Sunday 31 January 2016

वडावरची चिमणी

व्यक्त होणं ही माणसाची एक प्राथमिक गरज आहे. भाषेची निर्मितीच या गरजेतून झाली..! छोटं मोठं काहीही घडलं तरी ते लगेच कुणालातरी सांगावसं वाटतं. पण बर्‍याचदा मनात असं काही असतं की ते उघडपणे सांगता येत नाही. कधी कधी तर काय सांगायचंय ते आपल्यालाच नीट उमगलेलं नसतं. पण दाटून आलेल्या मेघांसारखं कोसळून मोकळं व्हायचं असतं मनाला... अशावेळी अव्यक्त राहूनही व्यक्त होण्याचं समाधान देणारं अद्‍भुत साधन म्हणजे कविता..! आजवर अनेकांनी कवितेची अनेक वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. पण लगेच लक्षात येणारं वैशिष्ट्य म्हणजे कविता एकाच वेळी अतिशय सोपी वाटते पण तितकीच ती दुर्लभ असते. हायकू, चारोळीएवढी अल्पाक्षरी असते आणि खंडकाव्याइतकी दीर्घही असते. साहित्याचा सर्वश्रेष्ठ प्रकार असते कविता पण गौरवा इतकंच टीकेलाही सामोरं जावं लागतं तिला. कुणाला आयुष्यभर झपाटून टाकते ती तर कुणी तिच्याकडे ढुंकूनही पाहात नाही...

काही असलं तरी ज्याला व्यक्त होण्याची आंतरिक निकड अस्वस्थ करत राहते, आणि ज्याला शब्दांचा लळा लागलेला आहे अशा प्रत्येकाला कविता लिहिण्याचा मोह होतो. आणि एकदा लिहिली की ती कुणालातरी दाखवावीशी वाटते. कुणीतरी ऐकून व्वा..छान.. असं म्हटलं की कवितेच्या जन्माचं एक आवर्तन पूर्ण होतं..! मग ती मागच्या पानावर जाऊन बसते. एकेक करत जमत गेलेल्या अशा कविता पुस्तकरूपात एकत्रित करून प्रकाशित करणं हा कवीच्या जीवनातला एक सुखाचा सोहळा असतो. कवी-मनात यावेळी आत कुठेतरी अपुरेपणाच्या जाणिवेनं जागवलेली हुरहुर असते पण हा सोहळा अधिक चांगलं लिहिण्याची, एका अर्थानं अधिक चांगलं जगण्याची उमेद बहाल करणारा असतो..!

 ‘वडावरची चिमणी’ या संग्रहाला प्रस्तावना लिहिताना कवितेविषयीचे असे सगळे विचार मनात गर्दी करताहेत... राजश्री सोले यांचा हा पहिलाच कवितासंग्रह. निवृत्तीनंतरच्या टप्प्यावर नव्यानं जगण्याच्या उत्साहात तो सामिल झाला आहे. या संग्रहाचं स्क्रिप्ट घेऊन त्या घरी आल्या तेव्हा आमचा प्रथम परिचय झाला. कविता माझ्या हातात सोपवताना त्या म्हणाल्या, ‘माझा पहिलाच कवितासंग्रह आहे हा. कविता वाचून मला काही सूचना केल्यात तर आवडेल...’ मग इतर काही बोलणं झालं. तेवढ्यानं आमच्यात मैत्री झाल्यासारखं वाटलं. स्क्रिप्ट ठेवून त्या गेल्या. दोन तीन दिवसांनी जरा निवांती मिळाल्यावर कविता वाचायला घेतल्या. आधी मनोगत वाचलं. छोटसं आणि खरंखुरं. स्वतःच्या कवितेविषयीची जाण असलेलं.. मग कविता वाचायला लागले. ‘वडावरची चिमणी’ या शीर्षक-कवितेपासूनच या संग्रहाची सुरवात झाली आहे... ‘गावाकडचं पानी’, ‘भोज्जा’, ‘बंडांच्या मनीचे बंड’, ‘बकुळे’ या कविता वाचल्या आणि जाणवलं यात छानसं कथाबीज लपलेलं आहे. ते कितीही विस्तारू शकतं. पण या कवितांमधे ते हात-पाय आवरून बसलंय. आशयाच्या दृष्टिनं त्याचा संकोच आणि कवितेच्या आकृतिबंधाच्या दृष्टिनं पसरट अशा या कविता वाचून मी थांबले. राजश्रीताईंनी सूचना करण्याबद्दल आवर्जून सांगितलेलं आठवलं. मग त्यांना फोन करून सांगितलं, ‘या या कविता.. खरंतर सगळ्याच कविता पुन्हा पुन्हा वाचून पहा. तुम्हाला वाटलं तर काही ओळी कमी करा, शब्द बदला.. परिष्करणाचा हात फिरला की तुमच्याच कविता तुम्हाला नवीन आणि छान वाटतील...’ त्यांनी ते मानलं...

या संग्रहातील कविता पुढे वाचत गेले तेव्हा जाणवलं की या कवितांमधे सामाजिक वास्तवाचं, विशेषतः स्त्रीविषयक वास्तवाचं भान जागं आहे. नात्यांमधल्या विसंवादाचं चित्रणही आहे काही कवितांमधे. रूपकात्मकता हे वैशिष्ट्य असलेल्या ‘वडावरची चिमणी’, ‘बंडांच्या मनीचे बंड’ अशा काही कविता आहेत. सामाजिक वास्तवावर त्या भाष्य करतात. समाजाची दुटप्पी, विसंगत आणि स्वार्थी मानसिकता अधोरेखित करतात. कवितेतील प्रतिमा, रूपकं कवितेला कवितापण देत असतात. व्यक्त होऊनही अव्यक्त राहता येतं ते यामुळंच..!

‘मेघराजा’ ही कविता स्वतंत्रपणे वाचताना या कवितेतला मेघ हा खराखुरा मेघ आहे असं वाटतं पण त्याच्या शेजारची ‘प्रतिभा’ ही कविता वाचल्यावर लक्षात येतं की मेघ ही एक अर्थपूर्ण प्रतिमा आहे..! राजश्री सोले यांनी या प्रतिमेचा सुंदर वापर केलाय-

‘ती उसवलीय उन्हाच्या तापाने
भेगाळलीय चटक्याने
बीज पोटात घेऊन बसलीय रे..’

पोटात बीज घेऊन बसलेल्या जमिनीसारखंच तृषार्त झालेलं असतं सृजनोत्सुक मन. आणि सृजनवेळेची वाट पाहताना तेही उसवतं... भेगाळतं!  

 काही कवितांत महाभारताचे संदर्भ आहेत. असे संदर्भ असलेली ‘हे योगेश्वरा’ ही कविता काहीसा वेगळा आशय घेऊन वाचकांना भेटते. यात योगेश्वराला विचारलंय,

‘हे योगेश्वरा,  
अजून अस्तित्वात आहेस तू?’

