Saturday 29 July 2017

कवितेतून व्यक्त होताना


कवितेतून व्यक्त होणं काय असतं?.. खरंच, काय असतं व्यक्त होणं म्हणजे..? व्यक्त होण्यात आधी ते अव्यक्त रूपात असणं गृहीत आहे. कुठं असतं ते? मनात.. बुद्धीत.. पेशी-पेशींमध्ये.. डी एन ए मध्ये..? की पंचेंद्रियांनी आपल्याशी जोडलेल्या चराचरात? काय घडतं व्यक्त होतांना?... कोणत्याही निर्मितीप्रक्रियेचा विचार करतांना असे मूलभूत प्रश्न पडतात. व्यक्त होण्यासाठी वापरलेल्या माध्यमानुसार कलाकृतीचं रूप बदलतं फक्त...! 

कवितेसाठी भाषा.. शब्द हे माध्यम आहे. इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा अधिक जिवलग.. जन्मासोबत आलेलं. सर्वव्यापी, सर्वांचं असलेलं. श्वासासारखं सतत आत-बाहेर करणारं. आपल्या आधी आणि नंतरही असणारं.. इतकी सतत सर्वत्र सगळ्यांची असते भाषा. तरी, अशा भाषेत लिहिलेली प्रत्येक कविता वेगळी असते. श्रेष्ठ.. सुमार कशीही असली तरी तिच्यासारखी तीच असते. एकमेव. कारण ती एका ‘स्व’ची अभिव्यक्ती असते. आणि अब्जावधी माणसांमधली प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र, एकमेव असते. तिचा ‘स्व’ वेगळा असतो..! 

कवितेतून व्यक्त होणं म्हणजे या ‘स्व’चं अनावरण..! झाकलेलं, दडलेलं, निराकार असलेलं उलगडून शब्दांमध्ये साकार करणं. ‘स्व’रूपाचाच शोध असतो तो. कविता लिहिताना शब्द टिपून घेतात आशय कुठे कुठे रुजलेला. किंवा असंही म्हणता येईल.. आशय भावरूप होऊन उसळतो आणि व्यक्त होण्यासाठी तो वेचून घेतो शब्द.... ‘स्व’ची जाणीव कुठे, किती खोल जाईल, मन.. बुद्धी.. पेशी.. डीएनए.. पैकी कुठे पोहोचेल तितका खोलातला अव्यक्त आशय ती शब्दांना देऊ शकेल. पंचेंद्रियांनी आपल्याशी जोडलेल्या चराचरात किती दूरवर पोहोचेल तेवढा व्यापक आशय तिला गवसेल. हा ‘आशय’ म्हणजे ‘स्व’चीच विविध रूपं असतात. कविता-लेखनाच्या आतापर्यंतच्या अनुभवातून मला जाणवलंय की आपली प्रत्येक कविता आपलं एखादं रूप आपल्याला उलगडून दाखवत असते. 

व्यक्त होऊ पाहणारा आशय मनात पूर्णतः आधीच स्पष्ट असतो असं दरवेळी होत नाही. एखादा विचार, कल्पना चमकते मनात. तिचं टोक पकडून लिहिता लिहिता आशय उलगडत जातो... बर्‍याचदा असं घडतं की जे लिहावं असं मनात असतं ते शब्दांमध्ये पूर्णतः उतरतच नाही. मग मनात राहिलेलं अस्पर्श असं ‘ते’ खुणावत राहातं सतत. अस्वस्थ करतं. त्याला स्पर्श करण्याच्या तहानेनं व्याकूळ होऊन जोपर्यंत आपण बुडी मारत नाही जगण्याच्या तळ्यात शब्द वेचण्यासाठी, जिवाच्या आकांतानं उत्खनन करत नाही आस्तित्वांच्या ढिगार्‍यांचं शब्द शोधण्यासाठी किंवा तपश्चर्या करून जिंकून घेत नाही हवे ते शब्द आकाशतत्त्वाकडून तोपर्यंत ते तसंच अस्पर्श राहातं आणि परत परत साद घालत राहातं शब्दांना...

प्रत्येक वेळी शब्दांसाठी अशी तपश्चर्या केली जात नाही. तयार भाषेतून शब्द अलगद पडतात ओंजळीत गळणार्‍या पानांसारखे वाळलेले.. निस्तेज... आणि आपण न कळताच सहज वापरून टाकतो असे आयते, स्वतः न कमावलेले पिढ्यान् पिढ्यांचे उष्टे शब्द आपले म्हणून..! अशा कवितेतून व्यक्त होणारा आशय वरवरचा असतो. अस्पर्श स्वचे अनावरण होतच नाही..! पण अपूर्णतेची ही अवस्थाच पुन्हा पुन्हा लिहिण्याची प्रेरणा देत राहते...

असं सतत कवितेतून व्यक्त होणं हे आपल्याला घडवणारंही असतं. कविता लिहिता लिहिता कवितेचं स्वरूप उमगत जातं. अपुरेपणाच्या जाणीवेतून झालेल्या चिंतनातून, रियाजातून आपली कविता विकसत जाते. कवितेच्या या विकासाबरोबर आपलाही विकास होत असतो. कारण ती दरवेळी आपल्या बदललेल्या, विकसित झालेल्या, नवं काही सांगू पाहणार्‍या ‘स्व’ची अभिव्यक्ती असते. कवितेतून व्यक्त होणं हे असं एकमेकाला घडवणारं असतं

ही प्रक्रिया सजगपणे अनुभवण्यासारखी आहे... लेखन कोणत्याही प्रकारचं असो त्यातून आपलं व्यक्तित्वच डोकावत असतं. खरंतर आपल्या प्रत्येक शारीरिक, वैचारिक कृतीतूनही तेच व्यक्त होत असतं. त्यामुळे अधिक सकस लेखनाची पूर्व अट अधिक चांगलं माणूस होणं ही आहे अशी माझी धारणा आहे. मध्यंतरी मी गोरखपूर येथील ज्येष्ठ कवी विश्वनाथ प्रसाद तिवारी यांच्या कवितांचा अनुवाद केला. त्यांची एक कविता आहे- बेहतर कविता लिखेगा वही / जो बेहतर कवि होगा / जिस समय वह लिख रहा होगा सबसे अच्छी कविता / जरूर होगा उस समय वह / सबसे अच्छा आदमी / जिस दुनिया में लिखी जायेंगी बेहतर कविताएँ / वही होगी बेहतर दुनिया / शब्द और अर्थ नहीं है कविता / सबसे सुंदर सपना है सबसे अच्छे आदमी का !’ 

