Sunday 25 November 2018

मनाला दार असतंच

‘मनाला दार असतंच’ हा वर्षा पवार-तावडे यांचा कॉन्टिनेन्टल प्रकाशनानं सिद्ध केलेला कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे. संयत रंग वापरून जागोजागी काढलेली देखणी, अर्थपूर्ण इलस्ट्रेशन्स असलेल्या या संग्रहाची एकूण निर्मिती उत्तम झाली आहे. भरजरी पेहरावातूनही चेहर्‍यावरचं मार्दव डोकवावं तसं संग्रहाचं शीर्षक साधेपणानं मुखपृष्ठावर विराजमान झालेलं आहे. आतल्या कविताही या भारदस्त नेपथ्यात झाकोळून न जाता आपल्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटवत राहतात. कवी सौमित्र यांची प्रस्तावना आणि संदीप खरे यांच्या मलपृष्ठावरील शुभेच्छा याही या संग्रहाच्या जमेच्या बाजू. कारण सेलिब्रेटीपणातही खरी कविता जपलेले हे रसिकप्रिय कवी आहेत.

संग्रहातील पहिल्याच शीर्षक कवितेत वर्षाताईंनी अदृश्य राहून सर्वस्व व्यापणार्‍या माणसाच्या मनाविषयी सहज साधेपणानं भाष्य केलेलं आहे. त्या म्हणतात,
“मनाला दार असतंच
म्हणून तर त्याचं सारखं
आत-बाहेर चालू असतं...
ते दार कधी आतून बंद होतं
तर कधी बाहेरून लावलं जातं..
गंमत म्हणजे दोन्हीकडच्या चाव्या
आपल्याच ताब्यात असतात...”

चमकदार शब्दांची आतषबाजी करण्याचा मोह या संग्रहातील कविताना नाही हे या पहिल्या कवितेतूनच लक्षात येतं... वर्षा पवार-तावडे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह आहे. एक संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता ही त्यांची पहिली ओळख. पार्श्वभूमी कोणतीही असली तरी माणूस सजगपणे भोवतीच्या वास्तवाचा विचार करत असेल आणि त्याचं मन आर्द्रतेनं भरलेलं असेल तर ते अनावरपणे व्यक्त होऊ पाहातंच. जगताना येणारी अस्वस्थता, मनातली खदखद व्यक्त करताना वर्षाताईना त्यांच्यातली कविता सापडली आणि या माध्यमातून व्यक्त होताना त्यांना त्यांची स्वतःचीही नव्याने ओळख झाली असं त्यांनी संग्रहाच्या मनोगतात म्हटलं आहे. अशी स्व-ओळख होत जाणं हीच खरंतर कविता सापडण्याची खरी खूण आहे. या संग्रहात भोवतीचं सामाजिक वास्तव, त्यात जगणार्‍या स्त्रीचं रूप, नाती, आणि मानवी मनाचा ठाव घेत स्वतःचा शोध घेणार्‍या कविता आहेत.

भोवतीचं वास्तव घाबरवणारं आहे. त्यात जगताना वास्तवाशी दोन हात करत जिद्दीनं उभं राहण्याची, किंवा वास्तवच बदलून टाकण्याची हिम्मत सर्वसामान्य स्त्रीमधे असतेच असं नाही. मग जगणं सुसह्य व्हावं असं समाजपरिवर्तन होण्याची आर्ततेनं वाट पाहणं एवढंच तिच्या हाती उरतं. ‘तो ‘माणूस’ कधी होणार?’ या कवितेत स्त्रीच्या मनातली ही व्याकुळ अवस्था वर्षाताईंनी व्यक्त केली आहे. या कवितेत त्याअंनी म्हटलं आहे,

‘ती सध्या काय करतेय?
रंग-रूप आणि देहाच्या पलिकडे
तो तिला सन्मानाने
कधी पाहणार
याची वाट बघतेय

भर रस्त्यात तिची छेडछाड
तिच्यावरचे बलात्कार
कधी थांबणार?
याची वाट बघतेय

अ‍ॅसिड फेकून
तिच्यावर सूड न घेता
तिचा नकार पचवायला
कधी शिकणार
याची वाट बघतेय

मर्दानगीच्या खोट्या कल्पनांतून
बाहेर पडून
तो ‘माणूस’ कधी होणार?
याची वाट बघतेय” (पृष्ठ २३)

