Saturday, 13 September 2025

या तहानेला तळ नाही... – हेमकिरण पत्की

सोलापूरचे ज्येष्ठ कवी हेमकिरण पत्की यांचाया तहानेला तळ नाहीहा कवितासंग्रह अलिकडे वाचनात आला. एका बैठकीत वाचण्यासारख्या या कविता नाहीत हे लगेच लक्षात आलं. त्या वाचल्यावर मनात मुरत राहतात. मुरलेला, मनात रेंगाळत राहिलेला आशय संग्रह काढून कविता पुन्हा वाचायला लावतो. अशा संग्रहातली एखादी कविता रसग्रहणासाठी निवडणं सोपं नाही.

कवितेची आस्वादप्रक्रिया निर्मिती-प्रक्रियेइतकीच अंतस्थ असते. कवितेच्या अंतरंगात उतरवणारी असते. मनाच्या त्या तरल अवस्थेत उमगलेला कवितेचा निराकार आशय मनस्वी आनंद देणारा असतो. त्या क्षणीच खरंतर आस्वादप्रक्रिया संपलेली असते. उमगलेला हा आशय नंतर कुणाला सांगायचा किंवा एखाद्या लेखात मांडायचा तर पुन्हा तो आशय परोपरीने शब्दांत उतरवावा लागतो. या सर्व प्रक्रियेत आपलं विचारविश्व सतत आपल्या सोबत असतं..!

या तहानेला तळ नाही या कवितासंग्रहातली ‘शांतता’ ही मला आवडलेली कविता. खरंतर ती मनात अनुभवावी अशी आहे. पण त्याच कवितेविषयी लिहायचं मी ठरवलं आहे. ती कविता अशी-

शांतता

भरून आलेलं आभाळ

पडलेला वारा

निष्पर्ण वृक्षावरली दुपार

सूर्य क्षितिजाआड होतानाचा काळ

निजलेलं गाव

नदीचं कोरडं पात्र

म्हणजे नसते शांतता.

उजाड उघडा माळ

सुगी झालेलं रान

तारा तुटल्यानंतरचं आकाश

पोरकं पोरकं अंगण

म्हणजेही नसते शांतता

शांतता असते :

शब्द विसर्जित झाल्यानंतरचं

रितं रितं मन;

मनापलीकडचं मोहन. (पृ. ३३)

***

या कवितेत शांतता म्हणजे काय नाही ते आधी सांगितलेलं आहे. जे अनिर्वचनीय असतं त्याविषयी बोलायचं तर अशा ‘नेती नेती’ भाषेतच बोलावं लागतं... आपल्या भोवती सतत माणसांचा, वाहनांचा, कुत्री-मांजरी.. पक्षी... कशाकशाचा आवाज येत असतो. सण उत्सवात तर ढोल, ताशे, डीजे... यांचा घरं हादरवणारा आवाज येत असतो. शांतता म्हणजे या आवाजाच्या कोलहलातून सुटका असं आपल्याला ढोबळपणे वाटतं. पण शांतता म्हणजे काय नाही ते सांगण्यासाठी सुद्धा कवीने या कोलाहलाचा उच्चार केलेला नाही.

कवितेत म्हटलंय,

संपृक्त होऊन निःशब्द झालेलं, ‘भरून आलेलं आभाळ’ किंवा रितेपणानं व्याकूळ होऊन ‘पडलेला वारा’ म्हणजे शांतता नाही. आत्ममग्न असलेल्या ‘निष्पर्ण वृक्षावरली मूक दुपार’ किंवा निरोप घेऊन अंधाराचं पांघरूण घालू लागलेला,सूर्य क्षितिजाआड होतानाचा काळ’ म्हणजे शांतता नाही. आपापल्या स्वप्नात हरवलेलं ‘निजलेलं गाव’ किंवा वाहत्या पाण्याचा खळाळ गमावलेलं ‘नदीचं कोरडं पात्र’ म्हणजे शांतता नाही.

