Wednesday, 4 June 2025

उसवलेलं शिवता येईल का?

 वर्षा चोबे यांचा ‘उसवलेलं शिवता येईल का?’ हा कवितासंग्रह वाचताना संग्रहाच्या शीर्षकानंच प्रथम लक्ष वेधून घेतलं. या शीर्षकात संग्रहातल्या कवितांच्या समग्र स्वरूपाचे सूचन आहे हे कविता वाचल्यावर जाणवलं. व्यक्ती म्हणून जगताना जाणवत राहातं की स्व पासून समाजापर्यंत सर्व स्तरांवर वास्तव जागोजाग उसवत चाललं आहे. संवेदनशील मनाला ते शिवायला हवं हेही उत्कटतेनं वाटत असतं आणि ते शक्य होईल का? अशी साशंकताही सलत असते. उसवलेलं शिवणं ही प्रतिमा परंपरेनं स्त्री असण्याशी निगडित करून ठेवली आहे. वर्षा चोबे यांच्यातील बाईमाणूस या सर्व जाणिवा तळहातावर घेते, निरखत राहाते आणि अस्वस्थ होते.. या संग्रहातील कविता त्या पक्व अस्वस्थतेतून अभिव्यक्त झालेल्या आहेत.

जळल्यावर किंवा जाळल्यावर उरणारा ‘राखरंग’, आयुष्यांची ‘अनावृत्त कादंबरी’, खेळणं झालेली ‘मणिपुरी बाहुली’, ‘सोलमेट’, ‘सत्तांतर’ अशा कवितांमधून बाईचं दाहक वास्तव प्रखरतेनं व्यक्त झालंय. धीट अभिव्यक्ती असलेल्या अशा कविता हे या संग्रहाचं बलस्थान म्हणता येईल. ‘रांगोळी काल आणि आजही’, ‘तो कॉम्रेड’ अशा कवितांमधून नात्यांतलं, सामाजातलं वास्तव-चित्रं  दिसतं तसं सुंदर लय असलेल्या ‘सावली’ सरख्या कवितांमधून निसर्गाचे विभ्रमही अनुभवता येतात. या कविता मुक्तछंद, अभंग छंद, अष्टाक्षरी, दामयमक, गझलसदृश रचना अशा विविध आकृतीबंधात लिहिलेल्या आहेत. 

वातावरण निर्मिती करणार्‍या पूर्ण तपशीलाची मागणी करणार्‍या कथालेखनाचा पिंड असलेल्या वर्षाताईंनी सर्व तपशील मुरवण्याची गरज असलेले कवितालेखनही प्रभावीपणे केले आहे. ‘उसवलेलं शिवता येईल का?’ हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह. कथालेखनासाठी जोपासलेल्या त्यांच्यातील अलिप्त निरीक्षकाने त्यांच्या कवितेलाही सखोलता प्रदान केलेली आहे. कवितेतील या दमदार पदार्पणासाठी वर्षाताईना हार्दिक शुभेच्छा.

आसावरी काकडे

 जून २०२५

स्त्री चळवळ आणि माझी कविता

स्त्री-प्रश्नांची आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या चळवळींची ओळख मला प्रथम ‘स्त्री’ मासिकातून झाली. साधना आणि स्त्री ही दोन नियतकालिके आमच्याकडे येत असत. स्त्री मासिकाच्या समविचारी वाचक-मैत्रिणींना एकत्र  आणणार्‍या ‘स्त्री सखीमंडळा’च्या कार्यक्रमांविषयी वाचून मी त्या मंडळाची सभासद झाले. दर महिन्याला होणार्‍या मिटिंग्जना मी नियमित जायला लागले. घर आणि नोकरी याखेरीज बाहेर पडण्याचं ते आवडतं निमित्त झालं. तिथंच विद्याताईंची ओळख झाली. तेव्हा मी नुकतीच कविता लिहायला लागले होते. एका महिन्याच्या मिटिंगमधे मी एक कविता वाचली होती. त्यातल्या काही ओळी आठवतायत-

‘बरं होतं तेव्हा कळत नव्हतं जेव्हा  

लिहू वाचू लागलो पडवीमध्ये आलो  

आलं गेलं कळलं वाटलं उगीच कळलं  ....

 

ज्योतिबा आले कर्वे आले बायांनो शिका म्हणाले  

दोघी तिघी झाल्या तयार बाकिच्यांचा त्यांना नकार  

एक घराबाहेर पडली दुसरी दारामध्ये अडली... ’ ......

स्त्री शिक्षणाच्या प्रवासाचा धावता आढावा या कवितेत होता असं आठवतंय... विद्याताईंना ती कविता आवडली. त्यांनी ती ‘स्त्री’ मासिकासाठी मागून घेतली. यथावकाश ती प्रकाशित झाली... कवितेच्या माध्यमातून स्वतःतून बाहेर पडण्याची, शाळा.. कॉलेज.. अभ्यास.. नोकरी.. घर या परिघापलिकडल्या समाज या घटकाचं भान येण्याची ती सुरुवात होती...

