यांचाही हार्दिक परिचय होतो... ही प्रक्रियाही कवितेविषयक, निर्मिती-प्रक्रियेविषयक समजुतीत भर घालणारी असते. या प्रक्रियेत जी आंतरिक मशागत होते त्यातून नव्या स्वतंत्र निर्मितीच्या शक्यता निर्माण होतात. म्हणूनच कवितांचा अनुवाद करणं हे सृजनाचा पैस वाढवणारं एक सशक्त माध्यम आहे असं मला वाटतं.

ब) रूपांतर-

     अनुवाद आणि रूपांतर यात फरक आहे. अनुवादात मूळ कवितेशी प्रत्येक स्तरावर प्रामाणिक राहावं लागतं. रुपांतरात भावानुवाद पुरतो. मूळ काव्य कळणं हा महत्त्वाचा हेतू असतो असं मला वाटतं. पसायदान, चांगदेवपासष्टी.. अमृतानुभव.. उपनिषदं यांचे बर्‍याच अभ्यासकांनी, साहित्यिकांनी रुपांतर केले आहे. मी प्रथम तसा प्रयत्न केला तो चांगदेवपासष्टीच्या रुपांतराचा. या प्रक्रियेत मला महत्त्वाची गोष्ट जाणवली ती ही की रुपांतर ही एक दृश्य स्वरूपातली आकलन-प्रक्रियाच आहे. रुपांतर करताना मूळ संहिता समजून घेणं आणि काय समजलंय ते आपल्या शब्दात उतरवणं अशा दोन कृती घडतात. शब्दांकन करताना कस लागतो खरोखर काय समजलंय त्याचा. आणि समजलेलं आपल्या शब्दात मांडताना भाषिक क्षमतेचीही परीक्षा होत असते. या प्रक्रियेत दोन गोष्टी घडतात... समजलेलं मनात सांभाळून ठेवण्याच्या ताणातून मोकळं होता येतं त्याचवेळी नव्या समजुतीला जागा करून दिली जाते. ओघ चालू राहतो.

कवितेची समीक्षा

     समीक्षा हा साहित्याचा अविभाज्य भाग आहे. समीक्षेमुळे साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तयार होतो. त्यातून लेखक आणि वाचक दोघांना मार्गदर्शन मिळतं. त्यामुळं साहित्याचे अभ्यासक, सामान्य वाचक आणि सर्जनशील लेखन करणार्‍या लेखकांनीही समीक्षाविचार करणं गरजेचं आहे.

कविता लिहितांना सहसा अमुक प्रकारची कविता लिहू असा विचार होत नाही. पण अभ्यासासाठी कवितांचे प्रकार विचारात घेतले जातात. उदा. स्त्रीवादी, दलित, ग्रामिण, शहरी, निसर्ग-कविता इत्यादी. हे कवितांचे प्रकार म्हणजे खरं तर कविता समजून घ्यायचे हे दृष्टिकोन आहेत.

     सर्व माणसं सारखी असली तरी जन्मानुसार अनुभवविश्व बदलतं. स्त्रीवाद मूलतः माणूसपणाची मागणी करत असला तरी स्त्री असण्यामुळे जगण्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन घडत असतो. शिवाय मासिक पाळी, मूल जन्माला घालणे.. असे स्त्रीचे खास वेगळे अनुभव असतात. त्यामुळं तिचं भावविश्व पुरुषांपेक्षा वेगळं होतं. त्यामुळं ‘ती’ची कविता वेगळी होऊ शकते. त्याच प्रमाणं दलित कुटुंबात जन्माला येण्याचे आणखी वेगळे अनुभव असतात. शहरी सवर्ण लोक कल्पनाही करू शकणार नाहीत असं त्यांचं जगणं असतं. त्यांच्या कवितेत अपरिहार्यपणे ते अनुभव, ती भाषा, त्या वेदना येणार... अशा कविता समजून घेण्यासाठी ठराविक संस्कारातून घडलेली दृष्टी पुरेशी नसते. समीक्षा-विचारातून असे वेगवेगळे दृष्टिकोन समजतात. आस्वादक, चिरित्रात्मक, आदिबंधात्मक... असे समीक्षेचे सात-आठ प्रकार आहेत. यांच्या अभ्यासातून आपल्या विचारांचा पैस रुंदावतो.

