Sunday, 2 September 2018

संत मीराबाईंची कविता आणि कवितेतल्या मीराबाई-


भारतात अनेक संत होऊन गेले. प्रत्येक राज्यातील भाषा, ऐतिहासिक, भौगोलिक पार्श्वभूमीनुसार प्रत्येकाच्या संतपणाची जातकुळी भिन्न असली तरी सर्वांमधे एक समान धागा आहे आणि तो म्हणजे ईश्वर-भक्ती..! कुणी ईश्वराचं निर्गूण निराकारत्व जाणून घेऊन ज्ञानोत्तर भक्तीला प्राधान्य दिलं तर कुणी कर्मयोगाचे पालन करत कुटुंबात राहून, सामाजिक प्रबोधन करत भक्तीमार्गाचा प्रसार केला. राजघराण्यात जन्माला आलेल्या संत मीराबाईंनी पूर्ण समर्पण भावानं एकनिष्ठ भक्ती केली. त्यांचं संतपण मधुरा भक्तीत विलीन झालेलं होतं.

भक्ती या समान धाग्यामुळं इतर भाषेतले संतही सर्वत्र वंदनीय झाले. त्यांच्या संतत्वाचा सहज स्वीकार झाला. त्यांची काव्यमय शिकवण समजून घ्यायचा प्रयत्न होत राहिला. आपल्या भजन-कीर्तनात ती सामावली गेली. संत मीराबाईंची पदं तर विशेषच लोकप्रिय आहेत. कथा, कादंबरी, कविता.. अशा साहित्यामधून, चित्रपटांमधूनही मीराबाईंचा परिचय जनमानसात रुजला. ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी मीराबाईंच्या साठ निवडक पदांचा अनुवाद करून त्यांच्या कवितेची ओळख मराठी वाचकांना करून दिलेली आहे. या सगळ्या माध्यमांमधून सतत भेटत राहिल्यामुळे संत मीराबाई मराठी मनाला कधी परक्या वाटल्या नाहीत.

संतसाहित्याला वाहिलेल्या ‘आनंदघन’ या दिवाळीअंकात या वर्षी वेगवेगळ्या अंगानं मीराबाईंचे संतत्व समजून घेण्याचा प्रयत्न होतो आहे. ‘संत मीराबाईंची कविता आणि कवितेतल्या मीराबाई’ हा त्यातलाच एक पैलू. खरं तर कवी आणि त्याची कविता एका पातळीवर अभिन्न असतात. कवीचे व्यक्तित्वच त्याने लिहिलेल्या प्रत्येक कवितेत डोकावत असते. एकेक कविता म्हणजे एकेका अँगलमधून त्यानं स्वतःच चितारलेलं स्वतःचं पोर्ट्रेट असतं. तरी त्याचं समग्र असणं त्याच्या कवितेत सामावू शकत नाही. संत मीराबाईंसारख्या कवयित्रीच्या मनाचा ठाव तर त्यांच्या पदांमधून पूर्णतः लागणं अशक्यच आहे. तरी त्यांची पदं आणि त्यांचं व्यक्तित्व यांच्यातला अनुबंध तपासण्यातून आपण त्यांच्या भक्तीची जातकुळी जाणून घेऊ शकतो का हे पाहता येऊ शकेल.

त्यासाठी त्यांची पदं समजून घ्यायची तर त्यांचं उपलब्ध चरित्र थोडक्यात जाणून घ्यायला हवं. मीराबाईंचा कार्यकाल अंदाजे १४९८-१५४७ असा मानला जातो. तो मोघल साम्राज्याचा काळ होता. त्यांचा जन्म १४९८ मधे राजघराण्यात झाला आणि १५१६ मधे त्यांचं चितोडच्या राणा संगाच्या ज्येष्ठ मुलाशी- युवराज भोजराजाशी लग्न झालं. लहानपणीच आईचे निधन झाल्यामुळे विष्णुभक्त असलेल्या आजोबांकडे त्या वाढल्या. तिथे त्यांच्यावर भक्तीचे संस्कार झाले. संतसाहित्य, आध्यात्मिक आणि पौराणिक साहित्याशी त्यांचा चांगला परिचय होता... लहानपणी एका साधूकडून त्याना मिळालेली कृष्णाची मूर्ती, तोच आपला पती मानणं, सासरी झालेला छळ... विषप्रयोग... अशी मीराबाईंविषयीची माहिती आख्यायिकांमधून आणि काही प्रमाणात त्यांच्या पदांमधून कळते. पण प्रमाण माहिती फारशी मिळत नाही असे त्यांच्याविषयीच्या लेखनात म्हटलेले दिसते. त्या जन्मापासून लग्नानंतरचा काही काळपर्यंत राजस्थानात होत्या. पतीनिधनानंतर काही वर्षांनी वृंदावनात गेल्या. शेवटी त्यांचे वास्तव्य व्दारकेत होते.. मीराबाईंच्या अशा चरित्रविषयक माहितीवरून लक्षात येतं की ऐहिक स्तरावर वैभवसंपन्न आयुष्य लाभूनही राजकीय, सामाजिक, कौटुंबिक स्तरांवर अस्थिरता, सर्वत्र कलहाचे वातावरण, जवळच्या व्यक्तींचे मृत्यु.. अशा गोष्टींमुळे ऐहिक जीवनाविषयी त्यांच्या मनात वैराग्यभाव जागा झाला असेल आणि त्यांच्यावर झालेल्या आध्यात्म-भक्तीच्या संस्कारांमुळे त्यांनी सामान्य जीवनाचा त्याग करून भक्तीमार्ग स्विकारला असेल.
मीराबाईंना काव्य, संगीत, नृत्य.. या कला चांगल्या अवगत होत्या. त्यांनी आपला आर्त उत्कट भक्तीभाव काव्यरूपात शब्दबद्ध केला. इतकंच नाही तर ही पदं स्वतः गाऊन, नाचून, उघडपणे संतांना बरोबर घेऊन त्या आपला भक्तीभाव व्यक्त करत असत. त्यांच्या समूहसाधनेचाच हा भाग होता. त्यांची पदं अत्यंत प्रभावी आणि हृदयस्पर्शी असल्यामुळे मौखिक परंपरेतून सर्वदूर पसरली आणि टिकली. त्यातली सुमारे ५०० पदं आजही उपलब्ध आहेत. पण त्यात प्रक्षिप्त भाग बराच आहे. त्यामुळे उपलब्ध पदांमधे अनेक भाषांचे मिश्रण आढळते. मूळ काव्य-रचना १५-१६व्या शतकातली राजस्थानी, ब्रज आणि गुजराती या भाषांमधे आहे. पण त्यात पंजाबी, खडी बोली.. इ. भाषांमधले शब्दही आढळतात. मीराबाईंच्या काव्याचा विषय प्रामुख्यानं कृष्ण-भक्ती.. विरह, मीलन.. हा आहे. पण काही पदांमधे वैयक्तिक आणि सामाजिक संदर्भही आढळतात. उत्कटता, भाव-सौंदर्य, शब्दमाधुर्य, नादमयता, गेयता, चित्रात्मकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मप्रचीतीचं सच्चेपण... ही त्यांच्या काव्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