लहानपणी अभ्यासाच्या पुस्तकांखेरीज वाचण्यासारखं आमच्या घरी काही नव्हतं. वडील सतत वाचत असायचे. पण ती पुस्तकं तत्त्वज्ञानाची असायची. आकार आणि आशय दोन्ही स्तरांवर जड असलेली. काहीतरी सांगा म्हणून मी वडलांजवळ गेले की ते मला त्यातलंच काही सांगायचे... नकळत त्या विषयाची आवड आणि जिज्ञासा निर्माण झाली. प्रत्यक्ष जगण्याचा अनुभव येण्याआधीच ‘हे सर्व विश्व आलं कुठून’, ‘त्यात आपलं स्थान काय?’, ‘आपल्या असण्याचा हेतू काय?’... अशा तत्त्वज्ञानातल्या मूलभूत प्रश्नांचे आकर्षण वाटू लागले. त्यांचा पाठपुरावा करावा एवढी कुवत माझ्यात नव्हती. त्या प्रश्नांनी माझ्यात अनाम अस्वस्थता पेरून ठेवली. ती अनावर झाली की मिळेल त्या फटीतून बाहेर पडू लागली. शाळेच्या शेवटच्या परीक्षेत, एस एस सी ला चारी तुकड्यात पहिली येऊन नॅशनल स्कॉलरशिप मिळवलेली मी अभ्यासातला रस गमावून बसले. कशीतरी बी कॉम झाले.

मग नोकरी.. लग्न.. जगण्याच्या अनुभवांना सामोरी जाऊ लागले. आता दुरून पाहताना लक्षात येतंय की खचून जावं असे होते ते अनुभव. पण ‘त्या’ प्रश्नांनी पेरलेल्या अस्वस्थतेची रेघ इतकी मोठी होती की जगण्यातल्या ज्वलंत प्रश्नांच्या रेघा त्याखाली झाकून जात होत्या. त्या प्रश्नांना मिळतील ती उत्तरं मी निमूट स्वीकारत राहिले. एक प्रकारची बधीरताच होती ती. जगण्याच्या तळाशी ‘त्या’ प्रश्नांनी पेरलेली अस्वस्थता आणि वर ही बधीरता अशा विचित्र कोंडीत असताना कवितेनं आयुष्यात प्रवेश केला. आणि डायरीतल्या कवितांना बाहेर पडण्यासाठी सखी मंडळाचा मंच मिळाला...

फक्त मंच मिळाला असं नाही. सखी मंडळाच्या मासिक कार्यक्रमांतील चर्चा, बंगलोर, हैदराबाद, भोपाळ, सोलापूर... अशा वेगवेगळ्या शहरांत झालेल्या सखी मंडळाच्या मेळाव्यांमधले विविध कार्यक्रम, विद्याताईंशी होत राहिलेला संवाद या सगळ्यामधून कवितांना वर्तमानातला आज-इथेचा जिवंत आशयही मिळाला. या नव्या परीघातील विचारांनी ‘त्या’ प्रश्नांची अस्वस्थता धूसर केली. त्यांना उत्तरं देऊन नाही तर त्यांचं स्थान दाखवून. ते प्रश्न मूलभूत महत्त्वाचे असले तरी वास्तवातले आताचे प्रश्न प्राधान्याचे आहेत हे लक्षात आणून देऊन..!

विश्वातील आपल्या स्थानाचा, हेतूचा विचार करणारी मी वर्तमानातल्या ‘मी’चा विचार करू लागले. भोवतीचं प्रखर वास्तव, त्या संदर्भातलं आपलं कर्तव्य या विचारांनी अस्वस्थ होऊ लागले. या अस्वस्थतेविषयी स्त्री मासिकाच्या तेव्हाच्या संपादक शांता किर्लोस्कर यांना एकदा पत्र लिहिल्याचं आठवतंय. त्यांचं छान उत्तरही आलं होतं. आता शब्द आठवत नाहीत पण त्यांनी या अस्वस्थतेचं स्वागत केलं होतं. ती कृतीशील व्हायला हवी हे त्या पत्रातून लक्षात आलं होतं.

त्या काळातला एक छोटासा प्रसंग आठवतो. कवितांमधे न मावणारं बरंच काही मी डायरीत नोंदवत असे. माझं डायरीलेखन म्हणजे ‘स्वतःशी संवाद साधणारं’ मी चालवलेलं दैनिक होतं. या ‘दैनिका’तल्या निवडक नोंदींचे संकलन ‘मी, माझ्या डायरीतून’ या नावानं अलिकडेच प्रकाशित झालं आहे. त्यातली एक नोंद अशी- ‘संध्याकाळी महर्षी कर्वे संस्थेतल्या कार्यक्रमाला गेले. तिथे नारी समता मंचात काम करणार्‍या पुष्पा रोडे भेटल्या. त्यांच्याबरोबर तिथल्या हॉस्टेलवर गेले. त्यांनी नोकरीला लावलेल्या एका बाईंना भेटायला. तिची अवस्था पाहून, तिची हकिगत ऐकून अस्वस्थ व्हायला झालं. अशा आणखी किती असतील. अन्याय अत्याचाराची किती भेसूर रूपं असतील. अशा विचारांनी थकायला झालं. मी माझ्या जागी अगदी सुखात असताना, भोवतीच्या अनंत प्रश्नांनी आतल्या आत माझं खचून जाणं ही कदाचित माझ्या सुखाची किंमत असेल. पण त्यांच्यापर्यंत ती पोचती होत नाहीए. या फ्रॉडला काय म्हणावं?’