शांततेच्या शक्यतांचा मागोवा घेत कवीमन ‘उजाड उघडा माळ’ पालथं घालतं पण त्याला तिथंही शांततेची खूण गवसत नाही. आत साठलेलं सर्व देऊन तृप्ती अनुभवत असलेलं ‘सुगी झालेलं रान’ किंवा तुटलेपणाच्या विरहानं खोलवर दुखावलेलं ‘तारा तुटल्यानंतरचं आकाश’, मुलाबाळांच्या बागडण्याविना ‘पोरकं पोरकं झालेलं अंगण’ कुठेच शांततेचा मागमूस लागत नाही कवीला. शांततेच्या शोधात बाहेर वणवण करून परतलेल्या, अंतरंगात डोकावलेल्या जाणिवेला मग ‘शब्द विसर्जित झाल्यानंतरचं रितं रितं मन’ शांततेला जोजवतं आहे असं दिसतं.. आणि खुणावतं त्याच्याही पलिकडे असलेलं शांततेचं ‘मोहन’ रूप..!

एखाद्या कवीच्या एखाद्या कवितेवर लिहायचं तर त्या कवितेचे शब्द काय सांगतात ते ऐकत आशयाचा असा मागोवा घेत गेल्यावर जी कविता समजते ती बहुधा रसिकाच्या मनात उगवलेली रसिकाची कविता असते. ती तशी असायला काही हरकत नाही. प्रत्येक वाचकाला त्याचा आशय कवितेत सापडावा हे कवितेचं स्वाभाविक सामर्थ्य आहे. Archibald MacLeish या अमेरिकन कवीच्या Ars Poetica या कवितेत म्हटलंय, A poem should not mean but be’- कवितेनं काही सांगू, बोलू नये फक्त स्व-रूपात ‘असावं.’ कवितेविषयक या दृष्टिकोनात हेच अभिप्रेत आहे.

पण कवीच्या मनातली कविता, कवीला काय म्हणायचं आहे ते समजून घ्यायचं तर त्या कवितेतील शब्दांचा अभिधानंतरच्या अर्थाचा मागोवा घेत जावं लागेल. त्यासाठी कवीच्या आशय-संचिताचा परिसर समजून घ्यावा लागेल. तो संग्रहातील इतर कवितांच्या माध्यमातून समजू शकेल.

‘शांतता’ या कवितेतील शब्दांचे बोट धरून ही कविता अनुभवताना लक्षात आलं की ती ‘शांतता’ या शीर्षकाखालच्या पहिल्या ओळीपासून सुरू झालेली नाही आणि शेवटच्या ओळीशी संपलेली नाही. संग्रहातल्या इतर कवितांमधून वेगवेगळ्या नावानं कवीमन याच अनिर्वचनीय ‘असण्या’चा शोध घेतं आहे.   

या संग्रहातील ‘एकच शब्द’ या कवितेत म्हटलंय,

‘अखेरचा

एकच शब्द लिहून ठेवतो

समोरच्या कोर्‍या कागदावर :

तू

जो एवढी पुस्तकांची रानं

मागं टाकून

नि आयुष्याचा माळ चालून

कधी माझा झाला नाही.’ (पृ.५६)

***

हेमकिरण पत्की यांच्या या कवितेतली जो कधी माझा झाला नाही’... या साध्या शब्दात व्यक्त झालेली उत्कट वेदना प्रत्येक वाचनात मनात खोल उतरत जाते.. कवितेतला हा तूचा शोध म्हणजे निरामयाचाच शोध असणार असं मला वाटलं. कवितेत म्हटलं आहे, ‘तुला समजून घेण्यासाठी मी इतक्या पुस्तकांची रानं तुडवली... पुन्हा पुन्हा पानं उलटली. शब्दांच्या दर्‍या, डोंगर पार केले... त्यासाठी आयुष्य पणाला लावलं. अख्ख्या आयुष्याचा माळ चालून झाला तरी तूआकलनाच्या कक्षेत आला नाहीस. माझा झाला नाहीस.. सापडायचंच नाही म्हणून तू शून्यात लपून बसलास. आणि मी शोधण्याचा अभिनिवेश करत राहिलो. आपण आपापल्या जागी उरलो. होतो तसे..!

कवितेतील ‘तू’ या शब्दाला अनेकार्थांचं वरदान लाभलेलं असतं. वाचक त्याचा जो अर्थ लावेल त्यानुसार पूर्ण कवितेचा आयाम बदलून जातो.. ‘शांतता’ कवितेच्या संदर्भात माझा न झालेला ‘तू’ म्हणजे अनिर्वचनीय शांत अवस्था होऊ शकते.