अशा काही निमित्ताने मीराबाईंविषयी अधिक माहिती मिळवणं, त्यांच्या काव्याची पार्श्वभूमी आणि प्रेरणा समजून घेणं या स्तरावर थोडा अभ्यास आणि विचार होतो. त्यातून मीराबाईंची विविध रूपं समोर येतात... भारतीय समाजाच्या नजरेत- अव्दितीय, श्रेष्ठ संत, मध्ययुगीन भारतीय साहित्यात स्त्री-विद्रोहाची विधायक सुरुवात करणारी क्रांतिकारी कवयित्री, स्त्रीजातीच्या आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी निर्धारानं लढणारी सत्याग्रही... इत्यादी आणि सासरच्या नजरेत कुलनाशिनी... तर पतीच्या नजरेतलं इतिहासाला माहीत नसलेलं प्रश्नार्थक रूप...! मीराबाईंच्या उपलब्ध पदांमधून या सर्व रूपांतील मीराबाईचं समग्र आकलन होणं अवघड आहे. पण त्यांच्या पदांमधून त्यांच्या भक्तीतील उत्कटतेचा प्रवास जाणवतो. तो समजून घेताना संत तुकारामांचे अभंग आठवत राहतात. त्या आधारे मीराबाईंच्या भक्तीचं स्वरूप जाणणं सोपं होतं...
उदाहरण म्हणून काही प्रातिनिधिक पदं पाहता येतील-

पद १-
“म्हांरां री गिरधर गोपाळ, दूसरा णा कूयां ।
दूसरां णां कोयां साधां, सकळ ळोक जूयां ॥
भाया छांड्या बंधां छांड्या, छांड्या संगा सूया ।
साधां संग बैठ बैठ, लोक लांज खूयां ॥
भगत देख्यां राजी ह्ययां, जगत देख्यां रूयां ।
असवां जळ सींच सींच, प्रेम बेळ बूयां ॥
दधी मथ घृत काढ लयां, डार दया छूयां ।
राणा विष रो प्याळा भेज्यां, पीय मगण हूयां ॥
अब त बात फेळ पड्या, जाण्यां सब कूयां ।
मीरां री लगण लग्यां, होणा हो जो हूयां ॥३॥”

भावार्थ- ‘हे जग मी पाहिलंय आणि मला कळून चुकलंय की गिरधर गोपालाखेरीज आता माझं असं कोणी नाही. मी सर्व सोयरेजनांचाच काय तर भक्तीत रमलेल्या साधूंच्या संगतीत राहताना लोकलज्जेचाही त्याग केला आहे. याचा राग येऊन राणाजींनी मला विषाचा पेला पाठवला... पण त्यामुळे माझा भक्तीभाव अधिकच दृढ झाला. हे सर्वांना माहिती झालंय. आता जे व्हायचं असेल ते होऊदे....’  
चरित्रात्मक तपशील असलेल्या या पदात लौकिक जीवनाचा पूर्ण त्याग आणि गिरधर गोपालाखेरीज आता माझं असं कोणी नाही या निर्णयाप्रत पोचणं हा टप्पा मीराबाईंनी गाठलेला आहे असं जाणवतं.  

पद २-
“हेरी म्हां तो दरद दिवाणी, म्हारा दरद णा जाण्यां कोय ॥
घायळ री गत घायळ जाण्या, हिवडो, अगण संजोय ।
जौहर कीमत जोहरां जाण्यां, क्या जाण्यां जिण खोय ॥
दरद री मारयां दर दर डोळला, बैद मिळया णा कोय ।
मीरा री प्रभु पीर मिटांगां, जद बैद सांवरो होय ॥२१॥”

भावार्थ- ‘सर्वस्वाचा त्याग करून मी त्याला आपलं म्हटलं पण त्याचं साधं दर्शनही होत नाहीए. त्याच्या विरहाच्या दुःखानं मी पार वेडी झालीय. या दुःखाची प्रत कोणाला कळण्यासारखी नाही. अशा विरहाच्या आगीत जो होरपळलाय त्यालाच ते समजू शकेल. रत्नाची किंमत रत्नपारखीच करू शकतो. इतर दगड समजून ते फेकून देतील. या दुःखावर औषध मिळावं म्हणून वैद्याच्या शोधात मी दारोदार भटकले पण कोणी वैद्य मिळाला नाही. आता तो प्रियतमच वैद्य बनून येईल तेव्हाच विरहाग्नी शांत होईल.’
इथे संत तुकारामांच्या ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस....’ या अभंगातील ईश्वरभेटीचा आकांत आठवतो. मधुरा भक्तीतला हा अत्यंतिक उत्कट असा विरहाचा टप्पा आहे.

