स्त्री-प्रश्नांची आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणार्या चळवळींची ओळख मला प्रथम ‘स्त्री’ मासिकातून झाली. साधना आणि स्त्री ही दोन नियतकालिके आमच्याकडे येत असत. स्त्री मासिकाच्या समविचारी वाचक-मैत्रिणींना एकत्र आणणार्या ‘स्त्री सखीमंडळा’च्या कार्यक्रमांविषयी वाचून मी त्या मंडळाची सभासद झाले. दर महिन्याला होणार्या मिटिंग्जना मी नियमित जायला लागले. घर आणि नोकरी याखेरीज बाहेर पडण्याचं ते आवडतं निमित्त झालं. तिथंच विद्याताईंची ओळख झाली. तेव्हा मी नुकतीच कविता लिहायला लागले होते. एका महिन्याच्या मिटिंगमधे मी एक कविता वाचली होती. त्यातल्या काही ओळी आठवतायत-
‘बरं होतं तेव्हा
कळत नव्हतं जेव्हा
लिहू वाचू लागलो
पडवीमध्ये आलो
आलं गेलं कळलं वाटलं
उगीच कळलं ....
ज्योतिबा आले कर्वे
आले बायांनो शिका म्हणाले
दोघी तिघी झाल्या तयार
बाकिच्यांचा त्यांना नकार
एक घराबाहेर पडली दुसरी दारामध्ये अडली... ’ ......
स्त्री शिक्षणाच्या प्रवासाचा धावता आढावा या कवितेत
होता असं आठवतंय... विद्याताईंना ती कविता आवडली. त्यांनी ती ‘स्त्री’ मासिकासाठी
मागून घेतली. यथावकाश ती प्रकाशित झाली... कवितेच्या माध्यमातून स्वतःतून बाहेर
पडण्याची, शाळा.. कॉलेज.. अभ्यास.. नोकरी.. घर या परिघापलिकडल्या समाज या घटकाचं
भान येण्याची ती सुरुवात होती...
लहानपणी अभ्यासाच्या
पुस्तकांखेरीज वाचण्यासारखं आमच्या घरी काही नव्हतं. वडील सतत वाचत असायचे. पण ती
पुस्तकं तत्त्वज्ञानाची असायची. आकार आणि आशय दोन्ही स्तरांवर जड असलेली. काहीतरी
सांगा म्हणून मी वडलांजवळ गेले की ते मला त्यातलंच काही सांगायचे... नकळत त्या
विषयाची आवड आणि जिज्ञासा निर्माण झाली. प्रत्यक्ष जगण्याचा अनुभव येण्याआधीच ‘हे
सर्व विश्व आलं कुठून’, ‘त्यात आपलं स्थान काय?’, ‘आपल्या असण्याचा हेतू काय?’... अशा तत्त्वज्ञानातल्या मूलभूत प्रश्नांचे
आकर्षण वाटू लागले. त्यांचा पाठपुरावा करावा एवढी कुवत माझ्यात नव्हती. त्या
प्रश्नांनी माझ्यात अनाम अस्वस्थता पेरून ठेवली. ती अनावर झाली की मिळेल त्या
फटीतून बाहेर पडू लागली. शाळेच्या शेवटच्या परीक्षेत, एस एस सी ला चारी तुकड्यात पहिली येऊन नॅशनल स्कॉलरशिप मिळवलेली मी अभ्यासातला रस
गमावून बसले. कशीतरी बी कॉम झाले.
मग नोकरी.. लग्न..
जगण्याच्या अनुभवांना सामोरी जाऊ लागले. आता दुरून पाहताना लक्षात येतंय की खचून
जावं असे होते ते अनुभव. पण ‘त्या’ प्रश्नांनी पेरलेल्या अस्वस्थतेची रेघ इतकी
मोठी होती की जगण्यातल्या ज्वलंत प्रश्नांच्या रेघा त्याखाली झाकून जात होत्या.
त्या प्रश्नांना मिळतील ती उत्तरं मी निमूट स्वीकारत राहिले. एक प्रकारची बधीरताच
होती ती. जगण्याच्या तळाशी ‘त्या’ प्रश्नांनी पेरलेली अस्वस्थता आणि वर ही बधीरता
अशा विचित्र कोंडीत असताना कवितेनं आयुष्यात प्रवेश केला. आणि डायरीतल्या कवितांना
बाहेर पडण्यासाठी सखी मंडळाचा मंच मिळाला...