अशा प्रत्येक अस्वस्थतेत विद्याताईंशी पत्रसंवाद हा मला सापडलेला मार्ग होता. विद्याताई तत्परतेनं आणि छान समजावणारं उत्तर द्यायच्या. त्यामुळे त्यांना पत्र लिहिताना अवघडलेपण यायचं नाही. ‘मी नुसता विचार करते. प्रत्यक्ष काही काम करत नाही. विचार करून नुसतं अस्वस्थ होण्याला काय अर्थ?’ ही रुखरुख मी बोलून दाखवायची तेव्हा त्या मला म्हणायच्या, विचार करणं ही पण एक कृतीच आहे. ती सगळ्यांना नाही जमत. विचार आणि लेखन बिनकामाचं नाही. त्यातून प्रत्यक्ष काम करणार्‍यांना बळ आणि दिशा मिळते. अस्वस्थ विचारांनी निष्क्रीय होण्यापेक्षा जमतं ते प्रामाणिकपणे करत राहाणं केव्हाही चांगलं... मग मी निरंकुश उमेदीने लेखनाकडे वळले. वेळोवेळी विषय देऊन विद्याताईंनी मला लिहितं ठेवलं. आता गीतालीताई पण हे काम करत आहेत.

हळूहळू लेखन हा माझा परीघ विस्तारणारा मार्ग झाला. लेखन म्हणजे कविताच. क्वचित लेख. वेगवेगळ्या संदर्भात कुणाकुणाला पत्र लिहिणं आणि डायरीलेखन... एवढंच. पण कुठल्या ना कुठल्या प्रकारे लिहित राहाणं ही माझी गरज होती. आजही आहे. मी नुसतं कधी वाचू शकत नाही. वाचताना समांतर विचार येत राहातात. काही पाहिलं, ऐकलं, अनुभवलं की त्या संदर्भात प्रश्न पडणं, त्यावर विचार होणं हा माझा स्वभाव आहे. विचारांचं ओझं पेलवेनासं झालं की ते मी शब्दांवर सोपवते. निराकार विचार शब्दांत उतरताना स्पष्ट होतात. विचारात न आलेलं, अव्यक्त राहिलेलं लिहितालिहिता शब्दात उतरतं. बरेचदा प्रश्न स्पष्ट होण्यातूनच आपले आपल्याला खुलासे मिळतात. ही लेखन-प्रक्रिया अनुभवण्यासारखी आहे.. समज आल्यापासून मी हे करतच होते. पण घर आणि नोकरी या परिघातून बाहेर पडून सखी मंडळात आल्यावर माझं विचारविश्व विस्तारत गेलं. कविता लिहिण्यापूर्वीचं मौन प्रवाही झालं.  

मनात अनाम अस्वस्थता पेरणार्‍या ‘त्या’ तात्त्विक प्रश्नांचं बोट सोडून मी वर्तमान वास्तवात रमू लागले... तेव्हा मी स्टेटबँकेत नोकरी करत होते. बँकेत जाण्यासाठी लूना घेतली होती. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी लूना चालवायला शिकले. पर्वतीजवळ घर आणि ऑफिस ससून हॉस्पिटल जवळ. एवढं अंतर लूनावर जा-ये करणं हा मी माझ्या शारीरिक, मानसिक कमजोरीवर मिळवलेला विजय होता. सकाळी साडेनऊला बाहेर पडून संध्याकाळी साडेसहापर्यंत घरी हे रूटीन छान बसलं होतं. एके दिवशी बँकेतलं काम संपायला उशीर झाला. अंधार पडायला लागला. लूनावर जायची भीती वाटायला लागली. पण पर्याय नव्हता. बाहेर पडले. धीर गोळा करून लूना सुरू केली आणि निघाले. रोजची ठरलेली वाट सहज पार करता आली. घरी सुखरूप पोचले. आधी भीती वाटली होती. पण प्रत्यक्षात सहज जमलं. हे काही फार मोठं धाडस नव्हतं. पण वेगवेगळ्या कारणांनी आलेल्या माझ्या मर्यादांना मला ओलांडता आलं याचा आनंद झाला. स्वसामर्थ्याची ओळख करून देणारा तो उत्कट आनंद कविताबद्ध झाला-

‘तुझ्या दिव्याचा लख्ख उजेड

नसतानाही

वाट स्वच्छ दिसते आहे !

संधीप्रकाशासारखा

तुझाच उजेड

अजून रेंगाळतोय ?

की

मी स्वयंप्रकाशी आहे ?

अनुभव छोटा असला तरी त्यातून मिळालेला ‘स्वयंप्रकाशी असू शकण्याचा’ प्रत्यय महत्त्वाचा आहे... या कवितेत तो अधोरेखित झाला आहे.

