रोजचं
आयुष्य जगत असताना लहान–मोठी सुख-दु:खं वाट्याला येत असतात. भोवतीचं वातावरणही कधी सुखावणारं असतं तर कधी अस्वस्थ करत असतं. या सगळ्याचे प्रतिध्वनी मनात उमटत असतात. मन भारावून जातं
अशा प्रतिध्वनींनी तेव्हा व्यक्त व्हावंसं वाटतं. ही अगदी मूलभूत गरज आहे
माणसाची ....‘अन्न –वस्त्र - निवार्या’ इतकी....!
व्यक्त
होण्यासाठी शब्द हे सर्वात जवळचं माध्यम. त्यातून कुणाला कवितेतून व्यक्त होता येत असेल तर
त्यासारखा दुसरा आनंद नाही. कवितेतून व्यक्त होण्यात दुहेरी प्रक्रिया घडत असते. कविता
लिहिणार्याला स्वतःला तर व्यक्त झाल्याचा आनंद मिळतोच पण ती वाचणार्यालाही
तेवढाच आनंद मिळतो ...!
अनुराधा
काळपांडे यांचा ‘मन परिमळ’ हा पहिलाच कवितासंग्रह प्रकाशित होतो आहे.
त्यातल्या कविता वाचून प्रस्तावना लिहिताना व्यक्त होण्याची गरज किती उत्कट असते
हे जाणवलं. मनातल्या वेगवेगळ्या भावना त्यांनी आपल्या कवितांमधून व्यक्त केल्या
आहेत. ईश्वर-कल्पना, भक्ती, ईशकृपा, अशा
विषयांवरील कवितांमधली ‘ईश्वर’ ही कविता मला विशेष
आवडली.
दुष्काळ, भ्रष्टाचार,
अत्याचार... हे भोवतीचं वातावरण अनुराधाताईंना अस्वस्थ करतं. त्यासंदर्भातले आपले विचारही त्यांनी कवितेतून मांडले आहेत. ‘शेतकर्यास’ या कवितेत त्यांनी शेतकर्याला
दिलेला सल्ला अगदी भावपूर्ण आहे. त्या म्हणतात.....
‘सावता माळ्यापारी धरी विठू दर्शनाची
कास
अर्ध्यावरी सोडून डाव का त्रास सार्या
जीवास?’
‘अंधश्रद्धा निर्मूलन’
नावाची आणखी एक कविता आहे. त्यातील विचार वाचकाला विचार करायला लावतील. ‘अंबेची आळवणी’ करणारं, ‘दत्तसेवा’ करणारं भाऊक मन ‘विज्ञानाचा धरा तुम्ही
हेका.....’ असं तळमळून सांगतं आहे. हे विशेष महत्वाचं वाटलं.
या
संग्रहात ‘आम्रवृक्षाप्रती’,
‘श्रावणधारा’, ‘वसंताची शान’ अशा काही निसर्ग
कविताही आहेत. आम्रवृक्ष त्यांना दोस्त
वाटतो तर घराची खिडकी त्यांना जीवनसखी
वाटते. ती निसर्गाचं दर्शन तर घडवतेच. पण मन विषण्ण असताना, सानुल्यांची वाट पाहताना सोबतही करते.
कविता
लिहिताना कविताही सखी होऊन जाते ! या माध्यमाविषयी आतून काही उमगू लागतं आणि तोच
कवितेचा विषय होतो. अनुराधाताईंनी याविषयीही लिहिले आहे. ‘कविता’ या कवितेत म्हटलंय-
‘कविता स्फुरते कविता फुलते
कशी कुणाला ठावे’
‘जर्जर जरा’ या कवितेत
वृद्ध अवस्थेचं प्रत्येयकारी वर्णन केलेलं आहे. पण त्यात तक्रारीचा सूर
नाही. देह जर्जर असला तरी मन तरूण आहे असं शेवटी त्यात म्हटलं आहे.
या
संग्रहात हलकीफुलकी विडंबन गीतं आणि बालगीतंही आहेत.
‘मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा’ या गीतावरील विडंबन पाहा---
‘हिंडता हिंडता मी सहज पाहिला होता
मज घेऊन दे हा सेट आताच्या आता !’
‘प्रश्न बालमनीचे’ या
कवितेत म्हटलं आहे---
‘कावळे साळूंकी बुलबुल सारे पक्षी
छप्पर नसलेल्या घरात त्यांना
आई देव कसा रक्षी ?’
‘ज्ञानप्रकाश’, ‘ध्यास’ अशा काही कवितांमधून
अंतर्मुख विचार व्यक्त झाले आहेत. ‘ध्यास’ कवितेत म्हटलं आहे.....
‘जुन्यातुनी नवे जन्मे
नव्यातुनी पुन्हा नवे
नव्याचीही आस जीवा
नवनिर्मितीचा ध्यास हवा !’
अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता या
संग्रहात वाचायला मिळतात. कविता
लिहिता लिहिता लक्षात येतं की अधिक
चांगल्या कवितेची वाट सोपी नाही. श्रेष्ठ कवितेपर्यंत पोचणं अवघड आहे. पण प्रवास
कितीही अवघड असला तरी सुरवातीचं पाऊल उचलायला तर हवं! अनुराधाताईंना याची जाण आहे. आतापर्यंत
स्वांतसुखाय लिहिलेल्या या कविता भावंडांनी आग्रह धरल्यामुळे त्या पुस्तक-रूपात आणत आहेत. या
निमित्ताने त्यांच्या काव्यप्रवासाला हार्दिक शुभेच्छा देते- अधिक चांगली कविता त्यांना अधिक चांगला आनंद
मिळवून देवो !
आसावरी
काकडे
9762209028
asavarikakade@gmail.com
४ सप्टेबर २०१६
No comments:
Post a Comment