Tuesday, 17 September 2024

‘क्षितिजापार’ : जगण्याशी एकरूप झालेल्या कविता

क्षितिज ही संकल्पना जितकी मोहक तितकीच प्रेरक. पुढे चालत राहायचे निमंत्रण त्यात आहे. क्षितिज गाठणे ही अनेकांची मनीषा असते. हातून मोठे काही घडले की क्षितिज गाठल्याचा आनंद होतो. पण संवेदनशील कवीमनाला त्या पल्याड काय असेल याची जिज्ञासा असते. त्याला क्षितिज गाठणे पुरेसे नसते. क्षितिजापार जायचे असते..!

विजया गुळवणी यांच्या पहिल्याच कवितासंग्रहाचे शीर्षक ‘क्षितिजापार’ असे आहे. या कवयित्रीला क्षितिज गाठण्याची अभिलाषा नाही. क्षितिजापार काय असेल ही जिज्ञासाही उरलेली नाही. आयुष्याच्या परिपक्व टप्प्यावर प्रकाशित होत असलेल्या या संग्रहाच्या ‘क्षितिजापार’ या शीर्षक-कवितेत त्यांनी म्हटलंय,

‘दूरवर अनंताचा रस्ता स्पष्ट दिसतोय

घट्ट रोवलेला पाय हलकेच सुटतोय

चल माझ्या सोबतीनं खुणावतोय ना तोही

चल क्षितिजापार तयारच आहे मीही..!’

कवयित्रीने मनोगतात आपल्या कवितेच्या प्रवासाविषयी सहज साधेपणानं लिहिलेलं आहे. हे मनोगत आणि या संग्रहातल्या कविता वाचताना जाणवतं की या कविता जगण्याशी एकरूप झालेल्या आहेत. घर, संसार, त्यातल्या आपत्ती, जबाबदार्‍या.. हे सर्व निभावत असताना विजयाताईंना कवितेचा आधार मिळाला. त्यांच्यासाठी कविता म्हणजे मनातलं गूज सांगण्यासाठीचं विश्वासाचं ठिकाण. बहिणाबाईंची कविता त्यांचा आदर्श आहे. त्यांनी कविता लिहायला उशीरा सुरुवात केली असली तरी कवितांची आवड असल्यामुळे त्या सतत कवितेच्या सान्निध्यात राहिल्या. वेगवेगळ्या कवींच्या कविता वाचनातून त्यांच्यावर नकळत कवितेचे संस्कार झाले आणि स्वमग्न उत्कट मनःस्थितीत त्यांच्या कवितालेखनाला सुरुवात झाली.

उत्कट भावना हा कवितेचा प्राण असतो. कवितांचे विषय ठरवणार्‍या घटना, प्रसंग, नानाविध अनुभव हे तर केवळ त्या त्या संदर्भातल्या भावनांच्या अभिव्यक्तीचे नेपथ्य करत असतात. आयुष्य जितकं अवघड, जितकं दुखावलेलं तितकं मन प्रगल्भ, गहिरं बनत जातं. दुःखांना समजावता समजावता शहाणं होत जातं. स्वतःच्याच दुःखात न बुडता काठावर येऊन इतरांची दुःखं समजून घेऊ लागतं. आयुष्य जगत असताना वाट्याला आलेल्या अनेकविध भल्याबुर्‍या अनुभवांनी विजयाताईंना लिहीतं केलं. काही उत्कट क्षणांच्या कविता झाल्या. वानप्रस्थाश्रमाच्या टप्प्यावर विजयाताईंचा पहिला संग्रह येतो आहे. यातील कवितांतून डोकावणारं त्यांचं भावसमृद्ध मन स्वतःच्या कोषातून बाहेर पडलं आहे. जीवनाचे सर्व रंग लेऊन इंद्रधनू झालंय... या विविधरंगी कवितांची ओळख होईल अशी काही उदाहरणं-

आईला दिसलेलं बाळाचं रूप वर्णन करणारी एक बालकविता आहे. हे वर्णन वाचताना ते बाळरूप डोळ्यासमोर साकारतं. त्यातल्या दोन ओळी-

‘टकमक टकमक बघतंय कोण?

बाळाचे सुंदर डोळे दोन’  (‘बाळ’)

बालविश्वातून बाहेर डोकावणार्‍या सजग मनाला दिसणारा भोवताल खिन्न करणारा आहे. अस्वस्थ मनाने आजच्या समाजाचे चित्र रंगवणार्‍या एका कवितेत त्यांनी म्हटले आहे-

चोरी करू की देश विकू

त्याशिवाय मी कसा टिकू?

....

गाढ झोप ही कुणाची?

कृष्णाची की जनतेची? (‘सैरभैर’)

अश्वत्थामा ही चिरंजीव वेदनेची सर्वपरिचित प्रतिमा. ब्रह्मास्त्र सोडलं म्हणून त्याला सतत भळभळत्या जखमेचा शाप मिळाला. पण काही न करता सतत दुःख वाट्याला आलेल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या संदर्भात ही प्रतिमा जवळची वाटते. ‘अश्वत्थाम्या,’ या कवितेत कवयित्री म्हणते,

‘मी कुठे चुकले ? विचार करून थकले

भाळच काढून नेले रे..