आणि लगेच उत्तरही दिलेलं आहे. मार्मिक आणि जिव्हारी लागणारं.. ते असं-

‘नक्कीच, लाखभर दुर्योधन दुःशासनांमागे
एकदा तुझं अस्तित्व जाणवतं
पण पुन्हा भेटण्यासाठी
एक लाख दुर्योधन दुःशासनांना  
सामोरं जावं लागतं..!

महाभारतातल्या द्रौपदीवर दीर्घ काव्य लिहिण्याचा राजश्री सोले यांचा संकल्प आहे. त्यात भरपूर अभ्यासपूर्ण संदर्भ आहेत. त्यातला काही भाग या संग्रहात समाविष्ट केलेला आहे. सर्वांना माहीत असलेलं कथानक आपल्या नजरेतून पाहून त्याविषयी लिहीणं हे एक मोठं आव्हान आहे.

या कवितासंग्रहातील स्त्री-जाणीवांच्या कविता विशेष उल्लेखनीय आहेत. उदा. एक अल्पाक्षरी कविता पहा-

‘तो आकाशाला भिडला
म्हणून घाबरतेस काय  
अगं तुझ्या पोलादी मिठीत  
त्याचे मातीचे पाय !’

इथे स्त्री-सामर्थ्याची सार्थ जाण आहे. पण तिच्यातील प्रेमभाव या पोलादी सामर्थ्यात हरवलेला नाही उलट त्यात बळ आहे त्याचे ‘मातीचे पाय’ समजून घेण्याचं याचंही भान आहे. त्या दृष्टिनं ‘पोलादी मिठी’ ही शब्दयोजना फार प्रभावी झाली आहे.

‘मादी आणि देवता’ या कवेतेत प्राणी आणि माणूस यांच्या माद्यांची केलेली तूलना लक्षवेधी आहे. त्यासाठी ही पूर्ण कविता वाचायला हवी. ‘खेळ नियतीचा’ या छोट्याशा कवितेतला दृष्टिकोनही कौतुकास्पद आहे.-

‘भुकेल्या पोटी उन्हात कष्ट करताना  
शरीरातून तिच्या घामाचा पाऊस बरसतो  
भुकेल्या पोटी पावसात कष्ट करताना
पोटात तिच्या भुकेची आग असते
नियती तिच्याशी खेळते? छे !
उन्हात पाऊस अन्‍ पावसात आग  
निर्माण करून
नियतीलाच ती खेळवत असते..’

‘खात्री कुणी देईल का?’ या कवितेत स्त्रीसंदर्भातलं जळजळीत वास्तव चित्रित झालंय. ही पूर्ण कविता कवयित्रीच्या तोंडून ऐकल्यावर त्यातल्या दहकतेचे चटके बसल्याशिवाय राहणार नाहीत. असं वास्तव असलेल्या आणि तरीही झोपेचं सोंग घेतलेल्या समाजाला ‘संसार’ या कवितेत राजश्री सोले यांनी एक खणखणीत प्रश्न विचारलाय-

‘जाळणारे हात परकेच असतात  
पण तेव्हा आपले काय झोपलेले असतात?’

याशिवाय ‘अग्नीदिव्य’, ‘निर्वाचित कलाम बाय तस्लिमा नसरीन’, ‘शिक्का’, ‘लढा’ आणि ‘आई’ या कविता स्त्रीविषयी वेगळेपणानं काही सांगू पाहतात, विचार करायला लावतात.

नात्यांमधल्या विसंगती, गोडवा, प्रेम..जिव्हाळा अशा वेगवेगळ्या अर्थच्छटा असलेल्या ‘दुधावरची साय’, ‘सप्तपदी’, ‘स्वप्न’ अशा काही कविता, कविताविषयक कविता आणि वेगळ्या विषयांवरच्या ‘शहीद जवानांना वाहिलेली श्रद्धांजली’, ‘आयाराम गयाराम’, अशाही कविता या संग्रहात समाविष्ट आहेत. राजश्री सोले यांनी आपल्या निवृत्तीपर्यंतच्या काळात पाहिलेलं जग, घेतलेले अनुभव, त्यातून झालेला अंतर्मुख विचार, आलेली अस्वस्थता, उमटलेले भावतरंग या त्यांच्या पूर्वसंचितातून या संग्रहातल्या अशा विविध कवितांचा जन्म झालेला आहे.

कवितेतून व्यक्त होता येणं ही दुर्मिळ क्षमता आहे. आयुष्य जगत असताना प्रत्येकजण अनुभवातून काही शिकत असतो. आपलं आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करत असतो. अशावेळी कवितेसारखं प्रभावी साधन हाताशी असेल तर वाट्याला आलेल्या सुख-दुःखांच्या उत्कट क्षणांना त्यांच्यापासून अलग होऊन निरखता येतं. त्यातून स्वतःची ओळख होते. आयुष्य घडवण्याच्या प्रवासातला हा महत्त्वाचा टप्पा. तिथून अधिकाधिक विकासाच्या दिशेनं पुढे पुढे जाता येतं. माणूस म्हणून जगणं याचा अर्थच आपलं आयुष्य घडवत राहाणं..! या अर्थपूर्ण प्रवासात राजश्री सोले यांना कवितेची अखंड सोबत मिळत राहावी ही शुभेच्छा.

आसावरी काकडे
21 जुलै 2014



      

पुन्हा नवा उत्सव.. पुन्हा नवी दिशा


श्री विजय शिंदे यांचा ‘अनुभूती’ हा पहिलाच कवितासंग्रह. ‘अनुभूती’ हे शीर्षक कवितासंग्रहासाठी  समर्पक वाटतं. कारण अनुभूती हा कवितेचा प्राण असतो. ती जितकी उत्कट तितकी ती कुणाला तरी सांगण्याची ऊर्मी अधिक. या ऊर्मीतच कविता-निर्मितीची प्रेरणा असते. अंतर्मनात रोजच्या जगण्यातले वेगवेगळे भलेबुरे अनुभव, गतकाळातल्या राहून गेलेल्या गोष्टींच्या आठवणी, नवागताविषयीची हुरहुर.. अशा असंख्य गोष्टी कवितांचा आशय बनून भावरूपात पिंगा घालत असतात. श्री शिंदे यांनी आपल्या एका कवितेत अंतर्मनातल्या या कल्लोळाला उत्सव असं म्हटलं आहे. मनातल्या कल्लोळांकडे अलिप्तपणे पाहात त्याला उत्सव म्हणण्यातली कवीमनाची समज दाद देण्यासारखी आहे.

