Wednesday, 4 June 2025

उसवलेलं शिवता येईल का?

 वर्षा चोबे यांचा ‘उसवलेलं शिवता येईल का?’ हा कवितासंग्रह वाचताना संग्रहाच्या शीर्षकानंच प्रथम लक्ष वेधून घेतलं. या शीर्षकात संग्रहातल्या कवितांच्या समग्र स्वरूपाचे सूचन आहे हे कविता वाचल्यावर जाणवलं. व्यक्ती म्हणून जगताना जाणवत राहातं की स्व पासून समाजापर्यंत सर्व स्तरांवर वास्तव जागोजाग उसवत चाललं आहे. संवेदनशील मनाला ते शिवायला हवं हेही उत्कटतेनं वाटत असतं आणि ते शक्य होईल का? अशी साशंकताही सलत असते. उसवलेलं शिवणं ही प्रतिमा परंपरेनं स्त्री असण्याशी निगडित करून ठेवली आहे. वर्षा चोबे यांच्यातील बाईमाणूस या सर्व जाणिवा तळहातावर घेते, निरखत राहाते आणि अस्वस्थ होते.. या संग्रहातील कविता त्या पक्व अस्वस्थतेतून अभिव्यक्त झालेल्या आहेत.

जळल्यावर किंवा जाळल्यावर उरणारा ‘राखरंग’, आयुष्यांची ‘अनावृत्त कादंबरी’, खेळणं झालेली ‘मणिपुरी बाहुली’, ‘सोलमेट’, ‘सत्तांतर’ अशा कवितांमधून बाईचं दाहक वास्तव प्रखरतेनं व्यक्त झालंय. धीट अभिव्यक्ती असलेल्या अशा कविता हे या संग्रहाचं बलस्थान म्हणता येईल. ‘रांगोळी काल आणि आजही’, ‘तो कॉम्रेड’ अशा कवितांमधून नात्यांतलं, सामाजातलं वास्तव-चित्रं  दिसतं तसं सुंदर लय असलेल्या ‘सावली’ सरख्या कवितांमधून निसर्गाचे विभ्रमही अनुभवता येतात. या कविता मुक्तछंद, अभंग छंद, अष्टाक्षरी, दामयमक, गझलसदृश रचना अशा विविध आकृतीबंधात लिहिलेल्या आहेत. 

वातावरण निर्मिती करणार्‍या पूर्ण तपशीलाची मागणी करणार्‍या कथालेखनाचा पिंड असलेल्या वर्षाताईंनी सर्व तपशील मुरवण्याची गरज असलेले कवितालेखनही प्रभावीपणे केले आहे. ‘उसवलेलं शिवता येईल का?’ हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह. कथालेखनासाठी जोपासलेल्या त्यांच्यातील अलिप्त निरीक्षकाने त्यांच्या कवितेलाही सखोलता प्रदान केलेली आहे. कवितेतील या दमदार पदार्पणासाठी वर्षाताईना हार्दिक शुभेच्छा.

आसावरी काकडे

 जून २०२५

No comments:

Post a Comment