अन दुर्भाग्य माझे भळभळले’

दुःख माणसाला जीवनाचं सूक्ष्म आणि खोलवरचं दर्शन घडवतं.. एका कवितेत मानवी दुःखाला कवयित्रीनं तुकारामांच्या अभंगांची उपमा दिलेली आहे. ही उपमा खूप वेगळी आहे. वाचताना वाटलं, कवीमन भाषेला स्वतःचा नवीन शब्द बहाल करतं. तशी एखादी नवी प्रतिमाही देऊ करतं... एका कवितेत कवयित्री म्हणते,

‘हे दुःख आहे ना

ते तुकारामांच्या अभंगांसारखं आहे

कितीही इंद्रायणीत नेऊन बुडवलं

तरी वर येतेच आहे.. तरंगतेच आहे

कारण शेवटी ते अभंग आहे..!’

‘दर्शनवारी’, ‘भावतरंग’, ‘मन्वंतर’, ‘शांत निळाई’, ‘परिणिता’ अशा आणखीही बर्‍याच कविता लक्ष वेधून घेणार्‍या आहेत. प्रस्तावनेसाठी कविता वाचायला मी विजयाताईंच्या कवितांची डायरी उघडली आणि समोर आलेल्या ‘परिणिता’ कवितेतील ‘सय तुझी सोनचाफा’ या पहिल्याच ओळीने माझे लक्ष वेधले. मग सगळ्या कविता परत परत वाचत गेले.

संग्रह रूपात या कविता वाचकांच्या हाती येतील तेव्हा वाचकांनाही हा संग्रह परत परत वाचावा असंच वाटेल.. ‘क्षितिजापार’ या कवितासंग्रहाच्या निर्मितीमधून विजयाताईंचे कवितेशी असलेले नाते दृढ व्हावे, त्यांना तिची सोबत अखंड लाभावी ही हार्दिक शुभेच्छा..!

आसावरी काकडे

१६.९.२०२४

 

 

Saturday, 17 August 2024

कोरड्या घशाचा ताळेबंद..

धरण हा विकासाचा असा मार्ग आहे की त्यामुळे सुबत्तेचा मार्ग खुला होतो. पण त्यासाठी काही लोकांना प्रचंड त्याग करावा लागतो. कोणताही वृक्ष बहरलेला दिसतो तेव्हा मन प्रसन्न होतं. अनेकांना त्याची फळं मिळतात. सावली मिळते. पण त्यासाठी बर्‍याच गोष्टी खत होऊन जमिनीत गाडल्या गेलेल्या असतात. हे निसर्गचक्र आहे. त्यामुळे पर्यावरण अबाधीत राहते. धरण हा मानवनिर्मित विकास-मार्ग आहे. त्यातून भविष्यात अनेकांना मिळणार्‍या फायद्याची किंमत मात्र काहींना लगेच मोजावी लागते. आर्थिक, मानसिक, शारिरीक सर्व स्तरांवर त्यांना त्रास सहन करावा लागतो. काही प्रमाणात पर्यावरणहानी पण होत असते.

कोणत्याही धरण प्रकल्पात तीन घटक सामिल असतात. धरणग्रस्त, लाभार्थी आणि प्रशासन. प्रत्येकजण आपापल्या अनुभवातून, आपापल्या भूमिकेतून यावर भाष्य करत असतो. ‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ हा कवितासंग्रह लिहिणारे कवी श्री शिवाजी चाळक यांनी धरण प्रकल्पातील हे तिन्ही घटक जवळून पाहिलेले आहेत. तिन्ही घटकांच्या भूमिकांमधले सुख-दुःख, ताण अनुभवलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कवितांमधे एकूण वास्तवाविषयीचा सम्यक दृष्टिकोन आला आहे. संग्रहात शेवटी तर धरणाचेही मनोगत सांगणारी सुरेख कविता आहे.

यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या या कवितासंग्रहाला जितेंद्र साळुंके यांनी अतिशय मार्मिक आणि लक्षवेधी मुखपृष्ठ तयार केले आहे. कवितासंग्रहाचे शीर्षक आणि आतील कवितांचा सम्यक आशय साकारलेले मुखपृष्ठ वाचकांना वेगळं काही वाचायला मिळणार याची हमी देणारे आहे.

श्री शिवाजी चाळक यांचं बालपण चाळकवाडी-पिंपळवंडी इथं गेलं. तेव्हा तिथून जवळच कुकडी प्रकल्पातील येडगाव या धरणाचे काम सुरू होते. शालेय सहलींमधून त्यांना हे काम पाहायला मिळाले. तेव्हापासून त्यांना अभियंता व्हावे असे वाटत होते. सामान्य आर्थिक परिस्थितीमुळे ते अवघड होते. पण घरच्या प्रोत्साहनामुळे आणि त्यांनी आत्मविश्वासाने केलेल्या दीर्घ प्रयत्नांमुळे ते आपलं स्वप्न पूर्ण करू शकले. गावाजवळून गेलेल्या ज्या कालव्याच्या रोजगार हमी कामावर त्यांची आई आणि चुलती जात असत त्याच धरण व कालव्यावर अभियंता होऊन उपविभागीय अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले. या दीर्घ, कष्टप्रद प्रवासाबद्दल आणि अभियंता म्हणून काम करताना आलेल्या विविध प्रकारच्या अनुभवांबद्दल त्यांनी आपल्या मनोगतात सविस्तर लिहिले आहे. ‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ या कवितासंग्रहातील कवितांना या प्रत्यक्ष अनुभवांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे त्यांच्या कवितांमधे धरणग्रस्तांच्या प्रश्नातील बारीकसारीक तपशील भावपूर्णतेने व्यक्त झाले आहेत तसे धरणामुळे झालेल्या विकासाचेही वर्णन आलेले आहे. त्याच बरोबर धरण-प्रक्रियेमधल्या प्रशासकीय कामातील स्वार्थ, दिरंगाई आणि प्रामाणिक काम करणार्‍यांच्या समस्यांनाही उद्‍गार मिळालेला आहे.