अशी वाट बघत, परंपरा सांभाळत खालमानेनं संसारात गुरफटलेल्या स्त्रीला वर्षाताई ‘वटपौर्णिमा’, ‘‘असत्य’वाना’, ‘अगं, अगं सावित्री’ यासारख्या कवितांमधून भानावर आणण्याचा प्रयत्न करतात. ‘अगं, अगं सावित्री’ या कवितेत त्यांनी वटपौर्णिमेचा उपास करणार्‍या आजच्या सावित्रीला ज्योतिबांच्या सावित्रीची आठवण करून दिलीय. कवितेत त्यांनी म्हटलंय, ‘उपास-तापास करताना / ठेव कणखर मन / तू सुद्धा सावित्रीसारखी / बुद्धीवादी बन /’

‘जमवायला हवंय’ या कवितेतही त्या स्त्रीमनाला समजावतायत, ‘जमवायला हवंय... स्वतःच्या कोषातून बाहेर पडणं / आणि स्वच्छ नजरेनं जगाकडे बघणं../... ‘ह्या कलियुगात.../ जमवायला हवंय / स्वतःतल्या कृष्णाला जाणणं / आणि आपल्या मनोरथाचं सारथ्य / स्वतःच समर्थपणे करणं..!!’ या कवितेतली ‘मनोरथाचं सारथ्य’ ही शब्दयोजना अतिशय मार्मिक आणि कल्पक अशी आहे. अनावर वेग असलेल्या मनाच्या रथाचं सारथ्य करायला स्वतःतल्या कृष्णाला आवाहन करणं जमायला हवंय ही अभिव्यक्ती लक्षात राहील अशी आहे..!

स्त्रीचं समाजातलं दुय्यम स्थान, तिच्या कष्टांची सहज उपेक्षा... या गोष्टी सतत लेखनातून मांडल्या जातात. पण स्त्रीचं गौण असणं समाजाच्या रोमरोमात इतकं भिनलेलं आहे की रोजच्या बोलीभाषेतील शब्दांपासून ते जीवनाशी निगडीत असंख्य गोष्टींमधून ते सतत व्यक्त होत राहातं. अशीच एक ‘चाल’ वर्षाताईंनी ‘बुद्धीबळात राणी अज्ञातवासात’ या त्यांच्या कवितेतून लक्षात आणून दिलीय. स्त्रीच्या उपेक्षित अस्तित्वासंदर्भातलं हे सूक्ष्म निरीक्षण कौतुकास्पद आहे. या कवितेत त्यांनी म्हटलंय,
‘‘चौसष्ट चौकड्यांच्या खेळात
राणी अज्ञातवासात आहे

राणीला पटावर यायला
अजून तरी ‘मज्जाव’ आहे
तिच्या आस्तित्वाची तरी
इथे कोणाला जाण आहे ?

ती असली किंवा नसली तरी
राजाला कुठे भान आहे ?
पटावरचं राज्य जिंकायचं
हेच त्याचं काम आहे

हत्ती, घोडे, उंट, प्यादी
सगळे मोहरे सज्ज आहेत
वजीरसुद्धा राजासाठी
आपली ‘चाल’ चालणार आहे

शह-काटशहाच्या खेळापासून
राणी मात्र अज्ञात आहे
तिला कुठे कळले आहे
कोणाची कोणावर मात आहे

चौसष्ट चौकड्यांच्या खेळात
राणी अज्ञातवासात आहे” (पृष्ठ ४७)