पद ३-
“सांवरो म्हारी प्रीत णिभाज्योजी ॥
थे छो म्हारो गुण रो शागर, औगुण म्हां विशराज्यो जी ।
ळोक णां शीझ्यां मण णा पतीज्यां मुखड़ा सबद शुणाज्यो जी ॥
दासी थारी जणम जणम री, म्हारा आंगण आज्यो जी ।
मीरां रे प्रभु गिरधरनागर, बेडा पार ळगाज्योजी ॥३०॥”

भावार्थ- ‘हे प्रियतम, आपलं प्रेम आता तूच निभावून ने. तू गुणांचा सागर आहेस. माझे अवगुण नजरेआड कर आणि माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. ज्यांना मी सोडून आलेय ते माझ्या प्रेमाविषयी शंका घेताहेत कारण तू अजून मला आपलंसं केलं नाहीएस. आता तू स्वतःच येऊन माझ्या प्रेमाचा स्वीकार केल्याचे सांग. मी जन्मोजन्मीची तुझी दासी आहे. मला भवसागरापार घेऊन जा.’
अशा काही पादांमधे जाणवतं की मीराबाई आपल्या प्रेमातलं सच्चेपण तपासून बघतायत. माझं प्रेम खरं असेल तर त्याचा स्वीकार केल्याचे येऊन सांग, आणि तूच ते निभावून ने असं प्रियतमाला आळवतायत.

पद ४-
“पग बांध घुंघरयां णाच्यां री ॥
ळोग कह्यां मीरां बावरी, शाशू कह्या कुळनाशां री ।
विख रो प्याळो राणा भेज्यां, पीवां मीरां हांशां री ॥
तण मण वारयां हरि चरणां मां, दरसण अमरत पाश्यां री ।
मीरां रे प्रभु गिरिधरनागर, थारी शरणं आश्यां री ॥४९॥”

भावार्थ- ‘प्रियतमाला रिझवण्यासाठी मी पायात घुंघरू बांधून नाचते आहे. माझी ही बेभान अवस्था पाहून लोकांना वाटतं मला वेड लागलंय. सासूला तर मी कुलनाशिनी वाटते आहे. शासन म्हणून मला विष दिलं गेलं. पण ते प्यायल्यावर मला दर्शनामृत प्राप्त झालं.. आता मी सदैव तुझ्या चरणांपाशीच राहीन.’
या टप्प्यावर मीराबाईंची ईश्वरभेटीची आस शिगेला पोचलीय. देहभानही उरलं नाही. ही एकप्रकारे माणसातून उठण्याचीच अवस्था...! ही भक्तीमार्गातली फार पुढची अवस्था आहे. संत तुकारामांनी या विषयी म्हटलंय, ‘देवाची ते खूण आली ज्याच्या घरा / त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा..!’

पद ५-
“माई म्हा गोविण्द गुण गाणा ॥
राजा रूठ्यां णगरी त्यागां, हरि रूठ्यां कठ जाणा ।
राणा भेज्यां विख रो प्याळा, चरणामृत पी जाणा ॥
काळा णाग पिटारयां भेज्यां शाळगराम पिछांणा ।
मीरां गिरधर प्रेम बावरी, सावळ्या वर पाणा ॥६३॥”

भावार्थ- ‘राजा पती रागावला म्हणून मी त्याचं नगर सोडून बाहेर पडले. पण ब्रह्मांडनायक असलेला माझा प्रियतम जर माझ्यावर रुष्ट झाला तर मी कुठे जाणार? म्हणून आता गोविंद गुणगान करत त्याला आळवत राहाणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय ठरलेलं आहे. कारण विषाचा पेला, काळा नाग पेटीतून पाठवून माझा नाश करण्याचा प्रयत्न झाला. पण त्या सगळ्यामधे मला हरिचंच दर्शन झालं. आता त्याला सोडून मी कुठेही जाणार नाही...!’
वाट्याला आलेल्या जीवघेण्या संकटांमुळेच मीराबाईंना संसारत्याग करणं सोपं झालं, त्यांची श्रद्धा अविचल झाली आणि ‘माई म्हा गोविण्द गुण गाणा’ हे जीवनाचं लक्ष निश्चित करता आलं. मीराबाईंची ही अवस्था “हाचि नेम आतां न फिरें माघारी / बैसलें शेजारी गोविंदाचे..!” या संत तुकारामांच्या अवस्थेची आठवण करून देणारी आहे.

मीराबाईंच्या कवितेमधून दिसणारा त्यांच्या भक्तीच्या उत्कटतेचा हा चढता आलेख म्हणजे केवळ त्यांच्या कवितेचा ढोबळमानाने लावलेला अन्वयार्थ आहे. आणखी खोलात शिरून, पदांमधील भावाशयाशी एकरूप होऊन, भाषेचे अडसर दूर करून मीराबाईंची ‘कविता’ समजून घेतली तर त्यांच्या भक्तीतल्या उत्कटतेचा प्रवास याहून वेगळा जाणवू शकेल. राजवैभवाचा आणि भोजराजासारख्या पतीचा त्याग करून इतक्या समर्पण भावनेनं एका मूर्तीच्या, खरंतर अमूर्ताच्या मागे लागण्यातली आंतरिक अपरिहार्यता समजून घेता येईल. तटस्थपणे दुरून विचार करताना भक्ती, त्यातही मधुरा भक्ती ही काय चीज असेल?... त्यासाठी आयुष्यच्या आयुष्य कुणी कसं आकांत करू शकतं?... असे प्रश्न पडू शकतात. आणि या संदर्भातल्या रूढ समजूती आणि आपसुक होत राहाणारे संस्कार यातून मिळणारी भाबडी उत्तरं अपुरी वाटतात. पण या असमाधानातून या सगळ्याचंच ‘पुनर्वाचन’ करता आलं तर मनात निर्माण होणार्‍या प्रश्नार्थक जिज्ञासेला सत्याच्या जवळ जाणारी उत्तरं मिळू शकतील. ‘मीराबाईंची कविता आणि कवितेतल्या मीराबाई’ या विषयीचं हे लेखन म्हणजे या दिशेनं टाकलेलं एक पाऊल आहे..!