अधिक चांगलं माणूस होण्याची आस आणि साहित्यसाधना या गोष्टी वर म्हटल्याप्रमाणे हातात हात घालून चालणार्‍या आहेत. हे कसं समजून घेता येईल? त्यासाठी लेखन-वाचन प्रक्रिया समजून घ्यावी लागेल... जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा आपल्या व्यवहारी मीपासून आपण बाजूला झालेले असतो. जे लिहायचं आहे त्या पातळीवर गेलेलो असतो. एकप्रकारे आपण तेव्हा आत्मभानात असतो. आपल्या जवळ, आतपर्यंत पोचलेले असतो. व्यवहारातली कुठलीही कृती करताना, विचार करून पाहा, आपण त्या कृतीत पूर्णांशानं उपस्थित नसतो. बर्‍याच गोष्टी सरावाने, प्रतिक्षिप्तपणे होत असतात. आपण एकीकडे आणि मन दुसरीकडेच..! लिहित असताना असं घडत नाही. लेखन-कृतीत आपण पूर्णपणे उतरलेले असतो. त्याशिवाय लेखन होऊच शकणार नाही. ‘उत्तरार्ध’ या माझ्या कवितासंग्रहाच्या मलपृष्ठावर मी लिहिलंय- ‘ही अक्षरं नाहीत / हे शब्द नाहीत / या कविता नाहीत /... मौनातून उसळून / मौनात विसर्जित होण्यापूर्वी / मध्यसीमेवर अस्तित्वभान देत / निमिषभर रेंगाळलेल्या आशयाची / स्मारकं आहेत ही / उभ्या आडव्या रेषा / काही बिंदू, काही वळणं / आणि बरंचसं अवकाश / यांनी घडवलेली..!

कसं असतं हे आपल्या जवळ जाणं? अस्तित्वभान येणं?... आपण जे लिहितो ते आशय-रूपात आधी मनात उमटतं. त्या अमूर्त आशयाचं शब्दांकन करताना, एकप्रकारे त्याचा शब्दांत अनुवाद करताना आधी तो आपल्याला उमगतो. त्याशिवाय शब्दांकन करणं शक्यच नाही. हा आशय उमगणं म्हणजेच अस्तित्वभान येणं, स्वरूप उमगणं..! उदा. तुम्ही प्रवासवर्णन लिहिताय. प्रवासातला एखादा अनुभव लिहिताय. हा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. तुमच्या नजरेतून दिसलेलं तुम्ही लेखनातून दुसर्‍यांना सांगू बघताय. प्रत्यक्षात तुम्ही वर्णन करत असता तुम्ही पाहिलेल्या दृश्याचं. हे वर्णन म्हणजे त्या दृश्याविषयीचं तुमचं आकलन असतं. पण त्याचवेळी ते त्या दृश्याकडे पाहणार्‍या तुमच्या दृष्टिकोनाचंही आकलन असतं. तुम्ही प्रवासवर्णन लिहिता तेव्हा तुम्हाला प्रवासातलं नेमकं काय आवडलं, का आवडलं हे त्या लेखन-प्रक्रियेत तुम्हाला उलगडत जातं. स्वतःची आवड आणि निवड कळते. स्वतःचा स्तर कळतो. त्यामुळे स्व-समीक्षा करता येते. विकसित होण्याची ती सुरुवात असते. हे सर्व घडत असतं. जाणीवपूर्वक ही प्रक्रिया समजून घेतली नाही तरीही... कुसुमावती देशपांडे यांनी पासंगया आपल्या समीक्षाग्रंथात म्हटलं आहे- काव्य लिहिण्यापूर्वी कवीच्या जाणिवेची जी पातळी असते त्यापेक्षा वेगळ्या पातळीवर ते काव्य लिहिल्यानंतर कवी पोचत असतो.’... कवितेच्या निर्मिती-प्रक्रियेत होणार्‍या स्व-आकलनाकडे सजगपणे पाहिलं तर या विधानाचा अर्थ उमगू शकेल.

स्व-शोध आणि ‘स्व’ची घडण या दोन गोष्टी मला सतत म्हत्त्वाच्या वाटत आल्या आहेत. माझा वैचारिक प्रवास त्याच दिशेनं चालू राहिला आहे. त्या साध्य करण्याचं माध्यम असलेल्या शब्दांचं, भाषेचं, कवितेचं...एकूण लेखन-प्रक्रियेचं  स्वरूप आणि सामर्थ्य ती प्रक्रिया आतून अनुभवताना मला हळूहळू उमगत गेलं. ही समज येण्याच्या आधीचा प्रवास बराच मोठा आहे. कविता हाच प्रकार व्यक्त होण्यासाठी जवळचा का वाटतो? या प्रश्नामुळे माझ्या वैचारिक प्रवासाच्या सुरुवातीच्या काळाची आठवण ताजी झाली...

सुरुवातीला व्यक्त होण्यासाठी डायरी-लेखन हे मला सापडलेलं साधन होतं. सतत पडणारे प्रश्न, त्यातून येणारी अस्वस्थता, एखादी सुचलेली कल्पना, रुखरुख, पश्चात्ताप, आनंद, मनात स्फुरलेला विचार, क्वचित कुठे काही वाचलं असेल त्याला प्रतिसाद... असं जे काही मनात पिंगा घालत राहील ते डायरीत उतरवायचं आणि त्यातूनं बाहेर पाडायचं.. ही माझी फार पूर्वीपासूनची सवय. हे लेखन अर्थात अगदी स्वतःपुरतं. पण शब्दात व्यक्त होऊन स्वतःला समोर पाहाता येण्यातली गंमत अनुभवता यायची. सूख वाटायचं. मनातले कल्लोळ शब्दात उतरवून मोकळं होण्याची ही सोय इतकी सवयीची झाली की कॉलेजातला माझा अभ्यास म्हणजे वाचन कमी नोट्स काढणं अधिक असं असायचं...! 

या स्वांतःसुखाय लेखनात एकदाच एक कविता लिहिली गेली. कुठेतरी वाचलेल्या कवितेला प्रतिसाद अशा रूपात होती ती. मूळ कविता कुठे वाचली, ती कुणाची होती ते आता आठवत नाही पण तिचा भावाशय असा होता- विरहार्त राधेला कृष्ण समजावून सांगतोय की, ‘अगं जरा बघ अवती-भवती.. हे आकाश.. वृक्ष.. फुलं.. ही सगळी आपल्या मीलनाचीच रूपं आहेत. आपण एकमेकांपासून दूर नाहीच..’ हे ऐकून राधेला काय वाटलं असेल ते मी लिहिलं डायरीत माझ्यापुरतं.. ते असं-

“पंचमहाभूतांच्या जाळ्यात अडकलेली मी
नेणीवेतून जाणिवेत येऊ कशी?
जाणिवेत असलेल्या तुला
चर्मचक्षूंनी पाहू कशी?
नाही रे अजून सुटत कोडं
प्रत्यक्ष येऊन समजाव ना थोडं
देहधारी ‘मी’ला देहधारी ‘तू’झीच
चांगली ओळख पटेल
मग लवकरच कोडं सुटेल” 
***
   
१९६७-६८च्या सुमारास लिहिलेली ही माझी पहिली कविता. त्या नंतर परत कविता लिहिली गेली नाही. मी कविता लिहू शकते हा शोध बर्‍याच उशीरा, १९८५-८६च्या आसपास मला लागला. कविता या माध्यमाची ओळख झाल्यावर, लिहायला जमतंय काहीतरी हे लक्षात आल्यावर मात्र मी सतत कविताच लिहित राहिले. डायर्‍यांमधे स्वगतांच्या जागी कविता लिहिल्या जाऊ लागल्या.. कवितेनं मला नादावून टाकलं. आवेग इतका होता की थांबताच येत नाही अशी अवस्था झाली...