फक्त मंच मिळाला असं नाही. सखी मंडळाच्या मासिक कार्यक्रमांतील चर्चा, बंगलोर, हैदराबाद, भोपाळ, सोलापूर... अशा वेगवेगळ्या शहरांत झालेल्या सखी मंडळाच्या मेळाव्यांमधले विविध कार्यक्रम, विद्याताईंशी होत राहिलेला संवाद या सगळ्यामधून कवितांना वर्तमानातला आज-इथेचा जिवंत आशयही मिळाला. या नव्या परीघातील विचारांनी ‘त्या’ प्रश्नांची अस्वस्थता धूसर केली. त्यांना उत्तरं देऊन नाही तर त्यांचं स्थान दाखवून. ते प्रश्न मूलभूत महत्त्वाचे असले तरी वास्तवातले आताचे प्रश्न प्राधान्याचे आहेत हे लक्षात आणून देऊन..!
विश्वातील आपल्या स्थानाचा, हेतूचा विचार करणारी मी वर्तमानातल्या ‘मी’चा विचार करू लागले. भोवतीचं प्रखर वास्तव, त्या संदर्भातलं आपलं कर्तव्य या विचारांनी अस्वस्थ होऊ लागले. या अस्वस्थतेविषयी स्त्री मासिकाच्या तेव्हाच्या संपादक शांता किर्लोस्कर यांना एकदा पत्र लिहिल्याचं आठवतंय. त्यांचं छान उत्तरही आलं होतं. आता शब्द आठवत नाहीत पण त्यांनी या अस्वस्थतेचं स्वागत केलं होतं. ती कृतीशील व्हायला हवी हे त्या पत्रातून लक्षात आलं होतं.
त्या काळातला एक छोटासा प्रसंग आठवतो. कवितांमधे न मावणारं बरंच काही मी डायरीत नोंदवत असे. माझं डायरीलेखन म्हणजे ‘स्वतःशी संवाद साधणारं’ मी चालवलेलं दैनिक होतं. या ‘दैनिका’तल्या निवडक नोंदींचे संकलन ‘मी, माझ्या डायरीतून’ या नावानं अलिकडेच प्रकाशित झालं आहे. त्यातली एक नोंद अशी- ‘संध्याकाळी महर्षी कर्वे संस्थेतल्या कार्यक्रमाला गेले. तिथे नारी समता मंचात काम करणार्या पुष्पा रोडे भेटल्या. त्यांच्याबरोबर तिथल्या हॉस्टेलवर गेले. त्यांनी नोकरीला लावलेल्या एका बाईंना भेटायला. तिची अवस्था पाहून, तिची हकिगत ऐकून अस्वस्थ व्हायला झालं. अशा आणखी किती असतील. अन्याय अत्याचाराची किती भेसूर रूपं असतील. अशा विचारांनी थकायला झालं. मी माझ्या जागी अगदी सुखात असताना, भोवतीच्या अनंत प्रश्नांनी आतल्या आत माझं खचून जाणं ही कदाचित माझ्या सुखाची किंमत असेल. पण त्यांच्यापर्यंत ती पोचती होत नाहीए. या फ्रॉडला काय म्हणावं?’
अशा प्रत्येक अस्वस्थतेत विद्याताईंशी पत्रसंवाद हा मला सापडलेला मार्ग होता. विद्याताई तत्परतेनं आणि छान समजावणारं उत्तर द्यायच्या. त्यामुळे त्यांना पत्र लिहिताना अवघडलेपण यायचं नाही. ‘मी नुसता विचार करते. प्रत्यक्ष काही काम करत नाही. विचार करून नुसतं अस्वस्थ होण्याला काय अर्थ?’ ही रुखरुख मी बोलून दाखवायची तेव्हा त्या मला म्हणायच्या, विचार करणं ही पण एक कृतीच आहे. ती सगळ्यांना नाही जमत. विचार आणि लेखन बिनकामाचं नाही. त्यातून प्रत्यक्ष काम करणार्यांना बळ आणि दिशा मिळते. अस्वस्थ विचारांनी निष्क्रीय होण्यापेक्षा जमतं ते प्रामाणिकपणे करत राहाणं केव्हाही चांगलं... मग मी निरंकुश उमेदीने लेखनाकडे वळले. वेळोवेळी विषय देऊन विद्याताईंनी मला लिहितं ठेवलं. आता गीतालीताई पण हे काम करत आहेत.