मिळून सार्‍याजणी मासिक १९८९ साली सुरू झालं. ऑगस्टच्या पहिल्याच अंकात माझ्या ‘प्रिय सखी’ या कवितेला स्थान मिळालं. छोट्या सुखवस्तू परिघात रमलेल्या मनाला त्यातून बाहेर पडण्यासाठी साद घालणार्‍या सखीला उद्देशून लिहिलेल्या या कवितेने माझ्यासह अनेकांना प्रेरणा दिली. आकाशवाणी दिल्ली तर्फे आयोजित, जयपूर येथे झालेल्या सर्वभाषी कवीसंमेलनात या कवितेची निवड झाल्यामुळे या कवितेचा सर्व भारतीय भाषांमधे अनुवाद झाला. ही कविता वाचकांच्या स्मरणात राहिलीय. अजून कुणी कुणी या कवितेचा शोध घेत माझ्यापर्यंत पोचतं..! ही कविता फक्त स्त्रियांना अंतर्मुख करते असं नाही. स्व-परिघात रमलेल्या कुणालाही त्यातून बाहेर पडण्यासाठी ती साद घालते. ‘आरसा’ संग्रहातली ही कविता वाचून ‘रारंगढांग’ या कादंबरीचे लेखक प्रभाकर पेंढारकर यांचे अशा आशयाचे पत्र आले होते. ते लक्षात राहिले आहे. ती कविता-

प्रिय सखी,

प्रिय सखी,

सध्या मी आटपाट नगरातील

एका भव्य पिंजर्‍यात राहाते आहे.

याच्या भिंतींना पाचूचा रंग आहे

आणि याला चांदीचे छत आहे !

याची दारं पारदर्शी आहेत.

आणि गंमत म्हणजे

ती बाहेरून नाही,

आतून बंद आहेत !

उडी मारून कडी काढता येईल

एवढीच ती उंच आहे..

पण इथल्या संगमरवरी फरशीला

गुरुत्वाकर्षण फार आहे !

उंच उडीचा सराव असूनही

उडी जमेनाशी झालीय.

नि आतल्या भव्यपणातच

मला वाटतं, मी आता रमू लागलीय !

 

‘चिऊताई, चिऊताई दार उघड’

असं म्हणत तू आलीस तर

अंघोळ घालते थांब माझ्या बाळाला

असंच काहीसं माझ्या तोंडून येईल.

पण सखी,

रागावून तू लगेच निघून जाऊ नकोस.

मला साद घालीत रहा.

मी केलेला उंच उडीचा सराव

बहुधा मला इथे रमू देणार नाही !

***

सुखवस्तू मन आटपाट नगरातल्या भव्य पिंजर्‍यात रमलेलं असणं, दरवाजा बाहेरून नाही आतून बंद असणं, उडी मारून कडी काढता येईल इतकीच ती उंच असणं, संगमरवरी फरशीला गुरुत्वाकर्षण फार असल्यामुळे उडी जमेनाशी होणं... या सर्व प्रतिमा पटकन रीलेट होणार्‍या आहेत. स्वतःतून बाहेर पडण्याची प्रेरणा देणार्‍या सखीमंडळातील वेगवेगळ्या उपक्रमांच्या प्रभावातून ‘साद घालत राहा’ असं म्हणणारी ही कविता जन्माला आली..

विद्याताईंच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या पाच संस्थांपैकी सखी मंडळ आणि मिळून सार्‍याजणी या दोन संस्थांमधे मी थोडी सक्रीय होते. एकदा अक्षरस्पर्श या नाविन्यपूर्ण ग्रंथालयाच्या कार्यकारिणीत काम करण्याविषयी मला विचारलं गेलं. तेव्हा मी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यामुळे लगेच हो म्हटलं. तिथे काम करण्यातून संपर्क-संवादाचे नवे मार्ग माझ्यासमोर खुले झाले. अक्षरस्पर्श मधल्या अक्षरगप्पांमधून, नवी पुस्तकं वाचण्यातून वेगवेगळ्या अनुभव-विश्वांचा परिचय झाला. त्या त्या लेखकांशी पत्र-संवाद होत राहिला. विचारांना नव्या दिशा दिसू लागल्या. अंतर्मुखता समृद्ध होत गेली. नव्या ऊर्जेसह माझ्या कवितेचा प्रवास चालू राहिला...

आसावरी काकडे

१३.३.२०२५

(‘मिळून सार्‍याजणी’ जून २०२५ अंकात पृष्ठ (१८,१९,३५) प्रकाशित)

Tuesday, 17 September 2024

‘क्षितिजापार’ : जगण्याशी एकरूप झालेल्या कविता

क्षितिज ही संकल्पना जितकी मोहक तितकीच प्रेरक. पुढे चालत राहायचे निमंत्रण त्यात आहे. क्षितिज गाठणे ही अनेकांची मनीषा असते. हातून मोठे काही घडले की क्षितिज गाठल्याचा आनंद होतो. पण संवेदनशील कवीमनाला त्या पल्याड काय असेल याची जिज्ञासा असते. त्याला क्षितिज गाठणे पुरेसे नसते. क्षितिजापार जायचे असते..!

विजया गुळवणी यांच्या पहिल्याच कवितासंग्रहाचे शीर्षक ‘क्षितिजापार’ असे आहे. या कवयित्रीला क्षितिज गाठण्याची अभिलाषा नाही. क्षितिजापार काय असेल ही जिज्ञासाही उरलेली नाही. आयुष्याच्या परिपक्व टप्प्यावर प्रकाशित होत असलेल्या या संग्रहाच्या ‘क्षितिजापार’ या शीर्षक-कवितेत त्यांनी म्हटलंय,

‘दूरवर अनंताचा रस्ता स्पष्ट दिसतोय

घट्ट रोवलेला पाय हलकेच सुटतोय

चल माझ्या सोबतीनं खुणावतोय ना तोही

चल क्षितिजापार तयारच आहे मीही..!’