‘मंगळसूत्र’, ‘जोडवी’ ‘स्त्री शक्तीचा अर्थ’ अशा अनेक कवितांमधून स्त्रीविषयक वास्तवाचं चित्रण वर्षाताईंनी केलं आहे. आपल्या कवितांमधून कधी त्या स्त्रीपण समजून घेतात तर कधी स्त्रीला समजावून सांगतात. ‘खरंच, ती ‘कार्यकर्ती’ सध्या काय करते? असा प्रश्न विचारत कधी अंतर्मुख होऊन स्वतःचा शोध घेतात तर कधी ‘मला मंदिरात जायचंच नव्हतं’ सारख्या कवितेतून मंदिर-प्रवेशासारख्या प्रश्नासंदर्भात स्वतःची भूमिका मांडतात. ‘मी’- ‘मीपलं – ‘तू’- ‘तुपलं’ / करता करता / काहीच उरलं नाही आपलं’ असं म्हणत कधी कुटुंबरचनेची चाललेली घसरण अधोरेखित करतात तर कधी ‘डावं – उजवं’ सारख्या कवितेतून समाजातील विचारवंतांच्या भूमिकांची समीक्षा करतात आणि ‘मला भीती वाटते, / डाव्यांमधल्या ‘जहाल’ डाव्यांची / आणि उजव्यांमधल्या ‘कर्मठ’ उजव्यांची..!’ अशी सार्थ भीती व्यक्त करतात.

‘मनाला दार असतंच’ या शीर्षक-कवितेशिवाय मनाच्या स्वरूपावर भाष्य करणार्‍या आणखीही काही कविता या संग्रहात आहेत. ‘देह आणि मन’ या कवितेत दोन्हीची तुलना करताना वर्षाताईंनी म्हटलंय,
‘देह आहे तसा दिसे
मन स्वतःला नोळखे
देह बेधुंद सोहळा
मन उसासे पोरके’ (पृष्ठ ११६)

‘मनात लपलेला नारद’ ही वेगळीच प्रतिमा वापरून मनाचं केलेलं चित्रण  मार्मिक झालं आहे. त्यासाठी तयार केलेल्या इलस्ट्रेशनमुळे या कवितेला दृश्यात्मक आयामही मिळाला आहे. या कवितेत म्हटलंय,
“प्रत्येकाच्या मनात
एक ‘नारद’ असतोच
पण त्याची ओळख पटवायला
आपल्याला वेळ नसतो !

तो ‘कळ’ लावून
नामानिराळा होतो
आणि आपण मात्र
आपली झोप उडवून बसतो !

समज, गैरसमज,
राग आणि भीती
संशयकल्लोळ पसरवणं
हीच तर नारदाची नीती !

अधूनमधून ‘कृष्णाला’
मनात आठवायचं असतं
भावनिक गोंधळातून
सावरायचं असतं !

चूक-बरोबर, खरं-खोटं
तपासायचं असतं
आणि मनातल्या नारदाला
हरवायचं असतं !! (पृष्ठ १०७)

‘खूप बोलायचंय मनाशी...’ या शेवटच्या कवितेत वर्षाताई सतत जवळ असून हुलकावणी देणार्‍या मनाचा शोध घेतायत. कवितेत शेवटी त्या म्हणतात, हा लपंडाव आता पुरे झाला.. आता ‘सोडून नको जाऊस मला / अशी पाठ फिरवून / खूप बोलायचंय तुझ्याशी / मुखवटे बाजूला काढून...’ समाजात वावरताना वेळोवेळी धारण कराव्या लागणार्‍या मुखवट्यांचं ओझं उतरवून आपल्या मनाशी बोलावसं वाटणं हे कवितेशी अंतरंग मैत्र जुळल्याचंच चिन्ह आहे.

या कवितासंग्रहाची अर्पणपत्रिका भावपूर्ण तर आहेच पण त्यातून वर्षाताईंची कवितेकडे, एकूण जगण्याकडे पाहण्याची प्रांजळ मनोवृत्ती व्यक्त होते. ‘रोजच्या जगण्याला सामोरं जाताना माझ्यातली ‘मी’ शोधायला मदत करणार्‍या आणि माझ्यातली कार्यकर्ती जिवंत ठेवणार्‍या सर्वांना’ वर्षाताईंनी हा आपला पहिला कवितासंग्रह अर्पण केलेला आहे. आपलं कार्यकर्तीपण जिवंत राहावं ही त्यांची आस पूर्ण व्हावी आणि स्वतःतल्या ‘स्व’ची शोधयात्रा चालू राहावी यासाठी वर्षाताईंना कवितेची अखंड सोबत लाभू दे हीच त्यांच्या पुढील काव्यलेखनासाठी हार्दिक शुभेच्छा..!

आसावरी काकडे
9762209028
asavarikakade@gmail.com


२५.११.२०१८ च्या सकाळ सप्तरंग पुरवणीत संपदित स्वरूपात प्रकाशित.