आसावरी काकडे
२२ जून २०१८


(या लेखात उद्‍धृत केलेली सर्व पदे श्री ब्रजेन्द्रकुमार सिंहल यांच्या भारतीय विद्या मन्दिर या संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘मेरे तो गिरधर गोपाल’ या संशोधनपर ग्रंथातून घेतलेली आहेत.)

आनंदघन दिवाळीअंक २०१८

खोद आणखी थोडेसे...


आयुष्य समृद्ध करण्यासाठी आपण सतत संपत्ती, ज्ञान, कीर्ती, यश... असं काही ना काही मिळवण्याच्या मागे लागलेले असतो. इच्छेच्या तीव्रतेनुसार चालत किंवा धावत तिचा पाठपुरावा करतो. आपली सर्व शक्ती पणाला लावतो. प्रयत्नांती कधी ते मिळून जातं तर कधी हाती लागता लागत नाही. मग एका टप्प्यावर येऊन हताश होऊन आपण थांबतो. हे आपल्या आवाक्यातलं नाही म्हणून निराश होऊन मागं फिरू लागतो... हार मान्य करू लगलेला तो क्षण कसोटीचा असतो. कारण आपली क्षमता संपत आलेली असते. आणि आपली तहान भागवणारं पाणी अगदी थोड्या प्रयत्नांच्या अंतरावर असू शकेल असा विचार करायचं त्राण आपल्यात राहिलेलं नसतं. अशा वेळी प्रयत्नांवरचा विश्वास वाढेल असा धीर कुणी दिला तर किती आधार वाटेल ना? 

‘खोद आणखी थोडेसे’ ही कविता अशा कसोटीच्या क्षणी धीर देणारी, प्रयत्नांना बळ देणारी आहे. कवितेच्या सुरुवातीलाच म्हटलं आहे,


                       ‘खोद आणखी थोडेसे 
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी...’

‘तहान’ भागवणारं ‘पाणी’ मिळवण्यासाठी खोदत तुम्ही बरेच खाली, पाणी लागण्याच्या अगदी जवळ गेलायत. आता आणखी थोडेसेच प्रयत्न लागणार आहेत. पण थकून तुम्ही थांबलायत... अशा नेमक्या वेळी ‘खोद आणखी थोडेसे / खाली असतेच पाणी’ हा उमेद वाढवणारा संदेश मिळतो. पुढे म्हटलं आहे, सगळी नाणी खोटी नसतात... म्हणजे या पूर्वी काही प्रसंगात अनुभवल्याप्रमाणे सगळी माणसं वाईट, फसवणारी नसतात. काही मदत करणारीही असतात... तेव्हा निराश होऊन थांबू नका. प्रयत्न चालू ठेवा..

     हे समजावणं एका कवितेच्या, प्रतिमांच्या माध्यमातून आहे. ‘आणखी थोडं खोद..’, ‘खाली पाणी असतं..’, ‘नाणी खोटी नसतात..’ या म्हणण्याचा इथे शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीए. त्यातून सूचित केलेला अर्थ समजून घ्यायचा. कवितेतल्या प्रतिमा म्हणजे ‘लेकी बोले सुने लागे’ अशा असतात. त्यांचा शब्दशः अर्थ एक असतो. पण सूचितार्थ वेगळाच असतो. तो अनेकार्थी होऊन अनेकांना मार्गदर्शक ठरतो. इथे खोदणे ही क्रिया प्रयत्नांची निदर्शक आहे. तर पाणी म्हणजे एक प्रातिनिधिक साध्य आहे. आणि सगळी नाणी खोटी नसतात हा एक सकारात्मक दिलासा आहे.
     कवितेत पुढं म्हटलंय-   

‘घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणार्‍या पानी.’

परोपरीनं समजावणं चाललं आहे. त्यासाठी कवितेत वेगवेगळ्या प्रतिमा आल्या आहेत. आपल्याला काही हवं असतं तसं काही म्हणायचंही असतं. पण आपण बोलत नाही. कधी ते स्वतःलाच उमगलेलं नसतं. तर कधी नेमकेपणानं सांगायचं कसं हे कळत नसतं. कधी ते जाणणारं कोणी समोर नसतं तर कधी सांगायची भीती किंवा संकोच वाटत असतो... कवितेत म्हटलंय प्रत्येकाचं आपलं असं एक गाणं मनात दडलेलं असतं. ते बाहेर पडू द्यावं. ओठ घट्ट मिटून घेऊ नयेत. गाणं मनात कसं असतं ते सांगताना एक उदाहरण दिलंय... वाळलेली, रिक्त झालेली पानं निसर्गनियमानुसार गळत असतात. पण गळताना ती पानगळखुणा मागे ठेवतात. तिथून पुन्हा नवी पानं फुटतात. झाडाचा बुंधा वरून कणखर दिसतो. शांत उभा असतो. पण त्याच्या आत कित्येक जन्मांचे आर्त संचितासारखे साठलेले असते. ते नव्या पानांच्या रूपात उगवून येत राहाते. आर्त म्हणजे दुःख. त्यात अत्यंतिक तीव्रतेनं काही हवं असणं ही अर्थछटाही मिसळलेली आहे... आपल्या आतही असं बरंच काही असतं. ते व्यक्त होण्यासाठी आसुसलेलं असतं. धीटपणानं ओठ उघडून त्याला वाट करून द्यावी. गळून पडलेल्या पानांच्या जागी नवी पानं फुटतात. तसे आपण काही बोलत.. लिहीत गेलो की एका शब्दामागून दुसरे शब्द उमटत राहतात. त्यासाठी प्रयत्नशील राहायला हवं. खाली पाणी असतंच.. तसं आत गाणंही असतंच..!
पुढे म्हटलंय-   

‘मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.’