     मात्र अभ्यासातून साचेबद्ध विचारात आपला दृष्टिकोन बसवू नये. तिथेही creative thinking आवश्यक आहे. आपण ठराविक पद्धतीनं, आपल्या चष्म्यातून दिसेल तसा विचार करत राहतो. त्याच तर्‍हेनं माणसं, घटना समजून घेतो. पण वस्तुस्थिती त्यापेक्षा खूप वेगळी असू शकते. आपल्यासह सगळे सतत बदलत असते. पण आपण संस्कारांनी दृढ झालेल्या तर्‍हेनंच विचार करतो. खरंतर वास्तवाचे केंद्र आणि परीघ दोन्ही बदलत असते, प्रत्येकाच्या नजरेतून वेगळे असू शकते. परीघावरचा कोणताही बिंदू केंद्रबिंदू होऊ शकतो. आणि तिथून पूर्ण चित्रच वेगळे दिसते. उदा. पांडव आणि कृष्ण यांना मध्यवर्ती मानून ऐकलेले महाभारत कर्ण नायक होतो तेव्हा वेगळे जाणवू लागते... कथनातील ‘नायक’ बदलला की पूर्ण कथन बदलून जाते...

सारांश, आपला दृष्टिकोन आपण सतत तपासून घेत गरजेनुसार बदलत राहायला हवं. समीक्षा ही ‘वाचना’ची पद्धती आहे. साहित्य असो, माणूस असो की घटना हे सर्व वाचताना, समजून घेताना परिप्रेक्ष बदलून पाहता आलं पाहिजे..!

मुक्तछंद- छंदोबद्ध कविता

पूर्वी कविता म्हणजे छंदोबद्धच असायची. हल्ली मुक्तछंदाचा जमाना आहे असं म्हणतात पण सध्या परत छंदोबद्ध कवितेचा जोरदार पुरस्कार होताना दिसतो आहे. फेसबुक, WhatsApp सारख्या माध्यमांमध्ये, कार्यशाळा, विविध उपक्रम घेऊन वृत्तांविषयी व्यवस्थित माहिती देऊन सभासदांकडून त्यानुसार कविता लिहून घेतल्या जातात...

छंदोबद्ध कवितेला अक्षर-संख्या, त्यांच्या मात्रा, त्यांचा अनुक्रम, यमक... असे बरेच नियम असतात. त्यानुसार अंतःस्फूर्त लेखन करणं सोपं नाही. पण नियमानुसार प्रयत्नपूर्वक कविता लिहिता येते. सरावाने कृत्रिमतेचा टप्पा ओलांडला जाऊ शकतो.. पण धडे गिरवणारे बरेचजण अलिकडेच राहतात.

मुक्तछंद कवितेला काही नियम असल्याचं माझ्या वाचनात आलेलं नाही. त्यात आशयाची लय असते असं म्हणतात पण ती छंदोबद्ध कवितेसारखी तपासता येत नाही. त्यामुळे मुक्तछंद कविता लिहिणं सोपं आहे असं अनेकांना वाटतं. पण तसं नाहीए. नियम नसल्यामुळं उलट ते अधिक जबाबदारीचं आहे. बोट सोडून सुटं चालण्यासारखं...

मुक्तछंद कवितेत मनातला आशय तुम्हाला योग्य शब्द निवडायला लावतो. छंदोबद्ध कवितेत नियमांचं बोट धरून तुम्ही शब्दांचे पर्याय शोधता. त्यांच्या दिग्ददर्शनानुसार शब्द निवडता. त्यातून कधी नको असलेला आशय स्वीकारावा लागतो तर कधी मनात नसलेला पण अधिक महत्त्वाचा आशय तुमच्या ओंजळीत अलगद येऊन पडतो..! मुक्तछंदात तुम्ही स्वावलंबी असता. आणि कोणत्याही दिग्दर्शनाशिवाय तुम्हाला तुमचे अनावरण करायचे असते...!