या छोटेखानी कवितासंग्रहात ५८ कविता आहेत. या संग्रहातल्या ‘दर्द’ या कवितेत श्री शिंदे यांनी आपल्या मनाची एक अवस्था शब्दबद्ध केली आहे.- ‘कसे समजावू मनाला? / हा दर्द सांगू कुणाला?... कैफियत मांडू कुठे कशी?’... मनाच्या एका विशिष्ट अवस्थेत शिंदे यांना पडलेले हे प्रश्न प्रत्येकालाच कधी ना कधी पडत असतात. कारण व्यक्त व्हावंसं वाटणं ही प्रत्येकाची स्वाभाविक गरज आहे. आपला एखादा वेगळा अनुभव, मनात आलेला विचार, जिव्हारी लागलेला सल किंवा उत्तेजित करणारा आनंद आपल्याला कुणालातरी त्यातील ताजेपणासह सांगावासा वाटतो. पण सगळंच काही सगळ्यांजवळ सांगता येत नाही. काही गोष्टी सांगाव्याशा तर वाटतात पण सगळं उघडंही करायचं नसतं. काही गोष्टीतलं मर्म एखाद्यालाच नेमेकेपणानं समजू शकतं. त्यामुळं व्यक्त व्हावसं वाटलं तरी मर्मग्राही श्रोता लगेच मिळेल असं होत नाही.. अशा वेळी कवितेसारखं साधन हाताशी असलं तर मनातलं सारं शब्दांजवळ व्यक्त करता येतं.. तेही असं की व्यक्त होऊनही ते झाकलेलंही राहावं. कारण कवितेत वैयक्तिकाला सार्वत्रिक करण्याचं सामर्थ्य असतं. आपण जितकं खरेपणानं अगदी जिवालगतचं लिहू तितकं ते प्रत्येकाला आपलं स्वतःचं वाटू शकतं. मग ती कविता आणि तिचा आशय फक्त कवीचा राहत नाही. तो सर्वांचा होतो... कविता फक्त कवीलाच व्यक्त होण्याचा आनंद देते असं नाही. ‘मला अगदी हेच म्हणायचं होतं’ असं मनात म्हणत एखादा वाचक कवितेला उत्स्फूर्त दाद देतो तेव्हा त्यालाही स्वतः व्यक्त झाल्याचा आनंद झालेला असतो.

कविता म्हणजे काय? तिचं स्वरूप काय? चांगल्या कवितेचे निकष कोणते?.. असे प्रश्न पडणं, या प्रश्नांची उत्तरं शोधत चांगल्या कवितेचा ध्यास धरणं हे टप्पे प्रत्येक कवीच्या वाटचालीत येत राहतात. यायला हवेत. पण उत्स्फूर्तपणे शब्दात व्यक्त होणं उत्स्फूर्तपणेच सुरु होऊन जातं. या पहिल्या टप्प्यावरही कविता आणि कवी यांच्यात बरच काही घडतं... व्यक्त होण्याच्या निमित्तानं कवी स्वतःपासून अलग होतो आणि मनातळातलं सांगून झाल्यावर सुटकेचा निःश्वास टाकतो. पण हे केवळ मनमोकळं करणं नसतं... अलग झालेला ‘मी’ रोजच्या धबडग्यात जगणार्‍या ‘मी’ला धीर देतो, जगण्याची उमेद देतो, कधी दोष दाखवून देत त्याची निर्भत्सनाही करतो. नात्यांचे, भोवतीच्या घटनांचे अर्थ शोधत त्याच्या ओंजळीत शहाणपण टाकत राहतो !
या संदर्भात श्री शिंदे यांच्या कवितेतल्या काही ओळी उदाहरण म्हणून पाहण्यासारख्या आहेत.- ‘फाटक्या आयुष्याच्या गोधडीला / ठिगळे जोडावी तरी किती? /... सुई म्हणते थांब वेडे, दोरा घे, टाका घाल घालत राहा..’ (‘टाका घाल’ १४), ‘कधी काटे कधी फुले / ओंजळीत घ्यायचेच असतात / आयुष्याची उमेद तीच तर असते’ (‘फुलांचे काटे’ १९)... इत्यादी.

उत्स्फूर्तपणे व्यक्त होण्याच्या पहिल्या टप्प्यावर बर्‍याचदा कविता म्हणून काहीही लिहिलं जातं. पण मला वाटतं हे ‘काहीही’ कधी वाया जात नाही. पक्षी कुठली कुठली फळं खात सहज बिया टाकत राहतात.. त्या कुठे पडतील, त्यातल्या किती रुजतील, किती तग धरतील, किती फोफावतील, आणि कोणती बी वटवृक्ष बनून पिढ्यान्‍ पिढ्या सावली देत राहतील.. काही सांगता येत नाही. वटवृक्ष होण्याच्या टप्प्यापर्यंत न पोचलेल्या बिया खत बनून त्याच्या मुळांना पोसत राहतात.. त्याच्या बहरण्याच्या उत्कटतेत मिसळून टाकतात आपला क्षीण जीव.. न जमलेल्या कविता अशाच एखाद्या अस्सल कवितेची वाट प्रशस्त करत राहतात. व्यक्त होण्याचा खराखुरा आनंद देणारी अस्सल कविता लेखणीतून कागदावर उतरेपर्यंतचं मौन किंवा लिहिलेल्या कमअस्सल कविता म्हणजे एकप्रकारे कवितेसाठी चालू ठेवलेला रियाजच असतो. विजय शिंदे याना कवितेच्या या निर्मिती-प्रक्रियेचा अनुभव आहे. या कवितापूर्व अवस्थेबाबत ते म्हणतात- ‘सुचलं तर लिहावं नाहीतर उगी राहावं..’ (पृ.४३)

कवीसाठी हे मौन महत्त्वाचं असतं. मौन सोडायचं तेव्हा सुद्धा काय लिहायला हवं त्याबाबत ते म्हणतात- ‘लिही लिही रे कवी / असे काही लिही / मिळूदे संदेश नवा.. (पृ.५५)

शिंदे याना शब्दांची चांगली जाण आहे असं दिसतं. ‘शब्द’ या कवितेत ते म्हणतात- ‘शब्द बोलावून येत नाहीत / शब्द अडविता थांबत नाहीत’... / ‘कळत नाहीत इतके अवघड होतात शब्द / सहज सोपे वाटावेत इतके सोपेही होतात शब्द’ (पृ. १०)

या कवितासंग्रहात ‘अर्थ’, ‘ओंजळ’ (पृ. २३, २४), ‘गर्दी’ (पृ. ३५), ‘तूच’ (पृ. ४५) अशा काही छान जमून गेलेल्या कविता आहेत. मला त्या विशेष आवडल्या. ‘खूप झालं जीवनात’ (पृ. ३८), ‘एकदा एक’ (पृ. ५४) अशा काही कविता मात्र जुळवल्यासारख्या वाटल्या.. याखेरीज त्यांच्या इतर कवितांमधल्या काही ओळी फार सुरेख उतरल्या आहेत. त्यांच्या कवितांमधली ही सौंदर्यस्थळं पाहण्यासारखी आहेत. उदा.-

‘ऋतु फुलावयाचे थांबविल सखे, इतकी तू फुलू नको / खळखळ झरा थांबवील सखे पायी पैंजण घालू नको’ (‘सखे’ ३६), ‘अंधार हलवून तू जेव्हा येशील / काजव्यांचा प्रकाशही पुरेसा असेल तुला..’ (‘चांदणे’ ४२), ‘राष्ट्रपित्याच्या स्वप्नात नसेल, असा झाला आहे देश / अस्वलाच्या हातात दोरी आणि नाचतो आहे दरवेश..! (‘किती दिवस’ ५६) सामाजिक वास्तव अधोरेखित करणारं हे भाष्य किती मार्मिक आहे ! या ओळींमधलं सौंदर्य उलगडून दाखवण्याची गरज नाही.