आपल्या मनाची आणखी एक चालाखी असते. प्रयत्न करताना थकून थांबण्याऐवजी, निराश होण्याऐवजी ते आपल्यात काही कमी आहे हेच मान्य करत नाही. ‘झाकली मूठ सव्वालाखाची’ अशी समजूत करून घेतं. आणि आहे तिथं थांबून राहातं. कविता मनाची ही पळवाट शोधून काढते आणि प्रश्न विचारते की मूठ न उघडताच ती भरलेली आहे असं का म्हणायचं? मूठ उघडून स्वच्छ पाहावं. तिचं रितेपण स्वीकारावं... याचा सूचितार्थ असा की स्वतःचा शोध घ्यावा, स्वतःतल्या उणीवा समजून घ्याव्यात. त्यांचा स्वीकार करावा. आणि त्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील व्हावं. स्वतःत खोल उतरून पाहावं. तिथं क्षमातांनी भरलेली ‘तळी’ दिसतील. त्या सूप्त रूपात असलेल्या क्षमताना जाग आणावी. आपली रिती ओंजळ भरून घ्यावी. रितेपणाची, उणीवांची जाणीव झाली तरच त्या भरून काढण्याचे प्रयत्न केले जातात.
शेवटच्या कडव्यात म्हटलं आहे-

‘झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे !’

झरा लागेलच... आणखी थोडंसंच खोदायला हवंय... जे मिळवायचंय ते यश पूर्ण क्षमतांनिशी केलेल्या प्रयत्नांमुळेच मिळतं. या प्रयत्नांसाठी लागणार्‍या क्षमता आपल्या आत असतात. त्या सूप्त क्षमता रित्या ओंजळीत घेऊन त्यांचा वापर करावा... हे सगळं केवळ एखाद्या विशिष्ठ साध्यापुरतं नाही. एकूण जगण्याशीच या सगळ्याचा संबंध जोडत कवितेत शेवटी म्हटलं आहे की उमेदीनं जगण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर हे ‘बळ’ लागत असतं...!

ही कविता अशा प्रकारे समजून घेता येईल... पण एखादी कविता अशी समजावून सांगणं म्हणजे घास भरवण्यासारखं आहे. कवितेचा आस्वाद आपला आपण घेता यायला हवा. मात्र त्यासाठी कविता या साहित्य-प्रकाराची पुरेशी ओळख व्हायला हवी. या निमित्तानं याच कवितेचा आधार घेत तेही पाहूया..

कवितेचं वेगळेपण

कथा, कादंबरी, ललित लेख, नाटक.. हे साहित्यप्रकार आणि कविता यात महत्त्वाचे तीन फरक आहेत. १- कविता अल्पाक्षरी असते, २- ती प्रतिमांच्या भाषेत बोलते आणि ३- तिला तिची अशी एक लय असते.

लयसौंदर्य-

लयीनुसार छंदोबद्ध, मुक्तछंद, वृत्तबद्ध.. असे प्रकार मानता येतात. ‘खोद आणखी थोडेसे’ ही कविता अष्टाक्षरी छंदात आहे. या छंदात प्रत्येक ओळीत आठ अक्षरं असतात. दुसर्‍या आणि चौथ्या ओळीत यमक जुळावं लागतं. यमक म्हणजे त्या ओळींच्या शेवटी समान अक्षर यावे. उदा. आपल्या कवितेतलं कोणतंही कडवं पाहा. कडवं म्हणजे ठराविक ओळींचा अर्थपूर्ण गट. पहिल्या कडव्यात पाणी – नाणी, दुसर्‍यात मनी – पानी, तिसर्‍यात भरलेली – तळी आणि चौथ्यात जरासे – थोडेसे असे यमक आहे.  ली – ळी किंवा नी – णी असे यमक चालते. कधी कधी इकारान्त, उकारान्त... असे यमक जुळले तरी चालते. याला स्वरयमक म्हणतात. कवितांमधे असे यमक क्वचित येते. अष्टाक्षरी छंदाची स्वतःची अशी एक लय असते. केवळ नियम पाळून ती साधेल असं नाही. कविता लिहितानाच ती लय मनात असावी लागते. या छंदाचे आणखीही बारकावे आहेत. ते सरावाने किंवा अधिक अभ्यासाने लक्षात येतील.

अष्टाक्षरी या छंदाशिवाय षडाक्षरी, ओवी, अभंग.. असे बरेच छंद आहेत. भुजंगप्रयात, मंदाक्रांता, पृथ्वी... अशी अनेकानेक वृत्तही आहेत. वृत्तबद्ध कवितांचे एक वेगळे सौंदर्य असते. पण त्या वृत्तांच्या नियमांना बांधिल असतात. वृत्तबद्ध, छंदोबद्ध कविता संगीत देऊन चालीत म्हणता येतात. शब्दांच्या ‘नाद’ या आयामामुळे कवितेला लयसौंदर्य प्राप्त होते. तर मुक्तछंद कवितेत नियमांचे बंधन नसल्यामुळे आशय मुक्तपणे प्रवाहित होतो. पण या कवितांनाही आशयाची मुक्त लय असते. त्यामुळेच गद्य आणि काव्य यात फरक करता येतो.