माझ्या मते मुक्तछंद कवितेत भावाशय कुठल्याही तडजोडीशिवाय थेट मांडता येतो. पण म्हणजेच तो स्वतःला खोदून उपसून काढावा लागतो. स्वतःला समजून घ्यावा लागतो. पूर्ण आशय मनात तयार असेल असं नाही. लिहिताना तो उलगडत जातो. लिहिणं म्हणजेच खोदणं असतं एकप्रकारे. मुक्तछंद कविता लिहिताना शब्दांना यमक.. इ. नियम नसतात. पण शब्दांचा फापटपसारा झाला की कविता पसरट होते आणि पुरेसं व्यक्त होता आलं नाही तर अर्थहानी होते. कविता फसते. कवितेच्या लांबीला काही नियम नाहीत. पण त्यातली एकही ओळ काढली किंवा खालीवर केली तर कवितेचा तोल जाईल अशी तिची बांधणी पक्की असावी लागते. कवितेची सुरुवात, विस्तार आणि शेवट याही बाबतीत नियम नसले तरी शेवट असा असावा की लगेच खाली सही करता यावी. शेवटी पंचलाइन किंवा क्लायमॅक्स असावा. विस्तार करताना त्यातली प्रत्येक ओळ आशय पुढे नेणारी असावी. एकच मुद्दा वेगवेगळ्या प्रकारे सांगण्यातही कवीची झेप व्यक्त होऊ शकते. त्यातून आशयाच्या कक्षा लक्षात आणून दिल्या जातात. उदा. कुसुमाग्रजांची ‘प्रेम कुणावरही करावं...’ ही कविता.

समारोप-

कविता लिहिणं एकूणातच सोपं नाही. आकाशातली वीज हातात धरण्यासारखं आहे ते.. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवींच्याही एकुणएक कविता उत्तम असत नाहीत. जमून गेलेल्या कोणत्याही कलाकृती संख्येनं थोड्याच असतात. त्यामुळं मुक्तछंद असो की छंदोबद्ध असो त्यात खरं काव्य उतरलंय का? हे महत्त्वाचं. पूर्वी छंदोबद्ध कवितेत पौराणिक कथा गुंफलेल्या असायच्या. तेव्हा ते माध्यम होतं. कथानक असलेल्या त्या कविता छंदोबद्ध असल्या तरी त्यांना कविता का म्हणायचं असा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. मुक्तछंदाला तर असा प्रश्न विचारलाच जाऊ शकतो.

मग प्रश्न निर्माण होतो की कोणत्या रचनेत काव्य आहे असं म्हणायचं? असे प्रश्न पडणं, त्यांच्या उत्तरांसाठी संवाद साधणं, अभ्यास करणं, इतरांच्या चांगल्या कविता वाचणं, आपल्यापुरतं त्याचं रसग्रहण करणं.. यात चांगलं काय आहे? कशामुळे आहे? ते पाहणं... चांगलं असण्याचे काही ठोस नियम नाहीत. आपणच ठरवायचं आपल्याला हे कशामुळं भावलं ते. ही रियाजाची दीर्घकाल चालणारी प्रक्रिया आहे. ज्याला तीव्र आंतरिक ध्यास आहे अशा व्यक्ती हे उत्स्फूर्तपणे करत असतात.

अनुभवांचे आंतरिकीकरण, अनुभवसमृद्धी, कवितांचा अनुवाद, समीक्षा, मुक्तछंद-छंदोबद्ध रचनेचा विचार... अशा विविध अंगांनी कवितेला भिडता येतं. हा एक प्रगल्भतेकडे नेणारा आंतरिक प्रवास आहे. कवीचे समृद्ध व्यक्तित्व हा कवितेचा पूर्वार्ध असतो तर शब्दात प्रकटलेली कविता हा उत्तरार्ध असतो. म्हणून कवितेचा रियाज म्हणजे खरंतर एक चांगलं, प्रगल्भ माणूस होण्याचाच रियाज असतो..!

आसावरी काकडे

१९.०४.२०२१

 

 

 

 

    

 

Thursday 18 March 2021

बालकवींची कविता

 

‘ग्रंथयात्रा’ या अर्चना मिरजकर याच्या उपक्रमासाठी-

आधुनिक मराठी कवितेची पायाभरणी करणार्‍या मोजक्या कवींमधे बालकवी हे एक महत्त्वाचे कवी मानले जातात. त्यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण कवितेबद्दल बरंच लिहिलं गेलं आहे. एखादा कवी वर्तमानापासून जितका दूर जातो तितका तो अधिक स्पष्ट कळू लागतो. कारण त्याच्या कवितेकडे अनेक दर्शनबिंदूंमधून पाहणं शक्य होतं. डॉ. अनुराधा पोतदार यांनी बालकवींच्या निवडक कवितांचे ‘बालविहग’ या नावाने संपादन केले आहे. या संपादनाला त्यांनी लिहिलेल्या मर्मग्राही प्रस्तावनेत त्यांनी अनेक समीक्षकांची मतं विचारात घेतली आहेत. नंदा आपटे यांचंही ‘समग्र बालकवी’ हे संपादन प्रसिद्ध झालेलं आहे. बालकवी यांच्या ‘औदुंबर’ या बहुचर्चित कवितेवर तर अनेक समीक्षकांनी लिहिलेलं आहे. या सर्व लेखांचं संपादन ‘बालकवींची ‘औदुंबर’ कविता : विविध अर्थध्वनी’ या नावानं प्रा एस एस नाडकर्णी यांनी केलेलं आहे.