आता विचार करताना जाणवतंय की किती स्वाभाविक होतं हे... डायरी-लेखनाला कविता हाच पर्याय असू शकतो. जे डायरी-लेखानात उतरू शकलं नव्हतं तेही कवितेतून व्यक्त करता येऊ लागलं. डायरी-लेखन स्वतःत मिटलेलं, काहीसं बंदिस्त, केवळ माझ्यापुरतं होतं. पण कवितेनं मला ‘मी’च्या छोट्या परिघातून बाहेर काढलं... कवितेचं सर्वात मोठं, प्रथम जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे ती आत्मनिष्ठ राहूनही सार्वत्रिक होऊ शकते. डायरीलेखन काचेसारखं पारदर्शी असतं तर कविता लिहिताना वैयक्तिक तपशील पार्‍यासारखा काचेच्या मागे राहतो आणि कविता आरसा बनून जाते..!  माझ्या पहिल्या कवितासंग्रहाचं शीर्षकच ‘आरसा’ असं आहे. या संग्रहाच्या अर्पण-पत्रिकेच्या जागी मी लिहिलंय- ‘मी तुला माझा, अगदी माझाच असलेला आरसा दिला तरी त्यात तुला तुझंच रूप दिसेल..’

डायरीपेक्षा कवितेचं हे रूप मला व्यक्त होण्यासाठी अधिक प्रभावी वाटू लागलं. पूर्वी डायरीतल्या स्वगतांमध्ये एकच कविता होती. हळूहळू कविता अधिक आणि ‘स्वगतं’ क्वचित असं होऊ लागलं. कवितेतून व्यक्त होण्यातल्या आनंदाच्या नाना परी मी अनुभवू लागले. माझी एक हिंदी कविता आहे-

‘न जाने कैसे / जान जाता है मन / कई अनकही बातें / जिन्हें बेपर्दा देखना ठीक नहीं होता! / तभी तो शब्दों के / कई रंगीन परदे / हमेशा पास रखे जाते हैं / और समय-समय पर / लगाए जाते हैं / जिनमें से / बातें खुलती भी हैं / और नहीं भी..!’ (‘मौन क्षणों का अनुवाद’ या संग्रहातून)

‘बातें खुलती भी हैं / और नहीं भी..!’ यातली गंमत वेगळा आनंद देणारी आहे...
मनातला संघर्ष, वेदना, संताप, गोंधळलेपण, थकलेपण.. यांना समोर बसवून त्यांचं शब्दचित्र रेखता आलं तर अशा अवस्थांमधूनही बाहेर पडता येतं. त्यांच्या जखडलेपणातून सुटता येतं. यातून शांत करणारा आनंद मिळतो... असा अनुभव मी अनेकदा घेतलेला आहे.

कवितेशी सख्य जडलं तेव्हा असंही अनुभवलं, की ती टिपून, शोषून घेते आपल्याला आणि व्यक्त झाल्यावर नामानिराळी होऊन शब्दांच्या गराड्यातून निसटून जाते. कुणी रसिक वाचक जेव्हा डोकावेल त्या शब्दांमध्ये तेव्हा प्रकटते पुन्हा नव्या रूपात.. त्या क्षणापुरती..! कायमची अडकून राहात नाही शब्दबंधात. आपल्यालाही ठेवते अस्पर्श आणि स्वतःही मुक्त होते. कविता व्दिज असते... एकदा जन्मते कवीच्या मनात- निर्मिती-प्रक्रियेत आणि दुसर्‍यांदा रसिकाच्या मनात- आस्वाद-प्रक्रियेत..! दोन्ही प्रकारे ती सदैव सर्वांची असते. मात्र ती एका कुणाची कधीच होत नाही...

कवितेशी कितीही जवळचं नातं जुळलेलं असलं तरी प्रत्येक वेळी तिला नव्यानं जिंकावं लागतं... तिच्यासाठी व्याकूळ व्हावं लागतं... ‘अस्वस्थतेचं अग्नीकुंड एकसारखं पेटतं ठेवावं तेव्हा कुठे अग्नीशलाकेसारखी कविता प्रकट होते.. पण तिच्या हातातला तृप्तीचा कलश मात्र आपल्याला हाती धरवत नाही...!’ (माझ्या आकाश या कवितासंग्रहातून) मग अतृप्ती पुन्हा अस्वस्थ करते.. अतृप्त ठेवून कविता आपल्याला खर्‍या अर्थानं जिवंत ठेवत असते..!! ती एक सळसळतं चैतन्य असते. हाती न लागून तिनं कितीही छळलं तरी एकदा लागलेला तिचा नाद सोडवत नाही..

कवितेचं हे स्वरूप तिला तिचं माध्यम असलेल्या भाषेमुळं प्राप्त होतं. मानवी भाषेत विलक्षण सामर्थ्य आहे. भाषा-शास्त्रात शब्दाच्या अभिधा (वाच्यार्थ..शब्दशः अर्थ), लक्षणा (लक्षणांवरून समजून घ्यावा असा अर्थ.. म्हणी, वाक्‍प्रचारांमध्ये याचा वापर केलेला असतो) आणि व्यंजना (सूचित केलेला अर्थ. कवितांमधल्या प्रतिमांमध्ये ही सूचकता, अनेकार्थता असते) अशा तीन शक्ती सांगितल्या आहेत. कविता हा असा साहित्यप्रकार आहे ज्यात शब्दांच्या या तिन्ही शक्तींचा वापर केला जातो. त्यामुळेच कविता हाच कोणत्याही भाषेतला आद्य असा साहित्यप्रकार आहे. व्यक्त होण्याचं ते एका अर्थी स्वाभाविक माध्यम आहे.