या कवितासंग्रहाच्या पान ३७ वर मित्रानावाची एक कविता आहे. तिनंही मला परत परत साद घातली... कितीही जवळचा मित्र असला तरी त्याचं संपूर्ण असणं तो सोबत असतानाही पुरेसं समजत नाही. मग शब्दांच्याही पलिकडं अथांग शांततेच्या गावात निघून गेलेल्या मित्राशी संवाद तरी कसा साधणार? या कवितेत शेवटी म्हटलंय,- ‘मित्रा, / निरोपाचा निःशब्द तरी ऐकू द्यायचास / धारणेच्या नव्या वळणावर / पुन्हा भेटण्यासाठी !’

कवीमनाला धारणेच्या प्रत्येक नव्या वळणावर शब्दांच्याही पलिकडच्या थांग न लागणार्‍या शांततेच्या गावी निघून गेलेल्या मित्राचा निःशब्द ऐकायचाय..!, ‘तू’ला आपलंसं करायचंय. मनापलीकडच्या मोहन रूपातली ‘शांतता’ समजून घ्यायचीय, अनुभवायचीय परोपरीने..! कवीमनाच्या या तहानेला तळ नाहीए..!!

आसावरी काकडे

१२.०९.२०२५

या तहानेला तळ नाही- कवितासंग्रह

हेमकिरण पत्की

सृजन संवाद प्रकाशन, ठाणे

संपर्क नंबर- ९८२०२७२६४६

Wednesday, 4 June 2025

उसवलेलं शिवता येईल का?

 वर्षा चोबे यांचा ‘उसवलेलं शिवता येईल का?’ हा कवितासंग्रह वाचताना संग्रहाच्या शीर्षकानंच प्रथम लक्ष वेधून घेतलं. या शीर्षकात संग्रहातल्या कवितांच्या समग्र स्वरूपाचे सूचन आहे हे कविता वाचल्यावर जाणवलं. व्यक्ती म्हणून जगताना जाणवत राहातं की स्व पासून समाजापर्यंत सर्व स्तरांवर वास्तव जागोजाग उसवत चाललं आहे. संवेदनशील मनाला ते शिवायला हवं हेही उत्कटतेनं वाटत असतं आणि ते शक्य होईल का? अशी साशंकताही सलत असते. उसवलेलं शिवणं ही प्रतिमा परंपरेनं स्त्री असण्याशी निगडित करून ठेवली आहे. वर्षा चोबे यांच्यातील बाईमाणूस या सर्व जाणिवा तळहातावर घेते, निरखत राहाते आणि अस्वस्थ होते.. या संग्रहातील कविता त्या पक्व अस्वस्थतेतून अभिव्यक्त झालेल्या आहेत.

जळल्यावर किंवा जाळल्यावर उरणारा ‘राखरंग’, आयुष्यांची ‘अनावृत्त कादंबरी’, खेळणं झालेली ‘मणिपुरी बाहुली’, ‘सोलमेट’, ‘सत्तांतर’ अशा कवितांमधून बाईचं दाहक वास्तव प्रखरतेनं व्यक्त झालंय. धीट अभिव्यक्ती असलेल्या अशा कविता हे या संग्रहाचं बलस्थान म्हणता येईल. ‘रांगोळी काल आणि आजही’, ‘तो कॉम्रेड’ अशा कवितांमधून नात्यांतलं, सामाजातलं वास्तव-चित्रं  दिसतं तसं सुंदर लय असलेल्या ‘सावली’ सरख्या कवितांमधून निसर्गाचे विभ्रमही अनुभवता येतात. या कविता मुक्तछंद, अभंग छंद, अष्टाक्षरी, दामयमक, गझलसदृश रचना अशा विविध आकृतीबंधात लिहिलेल्या आहेत. 

वातावरण निर्मिती करणार्‍या पूर्ण तपशीलाची मागणी करणार्‍या कथालेखनाचा पिंड असलेल्या वर्षाताईंनी सर्व तपशील मुरवण्याची गरज असलेले कवितालेखनही प्रभावीपणे केले आहे. ‘उसवलेलं शिवता येईल का?’ हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह. कथालेखनासाठी जोपासलेल्या त्यांच्यातील अलिप्त निरीक्षकाने त्यांच्या कवितेलाही सखोलता प्रदान केलेली आहे. कवितेतील या दमदार पदार्पणासाठी वर्षाताईना हार्दिक शुभेच्छा.