श्री शिवाजी चाळक यांनी लहानपणापासून हे सर्व अनुभवले असल्यामुळे या कवितांमधे त्या परिसरातील लोकांच्या बोलीभाषेतले शब्द आले आहेत. त्या शब्दांचे अर्थ त्यांच्याकडून समजून घेतले तेव्हा कवितांमधली वेदना तिच्या तीव्रतेसह जाणवली. उदा. पहिल्याच कवितेत झोपडीत एकटी असलेल्या मुलीचं भावविश्व चित्रित केलंय. मुलगी अकरा दिवसांची बाळंतीण आहे. जवळ तिची दोन चिलीपिली आणि तहानं बाळ आहे. आई-बाप कामाला बाहेर गेलेत. झोपडीचं मुल्यांकन करायला साहेब आलाय. त्याच्या हातात दुर्बिण, लाकूड कापायचं हत्यार (किकरी) अशी साधनं आहेत. किंमत ठरवण्यासाठी तो झोपडीच्या वाश्याचं लाकूड नमूना म्हणून कापून घ्यायला लागतो तेव्हा ती सायबाला विनवतेय, ‘या झोपडीच्या वाश्याला  

नको लावूस किकरी  

झोपडीचा वासा जसा  

माह्या लुगड्याची मिरी... 

याच कवितेत शेवटी म्हटलंय,

‘बांध तिरडी आमची  

आता बांधताना धरण  

घे सरकारी कमिशन  

आमचं रचताना सरण..!’

धरणासारखं मोठं, विकासाचं काम करताना अपरिहार्यपणे काहींना असा त्रास होतो. पण हा त्रास दिसतो त्या आकाराचा राहात नाही. फसवणूक, लाचखोरी, कामातली दिरंगाई, स्वार्थ अशा गोष्टींमुळे तो त्रास मरणप्राय होतो. त्या दुःखातून असे उद्‍गार येतात. ‘अंमलबजावणी’, ‘चाचणी खड्डा’, ‘बळी’, ‘हप्ता’, ‘घास’, ‘कोंडमारा’... अशा आणखी बर्‍याच कावितांमधे धरणग्रस्तांच्या दुःखाचे वेगवेगळे पैलू शब्दबद्ध झाले आहेत. ‘बळी’ या कवितेत शेवटी म्हटलं आहे,

‘हे खरे की  

कोणीही माणूस  

दिला जात नाही बळी

धरणाच्या भींतीच्या पायात...

पण माणसांनी गजबजलेल्या गावाचा मात्र  

बळी दिला जातो

धरणाच्या भिंतीच्या आत..’

या सर्व प्रक्रियेत कामाला गती येते, काम करणार्‍या इंजिनिअर्सना वेतनवाढ मिळते. पण हे सर्व प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या संवेदनशील मनाच्या इंजिनिअरला अपराधी वाटतं.... ‘शाबासकी’ या कवितेत म्हटलं आहे,

‘थरथरे माझे हात

दर पगाराच्या वेळी  

त्यागी जमीनमालक  

आठवतो अशा वेळी..!’

‘अभिषेक’ सारख्या कवितेत गाई-गुरांना कसा त्रास झाला त्याचं क्लेशकारक चित्र साकारलंय तर ‘धरणात बुडालेली हिवर्‍याची बाग’ या कवितेत दीडशे एकरातल्या दीडशे वर्षांच्या हिवर्‍याची बाग नावानं ओळखल्या जाणार्‍या ‘डॉ. अलेक्झांडर गिब्सन गार्डन’चं मनोगत व्यक्त झालं आहे. सुरुवातीला तिच्या वैभवाचं वर्णन आहे. आणि नंतर ते आता धरणात बुडणार याचं दुःख व्यक्त झालं आहे. या कवितेत शेवटी म्हटलं आहे,

‘मीही होईल कोणाच्या तरी

घराचा उंबरा, खिडकी, दरवाजा  

आणि छताला तोलणारं आडं  

नाहीतर कोणाच्या तरी  

सरणावरची लाकडं...’

‘शाळेची जलसमाधी’ या कवितेतही असेच एका शाळेचे हृदयस्पर्शी मनोगत आहे. माणसं गाव सोडून निघालीयत... कुणाचे कुठे पुनर्वसन होणार कुणालाच माहीत नाही.. शाळेची इमारत आणि मैदान ओस पडेल.. कवितेत शेवटी म्हटलंय- ‘चिलीपिली ही पाखरं

उडून जाईल थवा  

नाही माहीत कोणास  

ते कोण कुठल्या गावा...  

जेव्हा जातील सोडून  

तेव्हा निखळेल चिरा  

पाण्यात जलसमाधी  

कोंडेल हा श्वास सारा..!’