आपण जगत असलेल्या भोवतालाचं उत्कट भान असणं, त्याविषयी आपण काही देणं लागतो याची मनस्वी जाणीव असणं हे माणूस म्हणून प्रत्येकासाठीच गरजेचं आहे. पण कवींकडून याची विशेष अपेक्षा केली जाते. त्यानं अलिप्तपणे केवळ कल्पनाविश्वात रममाण होऊन राहाणं त्याच्या संवेदनशीलतेला शोभणारं नसतं. श्री शिंदे यांच्या कवितासंग्राहात हे सामाजिक भान व्यक्त करणार्‍या बर्‍याच कविता आहेत. उदा.-

‘कुठेतरी कोसळली आहे बर्लिनची भिंत / आणि आम्हाला वाटले सुरवात तर झालीच आहे / इथेही कोसळतील काही अशाच भिंती / ... पण कसचं काय / साधा तडाही नाही भिंतींना / उलट सारवली जाताहेत कुडं दोन्ही बाजूंनी..!’ (‘भिंत’ ९)

‘आहे आहे अजूनही आग शिल्लक आहे /... नवचैतन्याचा अग्नी पेटवायचा आहे / आग शिल्लक आहे पण.. / फुंकर घालणारा हवा आहे..!’ (‘आग’ ८)

कामगारास उद्देशून लिहिलेल्या ‘ती तुतारी’ या कवितेत पूर्वसूरींची आठवण जागवत, त्यांच्याकडून झालेले संस्कार जोपासत श्री शिंदे सहज लिहून जातात- ‘‘उपोषणाची, मानवतेची अरे इथे, पुन्हा पुन्हा हार आहे / लांडग्यांच्या कळपास इथे हात जोडणे बेकार आहे / .... ती तुतारी फुंकण्याची, आता पुन्हा वेळ आहे’’ (३४)

समाजाचं काहीतरी भलं व्हायला हवं ही सामान्यजनांची आर्त इच्छा अशा कवितांमधून परोपरीनं व्यक्त होते तेव्हा ती एक उत्कट प्रार्थनाच असते आपापल्या पट्टीत उच्चारलेली..! श्री शिंदे यांच्या कवितांमधून अशी सदिच्छा बाळगणारं कवीमन सतत डोकावत राहातं... कवितेबरोबर स्वतः घडत राहण्याचं सामर्थ्य या कविमनाला मिळावं ही शुभेच्छा-

आसावरी काकडे

३ मार्च २०१३        

बोली आरूषाची


‘बोली आरूषाची’ हा रेखा मिरजकर यांचा पहिलाच कवितासंग्रह. पण साहित्यक्षेत्रातलं हे पहिलंच पाऊल नाही. या आधी त्यांनी ललित लेख, कथा या प्रकारचं लेखन केलं आहे. त्यांची तीन-चार पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत.

‘बोली आरुषाची’ हे शीर्षक म्हणजे कवयित्रीची प्रामाणिक भूमिकाच आहे. याबद्दल त्यांनी आपल्या मनोगतात खुलासाही केलेला आहे. रांगता रांगता दिसेल तो आधार घेऊन उठत पाऊल टाकण्याचा प्रयत्न करणार्‍या बाळासारखे ‘अजून शब्द रांगत आहेत’ अशी त्यांची आपल्या कवितेबद्दलची नम्र समजूत आहे. पण या कविता वाचताना असं आर्षपण जाणवलं ते अभिव्यक्तीबाबत. आशयाच्या बाबत नाही. कवितांमधील आशय पुरेसा पक्व आहे. आणि ही पक्वता वाचकांपर्यंत पोचेल अशी शब्दकळाही आहे. स्वत:कडे थोडं ‘अभ्यास’पूर्वक लक्ष दिलं तर हीच कविता अधिक प्रभावी होईल.

कविता अल्पाक्षरी असते. ती सलणार्‍या घटना-प्रसंगातील तपशील पुसून टाकते आणि आत खोलवर पोचलेल्या पडसादापैकी काहीना शब्दरूप देते. त्यामुळे व्यक्त झालेली कविता वैयक्तिक राहात नाही. कवितेत असं सामान्यिकरण केलं जाण्याची जी क्षमता असते त्यामुळे ती प्रभावी होते. सर्वांची होते. व्यक्त होऊनही अव्यक्त राहाता येण्याच्या अशा शक्यतेमुळे कवितेचं अनेकांना आकर्षण वाटतं. कवितेच्या छोटेखानी रूपामुळेही कविता लिहिण्याचा मोह होतो. पण कविताच लिहावी असं तीव्रतेनं वाटण्याचं मुख्य कारण म्हणजे, कवयित्रीनं आपल्या मनोगतात म्हटल्याप्रमाणे ती ‘अस्वस्थ मनाची कोंडी फोडण्याचं’ एक जिवलग साधन असते. रेखा मिरजकर यांच्या कवितेत व्यक्त झालेली अस्वस्थता मनाची घुसमट मोकळी करणारी आहे. त्यांना कवितेचं आकर्षण वाटलं ते मन मोकळं  करता येईल अशी सखी या तिच्या रूपाचं. ‘वसा’, ‘अबोली’, ‘आठवणी’, ‘आकाश’.... अशा काही कविता या दृष्टीनं वाचण्यासारख्या आहेत.

जगण्याची संथ लय हरवून गेलेल्या सध्याच्या गतिमान आणि घाबरवणार्‍या वास्तवाचं प्रतिबिंब असलेली सध्याची कविता अधिकतर मुक्त छंदात लिहीली जाते. मुक्तछंद कविता लिहीणंही वाटतं तितकं सोपं नसतं. मुळात आतून अनावरपणे काही तरी उगवून यावं लागतंच. पण मुक्त छंदाला यमक, मात्रा, अक्षरसंख्या.... अशा प्रकारचं बंधन नसतं. त्यामुळं उत्स्फूर्तपणे आतून येईल ते थेटपणानं लिहीता येतं. स्वत:च्या वाटण्याशी तडजोड करावी लागत नाही.

छंदोबद्ध कवितेला यमक, मात्रा, अक्षरसंख्येचं बंधन असतं. आणि आतला उमाळा या बंधनातूनही व्यक्त होईल इतका प्राणवान असावा लागतो. अशा कवितेची लय विशिष्ठ शब्दांची मागणी करणारी असते. आतला उमाळा थोपवून धरत ती शब्दांचा, त्यांच्या वजनाचा विचार करायला लावते. आशय तितकाच समर्थ असेल तेव्हा तो असे ‘विशिष्ठ’ शब्द सोबतच घेऊन येतो. यमक, मात्रांचा ‘वेगळा’ विचार करावा लागत नाही. अंगभूत लय केवळ शब्दांनाच नाही अशा आशयाला सुद्धा असते. छंदोबद्ध कवितेचं वैशिष्ट्य असं की ती कविच्याही नकळत कविच्या मनातला आशय व्यक्त करते. कारण कवितेची लय कवी-मनातील अबोध आशयाला आवाहन करते. सूप्त आशयाला जाग आणते. आणि कविला स्वत:लाच स्वत:ची नवी ओळख करून देते.