हळूहळू लेखन हा माझा परीघ विस्तारणारा मार्ग झाला. लेखन म्हणजे कविताच. क्वचित लेख. वेगवेगळ्या संदर्भात कुणाकुणाला पत्र लिहिणं आणि डायरीलेखन... एवढंच. पण कुठल्या ना कुठल्या प्रकारे लिहित राहाणं ही माझी गरज होती. आजही आहे. मी नुसतं कधी वाचू शकत नाही. वाचताना समांतर विचार येत राहातात. काही पाहिलं, ऐकलं, अनुभवलं की त्या संदर्भात प्रश्न पडणं, त्यावर विचार होणं हा माझा स्वभाव आहे. विचारांचं ओझं पेलवेनासं झालं की ते मी शब्दांवर सोपवते. निराकार विचार शब्दांत उतरताना स्पष्ट होतात. विचारात न आलेलं, अव्यक्त राहिलेलं लिहितालिहिता शब्दात उतरतं. बरेचदा प्रश्न स्पष्ट होण्यातूनच आपले आपल्याला खुलासे मिळतात. ही लेखन-प्रक्रिया अनुभवण्यासारखी आहे.. समज आल्यापासून मी हे करतच होते. पण घर आणि नोकरी या परिघातून बाहेर पडून सखी मंडळात आल्यावर माझं विचारविश्व विस्तारत गेलं. कविता लिहिण्यापूर्वीचं मौन प्रवाही झालं.
मनात अनाम अस्वस्थता पेरणार्या ‘त्या’ तात्त्विक प्रश्नांचं बोट सोडून मी वर्तमान वास्तवात रमू लागले... तेव्हा मी स्टेटबँकेत नोकरी करत होते. बँकेत जाण्यासाठी लूना घेतली होती. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी लूना चालवायला शिकले. पर्वतीजवळ घर आणि ऑफिस ससून हॉस्पिटल जवळ. एवढं अंतर लूनावर जा-ये करणं हा मी माझ्या शारीरिक, मानसिक कमजोरीवर मिळवलेला विजय होता. सकाळी साडेनऊला बाहेर पडून संध्याकाळी साडेसहापर्यंत घरी हे रूटीन छान बसलं होतं. एके दिवशी बँकेतलं काम संपायला उशीर झाला. अंधार पडायला लागला. लूनावर जायची भीती वाटायला लागली. पण पर्याय नव्हता. बाहेर पडले. धीर गोळा करून लूना सुरू केली आणि निघाले. रोजची ठरलेली वाट सहज पार करता आली. घरी सुखरूप पोचले. आधी भीती वाटली होती. पण प्रत्यक्षात सहज जमलं. हे काही फार मोठं धाडस नव्हतं. पण वेगवेगळ्या कारणांनी आलेल्या माझ्या मर्यादांना मला ओलांडता आलं याचा आनंद झाला. स्वसामर्थ्याची ओळख करून देणारा तो उत्कट आनंद कविताबद्ध झाला-
‘तुझ्या दिव्याचा लख्ख उजेड
नसतानाही
वाट स्वच्छ दिसते आहे !
संधीप्रकाशासारखा
तुझाच उजेड
अजून रेंगाळतोय ?
की
मी स्वयंप्रकाशी आहे ?’
अनुभव छोटा असला तरी त्यातून मिळालेला ‘स्वयंप्रकाशी
असू शकण्याचा’ प्रत्यय महत्त्वाचा आहे... या कवितेत तो अधोरेखित झाला आहे.
मिळून सार्याजणी मासिक १९८९ साली सुरू झालं.