आसावरी काकडे

 जून २०२५

स्त्री चळवळ आणि माझी कविता

स्त्री-प्रश्नांची आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या चळवळींची ओळख मला प्रथम ‘स्त्री’ मासिकातून झाली. साधना आणि स्त्री ही दोन नियतकालिके आमच्याकडे येत असत. स्त्री मासिकाच्या समविचारी वाचक-मैत्रिणींना एकत्र  आणणार्‍या ‘स्त्री सखीमंडळा’च्या कार्यक्रमांविषयी वाचून मी त्या मंडळाची सभासद झाले. दर महिन्याला होणार्‍या मिटिंग्जना मी नियमित जायला लागले. घर आणि नोकरी याखेरीज बाहेर पडण्याचं ते आवडतं निमित्त झालं. तिथंच विद्याताईंची ओळख झाली. तेव्हा मी नुकतीच कविता लिहायला लागले होते. एका महिन्याच्या मिटिंगमधे मी एक कविता वाचली होती. त्यातल्या काही ओळी आठवतायत-

‘बरं होतं तेव्हा कळत नव्हतं जेव्हा  

लिहू वाचू लागलो पडवीमध्ये आलो  

आलं गेलं कळलं वाटलं उगीच कळलं  ....

 

ज्योतिबा आले कर्वे आले बायांनो शिका म्हणाले  

दोघी तिघी झाल्या तयार बाकिच्यांचा त्यांना नकार  

एक घराबाहेर पडली दुसरी दारामध्ये अडली... ’ ......

स्त्री शिक्षणाच्या प्रवासाचा धावता आढावा या कवितेत होता असं आठवतंय... विद्याताईंना ती कविता आवडली. त्यांनी ती ‘स्त्री’ मासिकासाठी मागून घेतली. यथावकाश ती प्रकाशित झाली... कवितेच्या माध्यमातून स्वतःतून बाहेर पडण्याची, शाळा.. कॉलेज.. अभ्यास.. नोकरी.. घर या परिघापलिकडल्या समाज या घटकाचं भान येण्याची ती सुरुवात होती...

लहानपणी अभ्यासाच्या पुस्तकांखेरीज वाचण्यासारखं आमच्या घरी काही नव्हतं. वडील सतत वाचत असायचे. पण ती पुस्तकं तत्त्वज्ञानाची असायची. आकार आणि आशय दोन्ही स्तरांवर जड असलेली. काहीतरी सांगा म्हणून मी वडलांजवळ गेले की ते मला त्यातलंच काही सांगायचे... नकळत त्या विषयाची आवड आणि जिज्ञासा निर्माण झाली. प्रत्यक्ष जगण्याचा अनुभव येण्याआधीच ‘हे सर्व विश्व आलं कुठून’, ‘त्यात आपलं स्थान काय?’, ‘आपल्या असण्याचा हेतू काय?’... अशा तत्त्वज्ञानातल्या मूलभूत प्रश्नांचे आकर्षण वाटू लागले. त्यांचा पाठपुरावा करावा एवढी कुवत माझ्यात नव्हती. त्या प्रश्नांनी माझ्यात अनाम अस्वस्थता पेरून ठेवली. ती अनावर झाली की मिळेल त्या फटीतून बाहेर पडू लागली. शाळेच्या शेवटच्या परीक्षेत, एस एस सी ला चारी तुकड्यात पहिली येऊन नॅशनल स्कॉलरशिप मिळवलेली मी अभ्यासातला रस गमावून बसले. कशीतरी बी कॉम झाले.

मग नोकरी.. लग्न.. जगण्याच्या अनुभवांना सामोरी जाऊ लागले. आता दुरून पाहताना लक्षात येतंय की खचून जावं असे होते ते अनुभव. पण ‘त्या’ प्रश्नांनी पेरलेल्या अस्वस्थतेची रेघ इतकी मोठी होती की जगण्यातल्या ज्वलंत प्रश्नांच्या रेघा त्याखाली झाकून जात होत्या. त्या प्रश्नांना मिळतील ती उत्तरं मी निमूट स्वीकारत राहिले. एक प्रकारची बधीरताच होती ती. जगण्याच्या तळाशी ‘त्या’ प्रश्नांनी पेरलेली अस्वस्थता आणि वर ही बधीरता अशा विचित्र कोंडीत असताना कवितेनं आयुष्यात प्रवेश केला. आणि डायरीतल्या कवितांना बाहेर पडण्यासाठी सखी मंडळाचा मंच मिळाला...

