निसर्गातील सौंदर्यानंदाची
अनुभूती शब्दांमधून रसिकांपर्यंत पोचवणार्या कवितेचा वारसा दमदारपणे पुढे
चालवणारा कवी नलेश पाटील यांचा ‘हिरवं भान’ हा उत्तम निर्मितीमूल्य असलेला कवितासंग्रह
पॉप्युलर प्रकाशनातर्फे अलिकडेच प्रकाशित झाला आहे. मुखपृष्ठावर गोपी कुकडे यांनी निसर्गाशी
एकरूप झालेल्या नलेश यांचं व्यक्तिमत्व पोर्टेटमधून साकारलंय. दारातली रांगोळी
पाहून घरातल्या प्रसन्नतेचा अंदाज यावा तसा पुस्तकाच्या या नेपथ्यावरून आतल्या
कवितांचा पोत लक्षात येतो.
‘कवितेच्या गावा जावे’ या कवितांच्या कार्यक्रमातून
कवी नलेश पाटील यांची लयीवर तरंगत येणारी कविता रसिकप्रिय झाली आणि मनामनांत
रेंगाळत राहिली. या ऐकलेल्या कविता आता संग्रहरूपात आल्यामुळे रसिकांना वाचायलाही
मिळतील. या संग्रहाचं निर्मिती-वैशिष्ट्य हे की यात एका प्रस्तावनेऐवजी अशोक
नायगावकर, अरुण म्हात्रे, अशोक बागवे, महेश केळुसकर, किशोर कदम आणि किरण खलप या
समकालीन नामवंत कवींनी या कवितांचं आणि या कवीचं एकेक मर्म उलगडून दाखवलेलं आहे.
हे वाचून कवितांकडे वळताना असं जाणवतं की हा संग्रह म्हणजे एक कवी आणि एवढे सारे
निवेदक यांची एक रंगलेली मैफलच आहे..!
या संग्रहातल्या कविता
वाचताना नलेश पाटील यांची अफाट कल्पनाशक्ती आणि त्यांच्या कवितेतील अनोखे
प्रतिमाविश्व ही वैशिष्ट्ये प्रकर्शाने जाणवतात. याची झलक दाखवणारी काही उदाहरणं-
‘‘आभाळाची समुद्रभाषा लाट लाट चल वाचू रे
तुषार बोले खडकांवरती मोरावाणी नाचू रे..’’ पृष्ठ २०
‘‘ही वाट असे संभाव्य नदीची खळखळणारी ओळ
की माती काळी क्षणात ओली निळी व्हायची वेळ..’’ पृष्ठ २१
‘‘चुटकीसरशी सूर्य पाखडीत पाकोळी ही आली गं
रानफुलांना ऊन चोपडीत उन्हात मिसळून गेली गं
...
नाही सावली पाकोळीला ती तर उडता उजेड गं
रूप आपुले उजेडावरी गिरवित गेला उजेड गं’’ पृष्ठ ९७
चित्रकार असलेला हा कवी शब्दांतूनही डोळ्यांसमोर अशी चित्रं उभी करतो.
शब्दांच्या नादाबरोबर निसर्गातल्या रंगांचं दर्शन घडवतो. अशा त्रिमितींमधून
कविताशय पोचवणार्या या ओळींवर गद्य भाष्य करणं म्हणजे जमून गेलेल्या चित्रावर
रेघोट्या मारण्यासारखं आहे.
या संग्रहात बहुतांश कविता लयबद्ध आहेत. काही मोजक्या कविता मुक्तछंदात आहेत.
त्यातही ही वैशिष्ट्ये जाणवतात. एका छोट्या, अगदी साध्या कवितेत नलेश यांनी कमाल
चित्र रेखले आहे- ‘निष्पर्ण वृक्षालाच’ या कवितेत म्हटलं आहे, ‘‘निष्पर्ण
वृक्षालाच / आपले घरटे समजून / एक भटके पाखरू / त्यात अंडे घालून निघून गेले /
चारा भरल्या चोचीने व वारा भरल्या पंखाने / ते परत आले / तेव्हा त्यास अंड्याच्या
जागी / एक चिमणे पान दिसले / आनंदाने बेहोश झालेले ते इवले पाखरू / क्षणाचाही
विलंब न लावता / झाडाच्या प्रत्येक फांदीवर / अंडी घालत सुटले / पाहता पाहता
झाडाचे घरटे / हिरव्या चिवचिवाटात बुडून गेले...’’ पृष्ठ ३८
निसर्ग-विभ्रमात बुडालेली नलेश यांची कविता डोळसपणे वास्तवाकडे पाहते तेव्हा मात्र
मनात उठलेली कळ शब्दांमधे पाझरल्याशिवाय राहात नाही. ‘वाटेचं एक बरं आहे’ (पृष्ठ
१०६), ‘इथे एक नदी वाहायची’ (पृष्ठ १२२) यासारख्या कवितांमधे सहजपणे हा सल व्यक्त झालेला
दिसतो.
या संग्रहातल्या काही कवितांमधे संत-कवितेतील आर्तता जाणवते. ‘भाग्य आले
उदयासी...’ (पृष्ठ १३०) या कवितेत ‘झाल्या ओठांच्या चिपळ्या, तुझ्या कीर्तनात दंग
/ वाजे हृदय मृदंग, धडधड पांडुरंग..!’ असं म्हणत पूर्ण देहात कसं पंढरपूरच वसलेलं
आहे त्याचं भावपूर्ण वर्णन केलेलं आहे. तर ‘माझ्या लेखणीत राही, काळ्या शाईची
विठाई’ (पृष्ठ १६२) या कवितेत आपली कविता कशी विठूमय झाली आहे याचं वर्णन आहे...
‘असा रचित मी जातो, जेव्हा ओळीवर ओळ / माझ्या कवितेची उभी, तेवू लागे दीपमाळ.’..
या दोन्ही कविता पूर्णच वाचायला हव्यात.
संग्रहाच्या सुरुवातीलाच कवी नलेश पाटील यांचा ‘अंतःस्वर’ उमटलेला आहे. या
छोट्याशा मनोगतात त्यांनी म्हटलं आहे, ‘कविता ही समीक्षातीत आहे असं मला नेहमीच
वाटत आलंय.’ म्हणूनच आपल्या आतल्या आवाजाला फुलू देत ते व्रतस्थपणे केवळ
निसर्गकविताच लिहित राहिले...! पण कवितेचे गाव वाट पाहात असताना कवितासंग्रहाची
तयारी करून, मनोगत व्यक्त करून हिरव्या दिशांच्या शोधात हा मनस्वी कवी मैफल
अर्ध्यावरच सोडून अचानक निघून गेला...!
त्यांच्या पश्चात अरुंधती पाटील यांनी नलेश यांच्या सुरेल दमदार आवाजातून रसिकांपर्यंत
पोचलेल्या या मैफलीतल्या कवितांचा ‘हिरवा भार’ आता अक्षर-रूपात रसिकांच्या हाती
सुपूर्द केलेला आहे.
आसावरी काकडे
9421678480
‘हिरवं भान’
कवितासंग्रह : कवी- नलेश पाटील
पॉप्युलर प्रकाशन,
मुंबई : पृष्ठे १६४. किंमत- ३२५ रु.
२२ सप्टे. २०१८ च्या साप्ताहिक सकाळमधे प्रकाशित
अप्रतिमच
ReplyDelete