कवितेत वैयक्तिक भावनांपासून ते तत्त्वचिंतनापर्यंत काहीही सामावू शकतं..! कविता घुसमटीतून बाहेर काढते तशी प्रबोधनही करते. दुःख, संताप.. व्यक्त करते तसं प्रेमही व्यक्त करते.. ती प्रतिमांच्या भाषेत बोलते तशी थेटही बोलते. शब्दांमधून बोलते तशी ओळींच्या मधल्या रिक्ततेतून, विरामचिन्हांमधूनही बोलते... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कितीही ‘बोलत’ असली तरी प्रत्येक वेळी शब्दांत उमटलेली प्रतिबिंबं ज्याची त्याला देऊन टाकून स्वतः आरशासारखी कोरी राहते. नवनिर्मितीच्या अनंत शक्यता तिच्यात ओतप्रोत भरलेल्या असतात... ‘इसीलिए शायद’ या माझ्या कवितासंग्रहातल्या ‘शब्द’ या कवितेतल्या सुरुवातीच्या काही ओळी-

‘कितने अद्‍भुत होते हैं
शब्द..!
कई तरह
कई बार
सत्य को
उजागर करते हैं
और फिर
ढक लेते हैं उसे
अपने ही
प्रकाश से
इसीलिए शायद....’
***

कवितेतून व्यक्त होता होता असं बरंच काही उमगत गेलं. जेवढ्या कविता लिहिल्या तेवढी तिच्यात उमटलेली ‘स्व’ची प्रतिबिंब दिसली. ‘स्व’रूपाचं उद्‍घाटन  करणारी कविता मात्र अस्पर्शच राहिलीय अजून..! असूदे. पण क्षितिजासारखी अप्राप्य राहून ती अशीच साद घालत राहूदे आजन्म..!!
    
आसावरी काकडे
२९.७.२०१७

asavarikakade@gmail.com


 समदा दिवाळीअंकासाठी २०१७


Sunday 16 July 2017

विंदा करंदीकरांच्या कवितेतील वैशिष्ट्ये

नमस्कार,

साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या जुलै महिन्याच्या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी तुम्ही मैत्रिणींनी मला दिलीत याबद्दल सुरुवातीला सर्वांचे आभार मानते. ज्येष्ठ कवयित्री पद्मा गोळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पद्मा गोळे या आपल्या मंडळाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होत्या. त्यांच्यासारख्या एका श्रेष्ठ कवयित्रीचे स्मरण जागवताना दुसर्‍या श्रेष्ठ कवीच्या जन्मशताब्दीचे औचित्य आयोजकांनी साधले हे कौतुकास्पद वाटते आहे.

आजच्या कार्यक्रमात विंदा करंदीकरांच्या बालकविता सादर होणार आहेत. त्यापूर्वी विंदांच्या एकूण कवितांविषयी मला बोलायचं आहे. विंदा हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठीतले श्रेष्ठ कवी. अर्थातच त्यांचं काव्यकर्तृत्व आणि इतर साहित्यिक योगदान खूपच मोठं आहे. वेगवेगळ्या निमित्तानं त्यांच्या व्यक्तित्वाच्या विविध पैलूंचा परिचय मराठी रसिकांना झालेला आहे.

आज त्यांच्या कवितांविषयी बोलण्यासाठी ‘विंदांच्या कवितेची महत्त्वाची वैशिष्ट्ये’ असा विषय मी ठरवला आहे. यासाठी मी मंगेश पाडगावकर यांच्या ‘संहिता’ या विंदा करंदीकरांच्या निवडक कवितांचं संपादन असलेलं पुस्तक आणि चंद्रकांत बांदिवडेकर यांचा एक लेख यांचा आधार घेतलेला आहे.

विंदा करंदीकरांच्या कवितेतील प्रयोगशीलता हे वैशिष्ट्य प्रथम विचारात घ्यावं लागेल कारण एखादा कवी तेव्हाच श्रेष्ठ ठरतो जेव्हा तो प्रस्थापित झालेल्या, स्थिरावलेल्या, कृतक, निर्जीव होऊ लागलेल्या कवितेला ओलांडून पुढे जातो. त्याला ताजं, अर्थपूर्ण, कालोचित असं परिमाण देतो. असं नवं वळण देण्यासाठी कवीला भाषा, शैली, आशय हे सगळंच नव्यानं सादर करावं लागतं. अर्थात हे ठरवून होत नाही. कवीच्या आतली जगाकडं नव्यानं पाहणारी दृष्टी, आतून जाणवलेलं नवं आकलन नव्या शैलीत व्यक्त करण्याचं सामर्थ्य आणि त्यासाठीची अनावर ओढ यातूनच अशी निर्मिती होऊ शकते.

तरल मूड व्यक्त करणारी हीच शुद्ध कविता या समजुतीतून चमत्कृतीपूर्ण शब्दांचे खेळ करणारी, काहीही न सांगणारी कविता, किंवा सामाजिक जाणिवांच्या वक्तृत्वपूर्ण घोषणा करणारी, ठराविक वर्तुळात फिरणारी कविता निर्माण होऊ लागली की जीवनातले असंख्य अनुभव दुर्लक्षित राहतात. आधुनिक मराठी कवितेत हा धोका निर्माण झाल्याची चिन्हं स्पष्टपणे जाणवत असताना विंदा करंदीकरांची दमदार कविता नव्या रूपात रसिकांसमोर आली. 

विंदा स्वभावतःच बंडखोर वृत्तीचे होते. त्यांच्यातील काहीसं मिस्किल, सळसळतं रांगडं चैतन्य, स्पष्टवक्तेपण त्यांच्या कवितेतून आणि काव्यवाचनातूनही व्यक्त होत असे. जीवनाला मनःपूर्वकतेनं सामोरं जाताना आलेल्या अनुभवांना शब्दरूप देताना हे अनुभव अस्सल रूपात थेट व्यक्त व्हावेत म्हणून त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. भाषा-वापराच्या जुन्या मळलेल्या वाटा त्यांनी टाळल्या. व्यक्त होण्याचे पारंपरिक शिष्टमान्य संकेत झुगारून दिले. विचारांचे, शैलीचे, अनुभव घेण्याचे असे कोणतेच रूढ साचे त्यांनी मानले नाहीत. त्यासाठी आवश्यक अशी भाषेची, रूपबंधाची आव्हाने त्यांची कविता निडरपणे स्वीकारत राहिली. त्यांच्या कोणत्याही कवितेत ही विंदाशैली स्पष्टपणे जाणवते.

कवितेच्या आकृतीबंधातून ही बंडखोर प्रयोगशीलता अधिक स्पष्ट होते. त्या दृष्टीनं त्यांनी लिहिलेले आततायी अभंग, सूक्ते, मुक्त सुनीते, तालचित्रे, बालगीते, विरूपिका... या कविता बघण्यासारख्या आहेत.