लयबद्ध कविता काहीशी संदिग्ध होते. अनेकार्थाच्या शक्यता या संदिग्धपणात लुकलुकत राहतात. लय, मात्रा, ठराविक वजनांचे शब्द आणि यमक यामुळे कविता गेय होते. स्वरबद्ध करता येते. आशयाला स्वरांची मिती मिळाल्यावर अशी कविता शब्दात न कळताही रसिकमनाला भावते. मनामनात गुणगुणत राहते.

कवितेचा आशय फक्त शब्दांतून नाही तर विराम-चिन्हांमधून, सोडलेल्या रिकाम्या जागांमधूनही व्यक्त होत असतो. छंदोबद्ध कवितेला व्यक्त होण्यासाठी लय ही एक अधिकची मिती प्राप्त झालेली असते. त्यामुळे अशा कवितेत कवितापण ठासून भरलेलं असतं. मात्र दुर्बोध होण्याचा धोकाही अशा कवितेला असतो.

अक्षर, मात्रा, यमक यांचं बंधन सांभाळणं अवघड तर असतंच पण त्यात दुहेरी धोका असतो. हे बंधन काटेकोरपणे पाळण्याचा दुराग्रह धरला, सर्व नियम पाळलेले असणं म्हणजे चांगली कविता असं मानलं तर अशी कविता म्हणजे केवळ शब्दकौशल्य ठरू शकते. नियमांसाठी आशयाशी तडजोड केलेली कविता कृत्रिम होऊ शकते. आणि नियमांकडे लक्ष न देता लिहीलेली कविता गेयता हरवून बसते. लय गमावते. ती एक फसलेली कलाकृती होते.

कविला अक्षर, मात्रा इत्यादींचं बंधन झुगारण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र ‘नियम’ मोडताना मुळात नियम काय आहेत, ते तसे का आहेत, त्यांचं महत्त्व काय..... हे पूर्णपणे माहीत असावं लागतं. एखादी मात्रा कमी, जास्त करण्यासाठी सोयीनुसार शब्द र्‍हस्व, दीर्घ लिहिले जातात. किंवा एखादी मात्रा कमी, जास्त राहू दिली जाते. यमक व्यंजनात जमलं नाही तरी स्वरात जमवून भागवून घेतलं जातं. मात्र अशी कोणतीही तडजोड पर्यायांचा पुरेसा विचार करून झाल्यावर, समजून उमजून केलेली असावी. छंद, लय... यावर हुकमत असलेला कवी सर्व नियमांचे सहज पालन करतो. त्याचे शब्द छंदोबद्ध होऊनच प्रकटतात. तडजोड केलेली कविता केव्हाही कमअस्सलच राहणार.

रेखा मिरजकर यांनी छंदोबद्ध कविता लिहिण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. या संग्रहात मुक्त छंदाच्या बरोबरीनं अशा लयबद्ध कविता आहेत. रेखाताईंनी प्रस्तावना लिहिण्यासाठी म्हणून ‘बोली आरूषाची’ चं हस्तलिखित दिलं तेव्हा या कविता वाचताना जाणवलं की यातली छंदोबद्ध रचना अजाणतेपणी झालेली आहे. कविता वाचण्याच्या, ऐकण्याच्या संस्कारातून लयीची ओळख होते. ती लय मनात ठेवून कविता लिहीली जाते. बर्‍याच प्रमाणात लय साधली जाते. मात्र कवितेला अशी लय येण्यासाठी किती मात्रा, अक्षरं.... यांची आवश्यकता आहे याचा अभ्यास नसल्यामुळे कमी, जास्त वजनाचे शब्द वापरले जातात.... .या गोष्टी लक्षात आणून दिल्यावर रेखाताईनी त्यावर मन:पूर्वक काम केलं आणि नकळत झालेल्या चुकांची दुरुस्ती केली. त्यामुळे या संग्रहातल्या छंदोबद्ध रचना बर्‍याच अंशी निर्दोष झाल्या आहेत.
उदा.-

“पाऊस घालतो गहन आगळी कोडी
जळि तरंग उठता झुलते कागद होडी” -(सृजन)

“अशा पेटत्या पाण्यात
उभे वेदनेचे गाव
दिशा दिशाहीन झाल्या
चुके काळजाचा ठाव” -(युगांत)

अशा काही ओळी अभिव्यक्तीच्या बाबतीतही आर्षपणाला ओलांडून जाणार्‍या आहेत. आशय तर हृदयस्पर्शी आहेच. या संग्रहातील एकूणच कविता अंतर्मुख होऊन स्वसंवाद साधणार्‍या आहेत. एक प्रकारे हा स्व-शोधच आहे. हा शोध कधी नात्यांचं स्वरूप उलगडण्यातून तर कधी निसर्गातील विभ्रमांशी नातं जोडण्यातूनही घेतलेला आहे.

गोव्यात राहणार्‍या व्यक्तीला गोव्याचा सार्थ अभिमान असतो. अनेक वर्षे गोव्यातच वास्तव्य असलेल्या रेखाताईंनीही ‘तेजोगाथा’ ही गोव्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करणारी कविता लिहीली आहे. निसर्गाचं वरदान लाभलेल्या गोव्याच्या भूमीत रेखाताईंची कविता अधिकाधिक संपन्न होत राहू दे हीच सदिच्छा.-

आसावरी काकडे

(२००८) 

Saturday 30 January 2016

किनारा होऊन आपणच

प्रिय कादंबिनी,
‘किनारा होऊन आपणच’ हा तुझा पहिला कवितासंग्रह. या संग्रहातल्या तुझ्या सगळ्या कविता सलग वाचल्या. त्यातल्या एक-दोन फार पूर्वी, तू लहान असताना लिहिलेल्या.... तेव्हा वाचून तुझं कौतुक केल्याचं आठवतंय. आता इतक्या वर्षांनी इतक्या कविता एकत्र वाचतांना पुन्हा कौतुक वाटतं आहे... तू चांगलं लिहिलंयस. तुझ्या कवितांमधला एकूण आशय, त्यामागचा तुझा विचार चांगला आणि भारदस्त आहे. त्यातून तुझं व्यक्तित्व आणि तो घडवणारा तुझ्या आई बाबांचा समृद्ध वैचारिक वारसा डोकावतोय. तू जगण्याचा, स्वत:च्या अस्तित्वाचा, नात्यांचा आणि भोवतीच्या वास्तवाचाही सतत विचार करतेस, तुला प्रश्न पडतात, विसंगती जाणवतात.... हे सर्व सजग आणि संवेदनशील असण्याचं सुचिन्ह आहे! अमेरिकेसारख्या दूरदेशात राहूनही लौकिक स्तरावर आजच्या काळाचं आणि बिथरवू शकणार्‍या सुबत्तेचं बोट धरून धावताना असा अंतर्मुख विचार करणं ही सहज गोष्ट नाही. पण त्याहून विशेष म्हणजे या विचारांनी तू अस्वस्थ होतेयस.... मनातला कोलाहल कवितांमधून व्यक्त करावासा वाटण्याइतकी! लिहिण्यातली ही उत्कटता कधीही कोमेजू देऊ नकोस. कविता हे घडत राहण्याचं जिवलग साधन आहे. तिची साथ सोडू नकोस !