बालकवींच्या कविता वाचल्यावर सहज लक्षात येतं की ‘निसर्गातील सौंदर्याचा आस्वाद’ हे त्यांच्या कवितेचं अंतःसूत्र आहे. उन्मुक्त आनंद असो की काळवंडणारे वैफल्य असो, निसर्गात रममाण झालेले बालकवी निसर्ग-प्रतिमांमधूनच आपल्या भावना व्यक्त करतात. त्याच्या प्रेमकविताही वेगळ्या काढता येत नाहीत. वा. ल. कुलकर्णी यांनी तर म्हटलं आहे, ‘बालकवींची निसर्गकविता हीच त्यांची प्रेमकविता होय.’ अनेकार्थी कवितेप्रमाणे अनेक रूपांमधे प्रकटणारा निसर्गही ज्याचा त्याचा वेगळा असतो. बालकवींचा, त्यांनी निर्मिलेला स्वतःचा निसर्ग होता. आणि तो घरात बसून कल्पना केलेला नाही तर प्रत्यक्ष अनुभवलेला होता. आत्मसात केलेला आशय कवितेत उतरावा तसा त्यांनी आत्मसात केलेला निसर्ग ‘प्रति-निसर्ग’ बनून त्यांच्या कवितेत उतरला. त्यातील सळसळते चैतन्यौद्गार, निरामय सौंदर्य, चित्रमयता, रंगांची पेरणी, त्याला मिळालेली नादलय, निसर्ग-घटितांना दिलेली मानवी रूपं.... ही बालकवींच्या स्वप्नाळू कवीमनाची ‘प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट’ अशी निर्मिती होती.

बालकवींच्या कविता समजून घेताना त्यांचा अल्पायुषी जीवनपट, त्यांचा काळ, त्यांच्यावर झालेला केशवसुतांसारख्या कवीच्या कवितांचा संस्कार या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कवितेत डोकावणार्‍या बालवृत्तीची चिकित्सा केली जाते. त्यांच्या कवितेत येणारा लडिवाळपणा, कवितांची आशय-कक्षा मर्यादित असणं, अनुभवाला अनुभवत्व येण्यापूर्वीच तो कवितेत उतरणं, अद्‍भुताप्रत गेलेली कल्पनारम्यता कवितेत येणं, काव्यात्म अनुभव पूर्णपणे संवेदनानिष्ठ असणं... ही या बालवृत्तीची चिन्हं आहेत. बलकवींच्या कवितेची ही बलस्थानंही आहेत आणि एका अर्थी मर्यादाही आहेत.

सर्व माणसं सतत भाषेचा वापर करत असतात. त्याच रोजच्या वापरातील भाषेतल्या शब्दांना कवी आपल्या संवेदनेनं वेगळा आयाम देत असतात.  बालकवींच्या कवितेची भाषा तर आतल्या प्रकाशाने उजळलेली, उत्कटतेनं ओथंबलेली होती. त्यामुळे फुलराणी, श्रावणमासी, गर्द सभोती, औदुंबर, तारकांचे गाणे, चिमणीचा घरटा अशा कविता वाचताना त्यांच्या जिवंत प्रतिमासृष्टीचा प्रत्यय आपल्याला घेता येतो, त्यांचं ‘मानसिक वर्तमानकाळात’ वावरणं अनुभवता येतं.

बालकवींच्या सर्वपरिचित अशा निसर्गकवितांखेरीज त्यांनी काही कवितेविषयक कविता, बालकविताही लिहिल्या. त्यांची काही अपूर्ण कथाकाव्येही आहेत. ‘धर्मवीर’ ही सामाजिक आशयाची कविता त्यांनी केशवसुतांच्या ‘तुतारी’ कवितेच्या धर्तीवर लिहिलेली होती. अशा कविता लिहिणं हा बालकवींच्या कवितांचा स्वभाव नाही. त्यामुळे त्यांच्या इतर कवितांच्या तुलनेत ती तितकी सकस उतरली नाही.