कवयित्रीने मनोगतात आपल्या कवितेच्या प्रवासाविषयी सहज साधेपणानं लिहिलेलं आहे. हे मनोगत आणि या संग्रहातल्या कविता वाचताना जाणवतं की या कविता जगण्याशी एकरूप झालेल्या आहेत. घर, संसार, त्यातल्या आपत्ती, जबाबदार्‍या.. हे सर्व निभावत असताना विजयाताईंना कवितेचा आधार मिळाला. त्यांच्यासाठी कविता म्हणजे मनातलं गूज सांगण्यासाठीचं विश्वासाचं ठिकाण. बहिणाबाईंची कविता त्यांचा आदर्श आहे. त्यांनी कविता लिहायला उशीरा सुरुवात केली असली तरी कवितांची आवड असल्यामुळे त्या सतत कवितेच्या सान्निध्यात राहिल्या. वेगवेगळ्या कवींच्या कविता वाचनातून त्यांच्यावर नकळत कवितेचे संस्कार झाले आणि स्वमग्न उत्कट मनःस्थितीत त्यांच्या कवितालेखनाला सुरुवात झाली.

उत्कट भावना हा कवितेचा प्राण असतो. कवितांचे विषय ठरवणार्‍या घटना, प्रसंग, नानाविध अनुभव हे तर केवळ त्या त्या संदर्भातल्या भावनांच्या अभिव्यक्तीचे नेपथ्य करत असतात. आयुष्य जितकं अवघड, जितकं दुखावलेलं तितकं मन प्रगल्भ, गहिरं बनत जातं. दुःखांना समजावता समजावता शहाणं होत जातं. स्वतःच्याच दुःखात न बुडता काठावर येऊन इतरांची दुःखं समजून घेऊ लागतं. आयुष्य जगत असताना वाट्याला आलेल्या अनेकविध भल्याबुर्‍या अनुभवांनी विजयाताईंना लिहीतं केलं. काही उत्कट क्षणांच्या कविता झाल्या. वानप्रस्थाश्रमाच्या टप्प्यावर विजयाताईंचा पहिला संग्रह येतो आहे. यातील कवितांतून डोकावणारं त्यांचं भावसमृद्ध मन स्वतःच्या कोषातून बाहेर पडलं आहे. जीवनाचे सर्व रंग लेऊन इंद्रधनू झालंय... या विविधरंगी कवितांची ओळख होईल अशी काही उदाहरणं-

आईला दिसलेलं बाळाचं रूप वर्णन करणारी एक बालकविता आहे. हे वर्णन वाचताना ते बाळरूप डोळ्यासमोर साकारतं. त्यातल्या दोन ओळी-

‘टकमक टकमक बघतंय कोण?

बाळाचे सुंदर डोळे दोन’  (‘बाळ’)

बालविश्वातून बाहेर डोकावणार्‍या सजग मनाला दिसणारा भोवताल खिन्न करणारा आहे. अस्वस्थ मनाने आजच्या समाजाचे चित्र रंगवणार्‍या एका कवितेत त्यांनी म्हटले आहे-

चोरी करू की देश विकू

त्याशिवाय मी कसा टिकू?

....

गाढ झोप ही कुणाची?

कृष्णाची की जनतेची? (‘सैरभैर’)

अश्वत्थामा ही चिरंजीव वेदनेची सर्वपरिचित प्रतिमा. ब्रह्मास्त्र सोडलं म्हणून त्याला सतत भळभळत्या जखमेचा शाप मिळाला. पण काही न करता सतत दुःख वाट्याला आलेल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या संदर्भात ही प्रतिमा जवळची वाटते. ‘अश्वत्थाम्या,’ या कवितेत कवयित्री म्हणते,

‘मी कुठे चुकले ? विचार करून थकले

भाळच काढून नेले रे..

अन दुर्भाग्य माझे भळभळले’

दुःख माणसाला जीवनाचं सूक्ष्म आणि खोलवरचं दर्शन घडवतं.. एका कवितेत मानवी दुःखाला कवयित्रीनं तुकारामांच्या अभंगांची उपमा दिलेली आहे. ही उपमा खूप वेगळी आहे. वाचताना वाटलं, कवीमन भाषेला स्वतःचा नवीन शब्द बहाल करतं. तशी एखादी नवी प्रतिमाही देऊ करतं... एका कवितेत कवयित्री म्हणते,

‘हे दुःख आहे ना

ते तुकारामांच्या अभंगांसारखं आहे

कितीही इंद्रायणीत नेऊन बुडवलं

तरी वर येतेच आहे.. तरंगतेच आहे

कारण शेवटी ते अभंग आहे..!’