अशा प्रयोगशीलतेतून साध्य झालेलं दुसरं वैशिष्ट्य आहे अनुभव आणि कलात्मकता यांचं संतुलन :

जीवनाच्या जिवंत कुतुहलातून करंदीकर काव्याची प्रेरणा घेतात. जगण्याला सामोरं जाताना येणारे अनुभव समरसून घेतल्यावर, ते आंतरिकीकरणाच्या मुशीतून बाहेर पडल्यावर मग कवितेची निर्मिती होते. या प्रक्रियेत करंदीकर जाणीवनिष्ठा सर्वात महत्त्वाची मानतात. कलात्मकतेच्या रूढ साच्यात ते अडकत नाहीत. आतून जाणवलेला भावाशय स्वतःचा स्वतंत्र आकार घेऊन त्यांच्या कवितेत व्यक्त होतो. म्हणून त्यांची कविता अनुभवांनी रसरसलेली राहिली आहे. कवितेचे कलात्मक मूल्य ते नाकारत नाहीत. पण ते अनुभवाच्या हातात हात घालून आलेले असावे. रचना सौंदर्यातून अनुभव सुंदर व्हावा. वेगळेपणानं वाचकांच्या मनाला भिडावा. अनुभवाचं सामर्थ्य आणि कलात्मक सौंदर्य यांच्या संतुलनातून खरी कविता निर्माण होते ही जाणीव त्यांच्या ‘खडक फोडितो आपुले डोळे’ या प्रतिकात्मक कवितेत व्यक्त झाली आहे. या कवितेत खडक हे अनुभवाच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे आणि खडकाला पैलू पाडणार्‍या लाटा हे सौंदर्याचं प्रतीक आहे. हे संतुलन करंदीकरांच्या सर्वच कवितांमध्ये साधलेलं दिसतं.

तिसरं वैशिष्ट्य चिंतनशीलता

‘जे न देखे रवी ते देखे कवी’ असं म्हणतात ते करंदीकरांसारख्या चिंतनशील वृत्ती असलेल्या कवीच्या बाबतीत अगदी खरं आहे. जीवनातील सामान्य अनुभवांकडेही करंदीकर वेगळ्या कोनातून बघतात. अनुभवांचे दृश्य स्तर खोदून आत शिरतात. जे दिसलं त्याचा अर्थ लावतात. आणि मग जाणवलेलं वेगळं काही, खोलात दिसलेल्या प्रतीकांच्या माध्यमातून स्वतःच्या स्वतंत्र शैलीत मांडतात. पार्थिव जगण्यात बुडालेली भोवतीची सामान्य माणसं, सामाजिक स्थित्यंतरं, त्यातल्या धार्मिक-अध्यात्मिक प्रेरणा, विज्ञान, राजकीय विचारप्रणाली... या सर्व घटकांविषयीचे प्रगल्भ चिंतन त्यांच्या कवितेतून व्यक्त होते. ‘त्यातून तुकारामापासून कन्फ्यूशिअसपर्यंत, अश्वघोषापासून मार्क्सपर्यंत, दामाजीच्या आख्यानापासून क्वांटम सिद्धांतापर्यंत अनेक प्रकारच्या वैचारिक दर्शनांचे संस्कार डोकावतात.’

पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य- सत्याचा शोध

     सत्याचा शोध घेण्याची अनिवार ओढ ही करंदीकरांच्या प्रतिभेची प्रकृती आहे. त्यांची जीवन विषयक जाणीव त्यांच्या सामाजिक-राजकीय विचारांनी मर्यादित होत नाही. ते अनुभवांना थेट भिडतात. आणि त्यातून उमगलेल्या नव्या सत्याच्या संदर्भात जुन्या निष्ठा तपासून बघतात. स्वतःच्या विचारांशीही विरोध पत्करतात. त्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भातील आवेशपूर्ण कवितेत अटळ हिंसेचे समर्थन दिसत असले तरी काही कवितांमधून युद्धातील संहाराविषयीची घृणाही तीव्रतेनं व्यक्त झाली आहे. युद्धाचे तत्त्वज्ञान त्यांना मान्य नाही. शांतीच्या कबुतराचे आकर्षण ते टाळू शकले नाहीत. माणूस हेच त्यांच्या चिंतनशीलतेचे केंद्र होते. या संदर्भात ‘हिमालयाएवढ्या मातीच्या ढिगावर’ ही कविता पाहण्यासारखी आहे.

     ‘वाटाड्या’ या कवितेत राजकीय वाटांचा शोध घेतांना सगळ्याच वाटांमधल्या फोलपणाची जाणीव व्यक्त झाली आहे. करंदीकर कुठल्याही एका विचारसरणीच्या आहारी गेले नाहीत. त्यांची बांधिलकी सत्याच्या शोधाला होती. सत्याचा शोध घेत असताना त्यांना विसंगतींचे तीव्रपणे दर्शन होते. इतके तीव्र की सत्याचा शोध ही एक पोकळीच असावी अशी व्यर्थतेची जाणीव निर्माण व्हावी..! पण ते या विसंगतींचाही खोलात शिरून अर्थ लावतात. या संदर्भात ‘क्षेत्रज्ञ’ आणि ‘तीन माणसे कुजबुजत गेली’ या कविता पाहण्यासारख्या आहेत.

     भोवतीचं सामान्य माणसाचं जगणं आणि सामाजिक-राजकीय घडामोडी, इंद्रियानुभव आणि अतींद्रिय अनुभव.. आत्मसाक्षात्कार, माणूसपण.. प्रेम.. स्त्रीत्व, तत्त्वज्ञान आणि विज्ञान.. अशा सर्व पातळीवर त्यांची कविता सत्य शोधार्थ विहार करताना दिसते.

या नंतर- त्यांच्या कवितेतील स्वाभाविक देशीयता

अलिकडेच चंद्रकांत बांदिवडेकर यांचा करंदीकरांवर लिहिलेला एक लेख वाचनात आला. त्यात त्यांनी म्हटलं आहे, “करंदीकरांनी आपला शंभर टक्के देशीपणा आपल्या काव्यात अनुभवापासून त्याच्या भाषिक संप्रेषणापर्यंत कायम राखला. त्यांची ही देशीयता आंतरिक, उत्स्फूर्त आणि सहज आविष्कृत होणारी आहे. त्यांच्या काव्यातील शब्द संचयनाचा अभ्यास केला तर इतका देशी कवी मराठीत अन्य नाही हे मान्य करावे लागेल... विंदाच्या कवितेत कोकण आहे. तिथल्या निसर्गाचा संपूर्ण तपशील आहे, तिथल्या दंतकथा, भूतांच्या कथा.. आहेत, तिथली अडाणी व बेरकी माणसे, त्यांचे धंदे आहेत. यामुळे विंदाच्या कवितेचा अंतर्बाह्य देशी थाट जोमदारपणे उभा राहतो. त्यातला मातीचा वास कुठेही लपत नाही. ‘चिवचिवणारी वाट असावी’सारखी विलक्षण दर्जेदार कविता या अशा द्रव्यातूनच साकार होते. प्रत्येक शब्दाच्या ध्वनीचा आणि अर्थाचा पुरेपूर कसून उपयोग करून घेणे ही विंदाची एक मोठी ताकद आहे. यातूनच विलक्षण अर्थगर्भ मितव्ययता निर्माण होते आणि पुढे पुढे ‘जातक’ संग्रहातील कवितांमध्ये दुर्बोधताही येते”


शेवटचा मुद्दा - इहवादी भूमिका

     विंदांचा इहवाद अतिशय व्यापक आहे. इंद्रियनिष्ठ अनुभव हे या भूमिकेचे केंद्र असले तरी त्यांची कविता तिथेच अडकलेली नाही. इंद्रियनिष्ठ संवेदांनांच्या घाटातून त्यांनी अपार्थिवाची ओढ व्यक्त केली आहे. लैंगिक सुखाचा उत्कट अनुभवही करंदीकरांना आध्यात्मिक अनुभवाकडे घेऊन जातो. या संदर्भात त्यांची रक्तसमाधी ही कविता महत्वाची आहे.

