नितीन कदम यांचा ‘तू माझी
सावली’ हा छान सजवलेला कवितासंग्रह प्रकाशनापूर्वी आभिप्रायार्थ माझ्या समोर आला
आहे. मुखपृष्ठावर पाठमोर्या मुलाचा फोटो आहे. आणि त्याची सावली एका मुलीची असावी
अशी आहे. आतही प्रत्येक पानावर असंच चित्र आहे. ही कलात्मक मांडणी संग्रहाचं
शीर्षक आणि कविता यांना साजेशी आहे.
या काविता वाचताना जाणवत
राहिलं की कवीमन प्रेमभावनेत आकंठ बुडालेलं आहे..! प्रेम करणारं मन सदैव वर्तमानात
जगत असतं. त्याला भूतकाळ स्मरत नाही की भविष्यकाळ भेडसावत नाही. आपल्या मनोवस्थांविषयी
भरभरून लिहिताना ते कवितेच्याही प्रेमात पडतं. नितीन कदम यांची या कविता लिहिताना
अशीच अवस्था झाली असावी. ते म्हणतात, ‘तू देतेस अर्थ म्हणून मी शब्द नवे शोधतो...!’
या
संग्रहात प्रेम हा एकच विषय आहे आणि एका आवेगात लिहिलेली एकच कविता वाटावी अशा ‘चारोळी’
एकामागोमाग एक आलेल्या आहेत. उत्कट भाव व्यक्त करणार्या त्यातल्या काही ओळी अशा- ‘समोरच्या प्रत्येक चेहर्यात
/ मी तुलाच आता पाहतो’, ‘तुझ्याविना हे जीवन / नुसतंच माणसांचं रान’, ‘कस्तुरीचा
गंध जसा / तशी तू माझ्या सोबती’, ‘तूही त्या
क्षितिजासारखीच / सत्यही आणि भासही’, ‘तुझं जीवनात येणं / जसा पाऊस उन्हातला’.... प्रेमात
बुडालेल्या या कविमनाला ऋतू कळेनासे झालेत. त्याला न किनारा गाठता येतोय न तळ..!
हे प्रेम निभावणं म्हणजे ‘स्वतःलाच पुन्हा शोधण्याचा / अवघड अशक्य प्रयास आहे’ असं
या मनाला वाटतं आहे. या सर्व भावना एका ‘तू’भोवती घोटाळणार्या आहेत.
माझ्या समोर असलेल्या या कवितांमधे व्यक्त होण्याचा
प्रामाणिक आवेग आहे. त्यातल्या काही ओळींमधे काव्यगूणही आहेत. पण कविता म्हणून
त्यांच्यावर आणखी थोडे संस्कार होणं गरजेचं आहे. कविता ही व्यक्त होण्याचं जिवलग
आणि सशक्त माध्यम आहे. पण त्यासाठी व्यासंग आणि प्रामाणिक रियाज व्हावा. एक अधिक
उन्नत माणूस होण्यासाठीही ही काव्य-साधना मार्गदर्शक ठरेल. या संग्रहाच्या निमित्तानं
नितीन कदम यांना मी कविता-लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा देते.
आसावरी काकडे
१२.११.२०१७
No comments:
Post a Comment