‘दर्शनवारी’, ‘भावतरंग’, ‘मन्वंतर’, ‘शांत निळाई’, ‘परिणिता’ अशा आणखीही बर्‍याच कविता लक्ष वेधून घेणार्‍या आहेत. प्रस्तावनेसाठी कविता वाचायला मी विजयाताईंच्या कवितांची डायरी उघडली आणि समोर आलेल्या ‘परिणिता’ कवितेतील ‘सय तुझी सोनचाफा’ या पहिल्याच ओळीने माझे लक्ष वेधले. मग सगळ्या कविता परत परत वाचत गेले.

संग्रह रूपात या कविता वाचकांच्या हाती येतील तेव्हा वाचकांनाही हा संग्रह परत परत वाचावा असंच वाटेल.. ‘क्षितिजापार’ या कवितासंग्रहाच्या निर्मितीमधून विजयाताईंचे कवितेशी असलेले नाते दृढ व्हावे, त्यांना तिची सोबत अखंड लाभावी ही हार्दिक शुभेच्छा..!

आसावरी काकडे

१६.९.२०२४

 

 

Saturday, 17 August 2024

कोरड्या घशाचा ताळेबंद..

धरण हा विकासाचा असा मार्ग आहे की त्यामुळे सुबत्तेचा मार्ग खुला होतो. पण त्यासाठी काही लोकांना प्रचंड त्याग करावा लागतो. कोणताही वृक्ष बहरलेला दिसतो तेव्हा मन प्रसन्न होतं. अनेकांना त्याची फळं मिळतात. सावली मिळते. पण त्यासाठी बर्‍याच गोष्टी खत होऊन जमिनीत गाडल्या गेलेल्या असतात. हे निसर्गचक्र आहे. त्यामुळे पर्यावरण अबाधीत राहते. धरण हा मानवनिर्मित विकास-मार्ग आहे. त्यातून भविष्यात अनेकांना मिळणार्‍या फायद्याची किंमत मात्र काहींना लगेच मोजावी लागते. आर्थिक, मानसिक, शारिरीक सर्व स्तरांवर त्यांना त्रास सहन करावा लागतो. काही प्रमाणात पर्यावरणहानी पण होत असते.

कोणत्याही धरण प्रकल्पात तीन घटक सामिल असतात. धरणग्रस्त, लाभार्थी आणि प्रशासन. प्रत्येकजण आपापल्या अनुभवातून, आपापल्या भूमिकेतून यावर भाष्य करत असतो. ‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ हा कवितासंग्रह लिहिणारे कवी श्री शिवाजी चाळक यांनी धरण प्रकल्पातील हे तिन्ही घटक जवळून पाहिलेले आहेत. तिन्ही घटकांच्या भूमिकांमधले सुख-दुःख, ताण अनुभवलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कवितांमधे एकूण वास्तवाविषयीचा सम्यक दृष्टिकोन आला आहे. संग्रहात शेवटी तर धरणाचेही मनोगत सांगणारी सुरेख कविता आहे.

यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या या कवितासंग्रहाला जितेंद्र साळुंके यांनी अतिशय मार्मिक आणि लक्षवेधी मुखपृष्ठ तयार केले आहे. कवितासंग्रहाचे शीर्षक आणि आतील कवितांचा सम्यक आशय साकारलेले मुखपृष्ठ वाचकांना वेगळं काही वाचायला मिळणार याची हमी देणारे आहे.

श्री शिवाजी चाळक यांचं बालपण चाळकवाडी-पिंपळवंडी इथं गेलं. तेव्हा तिथून जवळच कुकडी प्रकल्पातील येडगाव या धरणाचे काम सुरू होते. शालेय सहलींमधून त्यांना हे काम पाहायला मिळाले. तेव्हापासून त्यांना अभियंता व्हावे असे वाटत होते. सामान्य आर्थिक परिस्थितीमुळे ते अवघड होते. पण घरच्या प्रोत्साहनामुळे आणि त्यांनी आत्मविश्वासाने केलेल्या दीर्घ प्रयत्नांमुळे ते आपलं स्वप्न पूर्ण करू शकले. गावाजवळून गेलेल्या ज्या कालव्याच्या रोजगार हमी कामावर त्यांची आई आणि चुलती जात असत त्याच धरण व कालव्यावर अभियंता होऊन उपविभागीय अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले. या दीर्घ, कष्टप्रद प्रवासाबद्दल आणि अभियंता म्हणून काम करताना आलेल्या विविध प्रकारच्या अनुभवांबद्दल त्यांनी आपल्या मनोगतात सविस्तर लिहिले आहे. ‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ या कवितासंग्रहातील कवितांना या प्रत्यक्ष अनुभवांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे त्यांच्या कवितांमधे धरणग्रस्तांच्या प्रश्नातील बारीकसारीक तपशील भावपूर्णतेने व्यक्त झाले आहेत तसे धरणामुळे झालेल्या विकासाचेही वर्णन आलेले आहे. त्याच बरोबर धरण-प्रक्रियेमधल्या प्रशासकीय कामातील स्वार्थ, दिरंगाई आणि प्रामाणिक काम करणार्‍यांच्या समस्यांनाही उद्‍गार मिळालेला आहे.