फक्त मंच मिळाला असं नाही. सखी मंडळाच्या मासिक कार्यक्रमांतील चर्चा, बंगलोर, हैदराबाद, भोपाळ, सोलापूर... अशा वेगवेगळ्या शहरांत झालेल्या सखी मंडळाच्या मेळाव्यांमधले विविध कार्यक्रम, विद्याताईंशी होत राहिलेला संवाद या सगळ्यामधून कवितांना वर्तमानातला आज-इथेचा जिवंत आशयही मिळाला. या नव्या परीघातील विचारांनी ‘त्या’ प्रश्नांची अस्वस्थता धूसर केली. त्यांना उत्तरं देऊन नाही तर त्यांचं स्थान दाखवून. ते प्रश्न मूलभूत महत्त्वाचे असले तरी वास्तवातले आताचे प्रश्न प्राधान्याचे आहेत हे लक्षात आणून देऊन..!

विश्वातील आपल्या स्थानाचा, हेतूचा विचार करणारी मी वर्तमानातल्या ‘मी’चा विचार करू लागले. भोवतीचं प्रखर वास्तव, त्या संदर्भातलं आपलं कर्तव्य या विचारांनी अस्वस्थ होऊ लागले. या अस्वस्थतेविषयी स्त्री मासिकाच्या तेव्हाच्या संपादक शांता किर्लोस्कर यांना एकदा पत्र लिहिल्याचं आठवतंय. त्यांचं छान उत्तरही आलं होतं. आता शब्द आठवत नाहीत पण त्यांनी या अस्वस्थतेचं स्वागत केलं होतं. ती कृतीशील व्हायला हवी हे त्या पत्रातून लक्षात आलं होतं.

त्या काळातला एक छोटासा प्रसंग आठवतो. कवितांमधे न मावणारं बरंच काही मी डायरीत नोंदवत असे. माझं डायरीलेखन म्हणजे ‘स्वतःशी संवाद साधणारं’ मी चालवलेलं दैनिक होतं. या ‘दैनिका’तल्या निवडक नोंदींचे संकलन ‘मी, माझ्या डायरीतून’ या नावानं अलिकडेच प्रकाशित झालं आहे. त्यातली एक नोंद अशी- ‘संध्याकाळी महर्षी कर्वे संस्थेतल्या कार्यक्रमाला गेले. तिथे नारी समता मंचात काम करणार्‍या पुष्पा रोडे भेटल्या. त्यांच्याबरोबर तिथल्या हॉस्टेलवर गेले. त्यांनी नोकरीला लावलेल्या एका बाईंना भेटायला. तिची अवस्था पाहून, तिची हकिगत ऐकून अस्वस्थ व्हायला झालं. अशा आणखी किती असतील. अन्याय अत्याचाराची किती भेसूर रूपं असतील. अशा विचारांनी थकायला झालं. मी माझ्या जागी अगदी सुखात असताना, भोवतीच्या अनंत प्रश्नांनी आतल्या आत माझं खचून जाणं ही कदाचित माझ्या सुखाची किंमत असेल. पण त्यांच्यापर्यंत ती पोचती होत नाहीए. या फ्रॉडला काय म्हणावं?’

अशा प्रत्येक अस्वस्थतेत विद्याताईंशी पत्रसंवाद हा मला सापडलेला मार्ग होता. विद्याताई तत्परतेनं आणि छान समजावणारं उत्तर द्यायच्या. त्यामुळे त्यांना पत्र लिहिताना अवघडलेपण यायचं नाही. ‘मी नुसता विचार करते. प्रत्यक्ष काही काम करत नाही. विचार करून नुसतं अस्वस्थ होण्याला काय अर्थ?’ ही रुखरुख मी बोलून दाखवायची तेव्हा त्या मला म्हणायच्या, विचार करणं ही पण एक कृतीच आहे. ती सगळ्यांना नाही जमत. विचार आणि लेखन बिनकामाचं नाही. त्यातून प्रत्यक्ष काम करणार्‍यांना बळ आणि दिशा मिळते. अस्वस्थ विचारांनी निष्क्रीय होण्यापेक्षा जमतं ते प्रामाणिकपणे करत राहाणं केव्हाही चांगलं... मग मी निरंकुश उमेदीने लेखनाकडे वळले. वेळोवेळी विषय देऊन विद्याताईंनी मला लिहितं ठेवलं. आता गीतालीताई पण हे काम करत आहेत.