     त्यांच्या प्रेमकवितेला या संदर्भात विशेष स्थान द्यावे लागते. कारण या कवितेतील प्रेमानुभव एकूण जीवनाच्या संदर्भातला एक अनुभव असतो. प्रेमाच्या विविध छटाचे भावसौंदर्य न्याहाळीत असताना करंदीकर स्त्रीच्या व्यक्तित्वाचाही शोध घेत असतात. त्या दृष्टीनं त्यांची झपताल आणि ‘संहिता’ या कविता वाचण्यासारख्या आहेत. पैकी ‘झपताल’ कविता इथे वाचून दाखवते-

     ‘ओचे बांधून पहाट उठते...तेव्हापासून झपाझपा वावरत असतेस.
...कुरकुरणार्‍या पाळण्यामधून दोन डोळे उमलू लागतात;
आणि मग इवल्या मोदकमुठीतून तुझ्या स्तनांवर
बाळसे चढते. उभे नेसून वावरत असतेस. तुझ्या पोतेर्‍याने
म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते. आणि नंतर
उगवता सूर्य दोरीवरील तीन मुतेली वाळवू लागतो;
म्हणून तो तुला हवा असतो! मधूनमधून तुझ्या पायांमध्ये
माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात; त्यांची मान
चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस. तरी पण
चिऊकाऊच्या मंमंमधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो.
तू घरभर भिरभिरत असतेस; लहानमोठ्या वस्तूंमध्ये
तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात... स्वागतासाठी ‘सुहासिनी’ असतेस;
वाढताना ‘यक्षिणी’ असतेस; भरविताना ‘पक्षिणी’ असतेस
साठविताना ‘संहिता’ असतेस; भविष्याकरता ‘स्वप्नसती’ असतेस.
...संसाराच्या दहाफुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा
चपखल बसवणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही.’
मुंबई,
३०-०८-१९५७

     अशा विविध वैशिष्ट्यांनी युक्त विंदांची कविता अतिशय आदरणीय आहे. पण ती अनुकरणीय मात्र नाही. विंदांनी कवितालेखनासाठी पाळलेलं महत्त्वाचं पथ्य म्हणजे जाणीवनिष्ठा. जे, जसं आतून जाणवलं तेच त्यांनी लिहिलं. तोपर्यंतच लिहिलं. उसनं अवसान आणून किंवा मागणीनुसार लिहिण्यासाठी त्यांनी आपली प्रतिभा राबवली नाही. अत्यंतिक संवेदनशीलतेनं लिहितांना त्यांनी प्रचलित साचे अनुसरले नाहीत तसे स्वतःचेही साचे बनवले नाहीत. त्यामुळं अनुभवांच्या मुळाशी पोचलेल्या त्यांच्या आशयसंपन्न कवितेचं अनुकरण करता येणं शक्य नाही. आपण त्यांचे प्रतिभा-सामर्थ्य घेऊ शकत नाही. त्यांच्या शैलीचे अनुकरण करू शकत नाही. पण त्यांच्या कवितेतली सच्ची जाणीवनिष्ठा समजून घेऊ शकतो, ती अनुसरू शकतो.

एवढं बोलून मी थांबते. समारोप म्हणून शेवटी विंदाची एक लोकप्रिय कविता ‘तुकोबाच्या भेटीस शेक्सपीयर आला’ त्यांच्याच आवाजात ऐकवायचा प्रयत्न करते.

     धन्यवाद.

आसावरी काकडे
१९.७.२०१७     



ओवी आणि अभंग

कविता हा साहित्यनिर्मितीचा पहिला श्वास आहे. भाषेला लिपी नव्हती तेव्हा लौकिक, पारलौकिक सर्व ज्ञान मौखिक रूपात जतन करून ठेवलं जायचं. कविता अल्पाक्षरी, गेय असल्यामुळे पाठ होऊन म्हणायाला सोपी जाई. त्यामुळं सामान्य जनतेत लोकसहित्याच्या स्वरूपात काव्य-निर्मिती झाली. व्यवहारी ज्ञान गोवलेले  उखाणे, कोडी, ओव्या.. हे प्रकार रोजच्या जीवनाचा भाग झाले होते. पहाटे उठून स्त्रिया दळण कांडण अशी कामं करताना उत्स्फूर्त ओव्या रचायच्या. देवाचं स्मरण करता करता त्यातून त्या मनोगत व्यक्त करायच्या. मन मोकळं करायच्या. अशा ओव्या या काव्यात्म तर असायच्याच शिवाय त्यात त्या काळाचं चित्रण नकळत उमटायचं. डॉ. सरोजिनी बाबर यांनी अशा ओव्यांच्या संकलनाचं महत्त्वाचं काम केलेलं आहे.

गाऊन म्हणता येणे हाच निकष महत्त्वाचा असल्यामुळे अशा ओव्यांमधे यमक आवश्यक असायचे. मात्र बाकी आकृतिबंध बराच शिथिल असायचा. अक्षर, मात्रा यांचे बंधन नव्हते. एक उदाहरण-

पहिली माझी ओवी गं पहाटेच्या वेळेला
राम या देवाला .. राम या देवाला
दुसरी माजी ओवी गं यशोदेच्या कान्हाला
कृष्ण या देवाला कृष्ण या देवाला
तिसरी माझी ओवी गं पंढरपूर तीर्थाला
विठ्ठल देवाला विठ्ठल देवाला
    
मराठी संस्कृतीमध्ये रुळलेल्या या मराठी अक्षर-छंदातच संतांनीही आपले तत्त्व-विचार मांडले. त्यात भारुड, गौळणी.. अशा वेगवेगळ्या रचना असल्या तरी प्रामुख्याने ओवी, अभंग हेच छंद संतसाहित्यात अधिक वापरलेले दिसतात. मराठी साहित्याच्या इतिहासात संतसाहित्य हा पहिला महत्त्वाचा टप्पा आहे. पुढे निर्माण होत राहिलेल्या साहित्यावर आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही अंगांनी संतसाहित्याचा प्रभाव पडत राहिलेला आहे.