धरण बांधण्याची प्रक्रिया चालू असतानाची त्या परिसरातल्या गावांची होत असलेली अशी भयंकर परवड, धरण पूर्ण झाल्यावर अनुभवाला येत असलेल्या सुविधा, विकास, भरभराट.. आणि त्यातून निर्माण झालेली छानछोकी, व्यसनाधीनता... एका धरणाच्या योजनेमुळे झालेल्या भल्याबुर्‍या परिवर्तनाचा हा सर्व पट या कवितांमधून उलगडलेला आहे. यातील बारकावे समजून घ्यायचे तर सर्वच कविता मुळातून पूर्ण वाचण्यासारख्या आहेत.

‘कायम तहानलेला

दाता इथं धरणांचा  

कोणा विचारावा जाब  

पाण्यासाठी मरणाचा..!’

असा आक्रोश ‘गाव सोडताना’, ‘दैना’, ‘आयुष्याचे पर्यटन’, ‘कोरड’, ‘भोगी आणि त्यागी’.... अशा बर्‍याच कवितांमधून मुखर झाला आहे. तर

‘एका धरणाचे पाणी  

अशी करतेय क्रांती  

पाण्यातून वाढी लागे  

तेथे साधनसंपत्ती..’

असे धरणाचे सकारात्मक परिणाम दाखवणारे चित्र ‘क्रांती’, ‘आधुनिक शेती’, ‘किमया’, ‘हिरवाई’, ‘सुगी’ ‘मजूर उद्योग’, ‘लग्न सोहळा’, ‘शिक्षणाच्या वाटा’.... अशा काही कवितांमधे साकारलेय. त्यानंतर

‘पाण्यासंगे आली

गावाला सुबत्ता  

सोबतीला सत्ता  

आणि मस्ती’

हे सुबत्तेचे परिणाम वर्णन करणार्‍या ‘बोंबाबोंब’, ‘भीती’, ‘नासाडी’... अशा काही कविता येतात. ‘अंधार उशाला’ या कवितेत धरणाचे तटस्थ मनोगत आले आहे. तर ‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ या शेवटच्या शीर्षक कवितेत श्री चाळक यांनी संपूर्ण प्रकल्प प्रक्रियेचा लेखाजोखा घेत प्रशासनाने काय करायला हवे ते सांगितले आहे. या दोन्ही कविता परत परत पूर्णच वाचायला हव्यात अशा आहेत.

‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ या संग्रहामधल्या या सर्व कवितांमधून धरणग्रस्त आणि लाभार्थी यांच्यातील संबंध समजून घेताना फार पूर्वी पाहिलेल्या एका शॉर्ट फिल्मची आठवण झाली. त्यात एक गरीब मुलगा स्लीपर घालून रेल्वे स्टेशनवरच्या गर्दीतून चालला आहे. चालता चालता अचानक त्याची चप्पल तुटते. तो बाजूला एका दगडावर बसून चप्पल दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. ते करत असताना त्याची नजर गर्दीतून छान पॉलीश केलेले बूट घालून चाललेल्या मुलाच्या पायांकडे जाते. त्या चालत्या पावलांकडे तो पाहात राहातो. तो मुलगा आपल्या बुटाचे पॉलीश खराब होऊ नये म्हणून मधून मधून वाकून पुसत असतो. रेल्वेची वाट बघत बाकावर बसतो. तिथेही तो आपले बूट जपत असतो. गाडी आल्यावर तो वडलांचा हात धरून गाडीकडे जातो. गर्दीतून गाडीत चढताना त्याचा एक बूट खाली पडतो. दगडावर बसलेल्या मुलाच्या ते लक्षात येते. तो धावत जाऊन बूट उचलतो. आणि गाडीबरोबर धावत जाऊन तो बूट रेल्वेत चढलेल्या मुलाला द्यायचा प्रयत्न करतो. गाडी वेग घेते तेव्हा धावत जाऊन बूट हातात देणे अशक्य होते. तेव्हा तो बूट गाडीतल्या मुलाच्या दिशेने फेकतो. गाडीतला मुलगाही अधीरतेनं झेलण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला झेलता येत नाही. बूट परत खाली पडतो. दोघांना वाईट वाटते. पण गाडी फार पुढे जाण्यापूर्वी गाडीतला मुलगा दुसर्‍या पायात राहिलेला बूट चटकन खाली फेकतो. आता दोन्ही बूट खाली असतात. आणि तुटकी चप्पल हातात घेतलेला मुलगा बुटांकडे आणि निघून चाललेल्या गाडीतील अनोळखी मुलाकडे पाहात असतो... काही मिनिटांची ही फिल्म पाहिल्यावर मनात आलं, ‘आहेरे’ आणि ‘नाहीरे’ यांच्यातले संबंध इतके सहृदय आणि समंजस होऊ शकतील का?

