एकेकाचे आयुष्य म्हणजे
एकेक कादंबरी असते. संस्कृतीच्या एका टप्प्यावर तिची सुरुवात झालेली असते. पण
तिच्या कथानकाचे धागेदोरे त्या
आयुष्याच्या पूर्वसंचिताशी जोडलेले असतात.
भूत-भविष्यातील संघर्षांशी त्यांचं नातं असतं. भोवतीचा परिसर आणि त्यात घडणार्या
घडामोडी कथानकाला नवनवे आयाम देत असतात. असंख्य पात्रे त्याना आशय पुरवत
असतात... आणि निवेदक हे सारं उत्कटतेनं सतत सांगू बघत असतो....
पण प्रत्येक आयुष्याची कादंबरी पुस्तक रूपात प्रकाशित होत नाही. ती काळाच्या
डायरीत मिटलेलीच राहते. मग आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर निवेदक स्वतःच ती
मिटलेली पानं उघडून पाहत राहतो. अंतर्मुख होतो. आठवणींची गर्दी जमते भोवती. एकेकीला
कुरवाळताना मन भरून येते. अशा भारावलेल्या अवस्थेत शब्दांची कृपा झाली तर अनावर आठवणींना कवितेच्या ओंजळीत घालता येतं. कवितेत व्यक्त होऊन मोकळं होता येतं. पण थांबता येत नाही.
व्यक्त झाल्याचा आनंद पुन्हा पुन्हा व्यक्त होण्याची ओढ लावणारा असतो. एकामागून एक
आठवणी शब्दरूपात प्रकटण्यासाठी आतूर होऊन रांगेत उभ्या राहतात...
निवृत्त शिक्षिका असलेल्या
श्रीमती ऊर्मिला शेपाळ यांनी अशा आठवणींना वेळोवेळी दिलेली शब्दरूपं ‘आठवांची
ओंजळ’ या कवितासंग्रहात एकत्रित केलेली आहेत. हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह आहे.
ऊर्मिलाताई सायन्सच्या शिक्षिका होत्या. त्यांचे वडील आणि पती दोघेही पोलीस
खात्यात कार्यरत होते. मात्र घरचे वातावरण साहित्य आणि संगीत यामधे रस घेणारे
असल्यामुळे उर्मिलाताईंची साहित्याची आवड जोपासली गेली. त्या लिहित राहिल्या. संवेदनशीलतेनं
जगताना नाती, निसर्ग, समाज.. हे सगळे विषय जिवालगतचे होतात. स्वाभाविकपणे ते
त्यांच्या कवितांचे विषय झाले आहेत. त्यांच्या कवितांमधे त्यांची स्वतःची अशी
जीवनविषयक जाण आहे. त्यांना शब्दांचा लळा आहे. लिहिता लिहिता तेही जिवलग होऊन
जातात. ‘शब्द’ या कवितेत त्यांनी शब्दांच्या अपार सामर्थ्याचं वर्णन केलं आहे. या
कवितेत त्यांनी म्हटलंय, ‘शब्दांच्याच कुशीत विसावतात भाषा / त्यांना नसतात
सीमांच्या रेषा..’
जीवनाविषयीचा त्यांचा
स्वतःचा दृष्टिकोन काही कवितांमधून व्यक्त झाला आहे. अशा कवितांची काही उदाहरणं
पाहण्यासारखी आहेत.- ‘जीवनाचा अर्थ’ या कवितेत त्या म्हणतात,
‘जीवनाचा अर्थ नवा मागायचा
नसतो
आयुष्याच्या
संध्याकाळी तो जाणायचा असतो’
‘नवजीवन’ या कवितेत म्हटलंय,
‘कन्यादान म्हणू नये त्यासी असे ते नवजीवन
सोहळा असे हा पवित्र दोन जिवांचे होई मिलन’
‘आयुष्याचं गणित’ या
कवितेत हे गणित सोडवण्याच्या रीतींविषयी सांगत शेवटी म्हटलं आहे, या पद्धती
शिकायला ‘गरज भासते परिपूर्ण शिक्षकाची / गुरूदक्षिणा मात्र ज्याने त्याने वागण्यातून
द्यावयाची..’ आपल्या प्रत्यक्ष वागण्यातून गुरूदक्षिणा द्यायची हा विचार
महत्त्वाचा आहे.
‘आजीची गोधडी’ या कवितेत तर जीवनाचे सगळे आयाम आलेले आहेत. ऊर्मिलाताईंनी आजीचं
जगण्यात रममाण असणं गोधडी विणण्याच्या प्रतिमेतून चित्रित केलंय.
‘दृश्य’, ‘वृक्षमित्र’, ‘ऋण पावसाचे’ या निसर्गकवितांमधूनही उर्मिलाताई निसर्गाच्या
विभ्रमांचे वर्णन करता करता त्याचे जगण्याशी असलेले आंतरिक नाते लक्षात आणून
देतात.
माणसाचं मन ही एक
विलक्षण गोष्ट आहे. आजवर त्याविषयी असंख्य तर्हांनी लिहिलं गेलं आहे. तरी
कोणत्याच विश्लेषणाच्या चिमटीत मनाला धरता आलेलं नाही. त्याचं गूढ प्रत्येक कवीला सतत
आवाहन करत राहिलं आहे. ऊर्मिलाताईंच्या मनाविषयीच्या दोन कविता आहेत. ‘मन’ या
कवितेत त्यांनी मनाच्या विचित्र खेळांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्याशी असलेलं नातं
परोपरीनं सांगून शेवटी म्हटलं आहे,
‘मन धावे सैरभैर त्याचा सारीकडे वावर
धाक नाही त्यास कोणाचा त्याला घाला गं
आवर’
कसाही विचार केला तरी मनाचा थांगपत्ता लागत नाही. ‘मी ‘मन’ या दुसर्या कवितेत
मन स्वतःच आपली ओळख करून देतंय. पण त्यालाही ते जमत नाहीए. या कवितेत म्हटलंय,
‘मी मन, कशी करून देऊ माझी
ओळख?
तुमच्या देहात माझी वस्ती
पण कुणा नाही माझी पारख’
ऊर्मिलाताईंचा ‘आठवांची ओंजळ’ हा कवितासंग्रह
अशा विविध कवितांनी सजलेला आहे. आतापर्यंत स्वतःच्या डायरीत राहिलेल्या या कविता
आता पुस्तक रूपात रसिकांपर्यंत पोचतील. त्यांना भरघोस प्रतिसाद मिळेल. त्यातून
नव्याने लिहिण्याची प्रेरणा मिळत राहिल. कवितेच्या अधिकाधिक व्यासंगातून त्यांचं
कवितेशी असलेलं नातं दृढ होत राहिल. या प्रथम प्रकाशनाच्या निमित्तानं ऊर्मिलाताईंना
अधिक चांगल्या कवितेतून व्यक्त होण्यातला आनंद सदैव मिळत राहो ही हार्दिक शुभेच्छा..!
आसावरी काकडे
१३.१२.२०१८
No comments:
Post a Comment