अल्पाक्षर रमणीयत्व-

कविता साररूपात व्यक्त होते. ती आशयाचा तपशील सांगत नाही. संदर्भ देत नाही. ‘गागर में सागर’ असे तिचे स्वरूप असते. संदर्भ नसल्यामुळे ती एकाची, एकासाठी राहात नाही. सर्वांना आपल्याचसाठी लिहिलीय असं वाटतं. ‘मला अगदी असंच म्हणायचं होतं’ असं वाचकाला वाटतं ते कवितेचं यश असतं. कविता रसिकांपर्यंत पोचल्याची ती पावती असते. हे अल्पाक्षर रमणीयत्व कवितेचं सौंदर्य वाढवणारं वैशिष्ट्य आहे.

प्रतिमा-वैभव-

कवितांमधल्या प्रतिमा हे कवितेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. प्रतिमांमुळे कविता केवळ कवीमनातल्या आशयाशी बांधलेली राहात नाही. कॅलिडोस्कोप फिरवावा तशी आतली नक्षी बदलत राहाते तसे वाचकाच्या दृष्टीकोनानुसार प्रतिमांचे अर्थ बदलतात. त्यामुळे कविता अनेकार्थी होते. आणि गंमत म्हणजे प्रत्येक अर्थ बरोबर ठरू शकतो. म्हणूनच कवितेला व्दीज- दोनदा जन्मणारी असं म्हटलं जातं. प्रथम ती कवीमनात जन्म घेते. लिहून हातावेगळी झाली की ती कवीची राहात नाही. रसिकांची होते. आस्वाद-प्रक्रियेत तिचा वेगळा अर्थ लावला जातो तेव्हा तो तिचा पुनर्जन्म असतो. हे प्रतिमांमुळे शक्य होते. ‘खोद आणखी थोडेसे’ ही कविता समजून घेताना आपण त्यातल्या प्रतिमांचा अर्थ उलगडून पाहिला. पण त्यातून आणखी वेगळे अर्थही निघू शकतील. चांगल्या कवितेविषयी माझ्या एका कवितेत शेवटी मी म्हटलं आहे-

‘शब्दांचे बोट धरून निघालेल्या प्रत्येकाला
लागू नये एकाच अर्थाचे गाव
कवितेला तर नाहीच
कवितेखालीही नसावे कुणाचे नाव..!’

इथे नाव नसावे म्हणताना तिचा आशय केवळ कवितेच्या किंवा कवीच्या नावाशी बांधलेला नसावा असं म्हणायचं आहे. नावांच्या संदर्भांमधे कविता अडकली की मर्यादित होते. त्या दिशेनंच अर्थ लावला जातो. व्यवहारासाठी ही नावं आली तरी कविता समजून घेताना फक्त हेच संदर्भ धरून ठेवू नयेत.

कवितेतली सर्वनामंही प्रतिमांसारखी असतात. कवितेतला मी, तू, तो, ती म्हणजे कोणी विशिष्ठ व्यक्ती नसतात. आपण त्यांचे अर्थ लावू त्यानुसार कवितेचा परीघ बदलतो. ‘खोद आणखी थोडेसे..’ या कवितेत तर सर्वनामंच नाहीत. ही कविता कवीनं कुणा एकाला उद्देशून लिहिलेली नाही. हे आतून उमगलेलं शहाणपण स्वतःलाच समजावलेलं असू शकतं. किंवा वाचकाला ती आपल्याला उद्देशून लिहिलीय असं वाटू शकतं.

शब्दांची निवड-

कविता-निर्मिती आणि आस्वाद या दोन्ही प्रक्रियांमधे कवितेतल्या शब्दांची निवड हा महत्त्वाचा मुद्दा असतो. कविता लिहिताना शब्दांची निवड होते तेव्हा नेमकं काय म्हणायचं आहे ते निश्चित करावं लागतं. उदाहरणार्थ वाईट वाटलं असं म्हणायचंय. तर नेमकं किती, का, कशामुळे वाईट वाटलं हे नेमकेपणानं सांगणारा शब्द मिळायाला हवा. वाईट वाटण्याच्या अनेक अर्थछटा असू शकतात. त्यातली आपल्याला कोणती अभिप्रेत आहे हे आधी समजून घ्यावं लागतं. मग त्यानुसार शब्द निवडावा लागतो. या प्रक्रियेत भावनेकडून शब्दाकडे प्रवास होत असतो. हा प्रवास म्हणजे एकप्रकारे स्वतःला तपासणं असतं. स्वतःला समजून घेणं असतं. तो स्वतःचा शोध असतो... स्वतःचं अनावरण असतं..!

कवितेचा आस्वाद-

कवितेतली शब्दयोजना समजून घेताना उलट दिशेनं प्रवास होतो. आपण शब्दाकडून भावनेकडे जातो. शब्दाच्या आधारे आपण भावनेचा पोत समजून घ्यायचा प्रयत्न करतो. ही प्रक्रियाही एकप्रकारे स्वतःला समजून घेणारी, स्वतःचं अनावरण करणारी असते. कारण त्या भावनेशी आपण स्वतःला जोडून घेत असतो. चित्रपटातला एखादा करूण प्रसंग पाहताना आपल्याला रडू येतं कारण तो पाहताना आपण त्याच्याशी एकरूप झालेले असतो. कविता समजून घेताना असंच घडतं. घडायला हवं. नुसते शब्द वाचून, त्यांचे अर्थ माहिती होण्यातून कविता समजत नाही. त्या शब्दांमागच्या भावनेशी एकरूप होता आलं तर ती समजते.. भावते..!

माणसासारखी कवितेचीही एक देहबोली असते. उद्‍गार चिन्ह, प्रश्नचिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, दोन ओळींच्या मधली रिकामी जागा आणि प्रत्येक ओळीचा थांबा... या प्रत्येक घटकातून कविता काही सांगत असते. शब्दांच्या बरोबरीनं कवितेचे हे सर्व ‘हावभाव’ आणि तिचं मौनही बोलत असतं. कवितेचा आस्वाद घेणं म्हणजे कवीनं रचलेला शब्द.. चिन्ह.. मौन यांचा व्यूह भेदत आत शिरणं..!