‘आनंदी आनंद गडे...’ असं म्हणत निसर्गसान्निध्यात आनंदोत्सव साजरा करणार्‍या बालकवींना वैफल्यानं ग्रासलं तेव्हा मात्र त्यांना त्यातून विचारपूर्वक बाहेर पडता आलं नाही. त्र्य. वि. सरदेशमुख यांनी ‘अंधारयात्रा’ या पुस्तकातील एका लेखात बालकवींविषयी म्हटलं आहे, ‘त्यांच्या भाववृत्तीच्या सुकुमारपणाला जाणिवेच्या कणखरपणाची जोड येथे मिळू शकली नाही. आपल्या मनात दाटत चाललेल्या अंधारावर ज्ञानसंवेदनेची मशालही त्यांना पाजळून धरता आली नाही, किंवा त्या तिमिर प्रवाहात क्रियाशक्तीची नौकाही सोडता आली नाही.’

काही असलं तरी बालकवींनी आपल्या कवितांमधून साजरा केलेला आनंदोत्सव जनमानसात अजून रेंगाळतो आहे. त्यांनी स्वतः हा विश्वास त्यांच्या ‘माझे गाणे’ या कवितेत ‘निरध्वनी हे, मूकगान हे’ यास म्हणो कोणी, / नभात हे सांठवले याने दुमदुमली अवनी’ या शब्दात नोंदवून ठेवलेला आहे.

आसावरी काकडे

 

 

 

समर्थ रामदासांची काव्यसृष्टी

एखाद्या दिवाळीअंकात लेख लिहिण्याच्या दृष्टीने ‘समर्थ रामदासांची काव्यसृष्टी’ हा अतिव्याप्त विषय आहे. पण या निमित्ताने समर्थ रामदासांच्या समग्र लेखनाकडे बघण्याचा साहित्यिक दृष्टिकोन लक्षात घेतला जाईल. त्यावर विचार होईल. संत-साहित्य ‘धार्मिक’ या विभागात टाकलं की त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ठराविक साच्यातला होतो. श्रद्धेने बहुधा नुसती अक्षरं वाचली जातात आणि ठराविक भाव मनात उतरत राहतो. त्यात स्व-तंत्र आशय-आस्वादनाची प्रक्रिया होतेच असं नाही. संतांच्या रचना कविता म्हणून वाचताना आशयाचे विविध आयाम लक्षात येतात. आशय फक्त रचनेतील शब्दांमधून व्यक्त होत नाही तर त्या रचनेची लय, उच्चारातील नाद, रचनेसाठी योजलेले वृत्त... या सगळ्यातून आशयातील सूक्ष्मता उत्कट होऊन मनाला भिडते.

या दृष्टीने समर्थ रामदासांच्या विविध रचना पाहण्यापूर्वी त्यांच्या व्यक्तित्वातले वेगळेपण लक्षात घेण्यासारखे आहे. समर्थ रामदासांचे कार्य सोळाव्या शतकातले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले. ते स्वतः संन्यस्त वृत्तीचे होते. लहानपणीच घर सोडून बाहेर पडलेले. पण त्यांनी जनसामान्यांना प्रवृत्तीधर्म शिकवला. बलोपासनेचे महत्त्व समजावले. त्यासाठी प्रत्यक्ष कार्य केले. हातात धनुष्यबाण धारण करणारा श्रीराम आणि महाबली हनुमान ही त्यांची आराध्य दैवतं होती. ते स्वतःला ‘रामदास’ म्हणवत पण इतरांनी त्यांना ‘संत’ ऐवजी ‘समर्थ’ अशी उपाधी दिली गेली. त्यांचे शिष्य ‘जय जय रघुवीर समर्थ’ असा नामगजर करत असतात... सामर्थ्याचे उपासक असलेल्या रामदासांच्या व्यक्तित्वाचे प्रतिबिंब त्यांच्या काव्यात जागोजागी उमटलेले आहे. त्यांनी विविध विषयांवर वेगवेगळ्या आकृतिबंधात लिहिले. त्यासाठी ओवी-अभंगांसारखे छंद, विविध वृत्ते, यमक, अनुप्रास असे अलंकार, अर्थवाही शब्दयोजना, नादतत्त्व, शब्दोच्चार लय यांचा सढळ आणि समर्पक वापर केलेला आहे. रामदासांची ही बहुविध पैलू असणारी काव्यदृष्टी दासबोध, मनाचे श्लोक, शेकडो अभंग, आरत्या, प्रार्थना, स्फुट काव्ये, भारुड, ओवीबद्ध पत्रे... या विविध रचनांमधून व्यक्त झाली आहे. त्यांच्या एकेका रचनेच्या अनुषंगाने त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये, वेगळेपण पाहणे सोयीचे होईल.