हे झालं तुझ्या बद्द्ल, तुझ्या विचाराबद्दल, तुझ्या कवितांमधल्या आशयाबद्दल.... आता कविता या साहित्य-प्रकाराबद्दल थोडं सांगते. कविता मितभाषी असते. ती शब्दांपेक्षा मौनातूनच अधिक बोलते. ती घटना-अनुभवांतील तपशील गाळून टाकते आणि भावपातळीवर त्यांचे उमटलेले ठसे शब्दात अनुवादित करते. या प्रक्रियेत वैयक्तिक अनुभवाचं सामान्यीकरण होतं..... विशिष्ठ ’मी’  चा परिघ विस्तारून तो सामान्य ’मी’ होतो. त्यामुळेच कोणतीही चांगली कविता वाचकाला आपली वाटते....

कवितेची वेगवेगळी वैशिष्ट्ये सांगणार्‍या खूप व्याख्या आहेत. त्यातली एक माझ्या विशेष लक्षात राहिलीय. कारण ती प्रथम समजली तेव्हा कवितेच्या स्वरुपाविषयीचा माझा दृष्टिकोन बदलवण्याइतकं तिनं मला अंतर्मुख केलं होतं. ती व्याख्या अशी – A poetry is not the thing said but the way of saying it. !’

ही व्याख्या माहीत होईपर्यंत मी कवितेतील आशयालाच खूप महत्त्व देत होते. पण या व्याख्येनं लक्षात आणून दिलं की कवितेचं कवितापण कवितेच्या आशयात नाही तर तो व्यक्त होण्याच्या तर्‍हेत आह! विशिष्ठ रीतीनं सांगण्याची कवीची शैली कवितेच्या आशयाला कवीच्या नावाची एक मिती देत असते. कोणत्याही चांगल्या, जमून गेलेल्या कवितेत आशय स्वत:ची शैली घेऊनच व्यक्त होतो. आशय आणि अभिव्यक्ती या दोन वेगळ्या गोष्टी राहात नाहीत. दोन्ही मिळून एक सौंदर्यानुभूती देणारी आशयगर्भ कविता झालेली असते !

चांगल्या कवितेची वैशिष्ट्यं समजून घेऊन, अभ्यास करून चांगली कविता लिहिता येणार नाही. कविता लिहिता लिहिता, तिच्या सोबतीनं चालता चालताच कधीतरी ती प्रकटेल ! खरं तर चांगल्या कवितेचं स्वरूपही तेव्हाच नीट कळतं.....  तुझ्या कविता वाचताना जाणवलं की त्या अभ्यास-व्यासंगातून नाही तर आंतरिक निकडीतून आलेल्या आहेत. त्यामुळे त्यात नीट-नेटकेपणापेक्षा उत्स्फूर्तता आहे. आशयाच्या पातळीवर त्या पुरेशा समंजस आहेत पण अभिव्यक्तीच्या पातळीवर काहीशा अनघड ! मात्र काही कविता दोन्ही स्तरांवर छान जमून गेल्यायत. उदा. पहिलीच कविता –

“साधावा कधीकधी
एक संवाद
स्वत:चा
स्वत:शीच
अन
निरखून पाहावं
त्रयस्थपणे
स्वत:लाच कधीकधी
उगाच वाहात राहू नये नुसतंच
वेडावलेल्या नदीसारखं
किनारा होऊन आपणच
तिलाही
द्यावा आधार कधीकधी !”

ही कविता म्हणजे प्रौढ मनानं स्वत:तल्या खट्याळ प्रवाहांना समजावणं आहे. किंवा आत्मसंवाद साधू शकणार्‍या कवितेच्या कवितेचं स्वरूप जाणवणं आहे, किंवा... आणखी काही तरी! यातल्या शेवटच्या ओळींमधे वेगवेगळे अर्थ वाचकांपर्यंत पोचवण्याच्या शक्यता आहेत. मला त्या आवडल्या.

‘अतितात मी’ ही पण छोटीशी, मला खूप आवडलेली कविता. यात तू प्रत्यक्षात न लिहीलेलं बरंच काही वाचकांना जाणवू शकतं. तू लिहिलंयस-

“ अतीतात मी
माझ्याही अलिकडे, माझ्याही अलिकडे
वर्तमानात मी
माझी माझ्यातच, माझी माझ्यातच
भविष्यात मी
माझ्याही पलीकडे, माझ्याही पलीकडे”

तुझ्या बर्‍याच कवितांमधे स्वत:च्या असण्याचा, आस्तित्वाचा विचार आलाय. मला तो विशेष महत्वाचा वाटतो. काही कविता जिवलग नात्यांवर आहेत. तर ‘एक दणदणीत धमाका...’ सारख्या काही कविता वास्तवाचं भयंकर दर्शन घडवणार्‍या आहेत. तुझ्या कवितांचं आणखी एक वैशिष्ट्य जाणवलं, ते म्हणजे तुझ्या बर्‍याच कवितांचे शेवट चमकदार, लक्ष वेधून घेणारे आहेत. उदा.-

‘.... सारा प्रवास
एका आस्तित्वाचा
शुन्याकडून शून्याकडे
हा प्रवास माझाच
माझ्याकडून माझ्याकडे ’
**
‘आपणही त्यात रुजून
कुठे कुठे उगवत असतो ’
**
‘आता मी वणवा होऊन
तुला जाळत जाणार
अन्‍
जंगल होऊन
स्वत:ही जळत जाणार !’
**

याशिवाय ‘बाप’,  ‘आणि मी ?’,  ‘कधी कधी’, काळाच्या प्रवाहातून’ ....अशा काही कविता मला अधिक आवडल्या. ‘आपली नजर थांबली म्हणून / आभाळ कधी संपत नसतं’.. अशा काही ओळीतलं शहाणपण, ‘अनपेक्षित अनुभवांसारखी / कविता जगणं शिकवत येते’ अशा ओळींतून व्यक्त होणारी समजूत... असं आणखी काय काय लक्ष वेधणारं आहे तुझ्या कवितेत.

लिहिलंयस ते छान आहे. आणखी सतत लिहित राहा. कारण कविता हे अतिशय समर्थ माध्यम आहे. अंतर्मुख विचारांतून व्यक्त होऊ पाहणारा आशय व्यक्त होताहोता स्पष्ट आणि समृद्ध होत असतो. या प्रक्रियेत उत्स्फूर्ततेच्या जोडीला व्यासंग आणि उत्कटतेतलं सातत्य आवश्यक आहे. आपल्या पावलांना न मागताही मिळालेल्या, कधीकधी अनावर वाटणार्‍या गतीबरोबर संवेदनशीलता वाहून जाऊ नये यासाठी सावध असणं गरजेचं आहे. त्यासाठी संवेदनशीलता जागी ठेवू शकणारी चांगली कविता- मराठी, इतर भाषांमधली – मिळवून वाचत राहा. सततच्या अशा व्यासंगातून कविता या माध्यमाची आणि कवितेचं माध्यम असलेल्या भाषेची अंतर्बाह्य ओळख होत जाते...