विविध अंगांनी थोडक्यात कवितेचं स्वरूप समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तिचा आस्वाद कसा घ्यायचा हेही सूचित केलं आहे. आता या समजुतीच्या प्रकाशात अभ्यासाला नेमलेल्या इतर कविताही समजून घेता येतात का हे तुम्हाला पाहता येईल. मग अभ्यासक्रमाच्या बाहेरच्या कवितांचाही आस्वाद घेता येईल. त्यासाठी शुभेच्छा देताना याच कवितेच्या ओळींमधे जरा बदल करून म्हणते-

खोद आणखी थोडेसे
खाली असतो आशय..
कवितेच्या हृदयात
स्थान मिळू दे अक्षय..!

आसावरी काकडे
५.८.२०१८


पाठ्यपुस्तक मंडळाचे मुखपत्र- ‘शिक्षण संक्रमण’ ऑक्टोबर २०१८ 


Monday, 6 August 2018

‘कतरा’विषयी

एखादा शब्द त्याच्या भोवतीच्या विशेष अर्थ-वलयामुळे आपल्या मनात रुजतो. त्याला आपल्या मनातले संदर्भ बिलगतात आणि तो खास आपला होऊन जातो. मराठीत न रुळलेला, खणखणीत उर्दूच असलेला कतरा (थेंब) हा शब्द सुप्रियाताईंनी असा आपलासा करून घेऊन कवितासंग्रहाचं शीर्षक म्हणून योजलेला आहे. काव्यसागरात आपल्या कवितेची चिमुकली नाव घालताना त्या अथांगातल्या एका इवल्या थेंबासारखी आपली कविता असणार आहे याची त्यांना जाणीव आहे. ‘कतरा’ हे शीर्षक या जाणिवेचा निर्देश करणारं आहे.

पण आकारानं लाहान असला तरी हा कवितेचा थेंब संपृक्त आहे, भोगलेल्या आयुष्याकडे अलिप्तपणे पाहातो आहे. या संग्रहातल्या शीर्षक कवितेत सुप्रियाताईंनी रसिकांकडून अपेक्षा व्यक्त करताना सार्थपणे म्हटले आहे, ‘या थेंबाची वाट पाहात / सागरही थांबावा / क्षण दोन क्षण....’.. थेंब असण्याची नम्र जाणीव आणि तो संपृक्त असण्याचा अलिप्त विश्वास हे सगळं या शीर्षकातून त्यांना सुचवायचं आहे.

या संग्रहातल्या कविता आपल्या भोवतीच्या परिघातले भावकल्लोळ व्यक्त करणार्‍या आहेत. संयत आणि प्रामाणिक आहेत. गंगा यमुना... कृष्णा कावेरी..  सारखे मोठे जलाशय दिमाखात आपल्या जागी असतात. पण छोट्या तहानेसाठी जागोजाग छोट्या पाणपोया असाव्या लागतात. व्यक्त होण्याची तहान भागवणारा हा ‘कतरा’ रसिकांची तहान भागवणारी पाणपोई ठरो ही हार्दिक शुभेच्छा..!

आसावरी काकडे
२८.६.२०१८

Tuesday, 8 May 2018

परतून आलेले आभाळ

आयुष्यात काही माणसं अचानक भेटतात आणि आपल्या असण्याचा भाग बनून जातात. बघता बघता इतकी जवळीक निर्माण होते की यांच्याशिवाय आपण इतके दिवस कसे जगत होतो असं वाटावं... आणि जर आधीचंच गाढ जिवलग असलेलं कुणी दीर्घ दुराव्यानंतर अचानक भेटलं तर?... त्या नात्याला पुनर्स्थापित व्हायला कितीसा वेळ लागणार?... सुनीता टिल्लू आपल्या कविता घेऊन आमच्या घरी आल्या तेव्हा उपचाराचं बोलणं झाल्यावर त्यांनी आपल्या कवितांच्या अशा पुनर्स्थापित नात्याबद्दल विस्तारानं सांगितलं. ऐकताना मीही त्या नात्यात गुरफटत गेले... कवितांची फाईल माझ्या हाती देऊन त्या गेल्यावर सर्व कविता मी उत्सुकतेनं वाचून काढल्या. बराच वेळ कविता हा विषय मानात रेंगाळत राहिला.

सुनीताताईंच्या या कविता आता ‘परतून आलेले आभाळ’ या नावानं संग्रहरूपात प्रकाशित होत आहेत. हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह. या संग्रहाच्या मनोगतात त्यांनी कवितेशी असलेल्या त्यांच्या नात्याविषयी फार छान लिहिलंय. त्या म्हणतात, ‘कविता म्हणजे मला एक आत्मसंवाद वाटतो. भोवतालातून मनाच्या अंतःस्तरापर्यंत पोचणार्‍या अनुभवाचा कवी आपल्या व्यक्तीमत्वाच्या स्वभावधर्मानुसार अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. जे उमगतं ते सौंदर्यपूर्ण शब्दात मांडतो. ते स्वतःच स्वतःला सांगणं असतं...’ हे मनोगत सविस्तर आणि इतकं छान झालंय की खरं तर या संग्रहाला आणखी कुणाच्या प्रस्तावनेची गरजच नाही..! पण आपली कविता दुसर्‍यांना कशी दिसते, कशी वाटते, कशी पोचते दुसर्‍यांपर्यंत हे जाणण्याची कवीला ओढ असते. स्वांतःसुखाय लिहिलेल्या कविता संग्रहरूपात प्रकाशित करण्यात हीच तर प्रेरणा असते. रसिकांची दाद मिळाली की खर्‍या अर्थानं कवितेच्या जन्माचं सार्थक होतं. प्रस्तावना म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपातली पहिली दाद...! ती द्यायची संधी मी घेते आहे.