श्री शिवाजी चाळक यांनी लहानपणापासून हे सर्व अनुभवले असल्यामुळे या कवितांमधे त्या परिसरातील लोकांच्या बोलीभाषेतले शब्द आले आहेत. त्या शब्दांचे अर्थ त्यांच्याकडून समजून घेतले तेव्हा कवितांमधली वेदना तिच्या तीव्रतेसह जाणवली. उदा. पहिल्याच कवितेत झोपडीत एकटी असलेल्या मुलीचं भावविश्व चित्रित केलंय. मुलगी अकरा दिवसांची बाळंतीण आहे. जवळ तिची दोन चिलीपिली आणि तहानं बाळ आहे. आई-बाप कामाला बाहेर गेलेत. झोपडीचं मुल्यांकन करायला साहेब आलाय. त्याच्या हातात दुर्बिण, लाकूड कापायचं हत्यार (किकरी) अशी साधनं आहेत. किंमत ठरवण्यासाठी तो झोपडीच्या वाश्याचं लाकूड नमूना म्हणून कापून घ्यायला लागतो तेव्हा ती सायबाला विनवतेय, ‘या झोपडीच्या वाश्याला  

नको लावूस किकरी  

झोपडीचा वासा जसा  

माह्या लुगड्याची मिरी... 

याच कवितेत शेवटी म्हटलंय,

‘बांध तिरडी आमची  

आता बांधताना धरण  

घे सरकारी कमिशन  

आमचं रचताना सरण..!’

धरणासारखं मोठं, विकासाचं काम करताना अपरिहार्यपणे काहींना असा त्रास होतो. पण हा त्रास दिसतो त्या आकाराचा राहात नाही. फसवणूक, लाचखोरी, कामातली दिरंगाई, स्वार्थ अशा गोष्टींमुळे तो त्रास मरणप्राय होतो. त्या दुःखातून असे उद्‍गार येतात. ‘अंमलबजावणी’, ‘चाचणी खड्डा’, ‘बळी’, ‘हप्ता’, ‘घास’, ‘कोंडमारा’... अशा आणखी बर्‍याच कावितांमधे धरणग्रस्तांच्या दुःखाचे वेगवेगळे पैलू शब्दबद्ध झाले आहेत. ‘बळी’ या कवितेत शेवटी म्हटलं आहे,

‘हे खरे की  

कोणीही माणूस  

दिला जात नाही बळी

धरणाच्या भींतीच्या पायात...

पण माणसांनी गजबजलेल्या गावाचा मात्र  

बळी दिला जातो

धरणाच्या भिंतीच्या आत..’

या सर्व प्रक्रियेत कामाला गती येते, काम करणार्‍या इंजिनिअर्सना वेतनवाढ मिळते. पण हे सर्व प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या संवेदनशील मनाच्या इंजिनिअरला अपराधी वाटतं.... ‘शाबासकी’ या कवितेत म्हटलं आहे,

‘थरथरे माझे हात

दर पगाराच्या वेळी  

त्यागी जमीनमालक  

आठवतो अशा वेळी..!’

‘अभिषेक’ सारख्या कवितेत गाई-गुरांना कसा त्रास झाला त्याचं क्लेशकारक चित्र साकारलंय तर ‘धरणात बुडालेली हिवर्‍याची बाग’ या कवितेत दीडशे एकरातल्या दीडशे वर्षांच्या हिवर्‍याची बाग नावानं ओळखल्या जाणार्‍या ‘डॉ. अलेक्झांडर गिब्सन गार्डन’चं मनोगत व्यक्त झालं आहे. सुरुवातीला तिच्या वैभवाचं वर्णन आहे. आणि नंतर ते आता धरणात बुडणार याचं दुःख व्यक्त झालं आहे. या कवितेत शेवटी म्हटलं आहे,

‘मीही होईल कोणाच्या तरी

घराचा उंबरा, खिडकी, दरवाजा  

आणि छताला तोलणारं आडं  

नाहीतर कोणाच्या तरी  

सरणावरची लाकडं...’

‘शाळेची जलसमाधी’ या कवितेतही असेच एका शाळेचे हृदयस्पर्शी मनोगत आहे. माणसं गाव सोडून निघालीयत... कुणाचे कुठे पुनर्वसन होणार कुणालाच माहीत नाही.. शाळेची इमारत आणि मैदान ओस पडेल.. कवितेत शेवटी म्हटलंय- ‘चिलीपिली ही पाखरं

उडून जाईल थवा  

नाही माहीत कोणास  

ते कोण कुठल्या गावा...  

जेव्हा जातील सोडून  

तेव्हा निखळेल चिरा  

पाण्यात जलसमाधी  

कोंडेल हा श्वास सारा..!’

धरण बांधण्याची प्रक्रिया चालू असतानाची त्या परिसरातल्या गावांची होत असलेली अशी भयंकर परवड, धरण पूर्ण झाल्यावर अनुभवाला येत असलेल्या सुविधा, विकास, भरभराट.. आणि त्यातून निर्माण झालेली छानछोकी, व्यसनाधीनता... एका धरणाच्या योजनेमुळे झालेल्या भल्याबुर्‍या परिवर्तनाचा हा सर्व पट या कवितांमधून उलगडलेला आहे. यातील बारकावे समजून घ्यायचे तर सर्वच कविता मुळातून पूर्ण वाचण्यासारख्या आहेत.

‘कायम तहानलेला

दाता इथं धरणांचा  

कोणा विचारावा जाब  

पाण्यासाठी मरणाचा..!’