धरणग्रस्तांचा आक्रोश आणि लाभार्थ्यांचा जल्लोष या दोन्हीचा सम्यक लेखाजोखा घेणार्‍या ‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ या श्री शिवाजी चाळक यांच्या कवितासंग्रहातील कविता असा अंतर्मुख विचार करायला लावतात. धरणासारख्या विकास योजना राबवणार्‍या प्रशासनाची या संदर्भातली जबाबदारी महत्त्वाची आहे. प्रशासकीय सेवेत काम करणार्‍यांनी संवेदनशील असणं गरजेचं आहे. असे अधिकारी असतातही. पण त्यांना योजनेच्या सर्व बाजू सांभाळताना अविरत तारेवरची कसरत कशी करावी लागते ते श्री शिवाजी चाळक यांनी जवळून पाहिलेले आहे. संवेदनशील अभियंता असलेल्या श्री चाळक यांनी त्यांना भेटलेल्या अशा कार्यनिष्ठ सुहृदांनाच हा कवितासंग्रह अर्पण केलेला आहे.

आसावरी काकडे

asavarikakade@gmail.com

****

 

‘कोरड्या घशाचा ताळेबंद’ – कवितासंग्रह

कवी- श्री शिवाजी चाळक

प्रकाशक- यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे

पृष्ठे- १४४, किंमत- २५० रुपये


Wednesday, 17 January 2024

एकांतरेघेवरून चालताना..

सुनीती लिमये माझी धाकटी मैत्रीण. आयुष्याच्या एकांतरेघेवरून चालण्याचा  संघर्षमय प्रयत्न करत असताना भेटलेली. ‘एकांतरेघेवरून’ हा तिचा तिसरा कवितासंग्रह स्वयम्‍ प्रकाशनातर्फे प्रकाशित होतो आहे. त्या निमित्ताने त्यातील कवितांविषयी लिहिताना तेव्हाची सुनीती मला आठवली. तेव्हा तिच्याशी झालेला संवाद आठवला. एकाकीपणाच्या वेदनांनी सैरभैर झालेल्या अवस्थेतही विचार करू शकणारी सुनीती मला वेगळी वाटली. तिच्याशी बोलताना, तिला समजावताना मीही अंतर्मुख होत होते. ती शब्दांतून माझ्याशी संवाद करत होती. पण तो खरा तिचा स्वतःशीच संवाद होता. तेव्हा तिनं लिहिलं होतं, ‘पूर्ण स्वतंत्र झालो तर पाचोळ्याप्रमाणे उडून जाऊ आणि बंधनात राहिलो तर दगडासारखे पडून राहू (परमेश्वराची इच्छा म्हणत).. असे हे व्दंव्द...’, ‘मी निराश नाही, अडलेपण आलं आहे’, ‘अहंकार आणि सेल्फ एस्टीम यात खूप सूक्ष्म लाईन आहे. स्लीपरी वे आहे. अहंकार नसावा पण सेल्फ एस्टीम टिकवायचा.. जरा कसरत वाटते मला...’ २०१२ सालच्या आमच्या संवादातली तिची ही काही स्वगतं...

एकाकीपणाला शहाण्या एकांतवासात बदलवणारा हा तिचा स्वसंवाद आणि स्वसंघर्ष अंतरंग खोदणारा होता. तिच्या आजच्या आत्मविश्वासपूर्ण जगण्यामागे या संघर्षमय तपाचे संचित आहे. त्यातून तावूनसुलाखून निघालेली सुनीती आज कवयित्री, चित्रकार, छायाचित्रकार, गायिका, योग-प्रशिक्षक असे जगण्याचे वेगवेगळे आयाम आपलेसे करत कलात्मक आनंद घेत समृद्ध आयुष्य जगते आहे. ‘एकांतरेघेवरून’ या तिच्या कवितासंग्रहातल्या कविता वाचताना मला तिची ही पार्श्वभूमी आठवत राहिली...

कवितासंग्रहाचं ‘एकांतरेघेवरून’ हे शीर्षक तिचा हा पूर्वार्ध अधोरेखित करणारं आहे असं वाटलं. विशेष म्हणजे या संग्रहाचं सुंदर आणि समर्पक मुखपृष्ठ सुनीतीनं स्वतः केलेलं आहे. या मुखपृष्ठ-चित्राची रंगसंगती आणि त्यातलं गहिरेपण लक्षवेधक आहे.

या संग्रहात नव्वदएक कविता आहेत. काही मुक्तछंदात आहेत. काही लयबद्ध आहेत. मुक्तछंद कवितांमधे वास्तव-दर्शन आहे. वास्तव चित्रणासाठी हा आकृतीबंध स्वाभाविक वाटतो. यातील आशयाच्या भावावेगामुळे या कविता काही ठिकाणी पसरट झाल्या आहेत. त्या काहीशा एकसुरीही वाटल्या

लयबद्ध कविता मला विशेष आवडल्या. या कवितांची लय पक्की आहे हे एक कारण आणि दुसरं, यातील आशय अमूर्त चित्रासारखा आहे. नेमेकं काही न सांगता बरंच काही सांगणारा... या दृष्टीने ‘पैल’ ही या संग्रहातली कविता मला विशेष आवडली. या कवितेच्या पहिल्या दोन ओळी मुखपृष्ठाचं नेमकेपणानं सुंदर वर्णन करणार्‍या आहेत.-

‘मी म्हणाले पैल नाही, तो म्हणाला ऐल नाही

नाव मध्याशी बुडाली या नदीला धीर नाही’

 

लक्ष वेधून घेणारी, आस्वादासाठी शब्दांपाशी रेंगाळायला लावणारी आणखी काही उदाहरणं...