दासबोध

दासबोध हा समर्थांनी लिहिलेला प्रमुख ग्रंथ. या पूर्ण ग्रंथाची रचना ओवी-छंदात केलेली असून त्यात रोजच्या जगण्यातील वर्तनासंबधात स्पष्ट मार्गदर्शन आहे. रोजच्या जीवनाला अध्यात्म आणि भक्ती याची जोड कशी हवी हे सांगताना विवेकावर अधिक भर दिलेला आहे. संपूर्ण ग्रंथाची रचना तर्कशुद्ध आणि विवेकपूर्ण आहे. सृष्टीची निर्मिती, जीव-आत्मा यांचे स्वरूप, ईश्वर कसा आहे?, मूर्तीपूजा, मुक्ती, मानवी जीवनाचा हेतू काय?... अशा सर्व विषयांची मांडणी समर्थांनी प्रत्येकी दहा समास असलेल्या एकूण वीस दशकांमधे सूत्रबद्ध रीतीने केलेली आहे.

समर्थांच्या ओवी-रचनेचा पोत समजण्यासाठी त्यांच्या काही ओव्या पाहू. पहिल्या दशकातील दुसर्‍या समासात गणेशस्तवन आहे. त्याची सुरुवात अशी आहे-


‘ॐ नमोजि गणनायेका । सर्व सिद्धिफळदायेका । अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरूपा ॥ १॥ माझिये अंतरीं भरावें । सर्वकाळ वास्तव्य करावें । मज वाग्सुंन्यास वदवावें । कृपाकटाक्षेंकरूनी ॥ २॥’

यातील ‘अज्ञानभ्रांतिछेदका बोधरूपा’ हे संबोधन समर्थांचे वेगळेपण अधोरेखित करणारे आहे. ओव्यांमधली काव्यात्म शब्दकळाही वाचनसुलभ आहे. ‘मज वाग्सुंन्यास वदवावें । कृपाकटाक्षेंकरूनी ॥’ अशी सुरुवात करून इतकी बृहद रचना करून झाल्यावर ग्रंथाच्या शेवटी समर्थ विवेकपूर्ण नम्रतेनं म्हणतात,

‘देहे तंव पांचा भूतांचा । कर्ता आत्मा तेथींचा । आणी कवित्वप्रकार मनुशाचा काशावरुनी ॥३४॥ सकळ करणे जगदीशाचे । आणि कवित्वचि काय मनुशाचे । ऐशा अप्रमाण बोलण्याचे । काय घ्यावे ॥३५॥’

मनाचे श्लोक-

एकूण २०५ मनाचे श्लोक समर्थांनी भुजंगप्रयात वृत्तात रचलेले आहेत. या वृत्तात प्रत्येक ओळीत बारा अक्षरे असतात आणि लघु गुरू गुरू, लघु गुरू गुरू या क्रमाने ती यावी लागतात. अशा रचनेमुळे निर्माण होणारी लय किती आशयपूरक आहे ते श्लोक मोठ्यानं म्हणताना जाणवतं. काही श्लोक पाहू-


गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥२॥

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥


**

पहिल्या कडव्यात ‘परा, पश्यंति, मध्यमा, वैखरी’ या चार वाणींचे सूचन आहे. नंतरच्या कडव्यात म्हटलंय, ‘पुढे वैखरी राम आधी वदावा’. म्हणजे ओठांवरील उच्चारात ‘राम’ शब्द उमटण्याआधी तो अंतर्मनात- ‘परा, पश्यंति, मध्यमा’मधे उमटावा...! एकेका ओळीतील असे सूक्ष्म अर्थ जाणून हे श्लोक म्हणायला हवेत.