असा आक्रोश ‘गाव सोडताना’, ‘दैना’, ‘आयुष्याचे पर्यटन’, ‘कोरड’, ‘भोगी आणि त्यागी’.... अशा बर्‍याच कवितांमधून मुखर झाला आहे. तर

‘एका धरणाचे पाणी  

अशी करतेय क्रांती  

पाण्यातून वाढी लागे  

तेथे साधनसंपत्ती..’

असे धरणाचे सकारात्मक परिणाम दाखवणारे चित्र ‘क्रांती’, ‘आधुनिक शेती’, ‘किमया’, ‘हिरवाई’, ‘सुगी’ ‘मजूर उद्योग’, ‘लग्न सोहळा’, ‘शिक्षणाच्या वाटा’.... अशा काही कवितांमधे साकारलेय. त्यानंतर

‘पाण्यासंगे आली

गावाला सुबत्ता  

सोबतीला सत्ता  

आणि मस्ती’

हे सुबत्तेचे परिणाम वर्णन करणार्‍या ‘बोंबाबोंब’, ‘भीती’, ‘नासाडी’... अशा काही कविता येतात. ‘अंधार उशाला’ या कवितेत धरणाचे तटस्थ मनोगत आले आहे. तर ‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ या शेवटच्या शीर्षक कवितेत श्री चाळक यांनी संपूर्ण प्रकल्प प्रक्रियेचा लेखाजोखा घेत प्रशासनाने काय करायला हवे ते सांगितले आहे. या दोन्ही कविता परत परत पूर्णच वाचायला हव्यात अशा आहेत.

‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ या संग्रहामधल्या या सर्व कवितांमधून धरणग्रस्त आणि लाभार्थी यांच्यातील संबंध समजून घेताना फार पूर्वी पाहिलेल्या एका शॉर्ट फिल्मची आठवण झाली. त्यात एक गरीब मुलगा स्लीपर घालून रेल्वे स्टेशनवरच्या गर्दीतून चालला आहे. चालता चालता अचानक त्याची चप्पल तुटते. तो बाजूला एका दगडावर बसून चप्पल दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. ते करत असताना त्याची नजर गर्दीतून छान पॉलीश केलेले बूट घालून चाललेल्या मुलाच्या पायांकडे जाते. त्या चालत्या पावलांकडे तो पाहात राहातो. तो मुलगा आपल्या बुटाचे पॉलीश खराब होऊ नये म्हणून मधून मधून वाकून पुसत असतो. रेल्वेची वाट बघत बाकावर बसतो. तिथेही तो आपले बूट जपत असतो. गाडी आल्यावर तो वडलांचा हात धरून गाडीकडे जातो. गर्दीतून गाडीत चढताना त्याचा एक बूट खाली पडतो. दगडावर बसलेल्या मुलाच्या ते लक्षात येते. तो धावत जाऊन बूट उचलतो. आणि गाडीबरोबर धावत जाऊन तो बूट रेल्वेत चढलेल्या मुलाला द्यायचा प्रयत्न करतो. गाडी वेग घेते तेव्हा धावत जाऊन बूट हातात देणे अशक्य होते. तेव्हा तो बूट गाडीतल्या मुलाच्या दिशेने फेकतो. गाडीतला मुलगाही अधीरतेनं झेलण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला झेलता येत नाही. बूट परत खाली पडतो. दोघांना वाईट वाटते. पण गाडी फार पुढे जाण्यापूर्वी गाडीतला मुलगा दुसर्‍या पायात राहिलेला बूट चटकन खाली फेकतो. आता दोन्ही बूट खाली असतात. आणि तुटकी चप्पल हातात घेतलेला मुलगा बुटांकडे आणि निघून चाललेल्या गाडीतील अनोळखी मुलाकडे पाहात असतो... काही मिनिटांची ही फिल्म पाहिल्यावर मनात आलं, ‘आहेरे’ आणि ‘नाहीरे’ यांच्यातले संबंध इतके सहृदय आणि समंजस होऊ शकतील का?

धरणग्रस्तांचा आक्रोश आणि लाभार्थ्यांचा जल्लोष या दोन्हीचा सम्यक लेखाजोखा घेणार्‍या ‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ या श्री शिवाजी चाळक यांच्या कवितासंग्रहातील कविता असा अंतर्मुख विचार करायला लावतात. धरणासारख्या विकास योजना राबवणार्‍या प्रशासनाची या संदर्भातली जबाबदारी महत्त्वाची आहे. प्रशासकीय सेवेत काम करणार्‍यांनी संवेदनशील असणं गरजेचं आहे. असे अधिकारी असतातही. पण त्यांना योजनेच्या सर्व बाजू सांभाळताना अविरत तारेवरची कसरत कशी करावी लागते ते श्री शिवाजी चाळक यांनी जवळून पाहिलेले आहे. संवेदनशील अभियंता असलेल्या श्री चाळक यांनी त्यांना भेटलेल्या अशा कार्यनिष्ठ सुहृदांनाच हा कवितासंग्रह अर्पण केलेला आहे.

आसावरी काकडे

asavarikakade@gmail.com

****

 

‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ – कवितासंग्रह

कवी- श्री शिवाजी चाळक

प्रकाशक- यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे

पृष्ठे- १४४, किंमत- २५० रुपये