‘अहंपणाच्या खांद्यावरचा हात काढुनी घ्यावा

ओंकाराच्या गाभार्‍यातुन सूर स्वच्छ लागावा’ (साक्षी)

‘रक्त प्रवाही देह प्रवाही / आपुल्यामधले मोह प्रवाही’ (प्रवाही)

‘अर्थाचे काठ शोधत शोधत आपण किती लांब आलो नं प्रिय..!’ (काठ)

‘वेडी वर्दळ’, ‘देहामधले एक कलेवर’, ‘मर्म’, ‘कधी झोका वर’, ‘मी त्याच उन्हाचे झाड’, ‘काही निःशब्द प्रार्थना’ ‘सूर्य पश्चिमी बुडेल’ या कविता पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा आहेत. अर्थात प्रत्येक वाचक याच कवितांपाशी रेंगाळेल असं नाही. आस्वादक्षणी कुणाला कोणती कविता थांबवून ठेवेल हे सांगता येत नाही. प्रत्येक कवितेचं आवाहन वेगळं असतं.

कविता काहिशी आत्मकथनात्मक असते. पण ती जगण्याचा तपशील सांगत नाही. शब्दांशिवाय कुठेच व्यक्त होऊ न शकलेलं असं ‘काहीतरी’ कवितेत उतरतं. व्यक्त होऊनही अव्यक्त राहातं. लिहिणार्‍या एका ‘स्व’चं असूनही आत्मीयतेनं वाचणार्‍या प्रत्येकाला आपलं वाटतं. सुनीतीच्या कवितांमधे वाचकांना आपलं ‘काहीतरी’ गवसेल. आपापल्या एकांतरेघेवरून चालताना या कवितांची सोबत वाटेल. चित्र, छायाचित्रांच्या सोबतीनं तिची कविताही बहरत राहो ही हार्दिक शुभेच्छा.

आसावरी काकडे

१६ जानेवारी २०२४

 

Saturday, 7 October 2023

शांत गहिर्‍या तळाशी...

सानुल्या बीजापासून ते माणसापर्यंत प्रत्येकाला सतत व्यक्त व्हायचं असतं. व्यक्त होण्याच्या तर्‍हा वेगवेगळ्या असतात. पण व्यक्त होण्याची आंतरिक ओढ समान असते. माणूस केवळ लिहिण्या-बोलण्यातूनच नाही तर प्रत्येक कृतीतून सतत व्यक्त होत असतो. तरी असं काही उरतंच आत जे कवितेशिवाय इतर कशातूनही व्यक्त होऊ शकत नाही. केव्हा तरी पडलेलं बी जमिनीत रुजतं. रुजणं पूर्णत्वाला गेलं की बीज मातीचं कवच फोडून बाहेर पडतं. तशीच व्यक्त होण्यासाठीची अस्वस्थता परिपक्व होते तेव्हा खरी कविता लिहिली जाते. या संदर्भात संत तुकारामांच्या अभंगातली एक ओळ आठवते- ‘फाकूं नका रुजू जालिया वांचून’

निरुपमा महाजन यांचा ‘शांत गहिर्‍या तळाशी’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित होतो आहे. प्रस्तावना लिहिण्याच्या निमित्तानं यातल्या कविता वाचताना जाणवलं की त्यांनी ‘रुजू’ झाल्यावरच या कविता लिहिलेल्या आहेत. ‘रुजू’ होण्यासाठी बीजाप्रमाणे खोलातल्या शांत गहिर्‍या तळाशी वाट पाहात बसावं लागतं याची जाण कवयित्रीला आहे हे कवितासंग्रहाचं शीर्षक आणि आतल्या कवितांवरून लक्षात येतं.

आशय आणि अभिव्यक्ती ही कवितेची दोन अविभाज्य अंगं आहेत. अभिव्यक्तीच्या शैलीनुसार आशयाचा पोत बदलतो आणि आशयाच्या प्रगल्भतेनुसार अभिव्यक्तीचा दर्जा ठरतो. दृश्य कवितेच्या रोमरोमांतून आशय डोकावत असतो. कविता कधी मूर्त चित्रासारखी आशयप्रधान असते तर कधी अमूर्त चित्रासारखी शैलीप्रधान असते. निरुपमा महाजन यांच्या कवितांना शैलीप्रधान हे लेबल लावता येण्यासारखं नसलं तरी त्यांचा कल शैलीप्रधानतेकडेच आहे असं म्हणता येतं.

या संग्रहातील अधिकतर कविता लयबद्ध तर आहेतच पण त्यात वैविध्यही आहे. एकच एक छंद किंवा वृत्त वापरलेलं नाही. शेवटची ‘मीरा : एक आशय अनेक वृत्ते’ ही एकच कविता उदाहरण म्हणून पुरेशी आहे. यात वेगवेगळ्या सात वृत्तांचा वापर केलेला आहे. एकच आशय असा अभिव्यक्तीच्या अंगानं वळवणं सोपं नाही. निरुपमा यांचा हा प्रयोग कौतुकास्पद आहे.