ओवी, अभंग हे मराठमोळे अक्षर-छंद आशयप्रधान आहेत. त्यांना लय-तालाचे चांगलेच भान आहे पण ते रचना-तंत्रात जखडलेले नाहीत. त्यांचा उगम लोकवाङयात दिसतो. काही संशोधकांच्या मते ओवी आणि अभंगाचे मूळ संस्कृत अनुष्टुभ छंदात आहे. त्यातली प्रासादिकता, माधुर्य आणि भक्ति-परायणता ही वैशिष्ट्ये ओवी, अभंग या छंदामध्ये पुरेपूर भरलेली आहेत. संत ज्ञानेश्वरांनी तत्त्वज्ञानासारखा अवघड विषय मांडण्यासाठी ओवीचा अतिशय प्रगल्भ, काव्यात्म वापर केला आणि ओवी छंद धन्य झाला. संतांनी वापरलेल्या ओवीमध्ये साडेतीन चरण असतात. त्यात अक्षर संख्येचे बंधन नाही पण पहिल्या तीन चरणात यमक असावे लागते. चौथा चरण लहान आणि आशयपूर्ती करणारा असतो. उदाहरणार्थ – ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी- ओम नामोजी आद्या | वेदप्रतिपाद्या | जय जय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||’ संत एकनाथांनीही ओवी छंदात विपुल रचना केल्या. मराठी कवितेत मात्र अभंगासारखा हा छंद रुळलेला दिसत नाही.

संतसाहित्यात ओवीच्या बरोबरीनेच अभंग छंदात रचना केलेल्या दिसतात. पण प्रतिज्ञापूर्वक आणि विपुल प्रमाणात अभंग रचना प्रथम संत नामदेवांनी आणि नंतर संत तुकारामांनी केली. ‘शतकोटी तुझे करीन अभंग’ असा महासंकल्प नामदेवांनी केला. त्या विचारात असताना त्यांना एक स्वप्नवत अनुभूती आली. या अनुभूतीला त्यांनी दिलेले शब्दरूप असे-

अभंगाची कळा नाही मी नेणत |
त्वरा केली प्रीत केशीराजे ||||
अक्षरांची संख्या बोलिलो उदंड |
मेरू सुप्रचंड शर आदि ||||
सहा साडेतीन चरण जाणावे |
अक्षरे मोजावी चौकचारी ||||
पहिल्यापासोनि तिसर्‍यापर्यंत |
अठरा गणित मोज आलें ||||
चौकचारी आधी बोलिलो मातृका |
बाविसावी संख्या शेवटील ||||
दीड चरणाचे दीर्घ ते अक्षर |
मुमुक्षु विचार बोध केला ||||
नामा म्हणे मज स्वप्न दिले हरी |
प्रीतीने खेचरी आज्ञा केली ||||
(संत नामदेव : विहंग दर्शन- नि. ना. रेळेकर, या पुस्तकातून. पृष्ठ ८५)

या रचनेत अभंग-रचनेचे व्याकरणच नामदेवांनी सांगितले आहे. ते थोडक्यात असे- सहा अक्षरांचा एक याप्रमाणे तीन पूर्ण चरण आणि शेवटचा चार अक्षरांचा अर्धा चरण असावा. चार चरणांचा एक चौक (कडव्याच्या स्वरूपात) करावा. पहिल्या तीन चरणांची अक्षरसंख्या अठरा होते. शेवटचा चार अक्षरांचा अर्धा चरण मिळून एका कडव्यात बावीस अक्षरे येतात. साधारण सहा कडव्यांचा एक अभंग असतो.

प्राचार्य नि. ना. रेळेकर यांनी आपल्या ‘संत नामदेव : विहंग दर्शन’ या पुस्तकात म्हटले आहे, ‘स्वतः संत नामदेवांनीच आपल्याला स्फुरलेल्या या वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण काव्यरचनेला प्रथमतः ‘अभंग’ या नावाने संबोधले आणि मराठी संतसाहित्यात ‘अभंग’ ही संज्ञा रूढ झाली’, ‘या अभंग-काव्याला संत नामदेवांनी आणखी एका लक्षणीय परिमाणाची जोड देऊन संत आणि त्यांचे अतूट नाते निर्माण केले. आपल्या अभंगाच्या शेवटच्या कडव्यात ‘नामा म्हणे’ अशी स्वतःची नाममुद्रा उमटवून त्या अभंगाला आपली एक खास अशी ‘निजखूण’च त्यांनी प्राप्त करून दिली. (पृष्ठ ९३, ९५)
या शिवाय संत नामदेवांनी समचरणी अष्टाक्षरी अभंग-छंदाविषयीही त्याच छंदात लिहून त्याचे उदाहरण दिले आहे. संत नामदेव, संत तुकाराम यांचे बहुतांश अभंग गेय स्वरूपात मौखिक रूपातच प्रकट झाले. आज आपण वाचतो त्या छापिल गाथा वर्षानुवर्षांच्या अनेकांच्या कष्टातून प्रकाशित झालेल्या आहेत. एकूण अभंगरचना पाहिल्या की लक्षात येते की अभंग छंदाचे अनेक वेगवेगळे प्रयोग संतांनी केलेले आहेत. पण साडेतीन चरणांच्या षडक्षरी छंदातच अधिक अभंग रचना झाली आहे. विशेष म्हणजे मराठी कवितेतही अभंग म्हणून हाच छंद रूढ झाला आहे. अभंग वाचतांना रचनेच्या अंगाने पाहिले असता लक्षात येते की प्रत्येक कडव्यातील दुसर्‍या व तिसर्‍या चरणात यमक जुळवलेले असते. आशयाला प्राधान्य दिलेले असल्यामुळे हे नियम बरेच शिथिलपणे वापरलेले अढळतात. असं असलं तरी भजन कीर्तनामध्ये अभंग गाऊनच म्हटले जात असल्यामुळे अभंग-रचनेला लय-तालाचे चांगले भान असते. पहिले कडवे ध्रुपदासारखे परत परत म्हटले जाते. अनेक अभंग थोर संगीतकारांच्या संगीतावर श्रेष्ठ गायकांनीही गायलेले आहेत. उदाहरणार्थ भीमसेनजींनी गायलेला संत नामदेवांचा ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल...’ हा अभंग किंवा संत तुकारामांचा ‘अणुरणिया थोकडा तुका आकाशाएवढा..’ हा अभंग... असे कितीतरी अभंग मराठी मनांमध्ये खोलवर रुजलेले आहेत..