समर्थांच्या प्रार्थना-

१ करुणाष्टके-

रोजच्या सामान्य जीवनात वाट्याला येणारे व्याप-ताप माणसाला हतबल करतात. कुणीतरी यातून सोडवायला यावं असं वाटतं. अशा मनोवस्थेत ईश्वराशी केलेला आर्त संवाद म्हणजे करुणाष्टके. ही रचना मालिनी वृत्तात केलेली आहे. हे एक अक्षरगण वृत्त आहे. या वृत्तातील कवितेच्या प्रत्येक कडव्यात चार ओळी आणि प्रत्येक ओळीत १५ अक्षरे असतात. यातील अक्षरांचा क्रमही ठरलेला असतो. पहिली सलग सहा अक्षरे लघु, मग तीन अक्षरे गुरू, आणि शेवटची सहा अक्षरे लघू गुरू गुरू, लघू गुरू गुरू अशी असावी लागतात. ओळीतील तीन तीन अक्षरांच्या गटाला गण असं म्हणतात. प्रत्येक ओळीतला यती आठव्या अक्षरावर असतो. अशा रचनेमुळे या वृत्ताला स्वतःची विशिष्ट लय प्राप्त झाली आहे. करुणाष्टकातल्या काही ओळी पाहिल्या तरी या वृत्ताचे सौंदर्य आणि अनुरूपता लक्षात येईल-

‘अनुदिनी अनुतापे तापलो रामराया
परमदिन दयाळा नीरसी मोहमाया
अचपळ मन माझे नावरे आवरीता
तुजविण शिण होतो धाव रे धाव आता ॥१॥’

***

अनेक घरात पूजेच्या वेळी ही प्रार्थना श्रद्धेने म्हटली जाते. सहज कानावर पडली तरी त्यातल्या आळवण्यातली उत्कटता जाणवते आणि नकळत दिलासा मिळतो...

२ कल्याण करी रामराया-

समर्थांची ही प्रार्थना आर्त स्वरात गायली जाते तेव्हा ती ऐकताना मनात गहिवर उमटल्याशिवाय राहात नाही. जनसामान्यांविषयीची आस्था, तळमळ शब्दाशब्दांतून आणि रचनेच्या लयीतूनही व्यक्त झाली आहे. या प्रार्थनेचे शब्द-


कल्याण करी रामराया, देवराया । जनहित विवरी ॥धृ.॥
तळमळ तळमळ होतची आहे । हे जन हाती धरी ॥१॥
अपराधी जन चुकतची गेले । तुझा तूच सावरी ॥२॥
कठीण त्यावरी कठीणची झाले । आता न दिसे हुरी ॥३॥
कोठे जावे काय करावे । आरंभिली बोहरी ॥४॥
दास म्हणे अम्ही केले पावलो । दयेसी नाही सरी ॥५॥

कोमळ वाणी दे रे राम-

     या प्रार्थनेत रामाकडे मागणं केलेलं आहे. ते काय आहे? कोमळ वाणी, विमल करणी, बहुजनमैत्री, विद्या-वैभव, सावधपण, संगीत-गायन, नृत्यकला, सज्जन-संगती, अलिप्तपण, अनन्य सेवा... हे सर्व मागता मागता जाणवतंय की काय मागावं ते कळत नाहीए म्हणून मग जे कळत नाहीए ते दे, आणि शेवटी म्हटलंय, अशी तद्रूपता दे की ‘मजविण मज’ ब्रह्मानुभव मिळावा. किती भावपूर्ण आणि विवेकी मागणी आहे ही..!

अभंग-

१ आरंभी वंदिन अयोध्येचे राजा-

भीमसेन जोशी यांनी गायलेला हा अभंग सर्वश्रुत आहे. या रचनेच एक वैशिष्ट्य आहे- ज्या शब्दांनी कडवं संपतं त्याच शब्दांनी दुसरं कडवं सुरू होतं... याला कवितेच्या भाषेत दाम यमक म्हणतात. या रचनेचे शब्द -


आरंभी वंदिन अयोध्येचा राजा
भक्ताचिया काजा पावतसे

पावतसे महासंकटी निर्वाणी
रामनाम वाणी उच्चारिता

उच्चारिता राम होय पापक्षय
पुण्याचा निश्चय पुण्यभूमी

पुण्यभूमी पुण्यवन्तासी आठवे
पापिया नाठवे काही केल्या

काही केल्या तुझे मन पालटेना
दास म्हणे जना सावधान

***

२ येथे का रे उभा श्री रामा

पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेलेल्या समर्थांना तिथं आपल्या आराध्य दैवत असलेल्या रामाचंच दर्शन होतं. तेव्हा त्यांना दिसलेल्या रामाला ते विचारतायत, ‘तू येथे का उभा आहेस?’ असे बरेच प्रश्न असलेला हा अभंग बरंच काही सूचित करणारा आहे. त्याचे शब्द असे आहेत-

येथे कां रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥
काय केली सीतामाई । येथे राही रखुमाई ॥
काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥
काय केली शरयू गंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥
धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥
काय केले वानरदल । येथे मिळविले गोपाळ ॥ 