विशेष म्हणजे ही वृत्त-लयबद्धता निर्दोष आहे. लयबद्ध कविता लिहिणं कौशल्याचं काम आहे. अभिप्रेत आशय वृत्त-लयीच्या तंत्रात बसवताना बरेचदा आशय तरी फसतो नाहीतर लय तरी चुकते. लिखित / छापील कवितेत आणखी एक धोका असतो. मनातल्या लयीनुसार अक्षर र्‍हस्व हवे असते पण व्याकरणानुसार ते दीर्घ लिहिले / छापले जाते. तसे झाले तर रसिक वाचकाच्या दृष्टिने लय बिनचूक राहात नाही. निरुपमा यांच्या ‘वारस’ या गझलेत वृत्त-लय, काफिया, रदीफ अशी तंत्रं सांभाळताना कशी कसरत केली जाते त्याचं मार्मिक चित्रण आहे. त्यातला एक शेर असा आहे- ‘धड कळला नाही त्यांना शब्दांचा लगाव ओला / पण ‘लगावली’ का चुकली हा जाब विचारत होते..!’

निसर्ग, मानवी नाती, गावाकडचे वर्णन.. असे या कवितांचे विषय आहेत. इथे निसर्ग कधी वर्णन म्हणून येतो तर कधी प्रतिमा बनून येतो. ‘झाडाची प्रेमकविता’, या कवितेत जमिनीच्या वर उभे दिसणारे झाड आणि खाली खोलवर पसरत राहणारी मुळं यांच्यातील विलक्षण प्रेमाचे नाते चितारले आहे. ‘चक्र’ या कवितेत निसर्गवर्णन प्रतिमा म्हणून येते. जीवन-मृत्यूचं चक्र कसं अविरत फिरत असतं याचं सुंदर वर्णन यात आहे. ‘बहर’ ही कविता वाचताना निसर्गाशी कवयित्रीचं नातं किती उत्कट, आतून उगवलेलं आहे याचा प्रत्यय येतो. ‘हिरव्या हिरव्या हजार फांद्या या हातांतुन उगवुन याव्या / कंचपोपटी पानझालरी बोटांमधुनी उमलत जाव्या’ अशी सुरुवात असलेल्या या कवितेत पुढे, पायांना मुळं फुटावीत.. मन खोडासारखं टणक बनावं.. असं म्हणत शेवटी ‘या देहाने गाणारा हा वृक्ष बनावे बहरुन यावे / वठून गेले तरी नव्याने बी इवलेसे पुन्हा रुजावे..!’ अशी इच्छा व्यक्त केलीय.

या संग्रहातील कविता वाचताना, मेधवंती.. फांदोफांदी.. तृष्णित.. कांचनवाटा.. असे काही नवीन शब्द भेटतात. वृत्त-लयीसाठी असे शब्द कवी निर्माण करत असतो. विशेष म्हणजे निरुपमा यांच्या कवितांमधली ही शब्दयोजना कृत्रिम वाटत नाही.

‘आजी’, ‘कंठा’, ‘आईनंतर’ अशा काही कवितांमधे मानवी नात्यांचे भावपूर्ण चित्रण आहे तर ‘जत्रा’, ‘धनी’, ‘कपिला’ अशा काही कवितांमधे गावाकडलं चित्र उभं केलंय. या प्रत्येक कवितेची लय तिच्या आशयाला साजेशी आहे.

‘ती’, ‘भूमिती’, ‘समुद्र’, ‘आयुष्य’, ‘सूज्ञ’, ‘त्राता’ या कविता विशेष उल्लेखनीय आहेत. देहविक्रय करणार्‍या ‘ती’विषयीच्या ‘ती’ या कवितेत शेवटी म्हटलंय, ‘ती भक्ष्य कोडगे बनते / पचवून वेदना सारी / अन इथे सुखाने जगती / कुलवंत घरांच्या पोरी’. वेगळ्या प्रतिमा असलेल्या ‘भूमिती’ या कवितेत म्हटलंय, ‘मीच माझ्या आकृत्यांचे / जोडले नाहीत बिंदू / जीवनाच्या भूमितीची / क्लिष्टता कोणास सांगू?’

अशा कितीतरी ओळी उद्‍धृत करता येण्यासारख्या आहेत. पण तेवढ्यावर भागण्यासारखं नाही. ‘शांत गहिर्‍या तळाशी’ हा पूर्ण कवितासंग्रहच निवांतपणे समरसून आस्वादायला हवा..!

आसावरी काकडे

 

 

सावल्यांच्या अंतरंगात डोकावणार्‍या कविता-

‘अनुबंध क्षितिजाचे’, ‘बिन काचेचा बर्फ’ या दोन कवितासंग्रहांनंतर आता डॉ मिलिंद शेंडे यांचा ‘अंतरंग सावल्यांचे’ हा तिसरा कवितासंग्रह येतो आहे. लिहिलेल्या, संग्रहरूपात प्रकाशित झालेल्या ‘दृश्य’ कविता एका अर्थाने उत्तरार्ध असतात. त्यांचा पूर्वार्ध जमिनीखालच्या मुळांसारखा कवीच्या व्यक्तित्वात पसरलेला असतो. या पूर्वसंचितातूनच उगवलेल्या असतात प्रकाशित झालेल्या कविता..! मिलिंद शेंडे यांनी चार विषयात एम. ए. केल्यावर समाजशास्त्र विषयात पीएच डी पदवी संपादन केलेली आहे. कवी ग्रेस आणि सुरेश भट यांचे मार्गदर्शन त्यांना लाभलेले आहे. आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असण्याचा दीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे....’ त्यांच्या कवितांना इतका समृद्ध ‘पूर्वार्ध’ लाभलेला आहे.