सामान्यतः माणसाच्या जगण्याच्या परीघात आपल्या भोवतीचा निसर्ग, सामाजिक वास्तव आणि नातेसंबंध हे घटक असतात. जगताना येणारे अनेकविध अनुभव याच परीघातले असतात. संवेदनशील कवीला त्यातून कवितांचे विषय भेटतात. ‘परतून आलेले आभाळ’ या कवितासंग्रहात हे नेहमीचे विषय आहेतच. पण सुनीताताई कवितेइतक्याच कविता-प्रक्रियेच्या प्रेमात पडलेल्या आहेत. त्यामुळे कविता हाही त्यांच्या बर्‍याच कवितांचा विषय झालेला आहे.

कवितांविषयी लिहिताना सोयीसाठी त्यांचे विषयानुसार वर्गीकरण केले तरी प्रत्यक्षात कविता ठोसपणे एकरंगी असत नाही. बर्‍याच वेळा कवितेत विषयांचे एकजिनसी मिश्रण झालेले असते. भावना शब्दांमधे व्यक्त होतात पण त्यांचा पोत आणि त्यांचा पैस प्रतिमांच्या माध्यमातून साकारला जातो. उदाहरण म्हणून या संग्रहातली ‘अनावर’ ही कविता पाहण्यासारखी आहे. या कवितेत त्यांनी म्हटलंय,

‘बाहेर सुंदर पाऊस
नजर खिळवून टाकणारा... 
आर पार पाऊस
वाटते.. हळुवार कवेत घ्यावा
रक्तात जिरवून टाकावा..
किती अनावर सुचतोय पाऊस आभाळाला..
कधी कधी असेच अनावर सुचत जाते
सारे बांध तोडून पुराचा लोट फुटावा तसे
किती आवरावे.. किती पकडावे...’

कवयित्रीला कवितेच्या निर्मिती-प्रक्रियेविषयी काही म्हणायचं आहे. ते सांगण्यासाठी प्रतिमेच्या स्वरूपात इथं निसर्ग आलाय..!

‘हेतू’ ही मला आवडलेली आणखी एक कविता. या कवितेत निसर्ग एका अमूर्त नात्याच्या हातात हात घालून आला आहे. ही कविता अशी-

‘संध्या वेडी
चंद्रासाठी
झुरताना ये तू
घेऊन हृदयी
गंधित हळवे आतुर हेतू

दुपारचे उन्ह
उष्ण हसू
खुलताना ये तू
घेऊन हृदयी
लाल लाल गुलमोहर हेतू

भल्या पहाटे
दवात पाने
भिजताना ये तू
घेऊन हृदयी
गवती हिरवे चंचल हेतू..!’

कवितेत येणारं ‘तू’ हे सर्वनाम गणितातल्या ‘क्ष’सारखं असतं. वाचक ‘तू’ ला जे रूप देईल त्यानुसार कवितेचा पैस बदलत राहतो. ‘हेतू’ कवितेतला तू असाच अमूर्त आहे.

‘रस्ते... आत वळलेले’ ही एक छान जमून गेलेली कविता.. ती पूर्ण वाचून स्वतः अनुभवण्यासारखी आहे. त्यावर कोणतेही भाष्य नको. या कवितेत म्हटलंय,

‘आसपास एखादे जलाशय असावे
तशी हवेत शीतळता
एखाद्या हळुवार गाण्याची धून
मिटत मिटत जावी
तसा झुरमुरता प्रकाश
अन मला स्वच्छ दिसले
तुझ्या डोळ्यातील मोकळे अनाग्रही
समजुतदार रस्ते...

बघता बघता माझी पावलेही पडू लागली
जिथे पोचायचे तिथूनच
निघाल्यासारखी निर्भर...
कुठवर येऊन पोचले मी
हे शोधायचेच नव्हते मला....
.....’
कवितेचा शेवट चुकवू नये असा आहे. पूर्ण कविता वाचत वाचत वाचकांनी या आत वळलेल्या रस्त्यावर पोचावे..!

सामाजिक आशय प्रभावीपणे व्यक्त करणारी ‘दगडी गाभारा’ ही या संग्रहातील उल्लेखनीय कविता. या कवितेत कवयित्रीने देवीला जाब विचारला आहे...

‘लफ्फेदार पैठणीच्या
निर्‍या सांभाळत
भरलेल्या ओट्यांनी फुगलेला
पदर सावरत
भक्तांनी केलेला जयजयकार ऐकत
इथे गाभार्‍यातच उभी राहाणार आहेस
का......?

की या भक्तांनीच
दगडी करून टाकलेयत तुझे पाय
युगानुयुगांच्या मागण्यांनी
त्रिभुवनात गाजवत ठेवला
तुझा महिमा
तू या दगडी गाभार्‍यातच
अडकून पडावेस म्हणून?
.....’

स्त्रीच्या रक्षणार्थ माणसांनी केलेले उपाय पुरे पडणारे वाटत नाहीएत. म्हणून  कवितेत शेवटी देवीला दगडी गाभार्‍यातून बाहेर पडण्याचे आवाहन कवयित्रीने केलेले आहे...!

याशिवाय ‘ओठ घट्ट मिटून’, ‘तिसरी घंटा’, ‘वाळवंट’, ‘काळोख’, ‘मन्वंतर’, ‘तिच्या आखेरच्या वाटेवर’, ‘आजी झालेले जंगल’, ‘हेच घेते मागून’... अशा आणखी काही उल्लेखनीय कविता या संग्रहात आहेत.

‘परतून आलेले आभाळ’ या कवितासंग्रहाच्या निमित्ताने सुनीताताईंना शुभेच्छा देताना म्हणावसं वाटतं- त्यांना या आभाळाची सोबत अखंड मिळावी आणि या आभाळाला अनावर सुचत राहावा पाऊस...!

आसावरी काकडे
८ मे २०१८