ऑगस्टच्या पहिल्याच अंकात माझ्या ‘प्रिय सखी’ या कवितेला स्थान मिळालं. छोट्या सुखवस्तू
परिघात रमलेल्या मनाला त्यातून बाहेर पडण्यासाठी साद घालणार्या सखीला उद्देशून
लिहिलेल्या या कवितेने माझ्यासह अनेकांना प्रेरणा दिली. आकाशवाणी दिल्ली तर्फे
आयोजित, जयपूर येथे झालेल्या सर्वभाषी कवीसंमेलनात या कवितेची निवड झाल्यामुळे या
कवितेचा सर्व भारतीय भाषांमधे अनुवाद झाला. ही कविता वाचकांच्या स्मरणात राहिलीय. अजून
कुणी कुणी या कवितेचा शोध घेत माझ्यापर्यंत पोचतं..! ही कविता फक्त स्त्रियांना
अंतर्मुख करते असं नाही. स्व-परिघात रमलेल्या कुणालाही त्यातून बाहेर पडण्यासाठी ती
साद घालते. ‘आरसा’ संग्रहातली ही कविता वाचून ‘रारंगढांग’ या कादंबरीचे लेखक
प्रभाकर पेंढारकर यांचे अशा आशयाचे पत्र आले होते. ते लक्षात राहिले आहे. ती
कविता-
प्रिय सखी,
प्रिय सखी,
सध्या मी आटपाट नगरातील
एका भव्य पिंजर्यात राहाते
आहे.
याच्या भिंतींना पाचूचा रंग
आहे
आणि याला चांदीचे छत आहे !
याची दारं पारदर्शी आहेत.
आणि गंमत म्हणजे
ती बाहेरून नाही,
आतून बंद आहेत !
उडी मारून कडी काढता येईल
एवढीच ती उंच आहे..
पण इथल्या संगमरवरी फरशीला
गुरुत्वाकर्षण फार आहे !
उंच उडीचा सराव असूनही
उडी जमेनाशी झालीय.
नि आतल्या भव्यपणातच
मला वाटतं, मी आता रमू
लागलीय !
‘चिऊताई, चिऊताई दार उघड’
असं म्हणत तू आलीस तर
‘अंघोळ घालते थांब माझ्या
बाळाला’
असंच काहीसं माझ्या तोंडून
येईल.
पण सखी,
रागावून तू लगेच निघून जाऊ
नकोस.
मला साद घालीत रहा.
मी केलेला उंच उडीचा सराव
बहुधा मला इथे रमू देणार
नाही !
***
सुखवस्तू मन आटपाट नगरातल्या भव्य पिंजर्यात रमलेलं असणं, दरवाजा बाहेरून नाही आतून बंद असणं, उडी मारून कडी काढता येईल इतकीच ती उंच असणं, संगमरवरी फरशीला गुरुत्वाकर्षण फार असल्यामुळे उडी जमेनाशी होणं... या सर्व प्रतिमा पटकन रीलेट होणार्या आहेत. स्वतःतून बाहेर पडण्याची प्रेरणा देणार्या सखीमंडळातील वेगवेगळ्या उपक्रमांच्या प्रभावातून ‘साद घालत राहा’ असं म्हणणारी ही कविता जन्माला आली..
विद्याताईंच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या पाच संस्थांपैकी सखी मंडळ आणि मिळून सार्याजणी या दोन संस्थांमधे मी थोडी सक्रीय होते. एकदा अक्षरस्पर्श या नाविन्यपूर्ण ग्रंथालयाच्या कार्यकारिणीत काम करण्याविषयी मला विचारलं गेलं. तेव्हा मी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यामुळे लगेच हो म्हटलं. तिथे काम करण्यातून संपर्क-संवादाचे नवे मार्ग माझ्यासमोर खुले झाले. अक्षरस्पर्श मधल्या अक्षरगप्पांमधून, नवी पुस्तकं वाचण्यातून वेगवेगळ्या अनुभव-विश्वांचा परिचय झाला. त्या त्या लेखकांशी पत्र-संवाद होत राहिला. विचारांना नव्या दिशा दिसू लागल्या. अंतर्मुखता समृद्ध होत गेली. नव्या ऊर्जेसह माझ्या कवितेचा प्रवास चालू राहिला...
आसावरी काकडे
१३.३.२०२५
(‘मिळून सार्याजणी’ जून २०२५ अंकात पृष्ठ (१८,१९,३५) प्रकाशित)
No comments:
Post a Comment