आता प्रकाशित होत असलेल्या कवितासंग्रहाचे ‘अंतरंग सावल्यांचे’ हे शीर्षक मिलिंद शेंडे यांच्या आधीच्या कवितासंग्रहांच्या शीर्षकांसारखेच वेगळे, विचार करायला लावणारे आहे. त्यावरून आतील कवितांचा पोत काय असेल ते लक्षात येण्यासारखे आहे. ‘अंतरंग सावल्यांचे’ या कवितासंग्रहात एकूण शंभर कविता आहेत. त्या सलग वाचताना प्रथम वाचनात मनापर्यंत पोचत नाहीत. तरी त्यावर घाईनं काही शेरा मारता येत नाही. कारण या कवितांमधल्या कितीतरी जागा कविता परत वाचायला हव्यात हे सांगत असतात. ‘अंतरंग सावल्यांचे’ या संग्रहातील कवितेत आलेल्या प्रतिमा आणि लयबद्धता या दोन्हीवर कवी ग्रेस यांचा प्रभाव जाणवतो.

कवितेची लय आशयानुरूप असली की तिचं सौंदर्य व्दिगुणीत होतं. पण हे सहजसाध्य असत नाही. कवितेची लय पकडण्यासाठी ठराविक अक्षरसंख्या, त्यांचा ठराविक अनुक्रम आणि ठराविक मात्रा यांचे नियम पाळावे लागतात. दीर्घ रियाजाखेरीज हे जमण्यासारखे नसते. लयीची उपजत जाण असेल तर कवितेत सहजता येते. अन्यथा बरीच कसरत करावी लागते. ती करताना कधी आशय निसटतो तर कधी लय चुकते. मिलिंद शेंडे यांनी या दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.

कवितेतील प्रतिमांमुळे कवितेची शैली तयार होते. ही शैली म्हणजेच कविता अशा अर्थाची कवितेची एक व्याख्या आहे- Poetry is not the thing said, but the way of saying it.’ कवितेची प्रत, पोत या प्रतिमांमुळे ठरतो. मिलिंद शेंडे यांच्या कवितांमधे नदीचा काठ, भय व्याकुळता, सावली, अंधार, कारुण्य, आरसे, अंगण, घोडा... अशा प्रतिमा सहज येतात. त्यांचे बोट धरून कवितांमधे शिरता येते. काही उदाहरणं सलग पाहिली की या कवितांची जातकुळी लक्षात येईल.

‘झुल्यावरी थोड्यातरी आठवणी बांधू

देता देता एक झोका पारंबीला सांगू’ (‘आठवण’)

सांग पावलांना कसा लागे दिवसाचा शोध

तसा पणतीच्या उजेडाला अंधाराचा बोध’ (‘भय’)

‘किती सलावा किती रुतावा किती खुपावा काटा

कुठून येती फूलपाखरे उडून जाती वाटा (‘वाटा’)

‘सांगू कसे दुःख तुला सवतीच्या पोरा

भिल्लिणीचे भाग्य लाभो रामाच्याही बोरा’ (भाग्य)

‘माझा कापराचा देह

तुला जळायची भीती (भयभार)



‘सोडूनिया गेली दूर काठावरी नाव

ओळखीच्या सावलीचे आठवते गाव (ओंजळ)

कशी दाटते सांग ना मनी आंधळीच माया

कोण घालते उखाणा पुन्हा कातडी सोलाया (आधार)

या ओळी असलेल्या कविता मला अमूर्त चित्रासारख्या वाटल्या. अमूर्त चित्रं फक्त अनुभवायची असतात. त्यावर भाष्य करता येत नाही. त्यांचा अर्थ लावता येत नाही. या कविता वाचताना प्रत्येकाला त्याचा त्याचा आशय गवसेल, गवसावा. त्यावर काही भाष्य करून दिग्दर्शन करू नये असे वाटले.

या संग्रहात काही मुक्तछंद कविताही आहेत. त्यातील काही उदाहरणं

नेटाने पुढे पाऊल टाकणारे आपण

आतल्या आत किती जखमी होत असतो (अंधार)

‘कोणती अनामिक भीती प्रत्येकाला ग्रासत आहे

श्वासामधले श्वासही आता एक विषाचा प्याला आहे. (भीती)

‘जखमा’ या कवितेत वाड्याची भव्य ओनरशीप इमारत होते तेव्हा अंतर्बाह्य काय काय परिवर्तन होते याचे वास्तव चित्रण केलेले आहे. ‘प्रवाह’ ही एक छान जमून गेलेली कविता आहे. यात मनातल्या अस्थिरतेचं हृदयस्पर्शी चित्रण आहे. या शिवाय ‘दिवेलागण’, ‘सारीपाट’, ‘माझा धर्म’, ‘क्षितिज’ या कविता विशेष उल्लेखनीय आहेत.

ही उदाहरणं ‘अंतरंग सावल्यांचे’ या कवितासंग्रहातील सर्व कविता वाचायची उत्सुकता वाढवणारी आहेत. या कविता वाचकाला अंतर्मुख करतात. मिलिंद शेंडे यांच्या कवितांना रसिकांची भरभरून दाद मिळावी, त्यांच्या हातून उत्तरोत्तर अधिक सकस कवितालेखन होत राहावे ही हार्दिक शुभेच्छा.

आसावरी काकडे