हळूहळू लेखन हा माझा परीघ विस्तारणारा मार्ग झाला. लेखन म्हणजे कविताच. क्वचित लेख. वेगवेगळ्या संदर्भात कुणाकुणाला पत्र लिहिणं आणि डायरीलेखन... एवढंच. पण कुठल्या ना कुठल्या प्रकारे लिहित राहाणं ही माझी गरज होती. आजही आहे. मी नुसतं कधी वाचू शकत नाही. वाचताना समांतर विचार येत राहातात. काही पाहिलं, ऐकलं, अनुभवलं की त्या संदर्भात प्रश्न पडणं, त्यावर विचार होणं हा माझा स्वभाव आहे. विचारांचं ओझं पेलवेनासं झालं की ते मी शब्दांवर सोपवते. निराकार विचार शब्दांत उतरताना स्पष्ट होतात. विचारात न आलेलं, अव्यक्त राहिलेलं लिहितालिहिता शब्दात उतरतं. बरेचदा प्रश्न स्पष्ट होण्यातूनच आपले आपल्याला खुलासे मिळतात. ही लेखन-प्रक्रिया अनुभवण्यासारखी आहे.. समज आल्यापासून मी हे करतच होते. पण घर आणि नोकरी या परिघातून बाहेर पडून सखी मंडळात आल्यावर माझं विचारविश्व विस्तारत गेलं. कविता लिहिण्यापूर्वीचं मौन प्रवाही झालं.  

मनात अनाम अस्वस्थता पेरणार्‍या ‘त्या’ तात्त्विक प्रश्नांचं बोट सोडून मी वर्तमान वास्तवात रमू लागले... तेव्हा मी स्टेटबँकेत नोकरी करत होते. बँकेत जाण्यासाठी लूना घेतली होती. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी लूना चालवायला शिकले. पर्वतीजवळ घर आणि ऑफिस ससून हॉस्पिटल जवळ. एवढं अंतर लूनावर जा-ये करणं हा मी माझ्या शारीरिक, मानसिक कमजोरीवर मिळवलेला विजय होता. सकाळी साडेनऊला बाहेर पडून संध्याकाळी साडेसहापर्यंत घरी हे रूटीन छान बसलं होतं. एके दिवशी बँकेतलं काम संपायला उशीर झाला. अंधार पडायला लागला. लूनावर जायची भीती वाटायला लागली. पण पर्याय नव्हता. बाहेर पडले. धीर गोळा करून लूना सुरू केली आणि निघाले. रोजची ठरलेली वाट सहज पार करता आली. घरी सुखरूप पोचले. आधी भीती वाटली होती. पण प्रत्यक्षात सहज जमलं. हे काही फार मोठं धाडस नव्हतं. पण वेगवेगळ्या कारणांनी आलेल्या माझ्या मर्यादांना मला ओलांडता आलं याचा आनंद झाला. स्वसामर्थ्याची ओळख करून देणारा तो उत्कट आनंद कविताबद्ध झाला-

‘तुझ्या दिव्याचा लख्ख उजेड

नसतानाही

वाट स्वच्छ दिसते आहे !

संधीप्रकाशासारखा

तुझाच उजेड

अजून रेंगाळतोय ?

की

मी स्वयंप्रकाशी आहे ?

अनुभव छोटा असला तरी त्यातून मिळालेला ‘स्वयंप्रकाशी असू शकण्याचा’ प्रत्यय महत्त्वाचा आहे... या कवितेत तो अधोरेखित झाला आहे.