कवितेच येणं कधी थोपवू नकोस. सुचेल ते सुचेल तेव्हा लिहीत जा. कवितेतून व्यक्त होतांना आपल्याला काय म्हणायचंय त्यासाठी शब्द योजले जातात तेव्हा आपण आपल्याला काय वाटतंय त्याच्या जवळ पोचलेलं असतो. मात्र कधीकधी घाईघाईत आपण आपल्याला व्यक्त करून टाकतो. घाईघाईत हाताला येतील ते ऐकीव शब्द वापरून टाकतो. तुझ्या काही कविता अशा आहेत का ते शोधून काढ. बरेचदा आपण आपलं म्हणणं नीट ऐकूनच घेत नाही. आपला सच्चा अंत:स्वर ओळखणं आणि तो व्यक्त करण्यासाठी स्वत:चा गंध असलेला शब्द शोधणं ही एक प्रकारची साधना आहे. स्वत:चं अनावरण करत स्व-शोध घेण्याचीच प्रक्रिया असते ती !...

तुला एवढं सगळं सविस्तर सांगितलं कारण तू कवितेकडे गांभिर्यानं पाहणारी मुलगी आहेस. तुझ्या भोवती सर्वार्थानं पोषक वातावरण असूनही तू संग्रह प्रकाशीत करण्याची घाई केली नाहीस. अजूनपर्यंत विचार करतच होतीस. पण आता मनावर घेऊन संग्रह काढतेयस ते चांगलं आहे. कवितेची पूर्तता ती वाचून कुणाची तरी दाद मिळाल्यावर होते. कविता लिहीतांना वाचक आपल्या मनात नसतो. बरेचदा ती स्वांतःसुखाय, आंतरिक निकडीतून उत्स्फूर्तपणे लिहीली जाते. पण लिहून मनावेगळी झाल्यावर, तिला स्वतंत्र आस्तित्व लाभल्यावर मात्र ती कुणाला तरी दाखवाविशी वाटते. संग्रहरूपात कविता प्रकाशित होणं म्हणजे दाद मिळण्याच्या शक्यतांचा परिघ वाढणं!.... तुझ्या कवितांना जाणकार रसिकांची भरभरून दाद मिळू दे आणि तुझी कविता-लेखनावरची निष्ठा वाढत राहू दे ही हार्दिक शुभेच्छा !

आसावरी काकडे
२३ मार्च २०११
9762209028     

  

Friday 29 January 2016

पळसदरी आणि अभयगान


सद्ध्याच्या अतीमुक्तछंद कवितेच्या काळात छंदोबंध दीर्घकाव्ये क्वचितच लिहिली जातात. श्री र. ह. कुलकर्णी यांच्या ‘गूढगुंजन अक्षरे’ या काव्यसंग्रहात दोन लयदार दीर्घकाव्ये वाचायला मिळतात. ही काव्ये म्हणजे स्वतःच्या नादात प्रवासातील सुंदर आणि रौद्र-भीषण असा निसर्ग अनुभवताना गुणगुणलेली स्वगतं आहेत. या स्वगतात स्मरणरंजन आहे. या स्मरणरंजनाचं वैशिष्ट्य असं की संज्ञाप्रवाह नेईल तसं ते व्यक्त झालेलं आहे. कधी छंदोबद्ध काव्यात तर कधी सरळ गद्यातच. या उत्स्फूर्त आविष्काराला आकृतीबंधाचा तगादा ऐकू येत नाही. परिष्करणाची फिकीर करावीशी वाटत नाही. तो सहज आधार घेतो नावानिशी इतर लेखक-कवींच्या अभिव्यक्तीचा जिचा आशय आता स्वगत मांडणार्‍या मनात स्मरणरूपात स्वतःचा बनून गेला आहे...

हा सारा लेखन खटाटोप कशासाठी? ‘पळसदरी’ या पहिल्या दीर्घ काव्यात जी.ए. यांच्या एका वाक्याचा आधार घेत र.ह. म्हणतात- ‘तर आपणाला काय वाटते ते समजून घेण्यासाठी.. To know what one thinks and feels.’...  ‘ही मी अनुभवत असलेली पळसदरी म्हणजे तरी काय? एक व्यामिश्र अनाकलनीय महाप्रचंड जिवंत अस्तित्व आणि त्याचा अनुभव घेण्याची प्रक्रिया..!’ या प्रक्रियेतून पळसदरीकडून होत असलेली स्वतःची  ओळख महत्त्वाची. त्यासाठी हा सारा लेखन-प्रपंच..! 

सजगपणे जगताना लक्षात येतं की खरंतर आपली प्रत्येकच कृती ही आपल्यातल्या ‘स्व’ची अभिव्यक्ती असते. आपण काय वाचतो, कुठे जातो, कुणाशी काय बोलतो, काय खातो, कोणत्या कामाची निवड करतो... या सगळ्यातून ‘स्व’ची मूलभूत निवड व्यक्त होते. तीच ‘स्व’ची ओळख असते. पण इतर कोणत्याही कृतीपेक्षा लेखन-कृती अधिक समर्थपणे आपल्यासमोर आरसा धरत आपली ओळख करून देत असते. कारण या कृतीत अंतर्मुख मन सक्रीय असतं. लिहिता लिहिता स्पष्टपणे न जाणवलेलंही लिहिलं जातं.. ती या अंतर्मुख मनाचीच करामत असते. ते लिहिणाराला खोलवर कुठे कुठे घेऊन जाईल आणि काय काय खेचून वर आणेल ते सांगता येत नाही. या प्रक्रियेत पळसदरी किंवा कर्नाळा अभयारण्य यासारखं एखादं निसर्गाचं अप्रुप सोबत असेल तर मग मनाला पंखच फुटणार..! कधी माशाचे, खालच्या अथांगात नेणारे तर कधी पक्षाचे, वरच्या अथांगात फिरवून आणणारे... ‘पळसदरी’ आणि ‘अभयगान’ या दीर्घकाव्यांमधली काही उदाहरणं पाहिली तर याचा प्रत्यय येऊ शकेल.