मराठी कवितेतील अभंग-दर्शन


मराठी कवितेत अभंग-छंदाचा विपुल प्रमाणात वापर झालेला आहे. मर्ढेकर, विंदा करंदीकर यांच्यासारख्या श्रेष्ठ कवींपासून ते आता आता लिहू लागलेल्या कवींपर्यंत अनेकांनी हा छंद आपलासा केला आहे. काही उदाहरणं पाहू-

बा. सी. मर्ढेकर यांची एक प्रसिद्ध कविता या छंदात आहे.-

तुझ्यासाठी देवा काय म्या झुरावे |
झुरळाने कैसे पतंगावे ? |
साधू संत जेथे बैसले तिष्ठत |
मना कष्टवीत अहोरात्र |
काय तेथे माझी लांडी धडपड |
किरटी पकड भावनेची |
काय बोलू आता उघड नाचक्की |
अंतरात पक्की बोळवण ।”

विंदा करंदीकरांच्या आततायी अभंगातील एका अभंगाच्या काही ओळी-

“संस्कृतीला झाला । नफ्याचा उदर
प्रकाशाचे पोर । कुजे गर्भी
स्वातंत्र्याला झाला । स्वार्थाचा हा क्षय
नागड्याना न्याय । मिळेचना
मानवाचे सारे । माकडांच्या हाती
कुलुपेच खाती । अन्नधान्य
नागड्यांनो उठा । उगवा रे सूड
देहाचीच चूड । पेटवोनी ॥”

आरती प्रभुंच्या ‘दिवेलागण’ या कवितासंग्रहातील ‘काखेत काळोख’ या कवितेतल्या काही ओळी-

“का रे बापा पुच्छ । तोडोन घेतले
खात न त्यामुळे । कंदमुळे
कुठे गुहेमाजी । असेलही चित्र
तिला आज वस्त्र । देतो घेतो
विजेहून लख्ख । मानवी ओळख
काखेत काळोख । गुहेतला”

ना. घ. देशपांडे- ‘शीळ’ या कवितासंग्रहातील ‘माझी गाणी’ कवितेच्या काही ओळी-

“माझा योग-याग आळवावा राग
डोलवावा नाग नादरंगी ॥
मंद मंद चाली वागीश्वरी आली
आता दुणावली कोवळीक ॥
तन्मात्रांचे पाच नानाविध नाच
झाला सर्वांचाच एकमेळ ॥”

कुसुमाग्रज- ‘मुक्तायन’ या कवितासंग्रहातील ‘तूच आता’ या कवितेतील काही ओळी-

“मोह हा जळेना लाघवी लतांचा
मंजुळ गीतांचा राईतल्या ॥
अंतरीचे असे आसक्तीचे दंगे
विरक्तीच्या संगे अहोरात्र ॥
तूच फेक आता भगवे कफन
माझे तन मन ध्वंसणारे ॥

बा.भ. बोरकर- ‘बोरकरांची समग्र कविता’- खंड : २ पृष्ठ ३२६ ‘संतर्पणें’ या कवितेतील काही ओळी-

संधिप्रकाशात अजून जो सोने
तो माझी लोचने मिटो यावी ॥
तेव्हा सखे आण तुळशीचे पान
तुझ्या घरी वाण नाही त्याची ॥
तूच ओढलेले त्यासवे दे पाणी
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे ॥

अरुणा ढेरे- ‘मंत्राक्षर या कवितासंग्रहातील ‘विश्वासाचा शब्द’ या कवितेतील ओळी-

“विश्वासाचा शब्द दिलास असा की
माझ्या हृदयाशी मेघ आले ॥
वर्षताना स्नेह तुला ना कळाले
माझे वाहू गेले काय काय ॥
वळचणीपाशी उभी मी हताश
आता घरापास दिवा लाव ॥”

किशोर पाठक- ‘सम्भवा’ या कवितासंग्रहातील ‘लाघव’ या कवितेतील काही ओळी-

“बांधले शरीर चिरेबंद भिंती
तडे गुंतागुंती शतकांची ॥
भोगली भोगली नजरांनी मौत
छातीमध्ये औत ओढगस्ती ॥
तुझ्या इंद्रियांचा भोग कर्मोत्सव
नेत्रांचे लाघव आंधळावे ॥”

प्रज्ञा लोखंडे- ‘उत्कट जीवघेण्या धगीवर’ या कवितासंग्रहातील ‘काळोखले मन’ या कवितेतील काही ओळी-

“काळोखले मन जिण्याचे सरण
रिते रितेपण वस्तीतून ॥
घरात काहूर रक्तात विखार
राख थंडगार विझलेली ॥
आता उरे फक्त आकांत अपार
दुःखाचेच सल काळजाशी ॥”

सुनीति लिमये- ‘एकांतवेल’ या कवितासंग्रहातील ‘तिथे उजाडेना..’ या कवितेतील काही ओळी-

“आर्त काही आता येऊ नये ओठी
पीळ त्याच्यासाठी पडू नये ॥
कानात चौघडा अस्वस्थाचा वाजे
आणि बेचैनीचे पडघम ॥
तिथे उजाडेना इथे अंधारले
कुंपाणावरले देह आम्ही ॥”

     कविता, रूपांतर यासाठी अभंग छंदाचा मीही बराच वापर केला आहे. या छंदात लिहितांना मला सतत जाणवत राहिलं की या छंदाला स्वतःचा स्वभाव आहे, स्वतःचा आवेग आहे. मनात खोलवर अव्यक्त राहिलेलं संचित उन्मळून शब्दांमध्ये व्यक्त होतं या छंदात लिहिताना. अभंग छंदातली कविता स्वतःला उमगलेलं बारीकसं तत्त्व सहज सांगून जाते. साडेतीन चरणाचं एक कडवं म्हणजे एक विधान असतं. गझलेतील प्रत्येक शेर म्हणजे एक स्वयंपूर्ण कविता असते. तसंच अभंगाचं प्रत्येक कडवं कवितेचा आशय पुढे नेणारं असलं तरी अर्थाच्या दृष्टीनं पूर्ण असतं. एक कडवं एक पूर्ण कविता होऊ शकते. या छंदात लिहिताना यमक आशयाला बिलगुनच येतं. कधी कधी तर यमकासाठी धावून आलेला शब्द हव्या असलेल्या शब्दापेक्षा अधिक समर्पक ठरतो. रूपबंधाच्या दृष्टीनं काहीसा शिथिल तरी भावार्थानं बांधून ठेवणारा अभंग छंद म्हणूनच कविमनाला भुरळ घालत राहिला आहे.

संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली मराठी कविता आशयसमृद्ध तर आहेच. पण अकृतीबंधाच्या दृष्टीनंही ती श्रीमंत आहे. हायकू, रुबाई, गझलसारखे दुसर्‍या भाषेतले काव्यप्रकार तिनं आत्मसात केले तसे अभंगासारखे देशी अक्षरछंदही त्यांच्या वैशिष्ट्यासह तिनं आपल्या विस्तारात सहज सामावून घेतले आहेत. हा छंद इतका कवीप्रिय झालेला आहे की पावसावर कींवा आईवर कविता लिहिली नाही असा कवी नसेल तसा अभंग छंदात कविता न लिहिलेला कवीही दुर्मिळ असेल.

आसावरी काकडे
५ जुलै २०१७

‘साहित्यदीप’ दिवाळी अंक २०१७ साठी