रामी रामदासी भाव । तैसा होय पंढरिराव ॥रामदासांसारख्या निस्सिम रामभक्ताला सर्वत्र रामाचेच दर्शन कसे होते, सर्व देव एकच आहेत, भेद वरवरचा असतो... हा अर्थ तर यातून व्यक्त होतोच. पण ‘धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥’ हा प्रश्न वेगळं काही सूचित करतो आहे असं वाटतं. बाहेर सतत युद्धजन्य परिस्थिती असताना तू धनुष्यबाण टाकून हात कमरेवर ठेवून नुसता उभा का आहेस? असं तर समर्थांना म्हणायचं नसेल?

स्तोत्रे-

रामरक्षेसारखं ‘भीमरूपी महारुद्रा’ हे स्तोत्रंही घराघरात म्हटलं जातं. याला अनुष्टुप छंदाची लय आहे. यातील वनारी, अंजनीसूता, रामदूता, प्रभंजना... अशा एकेका संबोधनातून हनुमंताचं वर्णन केलेलं आहे. चित्रकार रंग-रेषांच्या एकेका आविष्काराने चित्र साकारत नेतो तसे ‘ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें’ अशा वर्णनातून समर्थांनी मनातील आराध्याचं मूर्त रूप साकारलंय. त्यातील काही ओळी-

‘भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||’

‘ध्वजांगे उचली, बाहो, आवेशें लोटला पुढें |
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||’
**

समर्थांनी आपल्या रचनांमधे काव्यालंकारांचा सढळ वापर केला आहे. त्यांनी लिहिलेले 'नृसिंहपंचक स्तोत्र' हे लाटानुप्रास अलंकाराचे उत्तम उदाहरण आहे. त्यातील एक कडवं- 
 
नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें।
प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें।
खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें।
तट तट तट स्तंभि व्यापिलें वन्हिजाळें।।
**

आरत्या -

समर्थांनी वेगवेगळ्या देवांच्या साठच्यावर आरत्या लिहिलेल्या आहेत. त्यातील ‘सुखकर्ता दुखहर्ता...’ ही गणपतीची आणि ‘लवथवती विक्राळा..’ ही शंकराची या आरत्या सर्वत्र नेहमी म्हटल्या जातात. या आरत्यांमधील शब्दांमधून झालेल्या रसोत्पत्तीचा काव्यदृष्ट्या विचार केला तर समर्थांची समर्थ काव्यशैली लक्षात येईल. श्री शंकराची आरती म्हणजे तर प्रभावी व्यक्तिचित्रणच आहे. पूर्ण तपशील देत केलेलं यातलं वर्णन डोळे मिटून ऐकलं तर मनःचक्षूसमोर साक्षात शंकर प्रकटेल... ‘लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा’ ही पहिलीच ओळ डोळ्यासमोर एक विराट दृश्य उभं करणारी आहे. त्यातलं पहिलं कडवं-

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।
वीषें कंठी काळा त्रिनेत्रीं ज्वाळां।।
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा।
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां ।।1।।
जय देव जय देव जय श्रीशंकरा।।
आरती ओवाळूं तुज कर्पुरगौरा ।।ध्रु.।।
**

समर्थांचे शब्दवैभव त्यांच्या काव्यात जागोजागी दिसते. त्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे त्यांनी लिहिलेली ‘गीरीचे मस्तकी गंगा । तेथुनि चालिली बळे । धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे..’ असे शिवथरघळीचे वर्णन करणारी सुंदर निसर्गकविता... अशी आणखी कितीतरी उदाहरणं देता येतील. वृत्त, छंद, नादलय, अलंकार, चित्रदर्शी शब्दयोजना... अशा काव्यगुणांमुळे तात्त्विक उपदेश सुंदर आणि भावपूर्ण होऊन जनमनात कसा पाझरू शकतो ते ‘समर्थ रामदासांची काव्यसृष्टी’ या विषयावर लिहिण्याच्या निमित्ताने लक्षात आणून द्यायचा अल्पसा प्रयत्न केला आहे.

आसावरी काकडे

२७.९.२०२०

(या लेखासाठी समर्थांचे समग्र साहित्य प्रत्यक्ष ग्रंथरूपात पाहता आले नाही. बरीच माहिती गूगलसर्चने मिळवलेली आहे. काही चुका असल्यास क्षमस्व.)

 आनंदघन दिवाळीअंक २०२०