मिळून सार्‍याजणी मासिक १९८९ साली सुरू झालं. ऑगस्टच्या पहिल्याच अंकात माझ्या ‘प्रिय सखी’ या कवितेला स्थान मिळालं. छोट्या सुखवस्तू परिघात रमलेल्या मनाला त्यातून बाहेर पडण्यासाठी साद घालणार्‍या सखीला उद्देशून लिहिलेल्या या कवितेने माझ्यासह अनेकांना प्रेरणा दिली. आकाशवाणी दिल्ली तर्फे आयोजित, जयपूर येथे झालेल्या सर्वभाषी कवीसंमेलनात या कवितेची निवड झाल्यामुळे या कवितेचा सर्व भारतीय भाषांमधे अनुवाद झाला. ही कविता वाचकांच्या स्मरणात राहिलीय. अजून कुणी कुणी या कवितेचा शोध घेत माझ्यापर्यंत पोचतं..! ही कविता फक्त स्त्रियांना अंतर्मुख करते असं नाही. स्व-परिघात रमलेल्या कुणालाही त्यातून बाहेर पडण्यासाठी ती साद घालते. ‘आरसा’ संग्रहातली ही कविता वाचून ‘रारंगढांग’ या कादंबरीचे लेखक प्रभाकर पेंढारकर यांचे अशा आशयाचे पत्र आले होते. ते लक्षात राहिले आहे. ती कविता-

प्रिय सखी,

प्रिय सखी,

सध्या मी आटपाट नगरातील

एका भव्य पिंजर्‍यात राहाते आहे.

याच्या भिंतींना पाचूचा रंग आहे

आणि याला चांदीचे छत आहे !

याची दारं पारदर्शी आहेत.

आणि गंमत म्हणजे

ती बाहेरून नाही,

आतून बंद आहेत !

उडी मारून कडी काढता येईल

एवढीच ती उंच आहे..

पण इथल्या संगमरवरी फरशीला

गुरुत्वाकर्षण फार आहे !

उंच उडीचा सराव असूनही

उडी जमेनाशी झालीय.

नि आतल्या भव्यपणातच

मला वाटतं, मी आता रमू लागलीय !

 

‘चिऊताई, चिऊताई दार उघड’

असं म्हणत तू आलीस तर

अंघोळ घालते थांब माझ्या बाळाला

असंच काहीसं माझ्या तोंडून येईल.

पण सखी,

रागावून तू लगेच निघून जाऊ नकोस.

मला साद घालीत रहा.

मी केलेला उंच उडीचा सराव

बहुधा मला इथे रमू देणार नाही !

***

सुखवस्तू मन आटपाट नगरातल्या भव्य पिंजर्‍यात रमलेलं असणं, दरवाजा बाहेरून नाही आतून बंद असणं, उडी मारून कडी काढता येईल इतकीच ती उंच असणं, संगमरवरी फरशीला गुरुत्वाकर्षण फार असल्यामुळे उडी जमेनाशी होणं... या सर्व प्रतिमा पटकन रीलेट होणार्‍या आहेत. स्वतःतून बाहेर पडण्याची प्रेरणा देणार्‍या सखीमंडळातील वेगवेगळ्या उपक्रमांच्या प्रभावातून ‘साद घालत राहा’ असं म्हणणारी ही कविता जन्माला आली..

विद्याताईंच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या पाच संस्थांपैकी सखी मंडळ आणि मिळून सार्‍याजणी या दोन संस्थांमधे मी थोडी सक्रीय होते. एकदा अक्षरस्पर्श या नाविन्यपूर्ण ग्रंथालयाच्या कार्यकारिणीत काम करण्याविषयी मला विचारलं गेलं. तेव्हा मी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यामुळे लगेच हो म्हटलं. तिथे काम करण्यातून संपर्क-संवादाचे नवे मार्ग माझ्यासमोर खुले झाले. अक्षरस्पर्श मधल्या अक्षरगप्पांमधून, नवी पुस्तकं वाचण्यातून वेगवेगळ्या अनुभव-विश्वांचा परिचय झाला. त्या त्या लेखकांशी पत्र-संवाद होत राहिला. विचारांना नव्या दिशा दिसू लागल्या. अंतर्मुखता समृद्ध होत गेली. नव्या ऊर्जेसह माझ्या कवितेचा प्रवास चालू राहिला...

आसावरी काकडे

१३.३.२०२५

(‘मिळून सार्‍याजणी’ जून २०२५ अंकात पृष्ठ (१८,१९,३५) प्रकाशित)