‘पळसदरी’ या दीर्घकाव्यात काष्ठशिल्प ही प्रतिमा वारंवार आलेली आहे. ‘पळसदरी’ मधली काही उदाहरणं पाहण्यापूर्वी या प्रतिमेविषयी थोडसं... पुणे-मुंबई असा प्रवास करताना घाटातून जाताना कवीला रोज भेटणारी पळसदरी म्हणजे प्रत्यक्ष जगण्याचं एक प्रतिकच आहे असं वाटत राहातं. पळसदरीची बदलती रूपं, तिच्यात होणारी पडझड, तिच्यावर होणारी आक्रमणं, त्याला पुरून उरत तिचं सृजनोत्सव साजरा करत राहणं... हे सर्व कवी संवेदनशीलतेनं अनुभवत राहातो. या विनाश-सृजनाच्या खेळात वाळून गळून पडणारी आणि नव्यानं उगवून येणारी वृक्षांची विविध रूपं कवीला शिल्पांसारखी वाटतात. ही काष्ठशिल्पं प्रतिकरूपात मानवी जीवनातल्या घटनांची आठवण देत राहतात. त्यातून निर्माण झालेल्या काव्यातील निसर्गवर्णनातूनही जगण्यातल्या भाव-विभ्रमांचं सूचन जाणवतं. उदा.-

“गवसतात सूर नवे  
किती उरांत बोगदेच
काळोखी नवसर्जन
पळसदरी”

प्रवासात बोगद्यातून जाताना अंतर्मुख मनाला लख्ख जाणवतं की अव्यक्ताचा काळोख जतन करणारे कितीतरी बोगदे आतही आहेत... मात्र बाहेरच्या बोगद्यातून बाहेर पडल्यावर नित्यनवी पळसदरी अनुभवताना आतल्या बोगद्यातल्या काळोखात सर्जनाला जाग येते आणि अव्यक्ताला नवे सूर गवसतात... त्यातून अभिव्यक्तीला प्रेरणा मिळते आणि काव्यनिर्मितीला बहर येतो. ‘पळसदरी’मधली काही अर्थवाही कडवी-

“काष्ठशिल्प नवनवीन
जन्माला रोज येत
घेउनिया करिं कुठार
शिल्पकार रोज फिरत

जाळाया जीवनास
जन्माला मरण घाल
पाळणाच सरणावर
समईची ज्योत तरल”

“मरणाची सरणाची
स्पर्धा ही जगण्याची
काष्ठशिल्प झाडावर
नित्यनवा जन्म घेत

झाडाचे शिल्पकाष्ठ
काष्ठाचे शिल्पवृक्ष
तरूणपणी मरण्याचे
जीर्णत्वी जगण्याचे

साक्षत्वी असण्याचे
काष्ठत्वी नसण्याचे
मरण्यातून जगण्याचे
स्वप्न ऊरी.. पळसदरी”

“झाडांच्या खोडातून
चिकट सत्य पाझरते
डिंकाचे जगण्यावर
गोंदवणे साकळते”

“फुटलेल्या धरणासम
दु:खाने फुटलेली
अश्रूंच्या पावसांत
न्हालेली पळसदरी”

पळसदरीमधल्या विविधरंगी दृश्यांच्या आधारानं जीवन-मरणावर भाष्य करणार्‍या या ओळी  वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणार्‍या आहेत. प्रत्येकाच्या मानात त्याच्या त्याच्या कल्पनेनुसार, आस्वाद-क्षमतेनुसार ‘झाडांच्या खोडातून पाझरणारं चिकट सत्य’ वेगवेगळ्या रूपात चित्रित होत राहील... पूर्ण काव्य वाचताना प्रत्येकाला त्याची अशी वेगळी पळसदरी उमगत जाईल..

दुसरं दीर्घकाव्य- ‘अभयगान’. याचा पोत थोडा वेगळा आहे. सुरुवातीला अगदी छोटंसं, एका परिच्छेदाचं प्रास्ताविक आणि मग सलग काव्यरचना आहे. या काव्याची लय ‘पळसदरी’हून वेगळी, यातील आशयाला साजेशी आहे. सलग वाचताना ही लय वाचकालाही नादावून टाकते. इतकी की शब्द काय सांगतायत ते पुरतं ऐकून न घेताच पुढं वाचत राहावं... एखादं अमूर्त पेंटिंग पाहताना यावा तसा अनुभव हे काव्य वाचताना येतो. इथे काव्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करायचाच नाही. लयीसोबत अनुभवायचं अभयारण्य.. तरी काही ठिकाणी शब्द पारदर्शी झालेत. त्यातून जो आशय डोकावतो तो कवीमनाचा ठाव घ्यायला मदत करतो. अशी काही मला भावलेली उदाहरणं-

      “शब्दांचे झुंबर झुलते
झुंबरांत पक्षी गातो
परिपक्व फळांचा झूला
एकाकी डुलता रमतो”

“हे जगदाकारीं कोण ?
अभयात निरंकुश आहे
या अरण्यांत लपलेले
प्रतिबिंब स्वतःचे आहे”

“घुबडांची चित्तरगाथा
चित्कारी रचली जाते
पोपटास पोपटपंची
शिकवून कोंडली जाते”

“अभयरान गाते आहे
शांतीचा उरिं कल्लोळ
अन बोटांमधला वेळू
हळू हळू मारतो शीळ”



“अश्रूंची घुंगुर भाषा
वाळल्या फुलांना कळते
वाळली पर्ण-वनराशी
तरूतळी विसावा घेते”

“पर्णांच्या आकाशात
फांद्यानी नक्षी रचली
साकार अक्षरामधूनी
उपनिषदे जन्मा आली”

“वेड्यांचा हिंसक दंगा
रडतात मनाशी झाडे
मातीत मिसळली माती
मोरपंख तटतटा तुटले !”

“या अभयारण्यांमधें
ज्याचा तो राहत नाही
त्याच्यातिल अंतिम कोणी
शब्दांकित होणे नाही”

“कर्नाळा अभयारण्या !
ही कविता तुझिया चरणी
र. ह. आला ! राहुनी गेला !
गुणगुणून गेला गाणी”


या दोन दीर्घ काव्यांखेरीज यात शेवटी ‘स्मरणाक्षरम्‍’ हा भाग येतो. म्हटलं तर हा एक संवाद आहे चिर-विरहात टाकून गेलेल्या आपल्या प्रिय पत्नीशी केलेला. म्हटलं तर हे एक स्वगत आहे. संज्ञाप्रवाहाबरोबर वाहात व्यक्त झालेलं. गद्यात बोलता बोलता मधेच काव्यरूपात जाणारं. इतकं खरं, आतून उन्मळून आलेलं की बघता बघता त्याचं सामान्यीकरण होऊन ते र. ह. कुलकर्णी नावाच्या एका व्यक्तीचं न राहता कुण्या विरही मनाची अभिव्यक्ती वाटावी..! एकाकी पडलेली सहजीवनाची विहीर आता आटली असं सांगणारी, डोळ्यात पाणी आणणारी शेवटी आलेली कविता या दृष्टीनं वाचण्यासारखी आहे- 

“विहीर ही आटली
गड्यानो विहीर ही आटली
तृषाशमन जे करून गेले
पाणी ओढुन नेण्या जमले
शुष्क भासल्यावरी निघाले
ही... ओलावा हरवली
गड्यानो विहीर ही आटली

होते झुळु झुळु सदैव पाणी
निर्मळ शीतल चविष्ट झरणी
समृद्धीने होती सजली
आता विहीर ही आटली

चिरा चिरा हा खचू लागला
गाळ हळू हळू साठु लागला
दबला मनीचा जणू उमाळा
एकाकी पडलेली
विहीर ही आटली”


आसावरी काकडे
२७ डिसेंबर २०१३
9762209028